भारतातील जी 20 शिखर परिषदेशी संबंधित 4 प्रकाशनांचे केले अनावरण
"युवा पिढीचा सहभाग असेल तर असे मोठे कार्यक्रम निश्चितच यशस्वी होतात"
"गेल्या 30 दिवसांत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व घडामोडी दिसून आल्या,भारताची कामगिरी अतुल्य आहे"
"नवी दिल्ली घोषणापत्रावरची सर्वसहमती जगभरातील माध्यमांची ठळक बातमी ठरली"
"दृढ राजनैतिक प्रयत्नांमुळे, भारताला नवीन संधी, नवीन मित्र आणि नवीन बाजारपेठा मिळत आहे, तरुणांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत"
"भारताने जी 20 ला जनसंचालित राष्ट्रीय चळवळ बनवले"
"आज प्रामाणिक व्यक्तींचा सन्मान केला जातो तर बेईमानांवर कारवाई केली जात आहे"
"देशाच्या विकासयात्रेसाठी स्वच्छ, स्पष्ट आणि स्थिर शासन अनिवार्य आहे"
"भारतातील तरुण हीच माझी ताकद आहे"
"मित्रांनो,चला माझ्यासोबत, मी तुम्हाला आमंत्रित करतो,25 वर्षे आपल्यासमोर आहेत, 100 वर्षांपूर्वी आपल्या नेत्यांनी स्वराज्यासाठी मार्गक्रमण केले,आपण समृद्धीसाठी करूया"

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे  जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे  भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे  संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.

 

जी 20 शिखर परिषदेदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी भारत मंडपम येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या कार्यक्रमांचे  स्मरण करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.  दोन आठवड्यांपूर्वी येथे महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्याचे त्यांनी नमूद केले.  तेच ठिकाण आज भारताच्या भविष्याचे  साक्षीदार ठरत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  जी 20 सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनांचा  दर्जा भारताने उंचावला आहे आणि जग त्यामुळे  अत्यंत आश्चर्यचकित झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  मात्र आपण यामुळे चकित झालो नाही कारण  देशातील आश्वासक युवा पिढीने या कार्यक्रमाला स्वतःशी जोडले होते.   "युवा पिढी जेव्हा अशा मोठ्या प्रमाणावरच्या कार्यक्रमांशी  स्वतःला जोडते तेव्हा असे कार्यक्रम यशस्वी होणे निश्चित असते,''असे पंतप्रधानांनी सांगितले.  पंतप्रधान मोदी यांनी  भारतातील यशाचे  श्रेय देशाच्या युवा उर्जेला दिले.

 

भारत घडामोडींचे ठिकाण होत चालला आहे असे  पंतप्रधान म्हणाले. गेल्या 30 दिवसांमधल्या घडामोडींवरून हे  दिसून येत असल्याचे ते म्हणाले.  गेल्या 30 दिवसांमधल्या घडामोडींना त्यांनी उजाळा दिला. सुरुवातीला  पंतप्रधानांनी यशस्वी चांद्रयान मोहिमेची आठवण करून दिली. तेव्हा संपूर्ण जगात नाद गुंजत होता, ‘इंडिया इज ऑन द मून'. “23 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून अमर झाला  आहे”,असे ते म्हणाले. हे यश कायम राखत भारताने आपल्या  सौर मोहिमेचा यशस्वी प्रारंभ केला.  अंतराळात चांद्रयानने 3 लाख किलोमीटरचे  अंतर पार केले  आणि सौरयान  15 लाख किलोमीटरचे अंतर कापेल  . “भारताने घेतलेली झेप अतुलनीय आहे'',असे  ते म्हणाले.

गेल्या 30 दिवसात भारताच्या मुत्सद्देगिरीने नवीन उंची गाठली असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जी 20 च्या आधी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ब्रिक्स  शिखर परिषदेचा  त्यांनी उल्लेख केला. या परिषदेत  भारताच्या प्रयत्नाने सहा नवीन राष्ट्रांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेनंतर, पंतप्रधानांनी आपल्या ग्रीस दौऱ्याचा  उल्लेख केला.  गेल्या  चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ग्रीस दौरा होता. जी 20 शिखर परिषदेपूर्वी इंडोनेशियामध्ये अनेक जागतिक नेत्यांच्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला.

 

जगाच्या कल्याणासाठी याच भारत मंडपम मध्ये घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर अधिक भर देत, पंतप्रधानांनी ही बाब अधोरेखित केली की जागतिकदृष्ट्या ध्रुवीकरण झालेल्या सध्याच्या वातावरणात सर्व सदस्य देशांना एकाच मंचावर आणण्यासाठी सामायिक कारण शोधणे ही भारत सरकारची मोठी कामगिरी होती. “एकमताने संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाला आहे,” असे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की भारत अनेक महत्त्वाचे उपक्रम तसेच परिणाम यांच्यासाठी प्रेरक ठरला आहे. 21व्या शतकाची दिशा संपूर्णपणे बदलण्याची क्षमता असणाऱ्या जी-20 च्या परिवर्तनात्मक  निर्णयांबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकी महासंघाचा जी-20 मध्ये स्थायी सदस्य म्हणून समावेश, भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय जैवइंधन आघाडी तसेच भारत मध्यपूर्व युरोपियन मार्गिका इत्यादींचा उल्लेख केला. 

जी-20 शिखर परिषद संपल्यानंतर लगेचच सौदी अरेबियाच्या राजकुमारांचा भारत दौरा झाला आणि आता सौदी अरेबिया भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. गेल्या 30 दिवसांमध्ये आपण 85 जागतिक नेत्यांच्या भेटी घेऊन जवळजवळ अर्ध्या जगाचा समावेश असलेल्या भागापर्यंत पोहोचलो अशी माहिती त्यांनी दिली. भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मानचित्राचे लाभ विषद करताना, पंतप्रधान म्हणाले की यामुळे भारताला नव्या संधी, नवे मित्र  आणि नव्या बाजारपेठा मिळत असून त्यातून देशातील युवकांना नव्या संधी प्राप्त होत आहेत.

 

अनुसूचित जाती आणि अनुसुधीत जमाती, इतर मागासवर्गीय समुदाय तसेच देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा उल्लेख केला . ते म्हणाले विश्वकर्मा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आलेल्या या योजनेमुळे कारागीर, शिल्पकार तसेच पारंपरिक कामगारांना मोठा लाभ होणार आहे असे ते म्हणाले. देशातील 10 लाखांहून अधिक तरुण मुला-मुलींना केंद्र सरकारमधील नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे देण्यासाठी आयोजित रोजगार मेळाव्यांचा देखील त्यांनी उल्लेख केला. या रोजगार मेळाव्यांच्या आयोजनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  नारीशक्ती वंदन अधिनियम हे नव्या संसद भवनात पार पडलेल्या उद्घाटनपर सत्रामध्ये संमत झालेले पहिले विधेयक आहे याचा देखील उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या संदर्भातील अलीकडच्या घडामोडींवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी देशातील बॅटरी उर्जा साठवण प्रणालीला अधिक सक्षम करण्यासाठी नवी योजना मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख केला. इतर अनेक घडामोडींसह, पंतप्रधान मोदी यांनी द्वारका येथील यशोभूमी कन्व्हेन्शन केंद्राचे उद्घाटन; वाराणसी येथे नव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमची पायाभरणी तसेच 9 वंदे भारत गाड्यांच्या परीचालनाची सुरुवात इत्यादींचे स्मरण केले. मध्य प्रदेशात नवीकरणीय उर्जेवर आधारित आयटी पार्कसह तेलशुद्धीकरण केंद्रात पेट्रोकेमिकल संकुल आणि मध्य प्रदेशात सहा नव्या औद्योगिक क्षेत्रांची सुरुवात या उपक्रमांची देखील त्यांनी माहिती दिली. “या सर्व घडामोडी रोजगार निर्मितीशी जोडलेल्या आहेत तसेच त्या युवा वर्गाच्या कौशल्यात वाढ करणाऱ्या आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जेथे आशावाद, संधी आणि खुलेपणा असतो तेथे युवा वर्ग प्रगती करतो असे पंतप्रधानांनी सांगितले. तरुणांनी व्यापक प्रमाणात विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. “तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे अशी कोणतीही कामगिरी नाही आणि प्रत्येक ठिकाणी देश तुमच्या मागे भक्कम उभा आहे,” असे ते म्हणाले. कोणतीही सफलता आणि दैनंदिन जीवनातील एखादे काम महत्त्वाच्या टप्प्यात रुपांतरीत होताना केले जाणारे प्रयत्न लहान मानू नये 

हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी जी-20 शिखर परिषदेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की ही परिषद म्हणजे केवळ दिल्लीमध्ये केंद्रित सरकारी कार्यक्रम होऊ शकला असता. मात्र, त्या ऐवजी, “भारताने जी-20 परिषदेला लोकांद्वारे संचालित राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप दिले,” पंतप्रधान म्हणाले. जी-20 विद्यापीठ संपर्क कार्यक्रमात देशभरातील 100 विद्यापिठांत शिकणाऱ्या 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. केंद्र सरकारने जी-20 परिषद 5 कोटी शालेय विद्यार्थी, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांतील विद्यार्थी तसेच कौशल्य विकास संस्थांपर्यंत नेली.  “आपले लोक व्यापक विचार करतात आणि त्याहूनही अधिक मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात ,” असे पंतप्रधान म्हणाले.

अमृत काळातील आगामी 25 वर्षांचे महत्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी देश आणि युवा वर्ग या दोघांच्या दृष्टीने असलेले या कालावधीचे महत्व विशद केले. प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या एकजुटीबद्दल पंतप्रधान म्हणाले की भारत ही जगातील झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून अतिशय कमी कालावधीत  दहाव्या स्थानावरून झेप घेऊन भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी पाचवी  अर्थव्यवस्था झाली आहे. भारताबद्दल जगाला एक दृढ विश्वास असून देशात विक्रमी परकीय गुंतवणूक आहे. निर्यात, उत्पादन आणि सेवा क्षेत्र प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. केवळ पाच वर्षात भारतातील 13.5  कोटी लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर येऊन नवमध्यम वर्गात आले आहेत. भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगती विकासामध्ये नवीन गतीला चालना देत आहे. भौतिक पायाभूत सुविधांमध्ये दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

 

युवा वर्गासाठीच्या नवीन संधींबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की ई पी एफ ओ वेतनपटावर  सुमारे 5 कोटी नोंदण्या झाल्या आहेत. यापैकी साडे तीन कोटी नोंदण्या ह्या ई पी एफ ओ च्या कक्षेत अगदी पहिल्यांदाच आल्या आहेत, याचाच अर्थ असा की त्या अधिकृत मंचावर त्यांची पहिल्यांदाच नोंदणी झाली आहे.

याशिवाय देशातील स्टार्ट अप्सच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली असून  2014 नंतर स्टार्ट अप्स ची संख्या 100 वरून आजपर्यंत एक लाखांवर पोहोचली आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल हँडसेट उत्पादक देश आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत देखील 2014 च्या तुलनेत 23 पटींनी वाढ झाली आहे. मुद्रा योजना, युवा वर्गाला रोजगार निर्माता बनवत आहे, असे त्यांनी सांगितले. या योजनेत 8 कोटी नवउद्योजक तयार करण्यात आले आणि गेल्या 9 वर्षात भारतात 5 लाख सामान्य सेवा केंद्रे उघडण्यात आली.

पंतप्रधानांनी देशातील सर्व सकारात्मक विकासाचे श्रेय राजकीय स्थैर्य, योजनांमधील सुस्पष्टता आणि लोकशाही मूल्यांना दिले. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असे सांगून पंतप्रधानांनी मध्यस्थांवर नियंत्रणासाठी आणि प्रणालीतील गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञान आधारित व्यवस्था कार्यान्वित केल्याचे उदाहरण दिले.

"आज प्रामाणिक लोकांना सन्मानित केले जाते तर अप्रामाणिकांना फटकारले जाते," असे पंतप्रधान म्हणाले.

"देशाची विकासाची यात्रा सुरु राहण्यासाठी एक स्वच्छ, स्पष्ट आणि स्थिर प्रशासन आवश्यक असते" यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतातील तरुणांचा निर्धार असेल तर 2047 पर्यंत देशाला एक विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संपूर्ण जग भारताकडे एक आशास्थान म्हणून बघत आहे कारण भारत आणि त्यातील युवावर्गाची क्षमता ते ओळखू  लागले आहेत. जगाच्या प्रगतीसाठी भारताची आणि तरुणांची प्रगती अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

युवकांमधील चैतन्याच्या जोरावरच पंतप्रधान राष्ट्राच्या वतीने   वचनबद्धतेचा निर्धार करू शकतात, जेव्हा आपण भारताची भूमिका  जागतिक मंचावर  मांडतो तेव्हा भारतातील युवा वर्ग आपली प्रेरणा असतो, असे पंतप्रधान म्हणाले.  “माझी ताकद भारतातील तरुणांमध्ये आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले आणि भारतीय तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यात तरुणांनी दिलेल्या  योगदानाने प्रभावित होऊन, पंतप्रधानांनी त्यांना गांधी जयंतीच्या  एक दिवस आधी 1 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या व्यापक स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन  केले. तसेच डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबत त्यांनी दुसरे एक आवाहन केले, एका आठवड्यात किमान 7 लोकांना युपीआयचा वापर करण्याबाबत शिक्षित करावे असे त्यांनी सांगितले. त्यांचे तिसरे आवाहन  वोकल फॉर लोकलबद्दल होते .  सणांच्या काळात स्वदेशी म्हणजेच ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्यास त्यांनी सांगितले आणि स्वदेशी मूळ असलेल्या वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले.. दैनंदिन वापराच्या वस्तूंची यादी बनवून  त्यातील किती वस्तू परदेशी बनावटीच्या आहेत हे तपासण्यास त्यांनी सांगितले.आपल्याला माहित नसलेल्या अनेक परदेशी वस्तूंनी आपल्या जीवनमनावर  अतिक्रमण केले आहे आणि त्यापासून मुक्त होणे हे देश वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

वोकल फॉर लोकल’ साठी भारतातील महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर  महत्त्वपूर्ण केंद्र बनू शकतात याकडे लक्ष वेधून ,या परिसरात खादीला  फॅशन स्टेटमेंट बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी खादीचे फॅशन शो आयोजित करण्याची  आणि महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांमध्ये विश्वकर्मांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची सूचना केली. आज केलेली तीन आवाहने आजच्या तरुणाईच्या तसेच भावी पिढ्यांच्या भल्यासाठी आहेत, असे नमूद करून,  हा संकल्प घेऊन तरुण आज भारत मंडपमधून बाहेर पडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी  व्यक्त केला.

स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे आपल्याला  देशासाठी बलिदान देण्याची  संधी मिळाली नाही, मात्र आपल्याला देशासाठी जगण्याची  संधी मिळाली आहे., असे पंतप्रधान म्हणाले.  शतकापूर्वीच्या दशकातील तरुणांनी स्वातंत्र्याचे महान ध्येय निश्चित केले होते  आणि त्याच  राष्ट्रव्यापी उर्जेने देशाला वसाहतवादी शक्तींपासून मुक्त केले, असे त्यांनी सांगितले. “मित्रांनो,  माझ्यासोबत मार्गक्रमण करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो.25 वर्षे आपल्यासमोर आहेत, 100 वर्षांपूर्वी जे घडले, ते स्वराज्यासाठी लढले , आपण  समृद्धीसाठी वाटचाल करूया ,” असे आवाहन पंतप्रधानांनी तरुणांना केले.

“आत्मनिर्भर भारतने समृद्धीची नवी दारे खुली केली असून आत्मविश्‍वासाला नव्या उंचीवर नेला आहे”, असेही ते म्हणाले.भारताला पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये नेण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  “म्हणूनच  भारतमाता आणि 140 कोटी भारतीयांसाठी मला तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची गरज आहे”, असे त्यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

पार्श्वभूमी

जी 20 जन भागीदारी चळवळीत  देशभरातील विविध शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास संस्थांमधील 5 कोटींहून अधिक तरुणांचा विक्रमी सहभाग होता.जी 20 विद्यापीठ कनेक्ट हा उपक्रम भारताच्या तरुणांमध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदासंदर्भात सूक्ष्म दृष्टिकोन  निर्माण करण्याच्या आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमात देशभरातील विद्यापीठांमधील 1 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने  सुरुवातीला 75 विद्यापीठांसाठी हा उपक्रम नियोजित करण्यात आला होता , या उपक्रमाचा  अखेरीस भारतातील 101 विद्यापीठांपर्यंत त्याचा विस्तार करण्यात आला.

जी -20 विद्यापीठ कनेक्ट उपक्रमांतर्गत देशभरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात  उच्च शिक्षण संस्थांचा  मोठ्या प्रमाणात सहभाग होता .  जो उपक्रम सुरुवातीला विद्यापीठांसाठी एक कार्यक्रम म्हणून सुरू झाला होता ,त्याचा विस्तार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झपाट्याने झाला  आणि हा उपक्रम  मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला.  जी 20 विद्यापीठ  कनेक्ट अंतिम टप्प्यात  सुमारे 3,000 विद्यार्थी, प्राध्यापक गण  आणि सहभागी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते तर देशभरातील विद्यार्थी  कार्यक्रमात थेट सहभागी  झाले होते.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 
Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'I Dedicate It To Farmers Of India': PM Modi Receives FAO's Highest Honor Agricola Medal

Media Coverage

'I Dedicate It To Farmers Of India': PM Modi Receives FAO's Highest Honor Agricola Medal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting the sacred legacy of our motherland and praying for universal prosperity
May 21, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam, noting that our motherland has been the sacred land of spiritual practice and worship, as well as courage, strength, and universal welfare. Shri Modi expressed his earnest wish that this holy land of great heritage and ancient culture may always keep everyone replete with happiness and prosperity.

The Prime Minister posted on X:

"हमारी मातृभूमि साधना और उपासना के साथ-साथ साहस, शक्ति और सर्व-कल्याण की पुण्यभूमि रही है। महान विरासत और प्राचीन संस्कृति की यह पावन धरती हर किसी को सदैव सुख-समृद्धि से परिपूर्ण रखे, यही कामना है।

यस्यां पूर्वे पूर्वजना विचक्रिरे यस्यां देवा असुरानभ्यवर्तयन् ।
गवामश्वानां वयसश्च विष्ठा भगं वर्चः पृथिवी नो दधातु ।।"

May the land where our ancestors performed great and benevolent deeds, and where the gods defeated the unjust forces, that motherland, full of livestock and power, grant us vast space and prosperity.