कोविड-19 महामारी आपल्यासोबत जगभरातील सरकारांसाठी धोरण निर्मितीच्या मार्गात पूर्णपणे नवी आव्हाने घेऊन आली आहे. भारतही त्याला अपवाद नाही. लोककल्याणासाठी पुरेशी संसाधने उभी करतानाच शाश्वतता सुनिश्चित करणे हे सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक ठरले आहे.

जगासमोर उभ्या असलेल्या आर्थिक चणचणीच्या पार्श्वभूमीवर, भारतातील राज्ये मात्र, 2020-21 या आर्थिक वर्षात लक्षणीयरीत्या अधिक कर्जे घेऊ शकली, हे आपल्याला माहित आहे का? हा कदाचित तुमच्यासाठी सुखद धक्का असेल की आपली राज्ये 2020-21 मध्ये 1.06 लाख कोटी रुपये अधिकचे उभे करू शकली आहेत. स्रोतांची ही उल्लेखनीय उपलब्धता केंद्र-राज्य भागीदारीचा दृष्टीकोन ठेवल्यानेच शक्य झाली.

जेव्हा आम्ही आर्थिक पातळीवर कोविड-19चा सामना करण्याची तयारी सुरु केली, त्यावेळी आम्ही हे सुनिश्चित केले की, आमचे उपाय ‘सर्वांना एकाच फुटपट्टीत मोजणारे’ नसावेत. संघराज्य व्यवस्था असलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात राष्ट्रीय पातळीवर सुधारणांचे धोरण तयार करून, राज्यांच्या सुधारणांना प्रोत्साहन देणे हे खरोखरच आव्हानात्मक आहे. पण आमचा संघराज्य राजकीय व्यवस्थेवर विश्वास होता आणि म्हणूनच आम्ही केंद्र-राज्य भागीदारीच्या भावनेने पुढे गेलो.

मे 2020 मध्ये, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत, भारत सरकारने राज्यांना 2020-21 करिता वाढीव कर्ज घेण्याची मुभा देत असल्याची घोषणा केली. सकल राज्य उत्पन्नाच्या 2%, वाढीची अनुमती, यातील 1% विशिष्ट आर्थिक सुधारणा राबविल्यास मिळेल या अटीवर, देण्यात आली. सुधारणांसाठी अशा प्रकारची सवलत देणे हे भारतीय सार्वजनिक अर्थसहाय्य क्षेत्रात दुर्मिळच आहे. राज्यांनी, जास्तीचा निधी मिळविण्यासाठी प्रागतिक धोरणांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली. याचे परिणाम उत्साहवर्धकच नव्हते तर, सक्षम आर्थिक धोरणांना मर्यादित प्रतिसाद मिळतो, हा समजदेखील खोटा ठरवणारे होते.

ज्या चार सुधारणांशी अतिरिक्त कर्जाचा सबंध होता, (प्रत्येक सुधारणा जीडीपीच्या 0.25% शी संलग्न) त्यांची दोन महत्वाची वैशिष्ट्ये होती. पहिले, प्रत्येक सुधारणा सर्वसामान्य नागरीकांचे, विशेषतः गरिब, दुर्बळ आणि मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्याशी संबंधित होती. दुसरे म्हणजे, या सुधारणा वित्तीय शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या होत्या.

‘एक देश, एक शिधापत्रिका’ या धोरणाअंतर्गत करण्यात आलेल्या पहिल्या सुधारणेत राज्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिका, संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करणे सुनिश्चित करायचे होते. तसेच, राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये इलेक्ट्रोनिक पीओएस (Point of Sale) असेल, ही व्यवस्था सुनिश्चित करण्याची जबाबदारीही राज्यांना देण्यात आली होती. या योजनेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे, स्थलांतरित मजूर यामुळे त्यांच्या हक्काचे धान्य देशात कुठल्याही रेशन दुकानातून घेऊ शकत होते. नागरिकांना तर हा लाभ मिळालाच; त्याशिवाय, आणखी एक आर्थिक फायदा म्हणजे, या डिजिटल व्यवस्थेमुळे बोगस कार्ड आणि बनावट सदस्यांचे संपून उच्चाटन झाले. देशातल्या 17 राज्यांनी या सुधारणा पूर्ण केल्या असून, त्यामुळे त्यांना 37,600 कोटी रुपये अतिरिक्त कर्ज घेण्याची परवानगी मिळाली आहे.

दुसऱ्या सुधारणेचा उद्देश देशात व्यवसाय-उद्योग स्नेही वातावरण निर्माण करणे हा होता. त्यासाठी राज्यांनी, सात कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या व्यवसाय-सबंधित परवान्यांचे नूतनीकरण करतांना ते स्वचालित, ऑनलाईन, अधिकारांच्या मर्जीविना आणि केवळ शुल्क भरून होतील, याची दक्षता घ्यायची होती. दुसरी अपेक्षा म्हणजे, संगणकीकृत रँडम निरीक्षण करण्याच्या पद्धतीची अंमलबाजावणी तसेच, व्यावसायिकांना होणारा त्रास आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, आणखी 12 कायद्यांअंतर्गत निरीक्षणासाठी पूर्वसूचना/आगावू नोटीस देणे अनिवार्य करणे. या सुधारणा (ज्यात 19 कायद्यांचा समावेश आहे) विशेषत: सूक्ष्म आणि लघु व्यावसायिकांना मदत व्हावी म्हणून करण्यात आल्या आहेत कारण ‘इन्स्पेक्टर राज’ व्यवस्थेचा सर्वाधिक फटका याच व्यावसायिकांना बसत होता. त्याशिवाय, या सुधारणांमुळे देशात गुंतवणुकीच्या वातावरणात सुधारणा झाली, अधिक गुंतवणूक झाल्याने अर्थव्यवस्थेचा विकासही जलद होईल. 20 राज्यांनी या सुधारणा केल्या असून, त्यांना अतिरिक्त 39,521 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

15वा वित्त आयोग आणि अनेक तज्ञांनी सक्षम मालमत्ता कर प्रणालीचे महत्व अधोरेखित केले आहे. तिसऱ्या सुधारणांमध्ये राज्यांनी, शहरी भागातील अनुक्रमे मालमत्ता व्यवहार आणि तात्कालिक किमती, या विषयी स्टॅम्प ड्युटी संबंधित मार्गदर्शक तत्वे यांच्या अनुषंगाने मालमत्ता कराचे फ्लोर रेट तसेच पाणीपुरवठा आणि मलनिःस्सारण शुल्क जाहीर करणे बंधनकारक होते. यामुळे शहरी गरीब आणि मध्यम वर्गाला अधिक उत्तम सेवा, अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि प्रगतीला चालना देण्याची हमी मिळणार होती. मालमत्ता कर हा वाढत जाणारा असतो, आणि याचा सर्वात जास्त फायदा शहरी भागातील गरिबांनाच होतो. या सुधारणांमुळे, अनेकदा पगार मिळण्याला उशीर होतो अशा नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना देखील लाभ होतो. एकूण 11 राज्यांनी ह्या सुधारणा अमलात आणल्या आणि त्यांना 15,957 कोटी रुपये अधिकचे कर्ज घेण्याची मुभा देण्यात आली.

चौथी सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज पुरवठ्याऐवजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुविधा सुरु केली. यासाठी यावर्षअखेरपर्यंत पथदर्शी तत्त्वावर राज्यव्यापी योजनेची एका जिल्ह्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची आवश्यकता होती. याला सकल घरगुती उत्पादनाच्या (GSDP) 0.15% अतिरिक्त कर्जाची जोड देण्यात आली आहे. तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी कमी व्हावी आणि महसूल आणि खर्च तफावत कमी व्हावी (प्रत्येकी जीएसडीपीच्या 0.05%) यासाठी एक घटक उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे पारेषण कंपनीची आर्थिक बाजू सुधारते, जल आणि ऊर्जा संवर्धनाला चालना मिळते आणि उत्तम आर्थिक आणि तांत्रिक कामगिरीच्या माध्यमातून सेवा गुणवत्ता सुधारते. 13 राज्यांनी किमान एका घटकाची अंमलबजावणी केली आहे, तर 6 राज्यांनी डीबीटीची अंमलबजावणी केली आहे. याचा परिणाम म्हणून 13,201 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

एकूण 23 राज्यांनी 2.14 लाख कोटी रुपये कर्ज क्षमतेपैकी 1.06 लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाचा लाभ घेतला आहे. परिणामी, राज्यांना 2020-21 वर्षासाठी एकूण कर्ज घेण्याची परवानगी (सशर्त आणि बिनशर्त) प्राथमिक अंदाजानुसार जीएसडीपीच्या 4.5% होती.

आपल्यासारख्या मोठ्या देशात अनेक जटील आव्हाने असताना हा अनोखा अनुभव होता. आपण नेहमी पाहत आलो आहोत की, विविध कारणांमुळे योजना आणि सुधारणा वर्षानुवर्षे परिचालीत होत नाहीत. भूतकाळातील अनुभवांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्यांनी महामारीच्या काळात एकत्रितपणे अल्पावधीतच जनउत्साही सुधारणा घडवून आणणे सुखद प्रवास ठरला. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या आपल्या दृष्टीकोनामुळे हे शक्य झाले. या सुधारणांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुचवले की, अतिरिक्त निधीच्या लाभाशिवाय या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लागली असती.

भारताने पूर्वी सुधारणांचे ‘छुपे आणि सक्तीचे’ प्रारुप पाहिले आहे. हे नवीन प्रारुप ‘दृढनिश्चय व प्रोत्साहनपर सुधारणांचे’ आहे. कठीण काळात नागरिकांच्या कल्याणासाठी या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व राज्यांचा मी आभारी आहे. 130 कोटी भारतीयांच्या जलद विकासासाठी आपण एकत्रित काम करत राहू.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s digital economy enters mature phase as video dominates: Nielsen

Media Coverage

India’s digital economy enters mature phase as video dominates: Nielsen
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
महात्मा जोतिराव फुलेः एक प्रकाश जो भारताला अजूनही मार्ग दाखवत आहे
April 11, 2026

आज, 11 एप्रिल, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेष दिवस आहे. भारताच्या अनेक महान समाजसुधारकांपैकी एक आणि पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती आहे. यावर्षी या जयंतीदिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ होत आहे.

महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक होते. त्याबरोबरच, त्यांचे जीवन नैतिक धैर्य, निरंतर जिज्ञासा आणि सामाजिक हितासाठी अविचल वचनबद्धतेचे प्रतीक होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींसाठी त्यांचे स्मरण केले जाते. त्याच वेळी, आपल्या सांस्कृतिक प्रवासातील त्यांचे योगदान आजही देशभरातील कोट्यवधी लोकांना मिळणाऱ्या शक्तीमध्ये सामावलेले आहे, जे त्यांनी जागवलेल्या आशेमध्ये, निर्माण केलेल्या आत्मविश्वासात आणि त्यांच्या विचारांमुळे आहे.

1827 मध्ये महाराष्ट्र या महान राज्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांची अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवातीची वाटचाल सुरू झाली. परंतु, सुरुवातीच्या काळात आलेल्या या अडचणी त्यांचे शिक्षण, धैर्य किंवा समाजाप्रति असलेल्या बांधिलकीच्या आड कधीही आल्या नाहीत. आव्हाने कितीही असली तरी, त्याला तोंड देण्यासाठी माणसाने कष्ट केले पाहिजेत, ज्ञान मिळवले पाहिजे आणि काहीही न करता बसण्याऐवजी त्या आव्हानांचे निवारण केले पाहिजे हे त्यांचे वैशिष्ट्य आयुष्यभर टिकून राहिले. शालेय जीवनापासूनच तरुण जोतिराव अत्यंत जिज्ञासू होते आणि त्यांच्यात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. अनेकदा ते त्यांच्या वयातील मुलांकडून अपेक्षित असलेल्या पुस्तकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पुस्तकांचे वाचन करत असत. अनेक वर्षांनंतर याविषयी बोलताना ते म्हणाले होते, "आपण जितके जास्त प्रश्न निर्माण करू, तितके ज्ञान त्यातून बाहेर येईल". त्यांच्या बालपणापासून त्यांना लाभलेली चौकस वृत्ती त्यांच्या वाटचालीत सदैव स्थिर राहिली.

त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात, महात्मा फुले यांच्या आयुष्याचे ध्येय हे शिकणे आणि शिक्षण देणे हेच बनले होते. शिक्षण आणि ज्ञान, ही कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही, ती एक शक्ती आहे, जी सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, याची अत्यंत दुर्मिळ अशी स्पष्टता त्यांना आली होती. जेव्हा शिक्षणाचा आनंद अनेकांना नाकारला जात होता, अशा काळात, त्यांनी मुलींसाठी आणि ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, अशा सर्वांसाठी पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरू केल्या. ते म्हणत असत- “मुलांमध्ये आईच्या मार्फत होणारी कोणतीही सुधारणा, अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच, जर शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या मुलींसाठी काढल्या पाहिजेत.” त्यांनी अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी काम केले, जिथे शाळा या न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे माध्यम बनल्या.

शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आम्ही देशातल्या युवकांसाठी, संशोधन आणि नवोन्मेष, हा पाया रचण्याचा प्रयत्न गेल्या दशकभरात केला आहे. देशात एक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे युवकांना, प्रश्न विचारणे, आपल्या शंका-कुशंका सोडवण्यासाठी नवनवी क्षितिजे शोधणे आणि नवोन्मेष हे खुलेपणाने करता येईल. ज्ञान, कौशल्य आणि संधी यात गुंतवणूक करुन, भारत युवाशक्तीला समस्या सोडवणारे आणि राष्ट्रीय प्रगतीचे वाहक होण्यासाठी सक्षम बनवत आहे.

महात्मा फुले यांचे ज्ञान आणि शहाणीव यातून, त्यांची, कृषी, आरोग्य आणि ग्रामविकासाविषयीची समज विकसित झाली होती. आपले शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणारा अन्याय, आपल्या समाजाला दुर्बळ करतो आहे, असे ते नेहमी म्हणत असत. गावात असो किंवा मग शेतात, या घटकांना सामाजिक विषमतेचे चटके कसे सहन करावे, लागत आहेत, ते त्यांनी पाहिले होते. आणि म्हणूनच, त्यांनी, गरीब, वंचित आणि दुर्बळ घटकांना त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्याच वेळी, सामाजिक सौहार्द सुद्धा कायम राहील, यासाठी देखील त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

​महात्मा फुले यांनी अत्यंत महत्वाचे मत व्यक्त केले होते की, जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणूनच तर त्यांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरणार्‍या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्थापित केलेला सत्यशोधक समाज ही चळवळ आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळींपैकी एक होती . सामाजिक सुधारणा, समाजसेवा आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ही चळवळ आघाडीवर होती. ही चळवळ समाजातील महिला, युवा आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची एक ठोस प्रभावशाली अभिव्यक्ति बनली. जर समाजाने आपल्या गाभ्याशी न्याय, प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर आणि सामूहिक प्रगतीची भावना ही मूल्ये जपली तर तो समाज अधिक सक्षम होऊ शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. या चळवळीतूनही महात्मा फुले यांच्या याच विश्वासाचे प्रतिबिंब उमटले होते.

महात्मा फुले ​यांच्या वैयक्तिक जीवनातूनही आपल्याला धैर्याची शिकवण मिळते. सतत कामात गुंतून राहिलेले असणे, सातत्याने लोकांमध्ये असणे याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणामही झाला. मात्र, प्रकृतीबात अत्यंत गंभीर आव्हाने समोर असतांनाही त्यांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. अर्धांगवायूच्या गंभीर झटक्याने त्यांना असंख्य मर्यादा आल्या, पण तरीही त्यांनी आपले काम आणि आपले संकल्प साकारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे शरीर जणू त्यांची सत्त्वपरीक्षाच घेत होते, मात्र समाजाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. त्यामुळेच तर आजही लाखो लोकांसाठी, विशेषतः संघर्षातून धैर्य मिळवणाऱ्यांसाठी, महात्मा फुले यांच्या जीवनाचा हा पैलू सर्वात शक्तिशाली पैलूंपैकी एक आहे.

सावित्रीबाई फुले यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय महात्मा फुले यांचे स्मरण पूर्ण होऊच शकत नाही. त्या स्वतः आपल्या देशातील महान सुधारकांपैकी एक होत्या. भारतातील स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या आघाडीच्या महिला शिक्षिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला पुढे नेण्यात निर्णायक भूमिका बजावली होती आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मुलींना मिळवून दिली होती. महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतरही सावित्रीबाईंनी हा वसा तसाच पुढे चालू ठेवला. 1897 मध्ये प्लेगच्या साथ रोगाचा उद्रेक झालेला असताना त्यांनी बाधित रुग्णांची इतक्या समर्पण भावनेनं सेवा केली की, त्या स्वतः त्या रोगाच्या विळख्यात सापडल्या, आणि त्यातच त्यांना आपले प्राण गमावावे लागले.

आपल्या भूमीला अशा महान सुपुत्र आणि सुकन्यांचे वरदान वारंवार लाभले आहे, ज्यांनी आपले विचार, त्याग आणि कृतीद्वारे समाज अधिक बळकट केला. बाहेरून कोणीतरी बदल घडवेल म्हणून त्यांनी प्रतीक्षा केली नाही, तर ते स्वतः त्या बदलाचे उगमस्थान बनले. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून समाज सुधारणेची कळकळीची हाक नेहमीच समाजातूनच उमटली आहे, ती अशा लोकांकडून, ज्यांना समाजातील दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि नशिबाचा भाग म्हणून तो स्वीकारायला त्यांनी ठामपणे नकार दिला. महात्मा जोतिराव फुले हे अशाच एका बुलंद आवाजाचे प्रतीक होते.

मला 2022 मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते, त्यावेळी मी शहरातील महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. आता आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. अशा वेळी या सगळ्याचे पुनर्नविनिकरण अर्थात नवी मांडणी करणे हीच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाहिलेली सर्वात यथार्थ आदरांजली ठरू शकणार आहे. त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शिक्षणासारख्या विषयांप्रती आपल्या बांधिलकीची नव्याने मांडणी करत आहोत, अन्यायाप्रती आपल्या संवेदनशीलतेची पुन्हा नव्याने जाणीव करून देत आहोत आणि समाजात स्वबळावर स्वतःत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता आहे हा विश्वास नव्याने जागृत करत आहोत. नैतिक स्पष्टता आणि लोककल्याणाचा उद्देश यांची जोड मिळाल्यास, भारतातील सामुदायिक शक्ती चमत्कार घडवून आणू शकते असेच त्यांची जीवनगाथा आपल्याला सांगते. आणि म्हणूनच ते आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत. म्हणूनच त्यांचे शब्द आणि कृती यांच्यातून आजही आशेचा किरण डोकावतो. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या जन्मापासून दोनशे वर्षांनंतरही केवळ भूतकाळातील एक व्यक्तिमत्त्व नव्हे तर भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक आहेत.