“गेल्या 6-7 वर्षात भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असा विश्वास निर्माण करण्यात सरकारला यश”
"आज भ्रष्टाचारावर हल्ला करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने सुधारणा देखील केली जात आहे"
“नव भारतात नवोन्मेष, पुढाकार आणि अंमलबजावणीवर भर. भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे हे मान्य करायला आता नवा भारत तयार नाही. त्याला आपली प्रणाली पारदर्शक, प्रक्रिया कार्यक्षम आणि प्रशासन सुरळीत हवे आहे. ”
"सरकारी कार्यपद्धती सुलभ करून सामान्य लोकांच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमी करण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घेतले"
"विश्वास आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनामुळे कार्यक्षम प्रशासन आणि व्यवसाय करणे सुलभ झाले आहे"
“तंत्रज्ञान आणि सतर्कतेसह साधेपणा, स्पष्टता, प्रक्रियांमध्ये पारदर्शकता प्रतिबंधात्मक दक्षतेसाठी दीर्घकालीन लाभदायी ठरेल. यामुळे आपले काम सुलभ होईल आणि राष्ट्राची संसाधने वाचतील ”
"देश आणि देशवासियांना फसवणाऱ्या कोणासाठीही आणि कुठेही सुरक्षित ठिकाण राहणार नाही याची खातरजमा करा"
"सीव्हीसी, सीबीआय आणि इतर भ्रष्टाचारविरोधी संस्थांनी नवीन भारताच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या अशा प्रक्रिया दूर केल्या पाहिजेत"

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी आज सीव्हीसी  अर्थात केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या संयुक्त परिषदेला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले.  गुजरातमधील केवडिया येथे ही परिषद होत आहे.

सरदार पटेल यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या केवडीया इथे ही बैठक होत असून   सरदार पटेल यांनी प्रशासनात भारताची प्रगती, सार्वजनिक हित आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.  “भारत आज अमृतमहोत्सवा दरम्यान आपले भव्य लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.  आज जेव्हा आपण जनहितार्थ आणि सक्रिय प्रशासनाला बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहोत, तेव्हा हे कृती-आधारित परिश्रम सरदार साहेबांच्या आदर्शांना बळ देईल” असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय जीवनातील सर्व स्तरातून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याचे आवाहन केले.  ते म्हणाले की भ्रष्टाचार लोकांचे हक्क हिरावून घेतो. सर्वांना न्याय मिळणे आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतो तसेच राष्ट्राच्या सामूहिक शक्तीवर परिणाम करतो.

गेल्या 6-7 वर्षात भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असा विश्वास निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. मध्यस्थाशिवाय तसेच लाच न देता सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो असा विश्वास लोकांमधे निर्माण झाला आहे असे ते म्हणाले.  आता लोकांना वाटते की भ्रष्ट माणूस, कितीही ताकदवान असला, तो कुठेही गेला तरी त्याला सोडले जाणार नाही. “पूर्वी, ज्याप्रकारे सरकार आणि व्यवस्था चालवली जात होती, त्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. आज भ्रष्टाचारावर हल्ला करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने सुधारणाही होत आहेत. “आज 21 व्या शतकातील भारत आधुनिक विचारसरणीसह मानवतेच्या हितासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहे. नव भारत हा  नवोन्मेष, पुढाकार आणि अंमलबजावणीवर भर देत आहे. भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे हे मान्य करायला आता नवा भारत तयार नाही.  त्याला आपली प्रणाली पारदर्शक, प्रक्रिया कार्यक्षम आणि प्रशासन सुरळीत हवे आहे ” बदललेल्या भारताबद्दल बोलताना श्री मोदींनी याकडे लक्ष वेधले.

आधीच्या सरकारच्या जास्तीत जास्त नियंत्रण आणि जास्तीत जास्त नुकसानापासून ते किमान सरकार  जास्तीत जास्त प्रशासनाच्या सरकारच्या प्रवासाचे वर्णन करताना, पंतप्रधानांनी सरकारी प्रक्रिया सुलभ करून सामान्य लोकांच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमी करण्याचे काम कसे युद्धपातळीवर हाती घेतले हे स्पष्ट केले.  नागरिकांना सक्षम करण्यासाठी सरकारने विश्वास आणि तंत्रज्ञानावर कसा भर दिला हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.  ते म्हणाले की, हे सरकार नागरिकांवर अविश्वास दाखवत नाही आणि म्हणूनच, कागदपत्रांच्या पडताळणीचे अनेक स्तर काढून टाकण्यात आले आहेत. जन्म प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनासाठी जीवन प्रमाणपत्र यासारख्या अनेक सुविधा या तंत्रज्ञानाद्वारे आणि मध्यस्थांशिवाय वितरित केल्या जात आहेत.  क आणि ड संवर्गाच्या भरतीमध्ये मुलाखत ही पायरीच न  ठेवणे , गॅस सिलेंडर नोंदणीपासून कर  भरण्यापर्यंतच्या सेवांमध्ये ऑनलाइन आणि फेसलेस अर्थात चेह्राविरहित  प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे.

विश्वास आणि तंत्रज्ञानाच्या या दृष्टिकोनामुळे कार्यक्षम प्रशासन आणि व्यवसाय करणे सुलभ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. व्यवसायांसाठी परवानग्या आणि अनुपालनासंबंधी अनेक जुने नियम काढून टाकले गेले आहेत, त्याचबरोबर सध्याच्या आव्हानांना अनुसरून अनेक कडक कायदे आणले गेले आहेत असे त्यांनी नमूद केले. अनुपालनासंबंधीच्या अनेक अटी काढून टाकण्याचा उद्देश आहे. बहुतेक परवानग्या आणि अनुपालन फेसलेस केले आहेत. स्वयं-मूल्यांकन आणि स्वयं-घोषणेसारख्या प्रक्रियांना प्रोत्साहित केले जात आहे असे ते म्हणाले.  GeM, सरकारी ई-मार्केटप्लेस इर्थात सरकारी ई बाजारपेठेने ई-निविदेमध्ये पारदर्शकता आणली आहे.  डिजिटल नोंदी तपास सुलभ करत आहेत.  त्याचप्रमाणे, पीएम गति शक्ती राष्ट्रीय महायोजना, ही निर्णय घेण्यासंबंधित अनेक अडचणी दूर करणार आहे. विश्वास आणि तंत्रज्ञानाच्या या मोहिमेत केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेसारख्या संस्था आणि अधिकाऱ्यांवर देशाचा विश्वास असणे महत्त्वपूर्ण आहे असे  ते म्हणाले, "आपण नेहमीच राष्ट्र-प्रथम हे बोधवाक्य ठेवले पाहिजे आणि नेहमी जनहित आणि जनकल्याणाच्या कसोटीवर खरे उतरले पाहिजे" हे निकष पूर्ण करणाऱ्या ‘कर्मयोगी’ यांच्या  पाठिशी ते नेहमीच ठाम उभे राहतील असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘प्रतिबंधात्मक दक्षते’ विषयी आपले विचार मांडले.  ते म्हणाले की, सावधगिरीने प्रतिबंधात्मक दक्षता प्राप्त केली जाऊ शकते आणि तंत्रज्ञान आणि अनुभवाद्वारे बळकट केली जाऊ शकते.  तंत्रज्ञान आणि सतर्कतेसह- साधेपणा, स्पष्टता, प्रक्रियांमध्ये पारदर्शकता प्रतिबंधात्मक दक्षतेसाठी दीर्घकालीन लाभदायी ठरेल.  यामुळे आपले काम सोपे होईल आणि राष्ट्राची संसाधने वाचतील, असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कोणतीही कसर सोडू नका आणि देशाला तसेच देशवासियांना फसवणाऱ्यांना सुरक्षित ठिकाण राहणार नाही याची खातरजमा करा असे आवाहन  पंतप्रधानांनी अधिकाऱ्याना  केले.  गरीबांच्या मनातून व्यवस्थे बद्दलची भीती काढून टाका असे अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यांनी तांत्रिक आव्हाने आणि सायबर फसवणुकीबाबत काम करण्याचे आवाहन केले.

कायदे आणि कार्यपद्धती सुलभ करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या आवाहनाची आठवण करून देत, पंतप्रधानांनी नवीन भारताच्या मार्गात येणाऱ्या अशा प्रक्रिया काढून टाकाव्यात असे आवाहन केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेसह इतर भ्रष्टाचारविरोधी संस्थांना केले.  “तुम्ही भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता अर्थात जराही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही हे नव भारताचे धोरण बळकट करण्याची गरज आहे.  गरीबांना व्यवस्थेच्या जवळ आणणे आणि भ्रष्टाचारी बाहेर फेकणे ”, अशा कायद्यांची अंमलबजावणी तुम्ही करण्याची गरज आहे असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How Bhashini’s Language AI Platform Is Transforming Digital Inclusion Across India

Media Coverage

How Bhashini’s Language AI Platform Is Transforming Digital Inclusion Across India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Haryana Chief Minister meets Prime Minister
December 11, 2025

The Chief Minister of Haryana, Shri Nayab Singh Saini met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.

The PMO India handle posted on X:

“Chief Minister of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister
@narendramodi.

@cmohry”