आज भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे; आता भारत आव्हानांना थेट सामोरे जातो - पंतप्रधान
आखाती देशांपासून ते जागतिक पश्चिमेपर्यंत आणि ग्लोबल साऊथपासून ते शेजारील देशांपर्यंत, भारत सर्वांसाठी एक विश्वासार्ह भागीदार आहे - पंतप्रधान
ज्याचे मोजमाप केले जाते, त्यात सुधारणा होते आणि अखेरीस त्याचे रूपांतर होते" - पंतप्रधान
हा नवा भारत आहे, तो विकासासाठी कोणतीही कसर बाकी ठेवत नाही" - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि जग' या विषयावरील टीव्ही9 शिखर परिषदेला संबोधित केले. जगातील अभूतपूर्व आणि गंभीर परिस्थितीची दखल घेत, पंतप्रधानांनी एका अत्यंत कठीण प्रसंगी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल टीव्ही9 नेटवर्कचे कौतुक केले.

पंतप्रधान  मोदी म्हणाले, "आज जग ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहे, ती अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक आहे आणि अशा काळात टीव्ही9 नेटवर्कने विचारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ तयार केले आहे." संघर्षाने ग्रासलेल्या जगात भारताच्या स्थितीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. 2014 पूर्वीची परिस्थिती मागे टाकून देश आता नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. कोरोना महामारीपासून आव्हाने वाढत असतानाही, 140 कोटी नागरिक एकजुटीने उभे राहिले, ज्यामुळे भारत प्रत्येक संकटावर मात करू शकला, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान  मोदी यांनी अधोरेखित केले की, "28 फेब्रुवारी पासूनच्या या 23 दिवसांत भारताने आपली नातेसंबंध निर्माण करण्याची क्षमता , निर्णय घेण्याची क्षमता  आणि संकट व्यवस्थापन क्षमता  सिद्ध केली आहे."

 

विखुरलेल्या जागतिक व्यवस्थेमध्ये भारताची राजनैतिक पोहोच  या विषयावर भाष्य करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारताने आखाती देशांपासून ते 'ग्लोबल वेस्ट'पर्यंत आणि 'ग्लोबल साऊथ'पासून ते शेजारील देशांपर्यंत अभूतपूर्व संवादाचे पूल बांधले असून, स्वतःला सर्वांसाठी एक 'विश्वासार्ह भागीदार' म्हणून प्रस्थापित केले आहे. भारताच्या भूमिकेबाबत  विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की, "आम्ही भारतासोबत आहोत, भारताच्या हितासोबत आहोत, शांततेसोबत आहोत आणि संवादाच्या  बाजूने आहोत.

जागतिक पुरवठा साखळ्या डळमळीत झाल्या असतानाच्या या काळात भारताच्या 'विविधीकरण आणि लवचिकते'च्या प्रारूपावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी नमूद केले की ऊर्जा असो, खते असोत किंवा अत्यावश्यक वस्तू असोत, नागरिकांना शक्य तितक्या कमी अडचणींचा सामना करावा लागेल, याची खात्री करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. "भारताने विविधीकरण आणि लवचिकतेचे एक आदर्श प्रारूप जगासमोर मांडले आहे आणि आपल्या नागरिकांना शक्य तितक्या कमी अडचणींना सामोरे जावे लागेल, याची खात्री करणे असाच आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे," असे मोदी यांनी नमूद केले.

 

पश्चिम आशियातील संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम यावर भाष्य करताना पंतप्रधानांनी आजच दिवसाच्या सुरुवातीला लोकसभेत केलेल्या आपल्या निवेदनाचा संदर्भ दिला. त्यांनी नमूद केले की, जरी ही युद्धे भारताच्या सीमांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असली, तरी आजच्या या परस्परावलंबी जगात कोणताही देश त्यांच्या दुष्परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. "ही संयम आणि संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आहे; जेव्हा एखाद्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशवासीय एकजुटीने उभे राहतात, तेव्हा त्याचे परिणाम नेहमीच अर्थपूर्ण ठरतात," असे मोदी यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर उलथापालथी होत असल्या तरी भारताच्या विकासाची गती अखंडित राहिली आहे, या बाबीवर भर देत पंतप्रधानांनी 28 फेब्रुवारीपासूनच्या 23 दिवसांचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गिकांचे उद्घाटन, सिलचर उच्च-गती मार्गिका आणि नवीन कोटा विमानतळाचे भूमिपूजन, तसेच मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याच्या बाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या. त्यांनी 100 'प्लग-अँड-प्ले' औद्योगिक पार्कना मिळालेली मंजुरी, 1,500 मेगावॅटची नवीन क्षमता जोडण्यासाठी 'लघु जलविद्युत विकास योजने'ला मिळालेला हिरवा कंदील, 'जल जीवन मिशन'ला 2028 पर्यंत दिलेली मुदतवाढ, 'पीएम किसान सन्मान निधी' अंतर्गत ₹18,000 कोटींहून अधिक रकमेचे थेट हस्तांतरण आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी तसेच निर्यातदारांसाठी 500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मिळालेली मंजुरी—या बाबींचाही आवर्जून उल्लेख केला. "ही सर्व पावले म्हणजे 'विकसित भारत' घडवण्यासाठी देश किती वेगाने कार्यरत आहे, याचाच पुरावा आहेत," असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

 

व्यवस्थापन तत्त्वांचा आधार घेत पंतप्रधानांनी 'ज्याचे मोजमाप केले जाते, त्याचे व्यवस्थापन होते' या सुप्रसिद्ध म्हणीचा विस्तार केला आणि पुढे असेही स्पष्ट केले की, ज्या गोष्टींचे मोजमाप केले जाते, त्या सुधारतात आणि अंतिमतः त्या परिवर्तित होतात. महामार्गांच्या बांधकामाचा वेग प्रतिदिन 11–12 किमी वरून जवळपास 30 किमीवर पोहोचला आहे; जहाजांना बंदरांवर लागणारा वेळ 5–6 दिवसांवरून 2 दिवसांपेक्षाही कमी झाला आहे;  नवीन व्यवसायांच्या नोंदणीचे प्रमाण 400–500 वरून 2 लाखांच्या वर गेले आहे; एमबीबीएसच्या जागांची संख्या 50–55 हजारांवरून 1.25 लाखांच्या पुढे गेली आहे; बँक खात्यांची संख्या 25 कोटींवरून 80 कोटींपेक्षा अधिक झाली आहे (यामध्ये 55 कोटी जन धन खात्यांचा समावेश आहे); तर 70 च्या आत असलेली विमानतळांची संख्या आता 160 हून अधिक झाली असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. "आज भारत वेगवान वाटेवर आहे, आज संकल्प प्रत्यक्षात उतरत आहेत," असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या परिवर्तनात्मक बदलांवर प्रकाश टाकला. एके काळी गोळ्यांच्या आवाजाने ग्रासलेले आसाम आता एका सेमीकंडक्टर प्लांटचे केंद्र बनले असल्याचे त्यांनी नमूद केले; ओडिशामध्ये सेमीकंडक्टरपासून पेट्रोकेमिकल्सपर्यंत सर्व क्षेत्रांची वाढ होत असल्याचे दिसत आहे; बिहारमध्ये गेल्या दशकात 5 हून अधिक नवीन पूल बांधले गेले आहेत; तर उत्तर प्रदेश मोबाईल फोन उत्पादनाचे जागतिक केंद्र बनले आहे. "भारत पूर्वीच्या काळातील विकासाच्या असमतोलाचे भविष्यातील संधींमध्ये रूपांतर करत आहे," असे मोदींनी अधोरेखित केले.

 

पश्चिम बंगालबाबत बोलताना, पंतप्रधानांनी संस्कृती, शिक्षण, उद्योग आणि वाणिज्य यांचे केंद्र म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्त्व असल्याचा उल्लेख करत या राज्याच्या विकासासाठी गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारने भरीव गुंतवणूक केली असल्याचे नमूद केले. "पक्षीय हितापेक्षा राष्ट्रीय हिताला अधिक वरचे स्थान देणे गरजेचे आहे, कारण राजकारणापेक्षाही देश आणि त्याचा विकास महत्त्वाचा आहे," असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले त्या शहीद दिवसाच्या आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांची जयंती अशा ऐतिहासिक योगाचे औचित्य साधून केलेल्या आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नेहमी स्वतःपेक्षा राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या या महान व्यक्तींकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. टीव्ही9 समिटमुळे भारताचा आत्मविश्वास आणि भारतीयांवरील जगाचा विश्वास दृढ होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. "राष्ट्रहिताला सर्वोपरि ठेवण्याच्या प्रेरणेमुळे भारत विकसित आणि आत्मनिर्भर होईल," असे नमूद करत मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Government's foodgrain stocks hit 604 lakh tonnes, nearly three times buffer requirement

Media Coverage

Government's foodgrain stocks hit 604 lakh tonnes, nearly three times buffer requirement
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 मे 2026
May 07, 2026

Justice Delivered Under PM Modi: How Operation Sindoor Redefined India’s Response to Terror

Aatmanirbhar Bharat in Action: Record Exports, Defence Exports, Food Security & Green Mobility Under the Leadership of PM Modi