“महिला नैतिकता, निष्ठा, निश्चय आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असतात”
“देशाला योग्य दिशा दाखविण्यासाठी महिला सक्षम आणि समर्थ असल्या पाहिजेत असे आपल्या वेद आणि परंपरांनी म्हटले आहे”
“महिलांची प्रगती नेहमीच देशाच्या सक्षमीकरणाला बळकटी देते”
“भारताच्या विकास यात्रेत महिलांना संपूर्णपणे सहभागी करून घेण्याला आज देशाने प्राधान्य दिले आहे”
“स्टँड अप इंडिया” योजनेअंतर्गत देण्यात आलेली 80 टक्क्याहून अधिक कर्जे महिलांना देण्यात आली आहेत. तसेच मुद्रा योजनेखाली दिलेली 70 टक्के कर्जे आपल्या भगिनी आणि सुकन्यांना दिलेली आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  कच्छ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राला संबोधित केले.

कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कच्छ प्रदेशाला नारी शक्तीचे प्रतीक म्हणून एक वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे कारण अनेक शतकांपासून माता आशापुरा येथे मातृशक्तीच्या वास करत आहे असे सांगत पंतप्रधानांनी या जागेचे वैशिष्ट्य नमूद केले. “येथील महिलांनी संपूर्ण समाजाला खडतर नैसर्गिक आव्हानांना तोंड देत जगायला शिकविले, प्रत्येक परिस्थितीत लढा द्यायला आणि जिंकायला शिकविले,” ते म्हणाले. पाण्याचे संवर्धन करण्यात कच्छच्या महिलांनी निभावलेल्या भूमिकेची देखील त्यांनी प्रशंसा केली. आजचा कार्यक्रम सीमेवरील गावात आयोजित केलेला असल्यामुळे पंतप्रधानांनी येथील महिलांच्या 1971 च्या युद्धातील योगदानाचे देखील स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले की, महिला नैतिकता, निष्ठा, निश्चय आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असतात. ते म्हणाले, “आणि म्हणूनच देशाला योग्य दिशा दाखविण्यासाठी महिला सक्षम आणि समर्थ असल्या पाहिजेत असे आपल्या वेद आणि परंपरांनी म्हटले आहे.”

उत्तरेकडील मीराबाईपासून दक्षिणेकडील संत अक्का महादेवीपर्यंत भारतातील दिव्यत्व प्राप्त झालेल्या अनेक महिलांनी भक्ती चळवळीपासून ज्ञानदर्शनापर्यंत, समाजातील अनेक सुधारणा तसेच परिवर्तनाला चालना दिली आहे. त्याच धर्तीवर कच्छ आणि गुजरातच्या भूमीने सती तोरल, गंगा सती, सती लोयान, रामबाई आणि लीरबाई यांच्यासारख्या दैवी महिलांच्या वास्तव्याचा अनुभव घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पृथ्वीला माता मानणाऱ्या भारतासारख्या देशात येथील महिलांची प्रगती नेहमीच देशाच्या सक्षमीकरणाला बळकटी देते. “महिलांचे जीवनमान सुधारणे हीच आज देशाची प्राथमिकता आहे. भारताच्या विकास यात्रेत महिलांना संपूर्णपणे सहभागी करून घेण्याला आज देशाने प्राधान्य दिले आहे,” ते पुढे म्हणाले. देशातील 11 कोटी शौचालयांची उभारणी, 9 कोटी उज्ज्वला गॅस जोडण्या, 23 कोटी जन धन खाती हे उपक्रम म्हणजे महिलांना सन्मानाचे आणि सुलभ जीवन देण्याच्या हेतूने उचललेली पावले आहेत याचा त्यांनी उल्लेख केला.

देशातील महिलांना जीवनात प्रगती करणे, स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे आणि स्वतःचे काम सुरु करणे शक्य व्हावे म्हणून केंद्र सरकार त्यांना आर्थिक मदत देखील पुरवत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. “स्टँड अप इंडिया” योजनेअंतर्गत देण्यात आलेली 80 टक्क्याहून अधिक कर्जे महिलांना देण्यात आली आहेत. तसेच मुद्रा योजनेखाली दिलेली 70 टक्के कर्जे आपल्या भगिनी आणि सुकन्यांना दिलेली आहेत,” ते म्हणाले. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली 2 कोटीहून अधिक घरे महिलांच्या नावे आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे आर्थिक बाबतीत निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला आहे असे ते म्हणाले.

सरकारने महिलांना आधी देण्यात येणाऱ्या 12 आठवड्यांच्या बाळंतपणाच्या रजेत वाढ करुन आता ही रजा 26 आठवडे केली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित वाटावे यासाठी संबंधित कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. बलात्कारासारखा अतिनिंद्य गुन्हा करणाऱ्याला आता फाशीची शिक्षा देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत हे लक्षात घेऊन आता मुलींचे विवाहाचे वय वाढवून कायदेशीररीत्या 21 वर्षे करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. देश आज मुलींना सशस्त्र दलांमध्ये अधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यास प्रोत्साहन देत आहे, सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी जनतेला कुपोषणाविरुध्द देशात सुरु असलेल्या अभियानाला मदत करण्याची विनंती केली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातील महिलांच्या भूमिकेवर त्यांनी जोर दिला. ‘कन्या शिक्षा प्रवेश उत्सव अभियान’ या मोहिमेत जनसामान्यांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

‘व्होकल फॉर लोकल’ हा आता अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा झाला आहे मात्र महिला सक्षमीकरणात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असे पंतप्रधान म्हणाले. बहुतेक स्थानिक उत्पादनांची क्षमता महिलांच्याच हाती आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

भाषण संपविताना पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील संत परंपरेच्या भूमिकेबद्दल चर्चा केली आणि उपस्थितांनी कच्छच्या रणाचे सौंदर्य आणि अध्यात्मिक वैभव यांचा अनुभव घ्यावा असे आवाहन देखील केले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games

Media Coverage

Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026
September 04, 2026

Make in India, Power India, Play for India: Multi-Sector Momentum Under PM Modi’s Leadership