पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी इंदूर येथे “गोबर-धन (बायो-सीएनजी) प्रकल्पाचे ” दूरदृश्य प्रणालीव्दारे दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधानांनी अलिकडेच स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 चा प्रारंभ केला, ज्यामध्ये “कचरामुक्त शहरे” निर्माण करण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन आहे. जास्तीत जास्त संसाधने परत मिळवण्यासाठी "कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती " आणि "चक्रीय अर्थव्यवस्था" या व्यापक तत्त्वांनुसार या मिशनची अंमलबजावणी केली जात असून या दोन्ही गोष्टी इंदूरच्या बायो-सीएनजी प्रकल्पात आहेत.
वेगळ्या केलेल्या ओल्या सेंद्रिय कचऱ्यापैकी दररोज 550 टनापर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची याची क्षमता आहे. त्यातून दररोज सुमारे 17,000 किलो सीएनजी आणि 100 टन सेंद्रिय खताचे उत्पादन अपेक्षित आहे. हा प्रकल्प शून्य ‘लँडफिल मॉडेल’वर आधारित आहे, ज्याद्वारे कुठलाही कचरा शिल्लक राहणार नाही. याव्यतिरिक्त, या प्रकल्पामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात घट, सेंद्रिय खताचा वापर आणि हरित ऊर्जा सारखे अनेक पर्यावरणीय लाभ मिळू शकणार आहेत.
इंदूर महानगरपालिका (IMC) आणि इंडो एन्व्हायरो इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेड (IEISL) यांनी सार्वजनिक आणिखाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत, इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एक ‘स्पेशल पर्पज वेहिकल’ म्हणून केली असून इंडो एन्व्हायरो इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेडची 100% म्हणजे 150 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक आहे. इंदूर महानगरपालिका या प्रकल्पात तयार झालेले किमान 50% सीएनजी खरेदी करेल आणि अशा प्रकारच्या पहिल्या उपक्रमात, शहरात या सीएनजीवर 250 बसेस चालवल्या जातील. उर्वरित सीएनजी खुल्या बाजारात विकला जाईल. सेंद्रिय कंपोस्टम्हणजेच खत शेती आणि बागायती उद्देशांसाठी रासायनिक खतांऐवजी वापरण्यात येणार आहे.


