नरेंद्र मोदी

‘वसुधैव कुटुंबकम्’- या दोन शब्दांमध्ये सखोल तत्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘ हे जग म्हणजे एक कुटुंब आहे.’ हा एक सर्वसमावेशक विचार आहे जो आपल्याला सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी प्रेरित करतो. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या काळात याचे रुपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे. एक पृथ्वी म्हणून आपण सर्व आपल्या ग्रहाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र येत आहोत. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत आहोत. आणि आपण सर्व एका सामाईक भवितव्याच्या दिशेने- एका भविष्याच्या दिशेने एकत्र वाटचाल करत आहोत; जे या परस्पर-संलग्नतेच्या काळात एक सर्वमान्य सत्य आहे.

महामारी-पश्चात जगामधील देशांची स्थिती महामारीपूर्व काळापेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये इतर बदलांबरोबरच तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत.

सर्वात पहिला बदल म्हणजे आता जगाच्या जीडीपी- केंद्रित दृष्टीकोनापेक्षा मानव-केंद्रित दृष्टीकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागत आहे.

दुसरा बदल म्हणजे जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागले आहे.

तिसरा बदल म्हणजे, जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होऊ लागला आहे.

या सर्व बदलांमध्ये आमच्या जी20 अध्यक्षतेने एका उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये ज्यावेळी आम्ही इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की मानसिकतेमधील बदलाला जी20 ने चालना देण्याची गरज आहे. ग्लोबल साऊथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्या संदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. 125 देशांचा सहभाग असलेल्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेमधून घुमलेला आवाज, हा आमच्या जी20 अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता. ग्लोबल साऊथ देशांचे अभिप्राय आणि त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता.

तसेच भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत जी-20 मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला, एवढेच नव्हे तर आफ्रिकी संघातील देशांचा जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणी देखील अधिक ठामपणे मांडण्यात आली.

एकमेकांशी जोडले गेलेले आपले जग म्हणजे विविध क्षेत्रांतील आपली आव्हाने देखील एकमेकांशी जोडलेली असणे आहे.वर्ष 2030 साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे आणि अनेकांना अशी चिंता सतावते आहे की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी)प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला आहे. एसडीजी साध्य करण्याच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठीची जी-20 2023 कृती योजना यापुढील काळात एसडीजीच्या अंमलबजावणीच्या दिशेने जी-20 ची दिशा निश्चित करेल.

भारतात, निसर्गाशी एकरूप होऊन जगणे ही प्राचीन काळापासूनची सामान्य जीवनपद्धती आहे आणि आपण आधुनिक काळात देखील हवामान बदल विषयक कृतीमधील योगदानाचा आपला वाटा उचलत आहोत.

ग्लोबल साउथमधील अनेक देश सध्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि म्हणूनच हवामानबदल विषयक कृती त्यांना राबविण्यासाठी अनुकूल असली पाहिजे. हवामान बदल विषयक कृतीच्या आकांक्षा आपल्या हवामानबदल विषयक वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांच्या कृतीशी जुळल्या पाहिजेत.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला नको याबाबतीतील निव्वळ निर्बंधात्मक वृत्तीपासून दूर जाऊन, काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करुन अधिक रचनात्मक वृत्ती स्वीकारण्याची गरज आहे यावर आमचा विश्वास आहे.

शाश्वत तसेच लवचिक नील अर्थव्यवस्थेसाठी चेन्नई एचएलपीएस मध्ये आपले महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आपल्या अध्यक्षतेतून हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह, स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था उदयाला येईल.

वर्ष 2015 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली. आता, जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून आपण चक्राकार अर्थव्यवस्थेच्या फायद्याशी सुसंगत असणारे उर्जा स्थित्यंतर शक्य होण्यासाठी जगाला मदत करत आहोत.

हवामान बदल विषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून ते जीवनशैलीचे निर्णय घेऊ शकतात. ज्याप्रमाणे निरामयतेसाठी योग एक जागतिक लोकचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे आपण शाश्वत पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) ने जगाला प्रेरित केले आहे.

हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण ठरते. मिलेट्स अर्थात भरडधान्ये किंवा श्री अन्न , क्लायमेट -स्मार्ट शेतीला चालना देत यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात, भरडधान्यांना आपण जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक आव्हानांवर कृती सांगणारी 'डेक्कन हाय लेव्हल प्रिन्सिपल्स ऑन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन' ही तत्त्वेदेखील या दिशेने उपयुक्त आहेत.

तंत्रज्ञान परिवर्तनकारी आहे पण ते सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात, तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने लाभले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिले आहे

उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांसाठी , डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेद्वारे (DPI) वित्तीय समावेशन करणे शक्य आहे. आपण आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तयार केलेल्या उपायांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. आता, जी 20 च्या माध्यमातून, आम्ही विकसनशील देशांना सर्वसमावेशक विकासाची शक्ती जागृत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनुकूलनशीलता, निर्माण आणि उंचावण्यात साहाय्य करू.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. आपल्या साध्या, मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजाच्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला आपली विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे. अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांनी महिलांचा विकास, या संकल्पनेला महिलांच्या नेतृत्वाखालील विकासामध्ये परिवर्तीत केले आहे. भारताच्या जी20 अध्यक्षपदा अंतर्गत आपण लिंग आधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, कामगारांच्या सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृव आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.

भारतासाठी, जी20 अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत.

आज, मोठ्या प्रमाणावर उद्दिष्टे पूर्ण करणे हा एक गुण समजला जातो, आणि तो भारताशी संबंधित आहे. जी20 चे अध्यक्षपद, यासाठी अपवाद नाही. ही एक लोक-नेतृत्वाखालील चळवळ बनली आहे. भारताच्या विशाल भूभागावर, 60 शहरांमध्ये 200 पेक्षा जास्त बैठका आयोजित करण्यात आल्या असून, आपल्या कार्यकाळात 125 पेक्षा जास्त देशांच्या जवळजवळ 100,000 प्रतिनिधींनी या बैठकींना हजेरी लावली. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या जी 20 अध्यक्षपदा अंतर्गत एवढा विशाल आणि वैविध्यपूर्ण भूभाग व्यापला गेला नाही.

भारताची लोकसंख्या, लोकशाही, विविधता आणि विकास याविषयी दुसऱ्याकडून ऐकणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला खात्री आहे की जी 20 परिषदेत सहभागी व्हायला आलेले प्रतिनिधी याला नक्की दुजोरा देतील.

आपले जी 20 अध्यक्षपद एकमेकांना जोडण्याचा, अडथळे दूर करण्याचा, आणि जगाचे पोषण करणाऱ्या सहकार्याची बीजे रोवण्याचा प्रयत्न करते, जिथे एकता विसंवादावर विजय मिळवते, जिथे सामायिक नियती एकाकीपण दूर करते.

जी 20 चे अध्यक्ष या नात्याने आपण प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देशाचे योगदान राहील, याची खात्री करून जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा केली. आपण आपल्या प्रतिज्ञेला कृती आणि परिणामांची जोड दिली, याबद्दल मी आशावादी आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI at 10: From payments pipe to backbone of India’s digital financial ecosystem

Media Coverage

UPI at 10: From payments pipe to backbone of India’s digital financial ecosystem
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
महात्मा जोतिराव फुलेः एक प्रकाश जो भारताला अजूनही मार्ग दाखवत आहे
April 11, 2026

आज, 11 एप्रिल, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेष दिवस आहे. भारताच्या अनेक महान समाजसुधारकांपैकी एक आणि पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती आहे. यावर्षी या जयंतीदिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ होत आहे.

महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक होते. त्याबरोबरच, त्यांचे जीवन नैतिक धैर्य, निरंतर जिज्ञासा आणि सामाजिक हितासाठी अविचल वचनबद्धतेचे प्रतीक होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींसाठी त्यांचे स्मरण केले जाते. त्याच वेळी, आपल्या सांस्कृतिक प्रवासातील त्यांचे योगदान आजही देशभरातील कोट्यवधी लोकांना मिळणाऱ्या शक्तीमध्ये सामावलेले आहे, जे त्यांनी जागवलेल्या आशेमध्ये, निर्माण केलेल्या आत्मविश्वासात आणि त्यांच्या विचारांमुळे आहे.

1827 मध्ये महाराष्ट्र या महान राज्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांची अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवातीची वाटचाल सुरू झाली. परंतु, सुरुवातीच्या काळात आलेल्या या अडचणी त्यांचे शिक्षण, धैर्य किंवा समाजाप्रति असलेल्या बांधिलकीच्या आड कधीही आल्या नाहीत. आव्हाने कितीही असली तरी, त्याला तोंड देण्यासाठी माणसाने कष्ट केले पाहिजेत, ज्ञान मिळवले पाहिजे आणि काहीही न करता बसण्याऐवजी त्या आव्हानांचे निवारण केले पाहिजे हे त्यांचे वैशिष्ट्य आयुष्यभर टिकून राहिले. शालेय जीवनापासूनच तरुण जोतिराव अत्यंत जिज्ञासू होते आणि त्यांच्यात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. अनेकदा ते त्यांच्या वयातील मुलांकडून अपेक्षित असलेल्या पुस्तकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पुस्तकांचे वाचन करत असत. अनेक वर्षांनंतर याविषयी बोलताना ते म्हणाले होते, "आपण जितके जास्त प्रश्न निर्माण करू, तितके ज्ञान त्यातून बाहेर येईल". त्यांच्या बालपणापासून त्यांना लाभलेली चौकस वृत्ती त्यांच्या वाटचालीत सदैव स्थिर राहिली.

त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात, महात्मा फुले यांच्या आयुष्याचे ध्येय हे शिकणे आणि शिक्षण देणे हेच बनले होते. शिक्षण आणि ज्ञान, ही कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही, ती एक शक्ती आहे, जी सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, याची अत्यंत दुर्मिळ अशी स्पष्टता त्यांना आली होती. जेव्हा शिक्षणाचा आनंद अनेकांना नाकारला जात होता, अशा काळात, त्यांनी मुलींसाठी आणि ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, अशा सर्वांसाठी पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरू केल्या. ते म्हणत असत- “मुलांमध्ये आईच्या मार्फत होणारी कोणतीही सुधारणा, अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच, जर शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या मुलींसाठी काढल्या पाहिजेत.” त्यांनी अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी काम केले, जिथे शाळा या न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे माध्यम बनल्या.

शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आम्ही देशातल्या युवकांसाठी, संशोधन आणि नवोन्मेष, हा पाया रचण्याचा प्रयत्न गेल्या दशकभरात केला आहे. देशात एक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे युवकांना, प्रश्न विचारणे, आपल्या शंका-कुशंका सोडवण्यासाठी नवनवी क्षितिजे शोधणे आणि नवोन्मेष हे खुलेपणाने करता येईल. ज्ञान, कौशल्य आणि संधी यात गुंतवणूक करुन, भारत युवाशक्तीला समस्या सोडवणारे आणि राष्ट्रीय प्रगतीचे वाहक होण्यासाठी सक्षम बनवत आहे.

महात्मा फुले यांचे ज्ञान आणि शहाणीव यातून, त्यांची, कृषी, आरोग्य आणि ग्रामविकासाविषयीची समज विकसित झाली होती. आपले शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणारा अन्याय, आपल्या समाजाला दुर्बळ करतो आहे, असे ते नेहमी म्हणत असत. गावात असो किंवा मग शेतात, या घटकांना सामाजिक विषमतेचे चटके कसे सहन करावे, लागत आहेत, ते त्यांनी पाहिले होते. आणि म्हणूनच, त्यांनी, गरीब, वंचित आणि दुर्बळ घटकांना त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्याच वेळी, सामाजिक सौहार्द सुद्धा कायम राहील, यासाठी देखील त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

​महात्मा फुले यांनी अत्यंत महत्वाचे मत व्यक्त केले होते की, जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणूनच तर त्यांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरणार्‍या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्थापित केलेला सत्यशोधक समाज ही चळवळ आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळींपैकी एक होती . सामाजिक सुधारणा, समाजसेवा आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ही चळवळ आघाडीवर होती. ही चळवळ समाजातील महिला, युवा आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची एक ठोस प्रभावशाली अभिव्यक्ति बनली. जर समाजाने आपल्या गाभ्याशी न्याय, प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर आणि सामूहिक प्रगतीची भावना ही मूल्ये जपली तर तो समाज अधिक सक्षम होऊ शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. या चळवळीतूनही महात्मा फुले यांच्या याच विश्वासाचे प्रतिबिंब उमटले होते.

महात्मा फुले ​यांच्या वैयक्तिक जीवनातूनही आपल्याला धैर्याची शिकवण मिळते. सतत कामात गुंतून राहिलेले असणे, सातत्याने लोकांमध्ये असणे याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणामही झाला. मात्र, प्रकृतीबात अत्यंत गंभीर आव्हाने समोर असतांनाही त्यांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. अर्धांगवायूच्या गंभीर झटक्याने त्यांना असंख्य मर्यादा आल्या, पण तरीही त्यांनी आपले काम आणि आपले संकल्प साकारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे शरीर जणू त्यांची सत्त्वपरीक्षाच घेत होते, मात्र समाजाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. त्यामुळेच तर आजही लाखो लोकांसाठी, विशेषतः संघर्षातून धैर्य मिळवणाऱ्यांसाठी, महात्मा फुले यांच्या जीवनाचा हा पैलू सर्वात शक्तिशाली पैलूंपैकी एक आहे.

सावित्रीबाई फुले यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय महात्मा फुले यांचे स्मरण पूर्ण होऊच शकत नाही. त्या स्वतः आपल्या देशातील महान सुधारकांपैकी एक होत्या. भारतातील स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या आघाडीच्या महिला शिक्षिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला पुढे नेण्यात निर्णायक भूमिका बजावली होती आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मुलींना मिळवून दिली होती. महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतरही सावित्रीबाईंनी हा वसा तसाच पुढे चालू ठेवला. 1897 मध्ये प्लेगच्या साथ रोगाचा उद्रेक झालेला असताना त्यांनी बाधित रुग्णांची इतक्या समर्पण भावनेनं सेवा केली की, त्या स्वतः त्या रोगाच्या विळख्यात सापडल्या, आणि त्यातच त्यांना आपले प्राण गमावावे लागले.

आपल्या भूमीला अशा महान सुपुत्र आणि सुकन्यांचे वरदान वारंवार लाभले आहे, ज्यांनी आपले विचार, त्याग आणि कृतीद्वारे समाज अधिक बळकट केला. बाहेरून कोणीतरी बदल घडवेल म्हणून त्यांनी प्रतीक्षा केली नाही, तर ते स्वतः त्या बदलाचे उगमस्थान बनले. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून समाज सुधारणेची कळकळीची हाक नेहमीच समाजातूनच उमटली आहे, ती अशा लोकांकडून, ज्यांना समाजातील दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि नशिबाचा भाग म्हणून तो स्वीकारायला त्यांनी ठामपणे नकार दिला. महात्मा जोतिराव फुले हे अशाच एका बुलंद आवाजाचे प्रतीक होते.

मला 2022 मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते, त्यावेळी मी शहरातील महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. आता आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. अशा वेळी या सगळ्याचे पुनर्नविनिकरण अर्थात नवी मांडणी करणे हीच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाहिलेली सर्वात यथार्थ आदरांजली ठरू शकणार आहे. त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शिक्षणासारख्या विषयांप्रती आपल्या बांधिलकीची नव्याने मांडणी करत आहोत, अन्यायाप्रती आपल्या संवेदनशीलतेची पुन्हा नव्याने जाणीव करून देत आहोत आणि समाजात स्वबळावर स्वतःत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता आहे हा विश्वास नव्याने जागृत करत आहोत. नैतिक स्पष्टता आणि लोककल्याणाचा उद्देश यांची जोड मिळाल्यास, भारतातील सामुदायिक शक्ती चमत्कार घडवून आणू शकते असेच त्यांची जीवनगाथा आपल्याला सांगते. आणि म्हणूनच ते आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत. म्हणूनच त्यांचे शब्द आणि कृती यांच्यातून आजही आशेचा किरण डोकावतो. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या जन्मापासून दोनशे वर्षांनंतरही केवळ भूतकाळातील एक व्यक्तिमत्त्व नव्हे तर भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक आहेत.