बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचेही राष्ट्रार्पण
म्हैसूर- कुशलनगर चौपदरी महामार्गाची पायाभरणी
“कर्नाटकात आज लोकार्पण झालेल्या अत्याधुनिक रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या राज्यातील दळणवळण व्यवस्थेला चालना मिळून आर्थिक विकासाला बळकटी मिळेल”
“भारतमाला’ आणि ‘सागरमाला’ यांसारखे उपक्रम भारतात परिवर्तन घडवत आहेत”
“यंदाच्या अर्थसंकल्पात, देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद”
“उत्तम पायाभूत सुविधांमुळे “आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. यातून प्रगतीच्या नव्या संधी विकसित होतात”
“मांड्या प्रदेशातील 2.75 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्राकडून 600 कोटी रुपये देण्यात आले”
“देशात कित्येक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प आता जलद गतीने पूर्ण केले जात आहेत”
“इथेनॉल निर्मितीवरचा भर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहाय्यक”

भारत माता की जय!

भारत माता की जय!

कर्नाटकातील तमाम जनतेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ताई भुवनेश्वरीलाही माझा नमस्कार!

मी आदिचुंचनगिरी आणि मेळुकोटे या गुरूंपुढे नतमस्तक होऊन त्यांचेही आशीर्वाद घेतो.

यापूर्वी मला कर्नाटकातील विविध भागातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. कर्नाटकात सर्वत्र, जनता भरभरून आशीर्वाद देत आहे. आणि मंडयाच्या लोकांच्या आशीर्वादात गोडवा आहे कारण त्याला साखरेचे शहर (सक्करे नगरा मधुर मंडा) म्हणतात. मंड्याचा हा स्नेह आणि आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांना नमन करतो!

जलद विकासाच्या माध्यमातून तुमच्या प्रेमाचे ऋण व्याजासह फेडण्याचा डबल इंजिन सरकारचा हा अथक प्रयत्न आहे. हजारो कोटी रुपये किमतीचे पायाभूत सुविधा प्रकल्प, ज्यांचे उद्घाटन किंवा पायाभरणी झाली आहे, ते याच प्रयत्नांचा एक भाग आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेची जोरदार चर्चा सुरू आहे. द्रुतगती महामार्गाशी संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतात सर्वत्र असे आलिशान, आधुनिक द्रुतगती मार्ग तयार व्हावेत ही प्रत्येक देशवासीयाची आणि आपल्या तरुणांची इच्छा आहे. आज बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग पाहून आपल्या देशातील तरुणांना अभिमान वाटत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे म्हैसूर आणि बेंगळुरू दरम्यानचा प्रवासाचा वेळ आता निम्म्याहून कमी झाला आहे.

आज म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गाची पायाभरणीही झाली. या सर्व प्रकल्पांमुळे या भागातील 'सबका विकास' गतिमान होईल आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन!

जेव्हा जेव्हा भारतातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनाशी संबंधित चर्चा होते तेव्हा दोन महान व्यक्तिमत्त्वांची नावे नेहमी समोर येतात - कृष्ण राजा वाडियार आणि सर एम. विश्वेश्वरय्या. हे दोन्ही महापुरुष याच मातीचे सुपुत्र होते आणि त्यांनी संपूर्ण देशाला नवा दृष्टिकोन आणि बळ दिले. या महान व्यक्तिमत्त्वांनी आपत्तीचे संधीत रूपांतर केले; पायाभूत सुविधांचे महत्त्व जाणले आणि आजच्या पिढ्या भाग्यवान आहेत की त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या तपश्चर्येचा लाभ मिळत आहे.

अशा महान व्यक्तींच्या प्रेरणेने आज देशात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम केले जात आहे. आज भारतमाला आणि सागरमाला योजनांमुळे कर्नाटक बदलत आहे. देशातही परिवर्तन होत आहे. जग कोरोनाशी झुंजत असतानाही भारताने पायाभूत सुविधांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत कैक पटींनी वाढ केली. यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे.

पायाभूत सुविधांमुळे केवळ सुविधाच मिळत नाहीत, तर रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, तसेच कमाईचे साधनही मिळते. एकट्या कर्नाटकात आम्ही गेल्या काही वर्षांत महामार्गाशी संबंधित प्रकल्पांमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

बेंगळुरू आणि म्हैसूर ही दोन्ही कर्नाटकातील महत्त्वाची शहरे आहेत. एक शहर तंत्रज्ञानासाठी, तर दुसरे परंपरेसाठी ओळखले जाते. या दोन शहरांना कनेक्टिव्हिटीच्या आधुनिक साधनांनी जोडणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे

बराच काळ दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांनी प्रचंड रहदारीबाबत तक्रार केली. मात्र आता एक्स्प्रेस वेमुळे हे अंतर अवघ्या दीड तासांत कापता येणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशातील आर्थिक विकासाचा वेग अभूतपूर्व ठरेल.

हा द्रुतगती मार्ग रामनगर आणि मंड्यातून जात आहे. येथे अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे देखील आहेत. या शहरांमध्येही पर्यटन क्षमता वाढेल. यामुळे केवळ म्हैसूरपर्यंत पोहोचणे सोपे होणार नाही, तर माता कावेरीचे उगमस्थान असलेल्या कोडागूपर्यंत पोहोचणेही सोपे होईल. आजकाल आपण पाहतो की पश्चिम घाटातील बेंगळुरू-मंगळुरु रस्ता पावसाळ्यात भूस्खलनामुळे बंद राहतो. त्यामुळे या भागातील बंदर कनेक्टिव्हिटीवर परिणाम होतो. म्हैसूर-कुशालनगर महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने हा प्रश्नही सुटणार आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे या भागात उद्योगाचाही झपाट्याने विस्तार होईल.

2014 पूर्वी केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. विविध पक्षांच्या पाठिंब्याने ते चालू होते. गरीब लोक आणि गरीब कुटुंबे उध्वस्त करण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नाही. गरिबांच्या विकासासाठी असलेले हजारो कोटी रुपये काँग्रेस सरकारने हडप केले. काँग्रेसने गरिबांच्या दु:खाची कधीच पर्वा केली नाही.

2014 मध्ये तुम्ही मला मतदान करून सेवेची संधी दिली तेव्हा देशात गरिबांचे सरकार स्थापन झाले; गरिबांचे दुःख आणि वेदनांबद्दल संवेदनशील असलेले सरकार स्थापन झाले. त्यानंतर या केंद्र सरकारने संपूर्ण प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि गरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले.

गरिबांना पक्की घरे , घरात नळाचे पाणी, उज्वला गॅस जोडणी, वीज जोडणी गावापर्यंत असते रुग्णालय आणि योग्य व्यवस्था सर्वांना मिळेल याची निश्चिती करण्याकरता भाजप सरकारने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.

गेल्या नऊ वर्षात कोट्यवधी गरीब माणसांचे जीवन भाजपा सरकारच्या योजनांमुळे आधीपेक्षा सोपे झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना सोयी मिळवण्यासाठी दारोदार भटकावे लागत असे. आता भाजपा सरकार गरिबांपर्यंत जाते आणि त्यांना सोयी पुरवते. भाजपा सरकारच्या योजना लागू असूनही जे अजून लाभापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे.

समस्यांना कायमचे उत्तर शोधण्याला भाजपा सरकारने नेहमीच महत्व दिले आहे.गेल्या नऊ वर्षात तीन कोटींपेक्षा जास्त गरीबांना या देशात घरे बांधून मिळाली आहेत. त्यापैकी लाखो घरे कर्नाटकातही बांधली गेली आहेत. जल जीवन योजनेअंतर्गत कर्नाटकातल्या जवळपास 40 लाख नवीन कुटुंबांना नळाचे पाणी मिळाले आहे.

आपल्या देशातले अनेक सिंचन प्रकल्प जे दशकानुदशके रखडलेले होते ते सुद्धा वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5300 कोटी घोषित केले आहेत. याशिवाय कर्नाटकाच्या बऱ्याच मोठ्या भागांमध्ये सिंचनाशी निगडित समस्यांवर कायमचा उपाय मिळणार आहे.

भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर कायमचा उपाय शोधून त्यांच्या अगदी लहानसहान समस्या सुद्धा सोडवणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार कोटी रुपये थेट जमा केले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारने मंड्यामधील 2.75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 600 कोटी रुपये जमा केले आहेत.

आणि  मला कर्नाटकातील भाजपा सरकारचं यासाठी कौतुक करावंस वाटतं की केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये पाठवले असताना, कर्नाटक सरकारने त्यात अजून चार हजार रुपये वाढवून दिले. म्हणजेच डबल इंजिन सरकारमध्ये शेतकऱ्यांना दुप्पट लाभ मिळतो, म्हणजेच त्यांच्या समस्यांची दखल घेतली जाते.

कर्नाटकातील साखरेचे शहर अशी ओळख  असलेल्या मंड्या येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना काही दशकांपासून अजून एका समस्येला तोंड द्यावे लागत होते. जेव्हा साखरेचे उत्पादन जास्त होते तेव्हा ती समस्या बनते तसेच जर साखरेचे उत्पादन कमी झाले तर तीही एक समस्याच असते. परिणामी साखर कारखान्यांकडे उस उत्पादक  शेतकऱ्यांची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच राहत असे.

या समस्येवर काहीतरी उपाय शोधून काढणे आवश्यक होते. भाजपा सरकार, जे शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देते अशा सरकारने इथेनॉलचा मार्ग निवडला. आम्ही उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचं उत्पादन वाढवायचं ठरवलं. म्हणजेच उसाचे उत्पादन जास्त असेल तेव्हा त्याच्यापासून इथेनॉल निर्मिती करायची त्यामुळे इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित होणार आहे.

केवळ गेल्या वर्षभरात देशाच्या साखर कारखान्यांनी वीस हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तेल कंपन्यांना विकले. त्यामुळे उस उत्पादक  शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणे शक्य झाले. 2013-14 पासून गेल्या मोसमापर्यंत एकूण 70,000 कोटी रुपयांचे इथेनॉल साखर कारखान्यांकडून खरेदी केले गेले. हा पैसा ऊस उत्पादक  शेतकऱ्यांपर्यत पोचवला गेला.

या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. साखर सहकारी संस्थांसाठी असलेले 10,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य तसेच करातून दिलेली सवलत याचाही लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच  होणार आहे.

आपला देश म्हणजे संधीची भूमी आहे.

जगभरातील लोक भारतामध्ये संधींचा शोध घेतात. भारतात 2022 या वर्षात विक्रमी परदेशी गुंतवणूक झालेली आहे.  याचा सर्वाधिक फायदा  कर्नाटकाला झाला आहे. करोना महामारीच्या काळातही कर्नाटकात चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुक आली आहे. डबल इंजिन सरकारचे कष्टसाध्य कार्य यातच प्रतिबिंबित होते.

केवळ माहिती तंत्रज्ञान हेच नाही तर जैवतंत्रज्ञानापासून संरक्षण साहित्याचे उत्पादन असे प्रत्येक क्षेत्र कर्नाटकात विकास पावत आहे. संरक्षण, एअरोस्पेस आणि अंतराळ अशा क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करण्यात येत आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनातही कर्नाटक वेगाने आघाडी घेत आहे.

डबल इंजिन सरकार घेत असलेल्या या प्रयत्नांच्या वेळी काँग्रेस आणि त्यांची आघाडी काय करत असते? काँग्रेस म्हणते की मोदींचे कबर खणली जात असल्याची स्वप्न त्यांना पडतात. काँग्रेस मोदींची कबर खणण्यात दंग आहे, मोदी एक्सप्रेस वे बांधून घेण्यात दंग आहेत. काँग्रेस मोदींची कबर खणण्यात दंग आहे आणि मोदी गरिबांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यात दंग आहेत. यावेळी काँग्रेस मोदींची कबर खणण्याचे स्वप्न बघत आहे. त्यांना हे माहित नाही की देशातील करोडो माता भगिनी आणि कन्यांचे आशीर्वाद आणि देशवासीयांचे आशीर्वाद हे मोदींचे अभेद्य चिलखत आहे.

कर्नाटकाच्या वेगवान विकासाला डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. या भव्य सोहळ्यासाठी आणि भव्य स्वागतासाठी तसेच आपल्या आशीर्वादासाठी मी पुन्हा एकदा मनापासून मंड्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. विकास प्रकल्पांसाठी माझ्याकडून आपले अभिनंदन!

भारत माता की जय, भारतमाता की जय!

भारत माता की जय, भारतमाता की जय!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Technical textiles critical to footwear sector

Media Coverage

Technical textiles critical to footwear sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi performs Darshan and Pooja at Baba Vishwanath Temple; prays for the prosperity and good health of all countrymen
April 29, 2026

 

Prime Minister Shri Narendra Modi today performed darshan and pooja at the Baba Vishwanath Temple in Kashi, where he prayed for the happiness, prosperity, and healthy lives of the people of the nation.

"हर हर महादेव !

काशी में बाबा विश्वनाथ मंदिर में दर्शन और पूजन का सौभाग्य मिला। यहां भगवान भोलेनाथ से समस्त देशवासियों के लिए सुख-समृद्धि और आरोग्यपूर्ण जीवन की कामना की।

माँ अन्नपूर्णा एवं माँ गंगा के दर्शन से असीम शांति मिली। उनकी कृपा से हर किसी में सकारात्मक ऊर्जा का संचार हो !

काशी की जनता को पुनः नमन