"भारताचे सेमीकंडक्टर क्षेत्र क्रांतीच्या उंबरठ्यावर असून उल्लेखनीय प्रगतीसह या उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे"
"आजचा भारत जगाला विश्वास देत आहे ... जेव्हा परिस्थिती वाईट असते, तेव्हा तुम्ही भारताकडे आशेने पाहू शकता"
"भारताचा सेमीकंडक्टर उद्योग विशेष डायोडसह सुसज्ज आहे ज्यामध्ये ऊर्जा दोन्ही दिशांना वाहते"
"भारतात सध्या सुधारणावादी सरकार, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि नवीन तंत्रज्ञानाची जाण असलेली देशाची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ अशी त्रिमितीय शक्ती आहे"
"ही लहान चिप भारतात शेवटच्या गावापर्यंत सेवा वितरण सुनिश्चित करण्याचे मोठे काम करत आहे"
“जगातील प्रत्येक उपकरणात भारताने बनवलेली चिप असावी हे आमचे स्वप्न आहे”
“जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात भारत एक प्रमुख भूमिका बजावणार आहे”
इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे 100% काम भारतात व्हावे हे आमचे लक्ष्य आहे.
"मग ते मोबाईल उत्पादन असो , इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा सेमीकंडक्टर्स असो, आमचे ध्येय सुस्पष्ट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!

 

मी SEMI च्या सर्व सहयोगींचे विशेष स्वागत करतो. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणारा भारत हा जगातील आठवा देश आहे; आणि मी म्हणेन की भारतात असण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आहात. एकविसाव्या शतकातील भारतात, वानवा  कधीच निर्माण होत नाही! आणि इतकेच नाही, आजचा भारत जगाला आश्वासन देतो-जेव्हा जगात वानवा-गंभीर स्थिती निर्माण होते, तेव्हा तुम्ही भारतावर निश्चिंतपणे विसंबून राहू शकता!

 

 

मित्रांनो,

सेमीकंडक्टर (अर्धवाहक) जगाशी असलेल्या तुमच्या संबंधांमध्ये डायोडचा (एकाच दिशेने प्रवाह वाहणारा अर्धवाहक) समावेश अपरिहार्य आहे; आणि तुम्हाला माहिती आहे की, डायोडमध्ये ऊर्जा फक्त एकाच दिशेने वाहते; परंतु भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगात विशेष डायोड वापरले जातात. इथे आपली उर्जा दोन्ही दिशांना वाहते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे? तर हे खूप मनोरंजक आहे, आपण गुंतवणूक करा आणि मूल्य तयार करा. दरम्यान, सरकार तुम्हाला स्थिर धोरणे आणि व्यवसाय करण्यास सुलभता प्रदान करते. तुमचा सेमीकंडक्टर उद्योग ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’शी (व्यवसाय पूर्णपणे चे एकात्मिक जाळे) जोडलेला आहे. भारत तुम्हाला ‘इंटिग्रेटेड इकोसिस्टम’ - एकात्मिक परिसंस्था देखील प्रदान करतो. भारताच्या रचनाकारांची  (डिझायनर्स) अफाट प्रतिभा तुम्हाला माहीत आहे.  डिझायनिंगच्या जगात भारताचे योगदान 20 टक्के आहे आणि ते सतत वाढत आहे. आम्ही 85,000 तंत्रज्ञ, अभियंते, तसेच संशोधन आणि विकास (R&D) तज्ञांचे सेमीकंडक्टर कार्यबळ तयार करत आहोत. विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सेमीकंडक्टर उद्योगासाठी सज्ज करण्यावर, भारताचा भर आहे. कालच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची पहिली बैठक पार पडली. हे फाउंडेशन भारताच्या संशोधन परिसंस्थेला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देईल.  याशिवाय भारताने एक लाख कोटी रुपयांचा ( 1 ट्रिलियन रुपये) विशेष संशोधन निधीही तयार केला आहे.

 

मित्रांनो,

अशा उपक्रमांमुळे सेमीकंडक्टर आणि विज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवरही आम्ही जास्त लक्ष केंद्रीत करत आहोत. शिवाय, तुम्हाला आमची त्रिमितीय शक्ती उपलब्ध आहे—पहिली, भारताचे सध्याचे सुधारणावादी सरकार, दुसरी-भारतातील वाढता उत्पादन आधार आणि तिसरी-भारताची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ! तंत्रज्ञानाची गोडी समजणारी बाजारपेठ!  तुमच्यासाठी, भारतातील थ्री-डी पॉवर सेमीकंडक्टर उद्योगाचा आधार अशी गोष्ट आहे जी इतरत्र मिळणे कठीण आहे.

 

मित्रांनो,

भारताचा महत्त्वाकांक्षी आणि तंत्रज्ञानाभिमुख समाज अतिशय अनोखा आहे. भारतासाठी चकती (चिप) हे केवळ तंत्रज्ञान नाही.  आमच्यासाठी ते लाखो आकांक्षा पूर्ण करण्याचे साधन आहे.  आज, भारत चिप्सचा प्रमुख वापरकर्ता आहे. आम्ही या चिपवर जगातील सर्वोत्तम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. ही छोटी चिप भारतातील दुर्गम भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचण्याची हमी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कोरोना महासाथीच्या काळात जगातील सर्वात मजबूत बँकिंग यंत्रणाही कोलमडत असताना, भारतातील बँका अखंडपणे कार्यरत राहिल्या. भारताचे UPI, रुपे कार्ड, डिजी लॉकर किंवा डिजी यात्रा असो, विविध डिजिटल माध्यमे भारतातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. आज भारत स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढवत आहे.  आज, भारत महत्त्वपूर्ण हरित संक्रमणातून जात आहे. भारतात विदा केंद्रांची (डेटा सेंटर) मागणी सातत्याने वाढत आहे. याचा अर्थ भारत जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.

 

मित्रांनो,

एक जुनी म्हण आहे - 'चिप्स जिथे पडतील तिथे पडू द्या'. याचा अर्थ, गोष्टी जशा घडायच्या तशा घडू द्या. आजचा तरुण आणि महत्त्वाकांक्षी भारत मात्र ही वृत्ती बाळगत नाही. भारताचा आजचा मंत्र आहे - 'भारतात उत्पादित चिप्सची संख्या वाढवणे'. आणि म्हणूनच आम्ही सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारतामध्ये सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी भारत सरकार 50 टक्के सहाय्य देत आहे. या संदर्भात राज्य सरकारेही अतिरिक्त सहकार्य करत आहेत. या धोरणांमुळे भारतात या क्षेत्रात अल्पावधीतच दीड लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. आणि आज अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत.

सेमीकॉन इंडिया कार्यक्रम हा देखील एक उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, फ्रंट-एंड फॅब (फॅब्रिकेशन प्रक्रियेचा पहिला टप्पा), डिस्प्ले फॅब, सेमीकंडक्टर पॅकेजिंग, कंपाऊंड सेमीकंडक्टर, सेन्सर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) साठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे; म्हणजेच, भारतात 360-डिग्री (सर्वसमावेशक) दृष्टिकोनाने काम केले जात आहे. आमचे सरकार भारतातील संपूर्ण सेमीकंडक्टर पुरवठा साखळी परिसंस्थेला प्रगत करत आहे. मी यावर्षी लाल किल्ल्यावरून नमूद केले की, जगातील प्रत्येक उपकरणात भारतीय बनावटीची चिप असावी, हे आमचे स्वप्न आहे. जगाचा सेमीकंडक्टर पॉवरहाऊस (ऊर्जा स्रोत) बनण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल.

 

मित्रहो,

महत्वाच्या खनिजांचे देशांतर्गत उत्पादन आणि परदेशातून संपादनासाठी आम्ही अलीकडेच  क्रिटिकल मिनरल मिशनची घोषणा केली. महत्वाची खनिजे, खाण ब्लॉक लिलाव आणि इतर गोष्टींसाठी सीमाशुल्कात सूट देण्यावर काम सुरू आहे. याव्यतिरिक्त, आम्ही भारतीय अंतराळ विज्ञान संस्थेमध्ये सेमीकंडक्टर संशोधन केंद्र स्थापन करण्यावर काम करत आहोत. आम्ही आयआयटी बरोबर भागीदारी करत आहोत, जेणेकरुन आमचे अभियंते केवळ आजच्यासाठी हाय-टेक (उच्च-तंत्रज्ञानाच्या) चिप्स विकसित करणार नाहीत, तर पुढच्या पिढीतील चिप्सवर देखील संशोधन करतील. आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार्यही पुढे नेत आहोत. तुम्ही तेल मुत्सद्देगिरीबद्दल ऐकले असेल, आजचे युग सिलिकॉन मुत्सद्देगिरीचे आहे. या वर्षी भारताची इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कच्या (हिंद प्रशांत महासागर आर्थिक चौकट) पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली. आम्ही QUAD सेमीकंडक्टर पुरवठा साखळी उपक्रमाचे महत्वाचे भागीदार आहोत आणि अलीकडेच जपान आणि सिंगापूरसह अनेक देशांबरोबर करार केले आहेत. भारत या क्षेत्रातील अमेरिकेबरोबरचे सहकार्यही सातत्याने वाढवत आहे.

 

मित्रहो,

भारताच्या सेमीकंडक्टर मिशनशी तुम्ही सर्व जण परिचित आहात. काही लोक असे विचारतात की, भारत यावर विशेष लक्ष का केंद्रित करत आहे. अशा व्यक्तींनी आमच्या डिजिटल इंडिया मिशनची माहिती घ्यायला हवी. देशाला पारदर्शक, प्रभावी आणि गळती-मुक्त प्रशासन प्रदान करणे, हे डिजिटल इंडिया मिशनचे उद्दिष्ट होते. आज आपण त्याचा वाढता प्रभाव अनुभवत आहोत. डिजिटल इंडियाच्या यशासाठी आम्हाला परवडणारे मोबाइल हँडसेट आणि डेटाची आवश्यकता होती. त्यानुसार, आम्ही आवश्यक सुधारणा लागू केल्या आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. दशकभरापूर्वी आम्ही मोबाईल फोनच्या प्रमुख आयातदारांपैकी एक होतो. आज आम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आणि निर्यातदार आहोत. भारत आता 5G हँडसेटसाठी दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे अलीकडील एक अहवाल सांगतो. केवळ दोन वर्षांपूर्वी, आम्ही 5G सेवा सुरू केली. आज आम्ही कुठे पोहोचलो आहोत, ते पहा. आज भारताच्या  इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने 150 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे, आणि त्यापेक्षाही मोठे यश गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला आमचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र या दशकाच्या अखेरीपर्यंत  500 अब्ज डॉलर्सवर न्यायचे आहे. यामुळे भारतातील तरुणांसाठी सुमारे 6 दशलक्ष रोजगार निर्माण होईल. भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रालाही याचा मोठा लाभ मिळेल. भारतात 100 टक्के इलेक्ट्रॉनिक उत्पादन व्हावे हे आमचे ध्येय आहे. म्हणजेच, भारत केवळ सेमीकंडक्टर चिप्स बनवणार नाही तर त्याचे तयार उत्पादनही बनवेल.

 

मित्रहो,

भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक आव्हानांवरही उपाय देते. डिझायनिंगशी संबंधित एक रूपक तुम्ही ऐकले असेल. ते असे आहे- ‘single point of failure’ (चुकीचा एक घटक सर्व काम बिघडवते). डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना ही चूक टाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण प्रणाली केवळ एका घटकावर अवलंबून राहणार नाही, हे सुनिश्चित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. हा धडा केवळ डिझाईन क्षेत्रापुरता मर्यादित नसून, तो आपले जीवन, विशेषत: पुरवठा साखळींच्या संदर्भातही तेवढाच लागू होतो. कोविड (COVID) असो, की युद्ध, अलीकडच्या काळात पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे बाधित झाला नाही, असा कोणताही उद्योग नसेल. म्हणूनच, पुरवठा साखळीतील लवचिकता महत्वाची आहे.

त्यामुळे, विविध क्षेत्रांमध्ये लवचिकता निर्माण करण्याच्या मोहिमेचा भारत महत्त्वाचा भाग आहे, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

तंत्रज्ञानाला लोकशाही मुल्यांची जोड मिळाली, तर तंत्रज्ञानाची सकारात्मक ऊर्जा अधिक बळकट होते. त्याउलट, लोकशाही मूल्य तंत्रज्ञानापासून वेगळी केल्यावर लगेच, तंत्रज्ञान हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, मोबाईल उत्पादन असो, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन असो किंवा सेमीकंडक्टर्स असो, आमचे उद्दिष्ट सुस्पष्ट आहे. आम्हाला असे जग निर्माण करायचे आहे, जे संकटकाळातही न थांबता कार्यरत राहील. भारताच्या या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांना तुम्ही बळ द्याल, असा विश्वास व्यक्त करून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA

Media Coverage

India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlights the power of courage and willpower to overcome challenges
March 17, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the significance of self-confidence and inner strength in conquering life's most difficult obstacles.

The Prime Minister remarked that for an individual filled with courage and resolve, nothing in life is impossible. Shri Modi affirmed that we can overcome the most difficult challenges on the strength of willpower and self-confidence.

The Prime Minister wrote on X;

"जो व्यक्ति साहस और संकल्प से भरा हो, उसके लिए जीवन में कुछ भी असंभव नहीं। आत्मविश्वास और इच्छाशक्ति के बल पर हम कठिन से कठिन चुनौतियों को पार कर सकते हैं।

एकोऽपि सिंहः साहस्रं यूथं मथ्नाति दन्तिनाम् ।
तस्मात् सिंहमिवोदारमात्मानं वीक्ष्य सम्पतेत्॥"

Just as one lion has the power to defeat a thousand elephants, in the same way a person should engage in noble actions fearlessly, with courage, confidence, and inner strength like a lion.