केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सर्व खासदार, विकसित भारत यंग लीडर्स चॅलेंजचे विजेते, इतर मान्यवर आणि देशभरातून आलेले माझे युवा सहकारी, परदेशातून आलेले तरुणांनाही इथे एक नवा अनुभव आला आहे. तुम्ही सारे दमला नाही का? दोन दिवसांपासून हे कर आहात, तर आता ऐकून ऐकून दमून जाणार नाही? मी खरेतर मागच्या जागेवर बसून मला जे सांगायचे होते ते सांगितले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा आपल्यापैकी बहुतेकांचा जन्मही झाला नसेल हे मला लक्षात येते आहे. आणि मी जेव्हा 2014 मध्ये पंतप्रधान झालो, तेव्हा आपल्यापैकी बहुतेकांना लहान मुले असेच म्हटले असेल. मात्र, या आधी मुख्यमंत्री म्हणून आणि आता पंतप्रधान म्हणूनही, मला नेहमीच तरूण पिढीविषयी अफाट विश्वास वाटत आला आहे. तुमची ताकद, तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या उर्जेतून मला स्वतःलाही ऊर्जा मिळते. आणि आज पहा, विकसित भारताच्या ध्येयाची सूत्रे आपण सारे हाती घेत आहात.
मित्रांनो,
जेव्हा 2047मध्ये आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या टप्प्याकडे जाणारा प्रवास भारतासाठी महत्त्वाचा आहे, आणि तोच कालावधी तुमच्याही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ असेल, म्हणजेच तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुमची ताकद भारताचे ताकद होईल, तुमचे यश, भारताच्या यशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या विषयावर मी पुढे सविस्तर चर्चा करेन, पण पहिल्यांदा आजच्या विशेष दिवसाविषयी बोलू या.
मित्रांनो,
आपणा सर्वांना माहितच असेल की आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी आहे. आपल्या आयुष्याचे ध्येय काय, जीवनाचा उद्देश काय आहे, राष्ट्रप्रथम भावनेसह आपले जीवन कसे जगू शकतो. आपल्या प्रत्येक प्रयत्नातून समाजाचे, देशाचे हित घडावे, यासाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप चांगले मार्गदर्शक, प्रेरक आहे. स्वामी विवेकानंदाचे स्मरणार्थ, दर वर्षी 12 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्ङणून साजरा करतो आणि आज 12 जानेवारीला त्यांच्या प्रेरणेतून विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे आयोजन करण्यात आले आहे.
मित्रांनो,
विकसित भारत यंग लीडर्स संवादाचे हे व्यासपीठ इतक्या कमी कालावधीत मोठे व्यासपीठ झाले आहे याचा मला आनंद आहे. एक असे व्यासपीठ जिथे देशाच्या विकासाची दिशा निश्चित करण्यात तरुणांची थेट सहभाग असतो. कोट्यवधी तरुणांचा सहभाग, 50 लाखाहून अधिक तरुणांची नोंदणी, 30 लाखाहून अधिक तरुणांचा विकसित भारत चॅलेंजमध्ये सहभाग घेणे, देशाच्या विकासासाठी आपल्या कल्पनांची देवाणघेवाण करणे, एवढ्या मोठ्या प्रमाणात युवाशक्तीचा सहभाग ही गोष्टी निश्चितच अभूतपूर्व आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये 'थिंक टॅक' हा शब्द प्रचलित आहे.थिंक टँकची चर्चाही होते आणि त्या थिंक टँकचा मोठा प्रभाव पडतो. हा मत तयार करणाऱ्यांचा एक गट तयार होते. मात्र कदाचित, आज मी जी सादरीकरणे पाहिली आणि आव्हाने पेलत तुम्ही ज्या प्रकारे इथपर्यंत आलात, ते पाहिल्यानंतर मला वाटते की ही गोष्ट, हा कार्यक्रम संस्थात्मक प्रकारात घडतो आहे आणि तो जगात स्वतःचे थिंक टँक म्हणून एक आगळे स्थान निर्माण करतो आहे. एका विशिष्ट विषयावर, निश्चित ध्येय ठेवून लाखो लोकांचे विचार मंथन करणे, यापेक्षा अधिक मोठा विचार काय असू शकतो? मला वाटते की याच्यासाठी थिंक टँक हा शब्द योग्य नाही, कारण टँक हा शब्द लहान प्रमाणात असल्यामुळे वापरला गेला असेल, मात्र हा तर प्रचंड आहे, समुद्रापेक्षा मोठा आहे आणि काळाच्या पुढचा आणि वैचारिकदृष्ट्या समुद्रापेक्षाही खोल, गहिरा आहे. त्यामुळेच थिंक टँक ही संज्ञा टँक पुरती मर्यादित ठेवू शकत नाही, असा याचा अनुभव येतो. आणि जे विषय तुम्ही आज चर्चेसाठी घेतले विशेषतः महिला नेतृ्त्वातील विकास आणि लोकशाहीतील युवकांचा सहभाग अशा गंभीर विषयांवरही आपण सर्वांना जे विचार मांडले ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. काही वेळापुर्वी आपण जे सादरीकरण इथे केले, विविध विषयसूत्रांवर आधारित प्रभावी विचार मांडले, त्यामधून विकसित भारताच्या निर्मितीसाठी अमृत पिढीची वचनबद्धता दिसून येते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारतातील जेन झी चा स्वभावही दिसून येतो. भारतातील जेन झी किती सर्जनशील आहे हे स्पष्ट होते. मी, सर्व तरूण मित्रांना, युवा भारत संघटनेशी निगडीत सर्व तरुणांना या कार्यक्रमासाठी आणि त्याच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,
मी,आपल्याशी संवादाची सुरुवात केली तेव्हा 2014चा उल्लेख केला होता. तेव्हा इथे बसलेले बहुतांश तरूण 8-10 वर्षांचे असतील.त्यांना वर्तमानपत्र वाचायचीही सवय लागली नसेल. आपण धोरण लकव्याचा तो जुना काळ पाहिला नसेल, ज्यामध्ये वेळेवर निर्णय घेत नाही अशी टीका तत्कालीन सरकारवर केली जात असे. आणि जे निर्णय होत असत ते देखील पायाभूत पातळीवर नीटपणे लागू होत नसत. नियम आणि कायदे असे असत, ज्यामुळे आपला तरुण वर्ग नवे काही करण्याचा विचार देखील करू शकत नसे. इतके निर्बंध असताना त्यांनी जायचे तरी कुठे या विचाराने देशाचे तरुण देखील हैराण होते.
मित्रांनो,
परिस्थिती तर अशी होती की कोणत्याही परीक्षेसाठी, नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर प्रमाणपत्रांचे सत्यापन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या सह्या घेण्यातच दमछाक होत असे. मग शुल्काचा डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी बँकांच्या आणि टपाल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असत. स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर बँका केवळ काही हजार रुपयांच्या कर्जासाठी शेकडो प्रकारचे तारण मागत असत. आज या गोष्टी अगदी अजब वाटतात मात्र, एका दशकापूर्वी पर्यंत असेच सगळे चालत असे.
मित्रांनो,
तुम्ही येथे स्टार्ट-अप्सशी संबंधित सादरीकरण केलेत, मी तुम्हाला स्टार्ट-अप परीसंस्थेचेच उदाहरण देतो की त्यामध्ये जे परिवर्तन घडून आले आहे ते कसे नेमके कसे घडून आले आहे ते बघूया. जगात 50-60 वर्षांपूर्वी स्टार्ट अप संस्कृतीची सुरुवात झाली, हळूहळू ती महा-कॉर्पोरेशनच्या युगात परिवर्तीत झाली. मात्र या संपूर्ण प्रवासादरम्यान भारतात स्टार्ट अप्स बद्दल फारच कमी चर्चा होत असे. वर्ष 2014 पर्यंत तर देशात 500 हून कमी स्टार्ट अप्सची नोंदणी झालेली होती. स्टार्ट अप संस्कृतीच्या अभावामुळे प्रत्येक क्षेत्रात सरकारच्या हस्तक्षेपाचाच वरचष्मा असायचा. आपली तरुण प्रतिभा, त्यांचे सामर्थ्य, त्यांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची कधी संधीच मिळाली नाही.
मित्रांनो,
मला आपल्या देशातील तरुणांवर संपूर्ण विश्वास आहे, तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही एक वेगळा मार्ग निवडला आहे. तरुणांचा विचार करून आम्ही एकामागोमाग एक अशा नव्या योजना तयार केल्या, येथूनच स्टार्ट अप क्रांतीने भारतात खरा वेग घेतला. व्यवसाय करण्यातील सुलभता, व्यापार क्षेत्रातील सुधारणा, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया निधी आणि कर यांचा कोष तसेच नियमांतील सुलभता असे अनेक उपक्रम सुरु करण्यात आले. काही अशी क्षेत्रे होती जेथे पूर्वी सरकारच सर्वेसर्वा होते, सरकारचेच वर्चस्व होते, त्या क्षेत्रांना युवा नवोन्मेष, तरुणांच्या व्यवसायांसाठी खुले करण्यात आले. याचा जो परिणाम झाला ती देखील एक वेगळीच यशोगाथा बनली आहे.

मित्रांनो,
तुम्ही अवकाश क्षेत्राचेच उदाहरण घ्या, 5-6 वर्षांपूर्वीपर्यंत अवकाश क्षेत्रात प्रगती करण्याची जबाबदारी केवळ इस्रोचीच असायची. आम्ही अवकाश क्षेत्र खासगी व्यवसायांसाठी खुले केले, संबंधित यंत्रणा उभारल्या, संस्था स्थापन केल्या आणि आज अवकाश क्षेत्रात 300 हून अधिक स्टार्ट अप्स काम करत आहेत. बघता बघता आपल्या स्कायरूट एअरोस्पेस या स्टार्ट-अप ने स्वतःचे ‘विक्रम-एस’ हे रॉकेट तयार केले. अग्निकुल कॉसमॉस या आणखी एका स्टार्ट-अप ने जगातील पहिले त्रिमितीय प्रिंटेड इंजिन तयार करून सर्वांना चकित केले, हे सर्व स्टार्ट अप चे कर्तुत्व आहे. भारतातील अवकाश विषयक स्टार्टअप्स आता सतत अभूतपूर्व कार्य करून दाखवत आहेत.
मित्रांनो,
मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कल्पना करा की जर ड्रोन उडवण्यावर चोवीस तास विविध प्रकारचे निर्बंध लागू राहिले असते तर काय झाले असते? ही परिस्थिती होती. पूर्वी आपल्याकडे ड्रोन उडवणे किंवा तयार करणे या दोन्ही बाबी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या होत्या. त्यासाठीच्या परवानग्या मिळवणे हे एखादा पर्वत चढण्यासारखे कठीण असायचे आणि त्याकडे केवळ सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच बघितले जायचे. आम्ही नवीन नियम तयार केले, नियम सोपे केले, त्यामुळे आज आपल्याकडे कितीतरी तरुणांना ड्रोनशी संबंधित क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. भारतात निर्मित ड्रोन्स युध्दक्षेत्रावर देशाच्या शत्रूंना धूळ चारत आहेत, आणि कृषी क्षेत्रात आमच्या नमो दीदी शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
मित्रांनो,
संरक्षण क्षेत्र देखील पूर्वी सरकारी कंपन्यांवरच अवलंबून होते. आमच्या सरकारने यात देखील बदल घडवून आणला, भारतातील संरक्षण परिसंस्थेने स्टार्ट अप्स साठी दरवाजे उघडले. याचा फार मोठा लाभ आपल्या तरूणांनाच मिळाला आहे. आजघडीला भारतात एक हजारापेक्षा जास्त संरक्षण संबंधित स्टार्ट अप्स कार्यरत आहेत. आज एक युवक ड्रोन तयार करत आहे तर दुसरा युवक ड्रोन-विरोधी प्रणाली तयार करत आहे, एखादा एआय कॅमेरा बनवत आहे तर दुसरा एखादा रोबोटिक्स च्या संदर्भात काम करत आहे.

मित्रांनो,
डिजिटल इंडिया उपक्रमाने देखील भारतात सर्जकांची एक नवी फळी उभी केली आहे. भारतात आज ‘ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजेच संस्कृती, सामग्री आणि सर्जनशीलतेचा अभूतपूर्व विकास होत असलेल्या बघायला मिळतो आहे. आपला देश माध्यमे, चित्रपट, गेमिंग, संगीत, डिजिटल कार्यक्रम, व्हीआर-एक्सआर यांसारख्या क्षेत्रांमधील एक मोठे जागतिक केंद्र होऊ घातले आहे. आत्ता येथे झालेल्या एका सादरीकरणात आपल्या संस्कृतीची निर्यात करण्याचा विषय निघाला. मी तर तुम्हा सर्व तरुणांना आग्रह करतो की आपल्या ज्या कथा आहे, गोष्टी-किस्से आहेत, रामायण-महाभारतातील गोष्टी आहेत, खूप काही आहे, तर आपण या गोष्टींना गेमिंगच्या जगात घेऊन जाऊ शकतो का? संपूर्ण जगभरात गेमिंगची एक फार मोठी बाजारपेठ आहे. आपल्या पौराणिक कथांशी संबंधित नवनवे खेळ गेमिंगच्या जगात सुरु करता येतील, आपले हनुमानजी संपूर्ण जगभरातील गेमिंगचे विश्व चालवू शकतील. आपली संस्कृती सुद्धा बाहेरच्या देशांत जाईल, आणि हे आधुनिक स्वरुपात होईल, त्यात तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.आणि आजकाल मला असे देखील दिसते आहे की आपल्या देशात या विषयाशी संबंधित असे अनेक स्टार्ट अप्स आहेत जे गेमिंगच्या जगात भारताशी जोडलेल्या अनेक गोष्टी सांगत आहेत, आणि यामुळे आपल्या मुलांना देखील खेळता खेळता भारत समजून घेणे सोपे होऊन जाईल.
मित्रांनो,
तरुण सर्जकांसाठी वेव्हज म्हणजेच ‘जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद’ ही एका फार मोठ्या व्यासपीठाचे कार्य करत आहे.
म्हणजे कोणताही क्षेत्र असो, आज भारतात तुमच्यासाठी अमर्याद संधींची दारे खुली होत आहेत. म्हणूनच आज येथे या आयोजनाशी संबंधित सर्व युवकांना, देशातील सर्व तरुणांना माझे आवाहन आहे—तुमच्या कल्पनांसह पुढे या, जोखीम घ्यायला मागे हटू नका. सरकार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत चालत आहे.

मित्रांनो,
मागील दशकात आपण बदलांचा, सुधारणांचा जो प्रवास सुरू केला, तो आता ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ बनला आहे. आणि या सुधारणांच्या केंद्रस्थानी तुम्ही आहात—आपली युवकशक्ती. वस्तू आणि सेवा करामधील पुढील पिढीच्या सुधारणांमुळे युवक आणि नवउद्योजकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर शून्य झाला आहे. त्यामुळे नव्या नोकरीला लागलेल्या किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांकडे अधिक बचत राहण्याची शक्यता वाढली आहे.
मित्रांनो,
आज वीज फक्त प्रकाशाचा स्रोत राहिलेली नाही. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर, मॅन्युफॅक्चरिंग अशा प्रत्येक प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज आहे. म्हणूनच आज भारत ‘अश्यूर्ड एनर्जी’ सुनिश्चित करत आहे. नागरी अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुधारणा म्हणजेच ‘शांती कायदा’ याच उद्देशाने करण्यात आला आहे. यामुळे अणुऊर्जा क्षेत्रात हजारो नवे रोजगार निर्माण होतीलच, शिवाय इतर क्षेत्रांवरही याचा बहूगुणित परिणाम दिसून येईल.
मित्रांनो,
जगातील विविध देशांच्या स्वतःच्या गरजा आणि मागण्या आहेत. तिथे कामगारांची संख्या सातत्याने कमी होत आहे. आमचा प्रयत्न आहे की भारतातील तरुण जगभर निर्माण होत असलेल्या संधींसाठी सज्ज असावेत. म्हणूनच कौशल्य विकासाशी संबंधित क्षेत्रांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे, आणि आम्ही त्या करत आहोत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर आता उच्च शिक्षणाशी संबंधित नियमांमध्येही सुधारणा केल्या जात आहेत. परदेशी विद्यापीठेही आता भारतात आपले कॅम्पस सुरू करत आहेत. अलीकडेच हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘पीएम सेतू’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्यतनीत केल्या जातील, जेणेकरून युवकांना उद्योगांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांनुसार प्रशिक्षण देता येईल. मागील काळात भारताने जगातील अनेक देशांसोबत व्यापार करार केले आहेत. हे करारही भारतातील तरुणांसाठी नव्या संधी घेऊन येत आहेत.

मित्रांनो,
कोणताही देश आत्मविश्वासाशिवाय आत्मनिर्भर किंवा विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या सामर्थ्याबद्दल, आपल्या वारशाबद्दल, आपल्या साधनसंपत्तीबद्दल अभिमानाचा अभाव आम्हाला खटकतो. त्याबद्दल आपल्याला एक बांधिलकी हवी, अभिमानाची भावना हवी. आणि आपल्याला मोठ्या मजबुतीने, अभिमानाने, मजबूत पावलांनी पुढे जायचे आहे. तुम्ही ब्रिटिश राजकारणी मॅकॉलेबद्दल नक्कीच वाचले असेल. गुलामगिरीच्या काळात शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून मानसिकदृष्ट्या गुलाम असणारी भारतीयांची पिढी तयार करण्यासाठी त्याने काम केले. यामुळे भारतात स्वदेशी गोष्टींबद्दल, आपल्या परंपरांबद्दल, आपल्या उत्पादनांबद्दल आणि आपल्या सामर्थ्याबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. केवळ परदेशी किंवा आयात केलेली वस्तूच श्रेष्ठ आहे, असे मानले जाऊ लागले. आता हे मान्य करण्याजोगे आहे का? आपल्याला मिळून गुलामगिरीची ही मानसिकता संपवायची आहे. दहा वर्षांनंतर मॅकॉलेच्या त्या दुष्कृत्याला 200 वर्षे पूर्ण होतील. 200 वर्षांपूर्वी झालेले ते पाप धुण्यासाठी आपल्याकडे आता केवळ 10 वर्षे उरली आहेत. आणि ही युवा पिढी ते नक्कीच धुऊन काढेल, याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच देशातील प्रत्येक तरुणाने संकल्प करून या मानसिकतेतून देशाला बाहेर काढायचे आहे.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे—आणि इथे स्टार्टअपच्या सादरीकरणातही याचा उल्लेख झाला—
“आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः”
म्हणजेच, सर्व दिशांनी कल्याणकारी, शुभ आणि श्रेष्ठ विचार आमच्याकडे येऊ देत. तुम्हालाही जगातील सर्वोत्तम पद्धतींकडून शिकायचे आहे, पण आपल्या वारशाला, आपल्या कल्पनांना कमी लेखण्याची प्रवृत्तीला कधीही तुमच्यावर प्रभूत्व गाजवू देऊ नका. स्वामी विवेकानंदांचे जीवन आपल्याला हेच शिकवते. त्यांनी जगभर भ्रमण केले, चांगल्या गोष्टींचे कौतुक केले, पण भारताच्या वारशाबद्दल पसरवलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. एखादा विचार लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी तो विचार स्वीकारला नाही तर त्यांनी कुरीतींना आव्हान दिले. स्वामी विवेकानंदांना एक अधिक चांगला भारत घडवायचा होता. त्याच भावनेने आज तुम्हा युवकशक्तीला पुढे जायचे आहे. आणि हो, आपल्या तंदुरुस्तीचीही काळजी घ्या, खेळा, आनंदी राहा. मला तुमच्यावर अढळ विश्वास आहे. तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या ऊर्जेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
याच शब्दांत, तुम्हा सर्वांना युवा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणखी एक सूचना द्यायची आहे. हा जो आपला ‘डायलॉग’ कार्यक्रम सुरू आहे, तो तुम्ही कधी तुमच्या राज्यात, राज्य विकसित करण्यासाठी सुरू करावा. त्यानंतर काही काळाने जिल्हा विकसित करण्यासाठीही असे डायलॉग कार्यक्रम सुरू करूया. प्रत्येक राज्यात युवकांनी मिळून असा एक उपक्रम सुरू केला, तर तो एक थिंक टँक न राहता ‘थिंक वेब’ बनेल. या दिशेने आपण पुढे जाऊया. माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
खूप-खूप धन्यवाद,मित्रांनो.


