गेल्या दशकात भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राने एक ऐतिहासिक परिवर्तन अनुभवले आहे आणि ते एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित असलेल्या क्षेत्रापासून जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे: पंतप्रधान
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ ही सरकारच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे, ज्याने प्रत्येक नागरिकाला विमानाने सहज प्रवास करता यावा या उद्देशाने विमान प्रवासाला सर्वसमावेशक बनवले आहे: पंतप्रधान
देशभरात प्रादेशिक आणि परवडणारी हवाई कनेक्टिव्हिटी तसेच सी-प्लेन सेवांचा विस्तार करण्यासाठी सरकार 'उडान' योजनेच्या पुढील टप्प्यावर काम करत आहे: पंतप्रधान
भारताने देशांतर्गत पातळीवर लष्करी आणि वाहतूक विमानांचे उत्पादन सुरू केले आहे आणि नागरी विमान निर्मितीच्या क्षेत्रातही तो पुढे वाटचाल करत आहे: पंतप्रधान
भारत 'ग्लोबल साउथ' आणि जगादरम्यान एक प्रमुख हवाई वाहतूक केंद्र म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राम मोहन नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, जगभरातून आलेले माननीय मंत्री, जागतिक हवाई वाहतूक उद्योगातील नेते, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर प्रतिनिधी, महिला आणि सज्जनांनो!

नमस्कार!

विंग्स इंडियाच्या या व्यासपीठावर मी सर्व उद्योग नेते, तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे अभिनंदन करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हवाई वाहतूक उद्योगाचा आगामी काळ अनेक आकांक्षांनी भरलेला आहे आणि भारत हा त्यातील एक मोठा खेळाडू बनत आहे. विमान निर्मिती, पायलट प्रशिक्षण, प्रगत हवाई गतिशीलता, विमान भाडेपट्टा ही अशी क्षेत्रे आहेत ज्यात भारत तुमच्यासमोर अनेक शक्यता घेऊन उपस्थित आहे. आणि म्हणूनच विंग्स इंडियाची ही शिखर परिषद आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची बनली आहे.

मित्रांनो,

गेल्या दशकात भारताच्या संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. एकेकाळी भारत जगातील अशा देशांमध्ये होता जिथे हवाई प्रवास केवळ एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ आहे. आमची प्रवासी वाहतूक वेगाने वाढली आहे. भारतीय विमान कंपन्यांचे ताफेदेखील वेगाने विस्तारत आहेत. अलिकडच्या वर्षांत भारतीय विमान कंपन्यांनी 1,500 हून अधिक विमानांची मागणी नोंदविली आहे.

मित्रांनो,

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची ही भरभराट झाली आहे कारण आमचे सरकार एक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. भारतातील हवाई प्रवास आता विशेष राहिलेला नाही, तर तो सर्वसमावेशक होत चालला आहे. भारतीय नागरिकांना विमानाने सहज प्रवास करता यावा हे आमचे ध्येय आहे. म्हणूनच, आम्ही श्रेणी-‌2 आणि श्रेणी-3 शहरांना विमानतळांशी जोडले आहे. 2014 मध्ये भारतात 70 विमानतळ होते. आज भारतात विमानतळांची संख्या 160 पेक्षा जास्त झाली आहे. याचा अर्थ असा की फक्त एका दशकातच भारतात दुप्पटीहून अधिक विमानतळ बांधले गेले आहेत. आम्ही देशात शंभराहून अधिक एअर डोम सक्रिय केले आहेत. यासोबतच, आम्ही आमच्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरांची उडान योजना सुरू केली आहे. उडान योजनेमुळे 15 दशलक्ष प्रवाशांनी म्हणजेच सुमारे दीड कोटी प्रवाशांनी अशा मार्गांवर प्रवास केला आहे, जे मार्ग याआधी अस्तित्वातही नव्हते.

मित्रांनो,

आज जेव्हा भारत विकसित होण्याच्या ध्येयाने पुढे जात आहे, तेव्हा आपल्या हवाई क्रियाकलापांचा विस्तार अनेक पटींनी वाढण्याचे निश्चित आहे. असा अंदाज आहे की 2047 पर्यंत भारतात चारशेहून अधिक विमानतळ असतील, हे एक मोठे जाळे असेल. इतकेच नाही तर आमचे सरकार उडान योजनेच्या पुढील टप्प्यावरही काम करत आहे. या धोरणामुळे प्रादेशिक आणि परवडणारी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. या सर्वांसोबतच, सीप्लेन ऑपरेशन्सचाही विस्तार केला जात आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हवाई कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मित्रांनो,

आज भारत सरकार पर्यटन क्षेत्राच्या विकासावर जोरदार भर देत आहे. देशभरात पर्यटन स्थळे विकसित होत आहेत आणि या ठिकाणी जाण्यासाठी हवाई प्रवासालाच मोठ्या संख्येने लोकांची पसंती असते. येत्या काळात हवाई प्रवासाच्या मागणीत आणखी अभूतपूर्व वाढ होणार आहे, म्हणजेच तुम्हा सर्वांसाठी गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो, 

आज भारत एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनत असताना आपल्या हवाई वाहतुकीच्या गरजांसाठी आपण इतरांवर अवलंबून राहू नये हे देखील महत्त्वाचे आहे. आपण आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मजबूत केलाच पाहिजे. हे भारतात गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांसाठीदेखील उपयुक्त ठरेल. याच विचाराने भारत विमान आरेखन, विमान निर्मिती आणि विमान एमआरओ परिसंस्थेवर खूप भर देत आहे. आजही भारत विमानांच्या सुट्या भागांचा एक प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार आहे. आपण देशांतर्गत लष्करी आणि वाहतूक विमानांचे उत्पादन सुरू करत आहोत. भारत नागरी विमान निर्मितीच्या दिशेनेही पुढे जात आहे आणि तुम्हा सर्व गुंतवणूकदारांना माहिती आहे की, भारताचीही अनेक बलस्थाने आहेत. जागतिक हवाई संचारमार्गात भारताची भौगोलिक स्थिती, आमचे अतुलनीय देशांतर्गत फीडर नेटवर्क आणि भविष्यात होणारा लांब पल्ल्याच्या ताफ्यांचा विस्तार ही आमची सर्वात मोठी ताकद आहे.

मित्रांनो,

तो दिवस दूर नाही जेव्हा भारतात आरेखित आणि उत्पादित केलेले इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग विमान संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्राला एक नवीन दिशा देईल. हे तंत्रज्ञान आपला प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करू शकते. याशिवाय आम्ही शाश्वत विमान इंधनावरदेखील उत्तम काम करत आहोत. पुढील काही वर्षांत भारत हरित विमान इंधनाचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मित्रांनो,

आम्ही देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक सुधारणा राबवत आहोत. अशा प्रत्येक प्रयत्नामुळे भारताला ग्लोबल साऊथ आणि जगादरम्यानचे एक प्रमुख हवाई वाहतूक प्रवेशद्वार बनवले जात आहे. ही हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

मित्रांनो,

आज भारत देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांनाच नव्हे तर त्यांच्या बाजारपेठांनाही जोडत आहे. आमची शहरे वाहतुकीच्या विविध पद्धतींद्वारे बंदरांशी जोडली जात आहेत. भारताचे हवाई वाहतूक धोरण हे हवाई मालवाहतुकीवरदेखील तितकेच केंद्रित आहे. मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियामक सुधारणांवर सरकार काम करत आहे. यासोबतच, आमचे डिजिटल कार्गो प्लॅटफॉर्म संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करत आहेत. ऑफ-एअरपोर्ट प्रोसेसिंग सिस्टममुळे आमच्या विमानतळांवरचा भारदेखील कमी होत आहे. आम्ही अशी आधुनिक गोदामेदेखील बांधत आहोत, ज्यामुळे माल हाताळणीचे काम जलद आणि चांगल्या प्रकारे होईल. यामुळे भविष्यात मालाची डिलिव्हरी वेळ आणि लॉजिस्टिक्स खर्च दोन्ही कमी होतील. भविष्यात, जेव्हा भारत एक मोठे आणि स्पर्धात्मक ट्रान्सशिपमेंट हब म्हणून उदयास येईल.

मित्रांनो,

मी सर्व गुंतवणूकदारांना सांगू इच्छितो की त्यांनी भारतातील वेअरहाऊसिंग क्षेत्र, फ्रेट फॉरवर्डिंग, एक्सप्रेस लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स या सर्व क्षेत्रांमधील संधींचा जरूर शोध घ्यावा.

मित्रांनो,

आज जगात असे काही मोजकेच देश आहेत ज्यांच्याकडे हवाई वाहतूक उद्योगासाठी इतके मोठे क्षेत्र, धोरणात्मक स्थिरता आणि तांत्रिक महत्त्वाकांक्षा आहे. मी प्रत्येक देशाला, प्रत्येक उद्योग नेत्याला आणि प्रत्येक नवोन्मेषकाला या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचे आवाहन करतो. आमच्या विकास प्रवासाचे दीर्घकालीन भागीदार बना आणि जगातील हवाई वाहतूक क्षेत्राच्या वाढीसाठी काम करा. मी जगभरातील गुंतवणूकदारांना आमच्यात सामील होण्यासाठी आणि भारताच्या उड्डाणाचे सह-वैमानिक बनण्यासाठी आमंत्रित करतो. पुन्हा एकदा, विंग्स इंडिया, तुम्हाला सर्वांना याच्या यशस्वी आयोजनासाठी माझ्याकडून शुभेच्छा. 

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%

Media Coverage

India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मार्च 2026
March 14, 2026

Heartening Resolve Meets Bold Action: PM Modi's Transformative Push for a Developed Assam.