भारताचा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतोः पंतप्रधान
विज्ञान आणि अध्यात्म, या दोन्ही आपल्या देशाच्या शक्ती आहेतः पंतप्रधान
"चांद्रयान मोहिमेच्या यशाने देशातील बालकांमध्ये आणि तरुणांमध्ये विज्ञानाबद्दल नव्याने रुची निर्माण झाली आहे. अंतराळात संशोधन करण्याची आवड निर्माण झाली आहे आणि आता तुमची ही ऐतिहासिक मोहीम या संकल्पाला अधिक बळ देत आहे - पंतप्रधान
आपल्याला मिशन गगनयान पुढे न्यायचे आहे, आपल्याला आपले स्वतःचे अंतराळ स्थानक उभारायचे आहे आणि भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर देखील उतरवायचे आहेः पंतप्रधान
आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की हा भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा पहिला अध्याय आहे. तुमची ही ऐतिहासिक मोहीम केवळ अंतराळापुरती मर्यादित नाही, ती आपल्या विकसित भारताच्या प्रवासाला गती आणि नवी ऊर्जा देईल- पंतप्रधान
भारत जगासाठी अंतराळातील नव्या संधींचे दरवाजे खुले करणार आहेः पंतप्रधान

पंतप्रधान: शुभांशु नमस्कार!

शुभांशु शुक्ला: नमस्कार!

पंतप्रधान: आज तुम्ही मातृभूमीपासून, भारतभूमीपासून, सर्वात दूर आहात, पण भारतीयांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात. तुमच्या नावातही शुभ आहे आणि तुमचा हा प्रवास एका नव्या युगाची सुरुवातही आहे. यावेळी बोलत आहोत आपण दोघे, पण माझ्यासोबत 140 कोटी भारतवासीयांच्या भावना देखील आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आणि आकांक्षा समाविष्ट आहेत. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेत नाहीये, तर सर्वात आधी हे सांगा, तिथे सर्व क्षेम-कुशल आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे?

शुभांशु शुक्ला: हो पंतप्रधान महोदय! खूप खूप धन्यवाद, तुमच्या आणि माझ्या 140 कोटी देशवासीयांच्या शुभेच्छांबद्दल. मी इथे अगदी ठीक आणि सुरक्षित आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे... खूप छान वाटत आहे. हा एक खूपच नवीन अनुभव आहे आणि कुठेतरी अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या दर्शवतात की मी आणि माझ्यासारखे अनेक लोक आपल्या देशात आणि आपला भारत कोणत्या दिशेने जात आहे."

माझा हा जो प्रवास आहे, पृथ्वीपासून या कक्षेपर्यंतचा 400 किलोमीटरचा हा जो लहानसा प्रवास आहे, हा केवळ माझा नाही आहे. मला असे वाटते की कुठे ना कुठे हा आपल्या देशाचा देखील प्रवास आहे, कारण जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की मी अंतराळवीर (astronaut) बनू शकेन; पण मला वाटते की तुमच्या नेतृत्वाखाली आजचा भारत अशी संधी देतो आणि त्या स्वप्नांना साकार करण्याचीही संधी देतो, त्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी कामगिरी आहे आणि मला खूप अभिमान वाटत आहे की मी इथे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकत आहे. धन्यवाद.

पंतप्रधान: शुभ, तुम्ही दूर अंतराळात आहात, जिथे गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याप्रमाणेच आहे, पण प्रत्येक भारतीयाला हे दिसत आहे की तुम्ही किती ‘डाऊन टू अर्थ’ आहात. तुम्ही जो गाजराचा हलवा घेऊन गेला आहात, तो तुमच्या सहकाऱ्यांना खायला दिलात का?

 

शुभांशु शुक्ला: हो पंतप्रधान महोदय! हे काही पदार्थ, मी आपल्या देशाचे काही खाद्यपदार्थ घेऊन आलो होतो; म्हणजे गाजराचा हलवा, मुगाच्या डाळीचा हलवा आणि आमरस आणि माझी अशी इच्छा होती की माझे जे सहकारी आहेत, इतर देशातून जे आले आहेत, त्यांनी देखील याची चव घ्यावी आणि चाखावी, भारताची जी समृद्ध खाद्य संस्कृती (rich culinary), आपला जो वारसा आहे, त्याचा अनुभव घ्यावा. तर आम्ही सर्वांनी एकत्र बसून याची चव चाखली आणि सर्वांना ते खूपच आवडले. काही लोकांनी तर अशी इच्छा व्यक्त केली की कधी ते खाली येतील आणि आपल्या देशाला भेट देतील आणि आपल्यासोबत या पदार्थांची चव चाखायची संधी मिळेल...

पंतप्रधान: शुभ, प्रदक्षिणा (परिक्रमा) घालणे ही भारताची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. तुम्हाला तर पृथ्वीमातेची प्रदक्षिणा करण्याचे भाग्य लाभले आहे. आता तुम्ही पृथ्वीच्या कोणत्या भागावरून जात असाल?

शुभांशु शुक्ला: "होय पंतप्रधान महोदय! या क्षणी माझ्याकडे ही माहिती उपलब्ध नाही, पण थोड्या वेळापूर्वी मी खिडकीतून बाहेर बघत होतो, तेव्हा आम्ही हवाई (Hawaii) वरून जात होतो. आम्ही दिवसातून 16 वेळा परिक्रमा करतो. कक्षेतून (orbit) आम्ही 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त पाहतो, आणि ही संपूर्ण प्रक्रिया खूपच आश्चर्यचकित करणारी आहे."

"या परिक्रमेत, या वेगवान गतीत, आम्ही या वेळी सुमारे 28,000 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत आहोत, तुमच्याशी बोलत असतानाही. ही गती जाणवत नाही कारण आम्ही आत आहोत, पण कुठेतरी ही गती नक्कीच दाखवते की, आपला देश किती वेगाने पुढे जात आहे."

पंतप्रधान: वा!

शुभांशु शुक्ला: यावेळी आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि इथून आणखी पुढे जायचे आहे.

पंतप्रधान: बरं, शुभ अंतराळाची भव्यता पाहून तुमच्या मनात सर्वात पहिला विचार कोणता आला?

शुभांशु शुक्ला: पंतप्रधान महोदय, खरं सांगायचे झाले तर ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही लोक कक्षेत पोहोचल्यावर, अंतराळात पोहोचल्यावर, जे पहिले दृश्य होते, ते पृथ्वीचे होते आणि पृथ्वीला बाहेरून पाहताना पहिली भावना, पहिला विचार जो मनात आला तो हा होता की पृथ्वी पूर्णपणे अखंड दिसते, म्हणजे बाहेरून कोणत्याही सीमारेषा दिसत नाहीत, कोणती बॉर्डर दिसत नाही आणि दुसरी गोष्ट जी खूपच दखल घेण्याजोगी होती, ज्यावेळी भारताला पाहिले, जेव्हा आपण नकाशावर शिकत असतो, भारताला पाहात असतो, तेव्हा इतर देशांचा आकार केवढा मोठा आहे, आपला आकार कसा आहे, ते नकाशावर पाहात असतो, पण ते काही योग्य नसते, कारण आपण त्रिमितीय आकाराला द्विमितीमध्ये म्हणजे कागदावर उतरवत असतो. भारत खरोखरच खूपच भव्य वाटतो. खूप मोठा वाटतो, जितका आपण नकाशात पाहतो, त्यापेक्षा खूपच जास्त मोठा आणि ही एकतेची भावना आहे, पृथ्वीच्या एकते भावना आहे, आपले जे घोषवाक्य आहे, ‘अनेकतेमध्ये एकता’ त्याचे खरे महत्त्व अशा प्रकारे लक्षात येते. बाहेरून पाहिल्यावर जाणवते की कोणतीही सीमा अस्तित्वातच नाही, कोणतेही राज्य अस्तित्वात नाही, देश अस्तित्त्वात नाहीत, शेवटी आपण सर्व मानवतेचा भाग आहोत आणि पृथ्वी हे आपल्या सर्वांचे एकच घर आहे आणि आपण सर्व त्याचे नागरिक आहोत.

पंतप्रधान:  "शुभांशु, तुम्ही अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय आहात. तुम्ही जबरदस्त मेहनत केली आहे, प्रदीर्घ प्रशिक्षण घेऊन गेला आहात. आता तुम्ही प्रत्यक्ष त्या परिस्थितीत आहात, खऱ्या अर्थाने अंतराळात आहात. तिथली परिस्थिती किती वेगळी आहे? तुम्ही स्वतःला कसे जुळवून घेत आहात?"

शुभांशु शुक्ला: "येथे तर सर्व काही वेगळे आहे पंतप्रधान महोदय. आम्ही गेल्या वर्षभरात प्रशिक्षण घेतले, मला सर्व प्रणालींबद्दल माहिती होती, सर्व प्रक्रियेबद्दल माहिती होती, प्रयोगांबद्दल माहिती होती. पण इथे आल्यावर अचानक सर्व काही बदलले, कारण आपल्या शरीराला गुरुत्वाकर्षणात (gravity) राहण्याची इतकी सवय असते की प्रत्येक गोष्ट त्यावर अवलंबून असते. पण इथे आल्यानंतर, सूक्ष्मगुरुत्वाकर्षण असल्याने, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही खूप कठीण होतात."

"आता तुमच्याशी बोलत असताना मी माझे पाय बांधलेले आहेत, नाहीतर मी वर जाईन. आणि माईकलाही असे सोडले तरी तो तरंगत (float) राहतो. पाणी पिणे, चालणे, झोपणे हे खूप मोठे आव्हान आहे. तुम्ही छतावर झोपू शकता, भिंतींवर झोपू शकता, जमिनीवर झोपू शकता."

"तर, पंतप्रधान महोदय, सर्व काही माहीत असते, प्रशिक्षण चांगले असते, पण वातावरण बदलल्यावर थोडे जुळवून घ्यायला एक-दोन दिवस लागतात, पण मग ठीक होते, मग सर्व सामान्य होते."

 

पंतप्रधान:  "शुभ, भारताची ताकद विज्ञान आणि आध्यात्मिकता दोन्हीमध्ये आहे. तुम्ही अंतराळात प्रवास करत आहात, पण भारताचा प्रवासही चालू असेल. तुमच्या आतमध्ये भारत धावत असेल. त्या वातावरणात मेडिटेशन (ध्यान) आणि माइंडफूलनेस (सजगता) चा लाभ मिळतो का?"

शुभांशु शुक्ला: होय पंतप्रधान महोदय, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मला कुठेतरी असे वाटते की, भारत आधीच धावत आहे आणि हे मिशन तर त्या मोठ्या शर्यतीची फक्त पहिली पायरी आहे. आपण नक्कीच पुढे पोहोचत आहोत आणि भविष्यात आपले स्वतःचे अंतराळ स्थानक (space station) देखील असेल आणि अनेक लोक तिथे पोहोचतील." "माइंडफूलनेसचा  खूप फरक पडतो. सामान्य प्रशिक्षणादरम्यान किंवा प्रक्षेपणाच्या (launch) वेळीही अनेकदा परिस्थिती खूप तणावपूर्ण असते आणि माइंडफूलनेसमुळे तुम्ही अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवू शकता आणि स्वतःला स्थिर ठेवू शकता. जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता." "असे म्हणतात की, धावपळ करत कोणीही व्यवस्थित जेवू शकत नाही. त्याचप्रमाणे, तुम्ही जितके शांत राहाल, तितके चांगले निर्णय घेऊ शकाल. त्यामुळे मला वाटते की, अशा गोष्टींमध्ये माइंडफूलनेसची खूप महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी (विज्ञान आणि आध्यात्मिकता) एकत्र सरावल्यास, अशा आव्हानात्मक वातावरणात त्या खूप उपयुक्त ठरतील आणि लोकांना लवकर जुळवून घेण्यास मदत करतील, असे मला वाटते."

पंतप्रधान: आपण अंतराळात अनेक प्रयोग करत आहात. येत्या काळात कृषी किंवा आरोग्य क्षेत्रासाठी उपयुक्त असा प्रयोग यात आहे का? 

शुभांशु शुक्ला: होय, पंतप्रधान महोदय, मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की भारतीय वैज्ञानिकांनी प्रथमच आखलेले 7 अनोखे प्रयोग मी माझ्यासमवेत इथे स्थानकावर घेऊन आलो आहे. आजच्या दिवशीचा नियोजित प्रयोग आहे, जो मी करणार आहे तो म्हणजे स्टेम सेल्सवरचा. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते, त्यामुळे भार नाहीसा होतो, स्नायुंचा ऱ्हास होतो. तर माझा प्रयोग आहे त्यातून पाहायचे आहे की एखादा पूरक आहार देऊन आपण हा ऱ्हास रोखू किंवा लांबवू शकतो का? याचा थेट उपयोग  पृथ्वीवरही होऊ शकेल, ज्या लोकांचा वयोमानामुळे स्नायूंचा ऱ्हास होतो त्यांच्यासाठी या पूरक आहाराचा वापर करता येईल. मला तर वाटते की पृथ्वीवर याचा नक्कीच वापर करता येईल. त्याचबरोबर दुसरा प्रयोग आहे सूक्ष्म शेवाळाच्या वाढीसंदर्भातला. सूक्ष्म शेवाळे अतिशय छोटे असले तरी ते अतिशय पौष्टिक असते. जर आपण याची वाढ पाहू शकलो आणि इथे अशी प्रक्रिया केली की मोठ्या प्रमाणात याची लागवड करू शकू आणि पोषण देऊ शकू तर पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्न सुरक्षेसाठीही याचा उपयोग होईल. अंतराळाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ही जी प्रक्रिया आहे ती इथे अतिशय वेगाने होते. आपल्याला अनेक  महिने किंवा वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत नाही. इथले जे परिणाम असतात ते ....  

पंतप्रधान: शुभांशु,चंद्रयानाच्या यशानंतर देशातली मुले, युवकांमध्ये विज्ञानाविषयी नवी गोडी निर्माण झाली, अंतराळात शोध घेण्याचा हुरूप वाढला. आपला हा ऐतिहासिक प्रवास हा संकल्प आणखी दृढ करत आहे. आज मुले केवळ आकाश पाहत नाहीत तर मी सुद्धा इथे पोहोचू शकतो हा विचार करतात. हा विचार, ही भावना भविष्यातल्या आपल्या अंतराळ अभियानाचा खरा पाया आहेत. भारतातल्या युवकांना आपण काय संदेश द्याल?

शुभांशु शुक्ला: पंतप्रधान महोदय, आपल्या युवा पिढीला संदेश देऊ इच्छिताना मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की, भारताचा ज्या दिशेने प्रवास सुरु आहे, आपण अतिशय धाडसी आणि उत्तुंग स्वप्ने पाहिली आहेत आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी आपणा सर्वांची आवश्यकता आहे. यशाचा मार्ग एकच नसतो. आपण कधी एक मार्ग निवडतो तर दुसरा कोणी आणखी एखादा मार्ग निवडतो. मात्र प्रत्येक मार्गात एक गोष्ट समान असते ती म्हणजे आपण प्रयत्नांची कास कधीच सोडू नका, प्रयत्न कधीही थांबवू नका. हा मूलमंत्र तुम्ही अंगिकारला तर आपण कोणत्याही मार्गावर आणि कोठेही असलात तरी आपण हार मानणार नाही, यश आज मिळेल नाहीतर उद्या, पण ते मिळणार हे नक्की.

पंतप्रधान: आपला हा मंत्र देशातल्या युवकांना नक्कीच आवडला असेल याचा मला विश्वास आहे. मी जेव्हा कोणाशी संवाद साधतो तेव्हा गृहपाठ नक्कीच देतो हे आपणाला माहित असेलच. आपल्याला मिशन गगनयान पुढे न्यायचे आहे. आपल्याला स्वतःचे अंतराळ स्थानक उभारायचे आहे आणि भारतीय शास्त्रज्ञांना चंद्रावर  न्यायचे आहे. या सर्व अभियानात आपले अनुभव नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्ही आपल्या अनुभवांची नक्कीच नोंद करत असाल याचा मला विश्वास आहे.

शुभांशु शुक्ला: होय,पंतप्रधान महोदय, नक्कीच, या संपूर्ण अभियानासाठी प्रशिक्षण घेताना, प्रयोग करताना मी जे अनुभव घेतले आहेत, जो बोध घेतला आहे, तो एखाद्या स्पंजप्रमाणे मी टिपून घेत आहे आणि मला विश्वास आहे की या सर्व गोष्टी मोलाच्या ठरणार आहेत, आपणासाठी अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. मी जेव्हा पृथ्वीवर परतेन तेव्हा त्यांचा आपल्या अभियानांमध्ये उपयोग करून ते लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊ शकू. माझ्यासमवेत जे सहकारी आले आहेत त्यांनीही मला गगनयान मध्ये सहभागाची शक्यता विचारली, मलाही हे ऐकून चांगले वाटले आणि लवकरच असे मी त्यावर उत्तर दिले. मला वाटते, हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि मला इथे जो बोध मिळाला आहे, परतल्यावर मी त्याचा, आपल्या अभियानामध्ये 100 टक्के उपयोग करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 

 

पंतप्रधान: शुभांशु, मला विश्वास आहे की आपला हा संदेश प्रेरणादायी ठरेल. आपण अंतराळात जाण्यापूर्वी आपण भेटलो होतो, आपल्या कुटुंबियांशीही भेटीची संधी मिळाली होती, आपले कुटुंबीयही तितकेच भावूक त्याचबरोबर उत्साही होते. शुभांशु,आपणासमवेत संवाद साधताना मला आनंद झाला, आपणासाठी बरेच काम आहे आणि 28,000 किलोमीटर वेगाने आपल्याला काम करायचे आहे हे मी जाणतो, आपला जास्त वेळ घेत नाही. भारताच्या गगनयान मिशनच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे, असे मी खात्रीने म्हणू शकतो. आपला हा अंतराळ प्रवास केवळ अंतराळापुरता मर्यादित नाही, तो आपल्या विकसित भारत वाटचालीला अधिक वेग आणि नवी बळकटी देईल. भारत, जगासाठी अंतराळामधल्या नव्या शक्यतांची द्वारे खुली करण्यासाठी निघाला आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही तर भविष्यातल्या उड्डाणांसाठी मंच तयार करणार आहे. मला वाटते, मी प्रश्न विचारण्याऐवजी आपल्या मनात आणखी काही सांगायची इच्छा असेल, तर आपण आपले मनोगत व्यक्त करावे, देशवासीय ऐकतील, देशाची युवा पिढी ऐकेल.मला स्वतःला सुद्धा, आपल्याकडून आणखी काही गोष्टी ऐकण्याची उत्सुकता आहे.   

शुभांशु शुक्ला: धन्यवाद, पंतप्रधान महोदय! अंतराळापर्यंत पोहोचण्याचा हा जो संपूर्ण प्रवास, त्यासाठीच्या प्रशिक्षणातून खूप काही शिकायला मिळाले, पंतप्रधान महोदय, मात्र इथे पोहोचल्यानंतर वैयक्तिक यशपूर्ती तर आहेच, त्याचबरोबर आपल्या देशासाठीही ही अतिशय मोठी सामुहिक कामगिरी आहे, असे मला वाटते. आपला हा संवाद पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक युवकाला मी  संदेश देऊ इच्छितो की आपण प्रयत्न करत राहिलात आणि उत्तम रीतीने आपले भविष्य घडवत राहिलात तर आपले भविष्य उत्तम साकारेल, आपल्या देशाचे भविष्यही उत्तम घडेल. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, आकाश अनंत आहे, त्याला मर्यादा नाही, आपल्यासाठी मर्यादा नाही, माझ्यासाठी नाही आणि भारतासाठीही मर्यादा नाही. ही बाब लक्षात ठेवली तर आपण आगेकूच कराल आणि आपले भविष्य उज्वल कराल, आपल्या देशाचे भविष्यही उज्वल कराल इतकाच माझा संदेश आहे, पंतप्रधान महोदय, आपल्याशी संवाद साधण्याची आणि त्याद्वारे 140 कोटी देशवासियांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली याचा मला अतिशय अतिशय आनंद झाला आहे, मी भावविवश झालो आहे. आपण पाहू शकत आहात, माझ्यापाठी हा जो तिरंगा आपण पाहत आहात, तो इथे नव्हता, काल मी प्रथम जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही पहिल्यांदा तो इथे लावला. मला हा क्षण भावनिक करतो, भारत आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे.

पंतप्रधान: शुभांशु, आपणाला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या या अभियानाच्या यशाबद्दल खूप-खूप शुभेच्छा देतो. शुभांशु, आम्ही सर्वजण आपल्या परतण्याची वाट पाहत आहोत. स्वतःची काळजी घ्या, भारतमातेचा सन्मान वृद्धिंगत करत राहा. खूप-खूप शुभेच्छा! 140 कोटी देशवासीयांच्या शुभेच्छा! कठोर मेहनतीने अंतराळापर्यंत पोहोचल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद! भारत माता की जय!     

शुभांशु शुक्ला: धन्यवाद, पंतप्रधान महोदय! 140 कोटी देशवासियांनाही धन्यवाद! आणि अंतराळातून सर्वांसाठी भारत माता की जय!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors

Media Coverage

PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Pays Tribute to the Martyrs of the 2001 Parliament Attack
December 13, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today paid solemn tribute to the brave security personnel who sacrificed their lives while defending the Parliament of India during the heinous terrorist attack on 13 December 2001.

The Prime Minister stated that the nation remembers with deep respect those who laid down their lives in the line of duty. He noted that their courage, alertness, and unwavering sense of responsibility in the face of grave danger remain an enduring inspiration for every citizen.

In a post on X, Shri Modi wrote:

“On this day, our nation remembers those who laid down their lives during the heinous attack on our Parliament in 2001. In the face of grave danger, their courage, alertness and unwavering sense of duty were remarkable. India will forever remain grateful for their supreme sacrifice.”