प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, जेव्हा ती अधीनतेच्या शतकानुशतके जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते, तेव्हा ती नव्या उर्जेने भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते. याचाच परिणाम प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या एकता का महाकुंभ म्हणजेच एकतेच्या महाकुंभमध्ये पाहायला मिळाला.

दिनांक 22 जानेवारी, 2024 रोजी, अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती म्हणजेचे अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते. प्रयागराज येथील महाकुंभात देवी आणि देवता, संत, महिला, लहान मुले, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले. देशामध्ये जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन यावेळी घडले. या पवित्र पर्वासाठी सुमारे 140 कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता.

प्रयागराजच्या या पूजनीय प्रदेशात श्रुंगवेरपूर ही एकता, सुसंवाद आणि प्रेमाने भरलेली पवित्र भूमी आहे. श्रीराम आणि निषादराज येथेच परस्परांना भेटले असे म्हणतात. त्यांची ही भेट भक्ती आणि सद्भावनेचे प्रतीक मानली जाते. आजही, प्रयागराज याच भावनेसह आपल्याला प्रेरित करते.

या 45 दिवसांत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कोट्यवधी लोक संगमावर येत होते. संगमाच्या जागी भावभक्तीच्या लाटा उसळत होत्या. प्रत्येक भाविक येथे एकाच उद्देशाने आला- संगमात स्नान करणे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा हा पवित्र संगम प्रत्येक यात्रेकरुचे मन उत्सुकता, उर्जा आणि विश्वासाने भरून टाकत होता.

प्रयागराज मधील महाकुंभ म्हणजे आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक, नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ञ यांच्यासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे. जगात या भव्यतेशी समांतर असेल किंवा त्याचे उदाहरण ठरेल असे आयोजन कुठेही झालेले नाही.

प्रयागराज येथे नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी, किनाऱ्यांवर कशा प्रकारे कोट्यवधी लोक गोळा झाले ते संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन पाहिले. या लोकांना कोणतेही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कधी-कुठे जायचे आहे यासंदर्भात त्यांच्यात आधी कोणताही संवाद झालेला नव्हता. तरीही, कोटीच्या कोटी लोक स्वतःच्या मर्जीने महाकुंभाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले आणि त्यांनी पवित्र जलात स्नान करण्याचे भाग्य अनुभवले.

या पवित्र स्नानानंतर अतीव आनंद आणि समाधानाने चमकणारे त्यांचे चेहरे मी विसरु शकत नाही. महिला, वयोवृध्द, आपले दिव्यांग बंधू-भगिनी अशा सर्वांनी संगमावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला.

या सोहोळ्यात भारतातील तरुणांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग बघणे माझ्यासाठी विशेष हृदयस्पर्शी होते. महाकुंभासारख्या पर्वात तरुण पिढीचा सहभाग असा गहन संदेश देतो की भारतीय युवक आपल्या वैभवशाली संस्कृती आणि वारशाचे मशालवाहक असतील. ही संस्कृती आणि वारसा जपण्याची त्यांची जबाबदारी त्यांना माहित असून ती पुढे नेण्याप्रती ते कटिबद्ध आहेत.

महाकुंभात उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजला आलेल्या लोकांच्या संख्येने निःसंशयपणे नवे विक्रम रचले आहेत. मात्र, प्रत्यक्ष तेथे हजर असलेल्या लोकांबरोबरच जे प्रयागराजला पोहोचू शकले नाहीत असे कोट्यवधी लोक देखील मनाने या सोहोळ्याशी घट्टपणे बांधले गेले होते.तेथे गेलेल्या भाविकांनी आणलेले पवित्र जल लाखो लोकांसाठी अध्यात्मिक आशीर्वादाचा स्त्रोत ठरले.महाकुंभाला उपस्थित राहून परतलेल्या अनेकांचे त्यांच्या गावांमध्ये आदराने स्वागत झाले, समाजाने त्यांचा गौरव केला.

गेल्या काही आठवड्यांत जे घडले, ते अभूतपूर्व असून, त्याने येणाऱ्या काही शतकांसाठी पाया रचला आहे.

प्रयागराजमध्ये कल्पनेपेक्षा अधिक भाविक दाखल झाले. कुंभमेळ्यातील मागील अनुभवांच्या आधारावर प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज बांधला होता.

या एकतेच्या महाकुंभात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट संख्येने भाविक सहभागी झाले.

अध्यात्माच्या अभ्यासकांनी कोट्यवधी भारतीयांच्या या उत्साही सहभागाचे विश्लेषण केले, तर त्यांना असे दिसून येईल, की आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत आता एका नव्या ऊर्जेने पुढे जात आहे. मला विश्वास आहे, की ही एका नवीन युगाची पहाट आहे, जी नव्या भारताचे भविष्य लिहिणार आहे.

हजारो वर्षांपासून या महाकुंभाने भारताची राष्ट्रीय जाणीव बळकट केली आहे. प्रत्येक पूर्णकुंभात संत, अभ्यासक आणि विचारवंत आपापल्या काळातील समाजाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येत होते. त्याचे प्रतिबिंब देशाला आणि समाजाला नवी दिशा देत होते. दर सहा वर्षांनी अर्धकुंभादरम्यान या कल्पनांचा आढावा घेतला जात असे. 144 वर्षांच्या 12 पूर्णकुंभ सोहळ्यानंतर, कालबाह्य परंपरांचा त्याग करण्यात आला, नवीन कल्पना आत्मसात करण्यात आल्या आणि काळा बरोबर पुढे जात नव्या परंपरा निर्माण करण्यात आल्या.

144 वर्षांनंतर यंदाच्या महाकुंभात आपल्या संतांनी पुन्हा एकदा भारताच्या विकासयात्रेसाठी नवा संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, विकसित भारत.

या एकतेच्या महाकुंभात प्रत्येक भाविक, मग तो श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वा वृद्ध, खेड्यापाड्यातील असो वा शहरातील, भारतातील असो, अथवा परदेशी, पूर्वेकडील असो, की पश्चिमेकडील, उत्तरेकडील असो, की दक्षिणेकडील, जात, पात, विचारधारा यांचा विचार न करता या ठिकाणी सर्वजण एकत्र आले. कोट्यवधी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे हे मूर्त रूप होते. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आता आपण याच भावनेने एकत्र यायला हवे.

श्रीकृष्णाने बालपणी यशोदा मातेला आपल्या मुखात संपूर्ण विश्वाचे दर्शन घडवले होते, तो प्रसंग मला आठवतो. त्याचप्रमाणे या महाकुंभात भारताच्या सामूहिक सामर्थ्याची प्रचंड क्षमता भारतीयांनी आणि जगभरातील लोकांनी पाहिली. आपण आता याच आत्मविश्वासाने पुढे जायला हवे आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी स्वत:ला समर्पित करायला हवे.

यापूर्वी भक्ती चळवळीतील संतांनी भारतभरातील आपल्या सामूहिक संकल्पाची ताकद ओळखून त्याला प्रोत्साहन दिले होते. स्वामी विवेकानंदांपासून ते अरविंदांपर्यंत प्रत्येक थोर विचारवंताने आपल्याला सामूहिक संकल्पांच्या शक्तीची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनीही याचा अनुभव घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात जर या सामूहिक शक्तीची ताकद ओळखली गेली असती, आणि त्याचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी झाला असता, तर नुकतेच स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या आपल्या देशासाठी ती एक मोठी ताकद ठरली असती. दुर्दैवाने, हे यापूर्वी केले गेले नाही. विकसित भारतासाठी लोकांची ही सामूहिक शक्ती ज्या प्रकारे एकत्र येत आहे, ते पाहून मला आनंद वाटत आहे.

वेदांपासून ते विवेकानंदांपर्यंत, प्राचीन धर्मग्रंथांपासून ते आधुनिक उपग्रहांपर्यंत, भारताच्या महान परंपरेने हा देश घडवला आहे. एक नागरिक म्हणून मी प्रार्थना करतो की, आपण आपल्या पूर्वजांच्या आणि संतांच्या आठवणींमधून नवी प्रेरणा घ्यावी. हा एकतेचा महाकुंभ आपल्याला नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी सहाय्य करेल. आपण एकतेला आपले मार्गदर्शक तत्त्व बनवूया. राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा आहे, या विचाराने आपण काम करूया.

काशी इथे निवडणूक प्रचार करत असताना मी म्हटले होते, की माता गंगेने मला बोलावणे धाडले आहे. हे केवळ एक भावनात्मक विधान नव्हते, तर तो आपल्या पवित्र नद्यांच्या स्वच्छतेच्या जबाबदारीप्रती प्रतिसाद होता. प्रयागराजमध्ये, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तिथे उपस्थित असताना तर माझा हा संकल्प अधिकच दृढ झाला. आपल्या नद्यांची स्वच्छता आपल्या स्वतःच्या जगण्याशी खूपच खोलवर जोडली गेलेली आहे. मोठ्या असोत किंवा लहान, आपल्या नद्यांना जीवनदायीनी प्रमाणे जपणे हीच आपली जबाबदारी आहे. या महाकुंभने आपल्याला आपल्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत राहण्याची प्रेरणा दिली आहे.

मला जाणीव आहे की, एवढ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे हे काही सोप्पे काम नव्हते. मी माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वतीला प्रार्थना करतो की, आमच्या भक्तीत कोणतीही त्रुटी राहिली असेल, तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी. मी जनता जनार्दनाला, लोकांना देवत्वाचे प्रतीक मानतो. त्यांची सेवा करण्याच्या प्रयत्नांमध्ये देखील जर कोणतीही उणीव राहिली असेल, तर जनतेनेही क्षमा करावी अशी मी प्रार्थना करतो.

कोट्यवधी लोक भक्तिभावाने या महाकुंभसाठी आले होते. त्यांची सेवा करणे ही एक जबाबदारी होती आणि तीही आम्ही त्याच भक्ती भावनेने पार पाडली. उत्तर प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संसदेतील सदस्य म्हणून मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, योगीजींच्या नेतृत्वाखाली इथल्या प्रशासनाने आणि जनतेने एकत्र येऊन हा एकतेचा महाकुंभ यशस्वी केला. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, इथे कुणीही शासक किंवा प्रशासक नव्हते, तर प्रत्येक जण म्हणजे समर्पण भावनेने काम करणारे सेवकच होते. स्वच्छता कर्मचारी, पोलीस, नावाडी, वाहनचालक, अन्नदानाची सेवा देणारे लोक – अशा प्रत्येकाने अथक परिश्रम घेतले. प्रयागराजच्या जनतेने त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत असतानाही, ज्या उत्साहाने अंतःकरणापासून यात्रेकरूंचे स्वागत केले, ते तर विशेषत्वाने प्रेरणा देणारेच होते. याबद्दल मी त्यांचे आणि उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो.

माझा आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यावर कायमच अढळ विश्वास राहिला आहे. या महाकुंभातून मिळालेल्या अनुभवाने तर हा विश्वास आता अनेक पटींनी वाढला आहे.

140 कोटी भारतीयांनी या एकतेच्या महाकुंभला ज्या रितीने जागतिक स्तरावरील एका भव्य सोहळ्याचे स्वरुप मिळवून दिले ते खरोखरच अद्भुत आहे. आपल्या लोकांच्या समर्पण भावनेने, त्यांच्यातील भक्तीभावाने आणि प्रयत्नांनी प्रेरित होऊन मी लवकरच 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या श्री सोमनाथ इथे भेट देणार आहे, तिथे मी या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचे फलित त्यांना अर्पण करणार आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रार्थनाही करणार आहे.

एक आयोजन म्हणून महाकुंभच्या या सोहळ्याचा महाशिवरात्रीला यशस्वी समारोप झाला असला, तरी देखील ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह जसा अनंत आहे, त्याचप्रमाणे या महाकुंभने जागृत केलेली आध्यात्मिक शक्ती, राष्ट्रीय जाणीवा आणि ऐक्याची भावना भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहणार आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains among best-performing major economies: S&P Global

Media Coverage

India remains among best-performing major economies: S&P Global
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
महात्मा जोतिराव फुलेः एक प्रकाश जो भारताला अजूनही मार्ग दाखवत आहे
April 11, 2026

आज, 11 एप्रिल, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेष दिवस आहे. भारताच्या अनेक महान समाजसुधारकांपैकी एक आणि पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती आहे. यावर्षी या जयंतीदिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ होत आहे.

महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक होते. त्याबरोबरच, त्यांचे जीवन नैतिक धैर्य, निरंतर जिज्ञासा आणि सामाजिक हितासाठी अविचल वचनबद्धतेचे प्रतीक होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींसाठी त्यांचे स्मरण केले जाते. त्याच वेळी, आपल्या सांस्कृतिक प्रवासातील त्यांचे योगदान आजही देशभरातील कोट्यवधी लोकांना मिळणाऱ्या शक्तीमध्ये सामावलेले आहे, जे त्यांनी जागवलेल्या आशेमध्ये, निर्माण केलेल्या आत्मविश्वासात आणि त्यांच्या विचारांमुळे आहे.

1827 मध्ये महाराष्ट्र या महान राज्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांची अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरुवातीची वाटचाल सुरू झाली. परंतु, सुरुवातीच्या काळात आलेल्या या अडचणी त्यांचे शिक्षण, धैर्य किंवा समाजाप्रति असलेल्या बांधिलकीच्या आड कधीही आल्या नाहीत. आव्हाने कितीही असली तरी, त्याला तोंड देण्यासाठी माणसाने कष्ट केले पाहिजेत, ज्ञान मिळवले पाहिजे आणि काहीही न करता बसण्याऐवजी त्या आव्हानांचे निवारण केले पाहिजे हे त्यांचे वैशिष्ट्य आयुष्यभर टिकून राहिले. शालेय जीवनापासूनच तरुण जोतिराव अत्यंत जिज्ञासू होते आणि त्यांच्यात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. अनेकदा ते त्यांच्या वयातील मुलांकडून अपेक्षित असलेल्या पुस्तकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक पुस्तकांचे वाचन करत असत. अनेक वर्षांनंतर याविषयी बोलताना ते म्हणाले होते, "आपण जितके जास्त प्रश्न निर्माण करू, तितके ज्ञान त्यातून बाहेर येईल". त्यांच्या बालपणापासून त्यांना लाभलेली चौकस वृत्ती त्यांच्या वाटचालीत सदैव स्थिर राहिली.

त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात, महात्मा फुले यांच्या आयुष्याचे ध्येय हे शिकणे आणि शिक्षण देणे हेच बनले होते. शिक्षण आणि ज्ञान, ही कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही, ती एक शक्ती आहे, जी सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, याची अत्यंत दुर्मिळ अशी स्पष्टता त्यांना आली होती. जेव्हा शिक्षणाचा आनंद अनेकांना नाकारला जात होता, अशा काळात, त्यांनी मुलींसाठी आणि ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, अशा सर्वांसाठी पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरू केल्या. ते म्हणत असत- “मुलांमध्ये आईच्या मार्फत होणारी कोणतीही सुधारणा, अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच, जर शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या मुलींसाठी काढल्या पाहिजेत.” त्यांनी अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी काम केले, जिथे शाळा या न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे माध्यम बनल्या.

शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आम्ही देशातल्या युवकांसाठी, संशोधन आणि नवोन्मेष, हा पाया रचण्याचा प्रयत्न गेल्या दशकभरात केला आहे. देशात एक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे युवकांना, प्रश्न विचारणे, आपल्या शंका-कुशंका सोडवण्यासाठी नवनवी क्षितिजे शोधणे आणि नवोन्मेष हे खुलेपणाने करता येईल. ज्ञान, कौशल्य आणि संधी यात गुंतवणूक करुन, भारत युवाशक्तीला समस्या सोडवणारे आणि राष्ट्रीय प्रगतीचे वाहक होण्यासाठी सक्षम बनवत आहे.

महात्मा फुले यांचे ज्ञान आणि शहाणीव यातून, त्यांची, कृषी, आरोग्य आणि ग्रामविकासाविषयीची समज विकसित झाली होती. आपले शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणारा अन्याय, आपल्या समाजाला दुर्बळ करतो आहे, असे ते नेहमी म्हणत असत. गावात असो किंवा मग शेतात, या घटकांना सामाजिक विषमतेचे चटके कसे सहन करावे, लागत आहेत, ते त्यांनी पाहिले होते. आणि म्हणूनच, त्यांनी, गरीब, वंचित आणि दुर्बळ घटकांना त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्याच वेळी, सामाजिक सौहार्द सुद्धा कायम राहील, यासाठी देखील त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

​महात्मा फुले यांनी अत्यंत महत्वाचे मत व्यक्त केले होते की, जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणूनच तर त्यांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरणार्‍या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्थापित केलेला सत्यशोधक समाज ही चळवळ आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळींपैकी एक होती . सामाजिक सुधारणा, समाजसेवा आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ही चळवळ आघाडीवर होती. ही चळवळ समाजातील महिला, युवा आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची एक ठोस प्रभावशाली अभिव्यक्ति बनली. जर समाजाने आपल्या गाभ्याशी न्याय, प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर आणि सामूहिक प्रगतीची भावना ही मूल्ये जपली तर तो समाज अधिक सक्षम होऊ शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. या चळवळीतूनही महात्मा फुले यांच्या याच विश्वासाचे प्रतिबिंब उमटले होते.

महात्मा फुले ​यांच्या वैयक्तिक जीवनातूनही आपल्याला धैर्याची शिकवण मिळते. सतत कामात गुंतून राहिलेले असणे, सातत्याने लोकांमध्ये असणे याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणामही झाला. मात्र, प्रकृतीबात अत्यंत गंभीर आव्हाने समोर असतांनाही त्यांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. अर्धांगवायूच्या गंभीर झटक्याने त्यांना असंख्य मर्यादा आल्या, पण तरीही त्यांनी आपले काम आणि आपले संकल्प साकारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे शरीर जणू त्यांची सत्त्वपरीक्षाच घेत होते, मात्र समाजाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. त्यामुळेच तर आजही लाखो लोकांसाठी, विशेषतः संघर्षातून धैर्य मिळवणाऱ्यांसाठी, महात्मा फुले यांच्या जीवनाचा हा पैलू सर्वात शक्तिशाली पैलूंपैकी एक आहे.

सावित्रीबाई फुले यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय महात्मा फुले यांचे स्मरण पूर्ण होऊच शकत नाही. त्या स्वतः आपल्या देशातील महान सुधारकांपैकी एक होत्या. भारतातील स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या आघाडीच्या महिला शिक्षिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला पुढे नेण्यात निर्णायक भूमिका बजावली होती आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मुलींना मिळवून दिली होती. महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतरही सावित्रीबाईंनी हा वसा तसाच पुढे चालू ठेवला. 1897 मध्ये प्लेगच्या साथ रोगाचा उद्रेक झालेला असताना त्यांनी बाधित रुग्णांची इतक्या समर्पण भावनेनं सेवा केली की, त्या स्वतः त्या रोगाच्या विळख्यात सापडल्या, आणि त्यातच त्यांना आपले प्राण गमावावे लागले.

आपल्या भूमीला अशा महान सुपुत्र आणि सुकन्यांचे वरदान वारंवार लाभले आहे, ज्यांनी आपले विचार, त्याग आणि कृतीद्वारे समाज अधिक बळकट केला. बाहेरून कोणीतरी बदल घडवेल म्हणून त्यांनी प्रतीक्षा केली नाही, तर ते स्वतः त्या बदलाचे उगमस्थान बनले. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून समाज सुधारणेची कळकळीची हाक नेहमीच समाजातूनच उमटली आहे, ती अशा लोकांकडून, ज्यांना समाजातील दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि नशिबाचा भाग म्हणून तो स्वीकारायला त्यांनी ठामपणे नकार दिला. महात्मा जोतिराव फुले हे अशाच एका बुलंद आवाजाचे प्रतीक होते.

मला 2022 मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते, त्यावेळी मी शहरातील महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. आता आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. अशा वेळी या सगळ्याचे पुनर्नविनिकरण अर्थात नवी मांडणी करणे हीच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाहिलेली सर्वात यथार्थ आदरांजली ठरू शकणार आहे. त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शिक्षणासारख्या विषयांप्रती आपल्या बांधिलकीची नव्याने मांडणी करत आहोत, अन्यायाप्रती आपल्या संवेदनशीलतेची पुन्हा नव्याने जाणीव करून देत आहोत आणि समाजात स्वबळावर स्वतःत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता आहे हा विश्वास नव्याने जागृत करत आहोत. नैतिक स्पष्टता आणि लोककल्याणाचा उद्देश यांची जोड मिळाल्यास, भारतातील सामुदायिक शक्ती चमत्कार घडवून आणू शकते असेच त्यांची जीवनगाथा आपल्याला सांगते. आणि म्हणूनच ते आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत. म्हणूनच त्यांचे शब्द आणि कृती यांच्यातून आजही आशेचा किरण डोकावतो. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या जन्मापासून दोनशे वर्षांनंतरही केवळ भूतकाळातील एक व्यक्तिमत्त्व नव्हे तर भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक आहेत.