“क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमांमुळे एका प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे.”
“क्रीडापटू, केवळ क्रीडा क्षेत्रामध्येच नव्हे तर इतरही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देशातील युवा वर्गाला देत असतात”
“तुम्ही देशाला विचार आणि लक्ष्य यांच्या एकीमध्ये गुंफता जी आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची सर्वात मोठी क्षमता होती”
“युक्रेनमध्ये तिरंग्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडले, जिथे केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर इतर देशांच्या नागरिकांना युद्धभूमीतून बाहेर पडण्यासाठी तो संरक्षक कवच बनला होता”
“जागतिक पातळीवर सर्वोत्तम, समावेशक, विविधतापूर्ण आणि गतिमान असलेली क्रीडा क्षेत्रासाठीपूरक प्रणाली निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे, कोणत्याही गुणवत्तेकडे दुर्लक्ष होता कामा नये”

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदके अशी उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल या पथकातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये या पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमामुळेच एका अतिशय प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही आठवड्यात देशाने क्रीडा क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या कामगिरी केल्या आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी बरोबरच देशाने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडचे यजमानपद भूषवले. “बर्मिंगहॅममध्ये तुम्ही विविध खेळांमध्ये खेळत असताना कोट्यवधी भारतीय येथे भारतात रात्री उशिरापर्यंत जागरण करत होते आणि तुम्हा प्रत्येकाच्या खेळाचा आनंद घेत होते.अनेक लोक  गजर लावून झोपत होते जेणेकरून त्यांना तुमच्या कामगिरीची ताजी माहिती मिळवता येईल,” असे पंतप्रधानांनी या खेळाडूंना सांगितले. या पथकाला स्पर्धेसाठी रवाना करताना जे आश्वासन दिले होते त्यानुसार आज आपण विजय साजरा करत आहोत, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अनेक पदके अत्यंत कमी फरकाने हुकली असल्यामुळे पदक तालिकेतील पदकांची संख्या यामागची संपूर्ण कथा दर्शवत नाही. तरीही आपले दृढ-निश्चयी खेळाडू लवकरच ही कसर भरून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळेच्या तुलनेत भारताने 4 नवीन सामन्यांमध्ये नवा मार्ग शोधल्याचे त्यांनी सांगितले.  लॉन बाउलस पासून ते अॅथलेटिक्सपर्यंत खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे देशातील नवीन खेळांकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या लेकींनी बॉक्सिंग, ज्युडो आणि कुस्तीमध्ये मिळवलेले यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मधील त्यांचे वर्चस्व याचा देखील पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. पदार्पण करणाऱ्या खेळाडूंकडून 31 पदके मिळाली आहेत.

यामधून युवा खेळाडूंचा वाढता आत्मविश्वास दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या खेळाडूंनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संकल्प केवळ देशाला पदक देऊनच नव्हे, तर उत्सव साजरा करण्याची आणि अभिमान बाळगण्याची संधी देऊन बळकट केला आहे. पंतप्रधान म्हणाले की खेळाडूंनी देशातल्या तरुणांना केवळ खेळातच नव्हे, तर अन्य क्षेत्रांमध्ये देखील उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा दिली आहे. “तुम्ही देशाला विचार आणि ध्येय्याच्या एकात्मतेने विणले आहे, जे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे देखील एक मोठे सामर्थ्य होते”, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य योद्ध्यांच्या आकाशगंगेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की पद्धती वेगळ्या होत्या, तरी त्या सर्वांचे ‘स्वातंत्र्य’ हे एकच ध्येय्य होते. तसेच, आपले खेळाडू देखील देशाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानात उतरतात. पंतप्रधानांनी नमूद केले की युक्रेनमध्ये भारताच्या तिरंगा ध्वजाची ताकत दिसली, ज्या ठिकाणी तो केवळ भारतीयच नव्हे, तर अन्य देशांच्या नागरिकांना देखील युद्ध भूमीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचे    सुरक्षा कवच बनला. 

खेलो इंडियाच्या व्यासपीठावर उदयाला आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. TOPS (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना) च्या, सकारात्मक परिणामांचा देखील त्यांनी उल्लेख केला, जे आताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये दिसू लागले आहेत. देशातल्या नवीन प्रतिभांचा शोध घेऊन त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आणखी तीव्र करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट, सर्वसामावेशक, वैविध्यपूर्ण आणि गतिमान क्रीडा क्षेत्राची परिसंस्था निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. कुठलीही प्रतिभा मागे राहू नये”, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. खेळाडूंच्या याशामागे असलेल्या क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रशासक आणि अन्य सहकारी कर्मचारी यांच्या भूमिकेचा देखील पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

आगामी आशियाई  क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी  खेळाडूंनी उत्तम तयारी करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वावानिमित्त पंतप्रधानांनी गेल्या वर्षी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना देशातील ७५ शाळा आणि शैक्षणिक संस्थाना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्शाहन देण्याचे आवाहन केले  होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील अनेक खेळाडूंनी ‘मीट द चॅम्पियन’ मोहिमेअंतर्गत अनेक शाळांना भेटी दिल्या. क्रीडापटूंनी हे अभियान यापुढेही सुरु ठेवावे कारण देशातील युवावर्ग  क्रीडापटूंना आपला आदर्श मानतात,  असे पंतप्रधान म्हणाले. तुमची वाढती लोकप्रियता, क्षमता आणि सर्वमान्यतेचा लाभ देशातील युवा पिढीसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करून खेळाडूंचे  त्यांच्या ‘विजय यात्रे’बद्दल अभिनंदन केले  आणि भविष्यातील कामगिरीसाठी  त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या पंतप्रधानांच्या अविरत प्रयत्नाचा भाग म्हणून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी, पंतप्रधानांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी   आणि टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी  जाणाऱ्या भारतीय पॅरा-अॅथलीट्सच्या तुकडीशी संवाद साधला होता. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानही, पंतप्रधानांनी खेळाडूंच्या एकंदर कामगिरीकडे  विशेष लक्ष दिले आणि खेळाडूंनी मिळवलेले यश आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना अधिक चांगला  खेळ करण्यास प्रोत्साहन दिले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  2022 बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 दरम्यान  आयोजित करण्यात आल्या  होता. एकूण 215 क्रीडापटूंनी 19 क्रीडा शाखांमधील 141 स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये भारताने विविध क्रीडा प्रकारांमध्ये  22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लि

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s jewellery exports rise 2.4% to $9.17 billion; studded gold emerges as bright spot

Media Coverage

India’s jewellery exports rise 2.4% to $9.17 billion; studded gold emerges as bright spot
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीचा फटका बसलेल्यांच्या धैर्याचे स्मरण केले
August 14, 2026
पंतप्रधानांनी कठोर परिश्रम आणि मानवी प्रयत्नांची ताकद अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीने प्रभावित झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, तो इतिहासातील असा एक क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, त्याने कुटुंबे विस्थापित झाली, आप्तेष्ट गमावले गेले आणि अतोनात दुःख सोसावे लागले.

त्याचवेळी या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याचे स्मरण करून देतो, असे त्यांनी नमूद केले. देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आणि 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्याचा आपला संकल्प या दिवसामुळे अधिक दृढ होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

त्या भयावह काळातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व देशवासियांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी नमूद केले की, आपल्या धैर्याच्या आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी हे दाखवून दिले की प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात. पंतप्रधानांनी सर्वांना सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना आणखी बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमुळेच विविध कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, कारागिरी आणि नवोन्मेष बहरतो, आणि यशाचा मार्ग मोकळा होतो, यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे. ते म्हणाले की, यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या मालिकेत लिहिले आहे:

"आज आपण #PartitionHorrorsRemembranceDay पाळत आहोत. आजच्या दिवशी फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो एक असा क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे विस्थापित झाली, आप्तस्वकीयांना गमवावे लागले आणि अतोनात दुःख सहन करावे लागले.

त्याचवेळी, या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांचा जीवनप्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.

हा दिवस आपल्या देशातील सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो, आणि सर्वांना एकत्र येऊन 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देवो.”

"फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, मी त्या भीषण कालखंडातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो. प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात हे त्यांनी आपल्या धैर्याने आणि सामर्थ्याने दाखवून दिले. चला, सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना अधिक दृढ करूया.

उद्यमस्य प्रसादेन दृश्यन्ते विविधाः कलाः।
कातरा एव जल्पन्ति यद् भाव्यं तद् भविष्यति॥”

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमधूनच कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, हस्तकला आणि नावोन्मेष यांची भरभराट होते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून, नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि अथक प्रयत्नांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.