सुमारे 16 लाख महिला सदस्यांना लाभ देणार्‍या स्वयंसहायता बचत गटांना 1000 कोटी रुपयांचे पंतप्रधानांकडून वितरण
पंतप्रधानांनी व्यवसाय समन्वयक -सख्यांना पहिल्या महिन्याचे विद्यावेतन हस्तांतरित केले आणि मुखमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या 1 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित केले.
पंतप्रधानांनी 200 हून अधिक पूरक पोषण उत्पादन युनिटची पायाभरणी केली
"मुख्यमंत्री कन्या सुमंगला सारख्या योजना ग्रामीण गरीब आणि मुलींसाठी विश्वासाचे एक मोठे माध्यम बनत आहेत": पंतप्रधान
"उत्तर प्रदेशच्या महिलांसाठी डबल-इंजिन सरकारने सुनिश्चित केलेली सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सन्मान अभूतपूर्व आहे. गतकाळातील परिस्थिती पुन्हा उद्भवू न देण्याचा उत्तर प्रदेशातील महिलांचा निर्धार
“मी महिला बचत गटांच्या भगिनींना आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या विजेत्या मानतो. हे स्वयंसहायता गट खरे तर राष्ट्रीय सहायता गट आहेत”
“मुलींनाही शिक्षणासाठी वेळ मिळावा आणि समान संधी मिळावी, अशी इच्छा होती. त्यामुळे मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षांवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलींच्या हितासाठी देश हा निर्णय घेत आहे.
"माफिया राज आणि अराजकता नष्ट करण्याच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आहेत उत्तर प्रदेशच्या भगिनी आणि मुली"

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजला भेट दिली आणि विशेषत: तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी सुमारे 16 लाख महिला सदस्यांना लाभ देणार्‍या स्वयंसहायता बचत गटांना 1000 कोटी रुपयांचे वितरण केले. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत हे पैसे वर्ग केले जात आहेत, ज्यामध्ये 80,000 स्वयंसहायता बचत गटांना सामुदायिक गुंतवणूक निधीतून (CIF) प्रति बचत गट 1.10 लाख रुपये आणि 60,000 बचत गटांना प्रति बचत गट 15000 रु.चा फिरता निधी प्राप्त होतो. या कार्यक्रमात 20,000 व्यवसाय समन्वयक सखींच्या खात्यात पहिल्या महिन्याचे विद्यावेतन म्हणून 4000 रुपये वर्ग करून पंतप्रधान या व्यवसाय समन्वयक सखींना (B.C.-Sakhis) प्रोत्साहन देताना दिसले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी मुखमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत 1 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना एकूण 20 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. पंतप्रधानांनी 202 पूरक पोषण उत्पादन युनिटची पायाभरणी केली.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी विख्यात हिंदी साहित्यिक आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. ते म्हणाले, प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे, जी हजारो वर्षांपासून आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज हे तीर्थक्षेत्रही स्त्री-शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये महिला सक्षमीकरणासाठी होत असलेल्या कामाचा संपूर्ण देश साक्षीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेसारख्या योजना, ज्या अंतर्गत त्यांनी आज राज्यातील एक लाखाहून अधिक लाभार्थी मुलींच्या खात्यात कोट्यवधी रुपये हस्तांतरित केले, त्या ग्रामीण गरीब आणि मुलींसाठी विश्वासाचे एक मोठे माध्यम बनत आहेत.

उत्तर प्रदेशच्या महिलांसाठी डबल इंजिन सरकारने दिलेली सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सन्मान अभूतपूर्व आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. गतकाळातील परिस्थिती पुन्हा उद्भवू न देण्याचा उत्तर प्रदेशातील महिलांनी निर्धार केला आहे असे पंतप्रधान म्हणाले. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेद्वारे स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने समाजातील चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, सरकार गर्भवती महिलांचे लसीकरण, रुग्णालयात प्रसूती आणि गर्भधारणेदरम्यान पोषण यावर लक्ष केंद्रित करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदरपणात महिलांच्या बँक खात्यात 5000 रुपये जमा केले जातात, जेणेकरून त्या समतोल आहार घेऊ शकतील. 

महिलांचा सन्मान वृद्धिंगत करणाऱ्या अनेक पावलांची यादी पंतप्रधानांनी कथन केली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोट्यवधी शौचालयांची निर्मिती, उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनची सुविधा आणि घरातच नळाचे पाणी यामुळे भगिनींच्या जीवनातही एक नवीन अनुकूलता येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अनेक दशकांपासून घर आणि मालमत्ता हा केवळ पुरुषांचा हक्क मानला जात होता, अशी टीका पंतप्रधानांनी केली. सरकारच्या योजना ही विषमता दूर करत आहेत, असे ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देण्यात येणारी घरे महिलांच्या नावे प्राधान्याने बांधली जात आहेत.

रोजगार आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महिलांना समान भागीदार बनवले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज मुद्रा योजना नवनवीन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे, अगदी खेड्यातील गरीब कुटुंबातीलही. दीनदयाळ अंत्योदय योजनेद्वारे महिलांना देशभरातील स्वयं-सहायता गट आणि ग्रामीण संस्थांशी जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. “मी महिला बचत गटांच्या भगिनींना आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या विजेत्या मानतो. हे स्वयं-सहायता गट खरे तर राष्ट्रीय सहायता गट आहेत”, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

डबल इंजिन असलेले सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय मुलींचे भविष्य सक्षम करण्यासाठी अव्याहतपणे काम करत आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय किती आहे, यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयाची माहितीही त्यांनी दिली. “पूर्वी, मुलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षे होते, परंतु मुलींसाठी ते केवळ 18 वर्षे होते. मुलींनाही शिक्षणासाठी वेळ मिळावा, समान संधी मिळावी, अशी इच्छा होती. त्यामुळे मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देश हा निर्णय मुलींच्या हितासाठी घेत आहे,” श्री मोदी म्हणाले.

अलिकडच्या वर्षांत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, माफिया राज आणि अराजकतेच्या निर्मूलनाचा सर्वात मोठा फायदा उत्तर प्रदेशच्या भगिनी आणि मुलींना झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली. 

पंतप्रधान म्हणाले, “आज उत्तर प्रदेशात सुरक्षेबरोबरच अधिकार आहेत. आज उत्तर प्रदेशात व्यवसायासोबतच संभाव्यताही आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या माता-भगिनींच्या आशीर्वादाने या नव्या उत्तर प्रदेशाला कोणीही अंधारात ढकलू शकत नाही.”

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Conferred With Uzbekistan's Highest Honour For Foreign Leaders

Media Coverage

PM Modi Conferred With Uzbekistan's Highest Honour For Foreign Leaders
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 ऑगस्ट 2026
August 30, 2026

Tiranga in Tashkent, Relief in Nepal: Soft Power Meets First Responder

Vocal for Local, Nari Shakti, Real Heroes: Mann Ki Baat’s Atmanirbhar Hour