कलम 370 रद्द केल्यामुळे तसेच राम मंदिरामुळे 5 ऑगस्ट ही भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण तारीख ठरत आहे : पंतप्रधान
हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळाचे वैभव पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने आपल्या युवकांनी एक मोठे पाऊल टाकले आहे: पंतप्रधान
आपले युवक विजयाचा गोल करत आहेत तर काही राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या ध्येयामध्ये गुंतलेले आहेत: पंतप्रधान
भारतातील तरुणांचा दृढ विश्वास आहे की ते आणि भारत दोघेही योग्य मार्गावर वाटचाल करत आहेत: पंतप्रधान
स्वार्थी आणि देशविरोधी राजकारण या महान देशाला ओलिस ठेवू शकत नाही: पंतप्रधान
दुहेरी इंजिन असलेल्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की उत्तर प्रदेशात गरीब, दलित, मागास, आदिवासींसाठी बनवलेल्या योजना वेगाने अंमलात आणल्या जातील: पंतप्रधान
उत्तर प्रदेशकडे नेहमीच राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले गेले. उत्तर प्रदेश भारताच्या विकास इंजिनाचे सत्ताकेंद्र बनू शकतो हा आत्मविश्वास अलिकडच्या वर्षांत निर्माण झाला आहे : पंतप्रधान
हे दशक उत्तर प्रदेशसाठी गेल्या 7 दशकांची तूट भरून काढण्याचे दशक आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 5 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी खूप खास बनला  आहे. 2 वर्षापूर्वी 5 ऑगस्ट रोजी, कलम 370 रद्द करून देशाने एक भारत, श्रेष्ठ भारतची भावना आणखी मजबूत केली होती, जम्मू -काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकार आणि सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेकडो वर्षांनंतर   भारतीयांनी 5 ऑगस्ट रोजी  भव्य राम मंदिर उभारण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते . अयोध्येत आज राम मंदिर उभारणीचे काम  वेगाने होत आहे.असे पंतप्रधानांनी  नमूद केले .

आजच्या तारखेचे महत्व पुढे  सांगत पंतप्रधान म्हणाले की ऑलिम्पिक मैदानावर देशातील युवकांनी आज हॉकीबद्दल आपला अभिमान पुनर्स्थापित  करून  उत्साह आणि रोमांच पुन्हा आणला आहे.

एकीकडे आपला देश, आपले युवक भारतासाठी नवीन कामगिरी करत आहेत, ते विजयासाठी गोल करत आहेत, तर देशात काही लोक असे आहेत जे राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या ध्येयामध्ये गुंतलेले आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते पुढे म्हणाले की देशाला काय हवे आहे, देश काय साध्य करत आहे, देश कसा बदलत आहे याच्याशी  त्यांना काहीही देणेघेणे नाही. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की हा महान देश अशा स्वार्थी आणि देशविरोधी राजकारणाचा बंधक बनून राहणार  नाही. या लोकांनी देशाचा विकास रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा देश त्यांना बळी पडणार  नाही. देश प्रत्येक आघाडीवर वेगाने प्रगती करत आहे, प्रत्येक संकटाला आव्हान देत आहे असे  ते म्हणाले.

ही नवीन भावना अधिक विस्ताराने विषद करताना पंतप्रधानांनी भारतीयांनी अलिकडच्या काळात केलेल्या अनेक विक्रम आणि कामगिरीचा उल्लेख केला.  ऑलिम्पिक व्यतिरिक्त,  मोदी यांनी लसीकरणाचा आगामी 50 कोटीचा टप्पा,  जुलै महिन्यातले  1 लाख 16 हजार कोटींचे  विक्रमी जीएसटी संकलन यावरही भाष्य केले, जे अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळाल्याचे दर्शवत आहेत.   2 लाख 62 कोटींच्या अभूतपूर्व मासिक कृषी निर्यातीकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची ही  सर्वोच्च कामगिरी आहे, जिने भारताला अव्वल -10 कृषी-निर्यातक  देशांमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशातल्या पहिल्या संपूर्ण देशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ च्या चाचणीचा, जगातील सर्वात उंचावर, लदाख इथे बांधलेल्या रस्त्याचा आणि ई-रूपी चा शुभारंभ या अलीकडच्या कामगिरीचाही उल्लेख केला.

विरोधकांनावर टीका करतांना पंतप्रधान म्हणाले की ज्यांना केवळ आपल्या पद आणि अस्तित्वाची चिंता आहे, असे लोक आता भारताची प्रगती थांबवू शकत नाहीत.नवा भारत आता क्रमवारी नाही, तर पदके जिंकून जगावर अधिराज्य गाजवतो आहे. नव्या भारताच्या उभारणीकडे जाण्याचा मार्ग आता कोणत्याही कुटुंबांच्या नावाने नाही तर केवळ परिश्रमाने सिद्ध होणार आहे. आज भारत आणि भारतातले युवक दोन्हीही प्रगतीपथावर आहेत, असा दृढ विश्वास युवकांच्या मनात आहे.

कोरोना महामारीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा देशात असे कुठलेही मोठे संकट येते, त्यावेळी देशातील सर्व व्यवस्था विस्कळीत होऊन जातात. मात्र आज, भारतात प्रत्येक नागरिक संपूर्ण शक्तिनिशी कोरोनाशी लढा देतो आहे. या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या सर्व प्रयत्नांविषयी पंतप्रधानांनी सविस्तर माहिती दिली. यात, वैद्यकीय पायाभूत सुविधांची व्यवस्था करणे, जगातील सर्वात मोठी मोफत लसीकरण मोहीम, वंचित, दुर्बल घटकांना या संकटकाळात उपासमारीपासून वाचवण्यासाठीचे अभियान, अशा सर्व कार्यक्रमांसाठी सरकारने लाखो-कोट्यवधी रुपये  गुंतवले असल्याचे सांगत, या योजना आज यशस्वीपणे राबवल्या जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. महामारीच्या काळातही पायाभूत सुविधा निर्मिती सुरूच आहे. देशात, नवे महामार्ग, द्रुतगती मार्ग, समर्पित मालवाहू मार्गिका आणि संरक्षण मार्गिका बांधल्या जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र आणि उत्तर प्रदेशातील डबल इंजिनच्या सरकारने गरिब, वंचित, मागास समुदाय आणि आदिवासींसाठी तयार करण्यात तयार करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी जलद होईल, आणि योजनांचा लाभ थेट लाभार्थीना मिळेल हे सुनिश्चित केले, असे, पंतप्रधान म्हणाले. पीएम स्वनिधी योजना, हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या भाषणात, महामारीच्या काळात निर्माण झालेल्या संकटांवर केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. सरकारच्या धोरणांमुळे अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहिल्या, शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे सुनिश्चित केले गेले, त्याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी यंदा विक्रमी उत्पादन घेतले आणि सरकारनेही किमान हमीभावाने विक्रमी अन्नधान्य खरेदी केली, असे त्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशात धान्याची विक्रमी खरेदी केल्याबद्दल त्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांचे कौतूक केले. किमान हमीभाव वाढवल्याचा फायदा उत्तरप्रदेशातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला, असे त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशात, अन्नधान्याच्या खरेदीचे मूल्य म्हणून 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे थेट 13 लाख  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच उत्तरप्रदेशात, 17 लाख कुटुंबांना घरे मिळाली आहेत , लाखों कुटुंबांना शौचालये मिळाली आहेत  , मोफत गॅस आणि लाखो वीज जोडण्या मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 27 लाख लोकांना पाईप नळाने पाणीपुरवठा सुरु झाला आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या काही दशकात, उत्तरप्रदेशाकडे कायम राजकारणाच्या चष्म्यातून बघितले गेले. उत्तरप्रदेश देशाच्या विकासात अधिक चांगली भूमिका कशी पार पाडू शकेल, याविषयी बोलणे देखील त्या काळी मान्य केले जात नसे. मात्र आता या दुहेरी इंजिनाच्या सरकारांनी उत्तरप्रदेशाकडे केवळ संकुचित दृष्टीने न बघता आपला दृष्टिकोन व्यापक केला आहे. भारताच्या विकास इंजिनाचे ऊर्जा केंद्र, म्हणून उत्तरप्रदेश भूमिका पार पासू शकतो, हा विश्वास त्यामुळे अलीकडे लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

हे दशक, उत्तरप्रदेशाचे दशक आहे, असे सांगत, आपल्याला गेल्या सात दशकातील कमतरता भरून काढायच्या आहेत, असे पंतप्रधान शेवटी म्हणाले. हे कार्य उत्तरप्रदेशातील युवक, युवती, गरीब, वंचित आणि मागास वर्गाच्या सहकार्याशिवाय तसेच त्यांना योग्य संधी दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026