विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू क्षेत्रांचा समावेश
श्री साईबाबा समाधी मंदिरात नवीन दर्शन रांग संकुलाचे केले उद्‌घाटन
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे केले लोकार्पण
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा केला प्रारंभ
लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डांचे केले वितरण
"सामाजिक न्यायाचा खरा अर्थ म्हणजे देश दारिद्रयमुक्त होणे आणि गरीबांना विपुल संधी उपलब्ध होणे"
"गरीब कल्याणला दुहेरी इंजिन सरकारचे सर्वोच्च प्राधान्य"
"शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध"
"सहकार चळवळ बळकट करण्यासाठी आमचे सरकार कार्यरत"
"महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि संधींचे केंद्र"
"महाराष्ट्राच्या जलद विकासातून साकारणार भारताचा जलद विकास"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील अहमदनगर मधील शिर्डी येथे आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. बहुविध विकास प्रकल्पांमध्ये अहमदनगर नागरी रुग्णालयातील आयुष रुग्णालय ; कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळला जोडणाऱ्या (24.46 किमी) 3 ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिका; एनएच -166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश होता. अहमदनगर नागरी रुग्णालयातील माता व बाल आरोग्य शाखेची त्यांनी पायाभरणी केली. मोदींनी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचेही वाटप केले.

 

इतर प्रकल्पांपैकी, मोदींनी शिर्डी येथे नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन केले, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे (85 किमी)  नेटवर्क राष्ट्राला समर्पित केले आणि 86 लाखांहून अधिक शेतकरी-लाभार्थ्यांना लाभ देणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केली.

तत्पूर्वी दुपारी  मोदींनी शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजाअर्चना केली आणि निळवंडे धरणाचे जलपूजन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, साईबाबांच्या आशीर्वादाने 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे. 5 दशकांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कामाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी आजच्या उद्घाटनाचा उल्लेख केला. या ठिकाणी जलपूजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन रांग संकुलाबद्दल बोलताना, मोदींनी ऑक्टोबर 2018 मध्ये केलेल्या त्याच्या पायाभरणीचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की यामुळे भारत आणि परदेशातील यात्रेकरूंच्या सोयीमध्ये आणखी वाढ होईल.

 

पंतप्रधानांनी वारकरी समाजातील बाबा महाराज सातारकर यांच्या आज सकाळी झालेल्या दुःखद निधनाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी बाबा महाराजांना आदरांजली वाहिली आणि कीर्तन आणि प्रवचनाद्वारे त्यांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे स्मरण केले जे पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

‘सबका साथ सबका विकास’ या सरकारच्या मंत्राचा पुनरुच्चार करताना “सामाजिक न्यायाचा खरा अर्थ म्हणजे जेव्हा देश दारिद्र्यमुक्त होतो आणि गरिबांना विपुल संधी मिळतात”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारचे गरिबांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवणार असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना 1 कोटी 10 लाख आयुष्मान कार्ड वितरित केल्याचे नमूद केले ज्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल ज्यासाठी सरकार 70,000 कोटी रुपयांचा बोजा उचलत आहे.

 

गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवणे आणि त्यांच्यासाठी पक्की घरे बांधणे या दोन बाबींसाठी सरकार प्रत्येकी 4 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा खर्च वर्ष 2014 पूर्वीच्या दशकात या बाबींसाठी केल्या गेलेल्या खर्चाच्या सहा पट अधिक आहे या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांनी सांगितले की  गरीब नागरिकांच्या घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने आतापर्यंत 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत, फिरत्या विक्रेत्यांना हजारो रुपयांची मदत दिली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच देशातील सुतार, सोनार,कुंभार आणि शिल्पकार यांच्या लाखो कुटुंबांना मदत करण्यासाठी नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या 13,000 कोटींहून अधिक खर्चाच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल देखील पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.

देशातील छोट्या शेतकऱ्यांबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा उल्लेख केला.या योजनेअंतर्गत, देशभरातील छोट्या शेतकऱ्यांना 2 लाख 60 हजार कोटी रुपये मिळाले आहेत आणि महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून 26 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की या योजनेतून शेतकऱ्यांना अतिरिक्त 6000 रुपयांचा लाभ होणार आहे म्हणजेच यापुढे राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.

 

वर्ष 1970 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या आणि गेली पाच दशके प्रलंबित राहून गेलेल्या   निळवंडे प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देताना, सध्याचे सरकार सत्तेत आल्यानंतरच या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हांला पाण्याच्या एकेक थेंबासाठी तडफडत ठेवले,” पंतप्रधान म्हणाले, “आज येथे जल पूजन करण्यात आले.” या प्रकल्पाचा उजवा कालवा लवकरच कार्यरत होईल. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरलेल्या बळीराजा जल संजीवनी योजनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या आणखी 26 सिंचन प्रकल्पांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की हे प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत.

 

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे याचा ठळक उल्लेख पंतप्रधानांनी केला. कालावधीत किमान आधारभूत किंमत योजनेतून गेल्या 7 वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी करण्यात आले असून याधीच्या सरकारमधील ज्येष्ठ नेत्याच्या कार्यकाळात केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली. वर्ष 2014 नंतरच्या काळात 1 लाख 15 हजार कोटी रुपये मूल्याच्या तेलबिया आणि डाळींची खरेदी झाली आहे तर पूर्वीच्या सरकारने सुमारे 500 ते 600 कोटी रुपये किमान आधारभूत मूल्याच्या तेलबिया आणि डाळी खरेदी केल्या होत्या. थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार तसेच निधीच्या गळतीचा प्रश्न निकाली निघाला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

रब्बी  पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, हरभऱ्याची एमएसपी 105 रुपयांनी वाढवली आहे तर गहू आणि करडईच्या एमएसपीत दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उसाच्या एमएसपीमध्ये प्रती क्विंटल 315 रुपयांची वाढ करण्यात आली आहे याचा देखील त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 9 वर्षांमध्ये, सरकारतर्फे सुमारे 70,000 कोटी रुपये किमतीच्या इथेनॉलची खरेदी करण्यात आली असून हा पैसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. “ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी वेळेवर दिली जातील याची सुनिश्चिती करण्यासाठी, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे,” ते पुढे म्हणाले.

 

पंतप्रधान म्हणाले, “आमचे सरकार सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी काम करत आहे. देशभरात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था स्थापन केल्या जात आहेत.” अधिक चांगल्या आणि जुन्या साठवण सुविधा सुनिश्चित करण्यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्था (PACs) आणि सहकारी संस्थांना सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. 7500 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यापूर्वीच कार्यरत झाल्या असून, या माध्यमातून लहान शेतकरी संघटीत होत आहेत.

 

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि शक्यतांचे केंद्र आहे. जेवढ्या वेगाने महाराष्ट्राचा विकास होईल, तेवढ्या वेगाने भारताचाही विकास होईल.” पंतप्रधान मोदी यांनी मुंबई आणि शिर्डीला जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाडीला  हिरवा झेंडा दाखविल्याचे स्मरण केले, आणि महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे सतत विस्तारत असल्याचे अधोरेखित केले. जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सोलापूर ते बोरगाव या चौपदरी महामार्गाच्या बांधकामामुळे संपूर्ण कोकण विभागाचे दळणवळण सुधारेल आणि या भागातील उद्योगांना आणि ऊस, द्राक्ष आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. "ही संपर्क सक्षमता (कनेक्टिव्हिटी) केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर प्रगती आणि आर्थिक विकासासाठी एक नवीन मार्ग तयार करेल", असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेले, शिर्डी येथील नवीन दर्शन रांगेचे संकुल ही एक अत्याधुनिक इमारत असून, दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आरामदायी जागा उपलब्ध करून देणे, ही या मागची संकल्पना आहे. हे संकुल दहा हजाराहून अधिक भाविकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या प्रतीक्षा दालनांनी सुसज्ज आहे. या ठिकाणी प्रतीक्षा दालने, प्रसाधन गृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इ. सारख्या वातानुकूलित सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत. या नवीन दर्शन रांग संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2018 मध्ये केली होती.

 

 

पंतप्रधानांनी निळवंडे धरणाच्या डाव्या काठावरील (85 किमी) कालव्यांच्या जाळ्याचे लोकार्पण केले. यामुळे 7 तालुक्यांमधल्या (अहमदनगर जिल्ह्यातील 6 आणि नाशिक जिल्ह्यातील 1) 182 गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करता येईल. निळवंडे धरणाची कल्पना सर्वप्रथम 1970 मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे 5177 कोटी रुपये खर्च करून ते विकसित केले जात आहे.

पंतप्रधानांनी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा’ शुभारंभ केला.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या    महाराष्ट्रातील  86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, या अंतर्गत त्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.

पंतप्रधांनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही केले. यामध्ये अहमदनगर सार्वजनिक रुग्णालयामधील आयुष रुग्णालय, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी), जळगाव आणि भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवरील अतिरिक्त सुविधा याचा समावेश आहे. अहमदनगर सार्वजनिक रुग्णालयातील माता व बाल आरोग्य शाखेची त्यांनी पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डच्या लाभार्थ्यांना कार्डचे वितरणही केले. 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Handloom — weaving India’s heritage into global growth

Media Coverage

Handloom — weaving India’s heritage into global growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to address the 57th Convocation Ceremony of IIT Delhi on 8th August
August 07, 2026
PM to present Institute's Highest Honours to Meritorious Students
PM to inaugurate Param Pragya, an AI-powered high-performance supercomputing facility established at Sonipat Campus of IIT Delhi

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the 57th Convocation Ceremony of the Indian Institute of Technology (IIT) Delhi as the Chief Guest on 8 August 2026 at 11 AM. He will address over 3000 graduating students including 587 Ph.D. scholars who will be conferred their degrees during the ceremony.

Recognizing outstanding academic excellence, Prime Minister will present the Institute's most prestigious honours, including the President's Gold Medal, Director's Gold Medal, Shankar Dayal Sharma Gold Medal, and Perfect Ten Gold Medals to the meritorious students.

Further emphasising India's commitment to advancing cutting-edge research and artificial intelligence, Prime Minister will inaugurate Param Pragya, an AI-powered high-performance supercomputing facility established at the Sonipat Campus of IIT Delhi. The state-of-the-art facility is expected to significantly enhance the institute's capabilities in AI, data science, advanced computing, and interdisciplinary research.