18,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी.
गंगा नदीवरील सहा पदरी पुलाची केली पायाभरणी.
बिहारमधील 3 रेल्वे प्रकल्प केले राष्ट्राला समर्पित.
बिहारमध्ये नमामि गंगे प्रकल्प अंतर्गत सुमारे 2,190 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या 12 प्रकल्पांचे केले उद्घाटन.
पाटण्यात युनिटी मॉलची केली पायाभरणी.
"बिहारचा अभिमान श्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा संपूर्ण बिहारचा सन्मान आहे"
"आमचे सरकार देशातील प्रत्येक गरीब, आदिवासी, दलित आणि वंचित व्यक्तीच्या क्षमता वाढवत आहे"
"बिहारचा विकास, शांतता, बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बिहारमधील भगिनी आणि मुलींना हक्क - ही मोदींची गॅरंटी आहे"

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी तसेच येथे बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांची नावे मी घेत नाही. पण जुन्या सर्व सहकाऱ्यांशी आज भेट झाली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व मान्यवर येथे आला आहात त्यांचे, जनता जनार्दनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

विश्व प्रसिद्ध सूर्य मंदिर, उमगेश्वरी माता आणि देव कुंडच्या या पवित्र भूमीला आम्ही वंदन करतो. तुम्हा सर्वांना देखील प्रणाम करतो. भगवान भास्कराची कृपा आपल्या सर्वांवर सदैव बरसात राहो.

मित्रांनो,

औरंगाबादची ही भूमी अनेक स्वातंत्र्य सैनिकांची जन्मभूमी आहे. बिहारचे महान व्यक्तिमत्त्व, अनुग्रह नारायण सिन्हाजींसारख्या अनेक महापुरुषांचे हे जन्मस्थान आहे. त्याच औरंगाबादच्या धरतीवर आज बिहारच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जातो आहे. आज येथे सुमारे साडेएकवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे.या प्रकल्पांमध्ये रस्त्यांशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा विषयक कार्यांचा समावेश आहे तसेच येत आधुनिक बिहारचे सशक्त दर्शन देखील आहे. आज येथे चार पदरी आमस-दरभंगा मार्गिकेची कोनशीला रचण्यात आली आहे. तसेच दाणापुर-बिहटा या चौपदरी उन्नत रस्त्याची देखील कोनशीला रचण्यात आली आहे. पटणा रिंग रोडच्या शेरपूर ते दिघवारा टप्प्याची देखील पायाभरणी झाली आहे. हीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची झलक आहे. आम्ही एखादे काम सुरु करतो, ते पूर्ण देखील करतो आणि आम्हीच ते काम जनतेला समर्पित देखील करतो. ही मोदींची गॅरंटी आहे, हो, ही मोदींची गॅरंटी आहे. आज भोजपूर जिल्ह्यात आरा बायपास रेल्वे मार्गाची पायाभरणी देखील झाली आहे. नमामि गंगे अभियानाअंतर्गत आज बिहारला 12 प्रकल्प मिळाले आहेत. मला माहित आहे, बिहारमधील लोक, विशेषतः औरंगाबादमधील माझे बंधू-भगिनी वाराणसी-कोलकाता द्रुतगती महामार्गाची देखील वाट बघत आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे काही तासातच उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचता येईल आणि कोलकात्याला देखील काही तासात पोहोचता येईल. ही एनडीएची कार्यपद्धती आहे. बिहारमध्ये विकासाची ज्या गंगेचा ओघ सुरु होणार आहे त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे, बिहारवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

आज बिहारच्या भूमीमध्ये माझे येणे अनेक दृष्टीने विशेष आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी, बिहारच्या कर्पुरी ठाकूर यांना देशाने भारतरत्न देऊन गौरवले आहे. हा संपूर्ण बिहारचा सन्मान आहे. काही दिवसांपूर्वी अयोध्येत रामाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली. अयोध्येत राम स्थापित झाले तेव्हा सर्वाधिक आनंद सीतामातेच्या भूमीवर साजरा होणे साहजिकच आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे बिहार ज्या प्रकारे आनंदात न्हाऊन निघाला, बिहारच्या लोकांनी जसा काही सणच साजरा केला, रामललासाठी भेटवस्तू पाठवल्या. तो आनंद मी तुमच्याशी सामायिक करू इच्छितो. यासोबतच, बिहारने पुन्हा एकदा दुहेरी इंजिनाचा विग देखील घेतला आहे. म्हणून, बिहार सध्या अत्यंत उत्साहात देखील आहे आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. आणि हा उत्साह मला समोर दिसतो आहे. इतक्या मोठ्या संख्येने माताभगिनी, तरुण वर्ग, जिथवर माझी नजर पोहोचते आहे तिथपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. तुमच्या चेहेऱ्यांवर दिसणाऱ्या या आनंदामुळे, बिहारला लुटण्याची स्वप्ने बघणाऱ्या लोकांचे चेहेरे उतरले आहेत.

मित्रांनो,

एनडीएचे सामर्थ्य वाढल्यापासून बिहारमध्ये घराणेशाहीच्या राजकारणाला ओहोटी लागली आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचे आणखी एक विडंबन आहे. यामध्ये आई-वडिलांकडून वारसा हक्काने पक्ष आणि सत्ता तर मिळते पण आई-वडिलांच्या साकारणे केलेल्या कामाची चर्चा करण्याची कोणाची हिम्मत होत नाही. घराणेशाही राजकीय पक्षांची ही दुर्दशा आहे. मी तर असे ऐकले आहे की यांच्या पक्षाचे मोठमोठे नेते देखील या वेळी बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढवायला तयार नाहीत.

आणि मी तर संसदेत सांगितले होते की सर्व पळ काढत आहेत. तुम्ही पाहिले असेल की आता लोकसभेची निवडणूक देखील त्यांना लढवायची नाही आहे. राज्यसभेच्या जागा शोधत आहेत हे लोक. जनता साथ द्यायला तयार नाही आहे. आणि ही आहे तुमचा विश्वास, तुमचा उत्साह, तुमच्या संकल्पाची ताकद. मोदी याच विश्वासाने बिहारच्या जनतेला धन्यवाद करायला आले आहेत.

 

मित्रहो,

एकाद दिवसात इतक्या व्यापक स्तरावर विकासाची ही चळवळ, डबल इंजिन सरकारच्या काळात बदल किती वेगाने होतो याची साक्षीदार आहे. आज रस्ते आणि महामार्गाशी संबंधित जी कामे झाली आहेत, त्यामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले जाणार आहे. गया. जेहानाबाद, नालंदा, पाटणा, वैशाली, समस्तीपूर आणि दरभंगाच्या लोकांना आधुनिक वाहतुकीचा अभूतपूर्व अनुभव मिळेल. याच प्रकारे बोधगया, विष्णुपद, राजगीर, नालंदा, वैशाली, पावापुरी, पोखर आणि जेहानाबादमध्ये नागार्जुन गुंफांपर्यंत पोहोचणे देखील सुलभ होईल. बिहारची सर्व शहरे, तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनाच्या अमाप संभावनांसोबत जोडलेली आहेत. दरभंगा विमानतळ आणि बिहटामध्ये तयार होणारा नवा विमानतळ देखील या नव्या रस्ता पायाभूत सुविधेने जोडला जाईल. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील सोयीचे होईल. 

मित्रहो,

एक तो काळ होता, ज्यावेळी बिहारचेच लोक आपल्याच घरातून बाहेर पडायला घाबरत होते. एक हा काळ आहे जेव्हा बिहारमध्ये पर्यटनाच्या अमाप संधी विकसित होत आहेत. बिहारला वंदे भारत आणि अमृत भारत यांसारख्या आधुनिक रेल्वे गाड्या मिळाल्या. अमृत स्थानकांचा विकास केला जात आहे. बिहारमध्ये जेव्हा जुना काळ होता, राज्याला अशांतता, असुरक्षितता आणि दहशतीच्या आगीत ढकलून दिले होते. बिहारच्या युवांना प्रदेश सोडून पलायन करावे लागले. आणि आजचे युग आहे, ज्यावेळी आम्ही युवा वर्गाच्या कौशल्याचा विकास करून, त्यांच्या कुशलतेत वाढ करत आहोत. बिहारच्या हस्त शिल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तयार होणाऱ्या एकता मॉलची पायाभरणी केली. ही नव्या बिहारची नवी दिशा आहे. ही बिहारची सकारात्मक विचारसरणी आहे. ही या गोष्टीची गॅरंटी आहे की बिहारला आम्ही पुन्हा जुन्या काळात जाऊ देणार नाही.

 

मित्रहो,

जेव्हा बिहारमधील गरीब पुढे जाईल, तेव्हा बिहार पुढे जाईल. बिहार तब्बे आगे बढ़तई जब बिहार के गरीब आगे बढ़तन! म्हणूनच, आमचे सरकार देशातील प्रत्येक गरीब, आदिवासी, दलित, वंचिताचे सामर्थ्य वाढवण्यात गुंतलेले आहे. बिहारच्या सुमारे 9 कोटी लाभार्थ्यांना पीएम गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. बिहारमध्ये उज्ज्वला योजने अंतर्गत सुमारे 1 कोटींपेक्षा जास्त महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. बिहारच्या सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त हस्तांतरित करण्यात आले आहेत. 5 वर्षांपूर्वी बिहारच्या गावातील केवळ 2 टक्के घरांमध्ये नळाने पाणी येत होते. आज येथील 90 टक्यांपेक्षा जास्त घरांपर्यत नळाने पाणी पोहोचत आहे. बिहारमध्ये 80 लाखांपेक्षा जास्त आयुष्मान कार्डधारक आहेत, ज्यांना 5 लाख रुपयांपर्यत मोफत उपचारांची गॅरंटी मिळाली आहे. आमचे सरकार अनेक दशकांपासून रखडलेला उत्तर कोयल जलाशय हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे. या जलाशयातून बिहार-झारखंडच्या 4 जिल्ह्यांमध्ये एक लाख हेक्टरवरील शेतांच्या सिंचनासाठी पाणी मिळू लागेल.

 

मित्रहो,

बिहारचा विकास- ही मोदींची गॅरंटी आहे. बिहारमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचे राज्य- ही मोदींची गॅरंटी आहे. बिहारमध्ये बहिणी-सुकन्यांना अधिकार ही मोदींची गॅरंटी आहे. तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार याच गॅरंटींना पूर्ण करण्यासाठी आणि विकसित बिहार बनवण्यासाठी संकल्पबद्ध आहे.

तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन, आज विकासाचा उत्सव आहे, मी तुम्हा सर्वांना आग्रह करतो की तुमचा मोबाईल फोन काढा, त्याचा फ्लॅशलाईट चालू करा. तुमच्या सर्वांच्या मोबाईलचे फ्लॅश लाईट चालू करा. विकासाचा हा उत्सव साजरा करा, सर्वांनी जे लांब लांब आहेत त्यांनी देखील करावे, प्रत्येकाने आपला मोबाईल फोन बाहेर काढा, हा विकासाचा उत्सव साजरा करा. माझ्या सोबत बोला-

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Water conservation in India: The community as custodian

Media Coverage

Water conservation in India: The community as custodian
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 मार्च 2026
March 21, 2026

Empowering Bharat Holistically: Health, Finance, Heritage & Export Growth Under the Leadership of PM Modi