सुमारे 5,450 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची केली पायाभरणी
सुमारे 1,650 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या एम्स रेवाडीची केली पायाभरणी
ज्योतिसर, कुरुक्षेत्र येथे प्रायोगिक संग्रहालय ‘अनुभव केंद्र’ चे केले उद्घाटन
अनेक रेल्वे प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
रोहतक-मेहम-हंसी विभागातील रेल्वे सेवेला दाखवला हिरवा झेंडा
“हरयाणाचे दुहेरी इंजिन सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध”
"विकसित भारत बनवण्यासाठी हरियाणाचा विकास होणे अत्यंत आवश्यक"
"ज्योतिसार अनुभव केंद्र,जगाला भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणूकीची ओळख करून देईल"
"हरियाणा सरकारने पाण्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी केले आहे प्रशंसनीय काम"
कापड आणि वस्र प्रावरणे उद्योगात हरियाणा नाव कमावत आहे
"हरियाणा गुंतवणुकीसाठी अव्वल राज्य म्हणून उदयास येत आहे आणि गुंतवणुकीत वाढ म्हणजे रोजगाराच्या नवीन संधींमध्ये वाढ”

भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
 
शूरवीरांची भूमी असलेल्या रेवाडीमधून संपूर्ण हरियाणातील जनतेला माझा नमस्कार! मी जेव्हा जेव्हा रेवाडीला येतो तेव्हा अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. रेवाडीशी माझे काही वेगळेच नाते आहे. मला माहित आहे रेवाडीतील लोकांचा मोदींवर खूप जास्त लोभ आहे. आणि आता, माझे स्नेही राव इंद्रजीत जी यांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री मनोहर लाल जी यांनी सांगितल्याप्रमाणे, 2013 मध्ये, भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते, तेव्हा माझा पहिला कार्यक्रम रेवाडीमध्ये झाला होता आणि त्या वेळी रेवाडीने मला 272 पार करण्याचा आशीर्वाद दिला होता आणि तुमचा तो आशीर्वाद फळला. आता लोक म्हणत आहेत की, मी पुन्हा एकदा रेवाडीत आलो आहे, तर तुमचा आशीर्वाद आहे, यावेळी 400 पार, एनडीए सरकार 400 हून अधिक जागा मिळवेल. 

 

मित्रांनो,
लोकशाहीत जागा महत्त्वाच्या असतात, पण माझ्यासाठी त्यासोबतच जनतेचे आशीर्वाद ही माझ्यासाठी मोठी संपत्ती आहे. आज भारताने संपूर्ण जगात नवीन उंची गाठली आहे, ती तुमच्या आशीर्वादामुळेच आहे, तुमच्या आशीर्वादाचीच ही कमाल आहे. दोन देशांचा प्रवास करून मी काल रात्री उशिरा भारतात परतलो. युएई आणि कतारमध्ये आज भारताला ज्या प्रकारचा आदर मिळतो, भारताला प्रत्येक कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळतात. तो सन्मान फक्त मोदींचा नाही. तो आदर प्रत्येक भारतीयाचा आहे, तो तुम्हा सर्वांचा आहे. भारताने जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन केले ते तुमच्या आशीर्वादानेच झाले. भारताचा तिरंगा चंद्रावर तिथे पोहोचला जिथे कोणीही पोहोचू शकत नाही, ते तुमच्या आशीर्वादामुळेच. 10 वर्षात भारत 11व्या स्थानावरून 5वी आर्थिक महासत्ता बनला, हेही तुमच्या आशीर्वादाने घडले. आणि आता माझ्या तिसऱ्या कार्यकाळात, येत्या काही वर्षांत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.
माझ्या हरियाणातील बंधू आणि भगिनींनो,
विकसित भारत बनवण्यासाठी हरियाणाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हरियाणाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा येथे आधुनिक रस्ते बांधले जातील. जेव्हा येथे रेल्वेचे आधुनिक नेटवर्क असेल तेव्हाच हरियाणाचा विकास होईल. हरियाणाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा तेथे मोठी आणि चांगली रुग्णालये असतील. थोड्याच वेळापूर्वी मला अशा प्रकारच्या सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हरियाणाला सुपूर्द करण्याची संधी मिळाली. त्यात रेवाडी एम्स, गुरुग्राम मेट्रो, अनेक रेल्वे लाईन, नवीन गाड्या आहेत. यापैकी ज्योतीसरमध्ये कृष्णा सर्किट योजनेतून बांधलेले आधुनिक आणि  भव्य संग्रहालयही आहे. आणि प्रभू रामाचा आशीर्वाद असा आहे की आजकाल मला सर्वत्र अशा पवित्र कार्याशी जोडण्याची संधी मिळते, ही रामजींची कृपा आहे. हे संग्रहालय जगाला भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचा संदेश आणि या पवित्र भूमीच्या भूमिकेची ओळख करून देईल. या सुविधांसाठी मी रेवाडीसह संपूर्ण हरियाणातील लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो.

 

बंधू आणि भगिनींनो,
सध्या देशात आणि जगात मोदींच्या हमीची जोरदार चर्चा आहे. आणि रेवाडी हे मोदींच्या हमीचे पहिले साक्षीदार ठरले आहे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मी देशाला काही हमी दिली होती. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढावी, अशी देशाची इच्छा होती. आम्ही हे करून दाखवले. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य राम मंदिर व्हावे, अशी देशाची इच्छा होती. आज संपूर्ण देश भव्य राम मंदिरात प्रभू रामललांचे दर्शन घेत आहे. एवढेच काय, काँग्रेसचे जे लोक आमच्या प्रभू रामांना काल्पनिक म्हणायचे, ज्यांना अयोध्येत रामाचे मंदिर व्हावे अशी कधीच इच्छा नव्हती, तेही आता जय सियाराम म्हणू लागले आहेत.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात काँग्रेसने अनेक दशकांपासून अडथळे निर्माण केले होते. मी तुम्हाला हमी दिली होती की मी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करेन. आज काँग्रेसच्या सर्वोतोपरी प्रयत्नांनंतरही कलम 370 इतिहासाच्या पानांत हरवले आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये महिला, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. म्हणूनच लोकांनी आणखी एक संकल्प घेतला आहे आणि जनता जनार्दन, तुम्ही लोक म्हणताय - ज्याने 370 रद्द केले, तो भाजप 370 जागांवर निवडून येईल. फक्त भाजपचे 370 एनडीएला 400 च्या पुढे नेतील.
मित्रांनो,
रेवाडी येथेच मी माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू करण्याची हमी दिली होती. केवळ 500 कोटी रुपये दाखवून वन रँक वन पेन्शन लागू करण्याबाबत काँग्रेसचे लोक खोटे बोलत होते. रेवाडीच्या शूरवीरांच्या भूमीवरून घेतलेला संकल्प मी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण केला आहे. आतापर्यंत, ओआरओपी अंतर्गत, माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन अंतर्गत अंदाजे 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. आणि त्याचे मोठे लाभार्थी हरियाणाचे देखील माजी सैनिक आहेत. जर मी एकट्या रेवाडीतील सैनिकांच्या कुटुंबांबद्दल बोललो तर त्यांना ओआरओपी मधून 600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. तुम्ही मला सांगा, काँग्रेसने संपूर्ण देशातील माजी सैनिकांसाठी केवळ 500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती जी रेवाडीतील सैनिकांच्या कुटुंबांना मिळालेल्या रकमेपेक्षा कमी होती. अशा लबाडी आणि फसवणुकीमुळेच देशाने काँग्रेसला नाकारले आहे.

 

मित्रांनो,
मी रेवाडीच्या लोकांना आणि हरियाणातील कुटुंबांना इथे एम्स उभारण्याची हमी दिली होती. आज येथे एम्सच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि आमचे राव इंद्रजीत या कामाबद्दल सतत बोलत नाहीत, मात्र जे ठरवतात त्याचा पाठपुरावा करतात. आज एम्सची पायाभरणी झाली आहे, म्हणून मी तुम्हाला हमी देत सांगतो की आज त्याची पायाभरणी झाली आहे. आणि त्याचे लोकार्पणही आम्हीच करू. आणि येथे तुम्हाला चांगले उपचारही मिळतील, तरुणांना डॉक्टर बनण्याची संधीही मिळेल. आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होतील. देशातील 22 वे एम्स रेवाडी येथे बांधले जात आहे. गेल्या 10 वर्षांत 15 नवीन एम्स ना मंजुरी मिळाली आहे. स्वातंत्र्यापासून वर्ष 2014 पर्यंत देशात सुमारे 380 वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली. गेल्या 10 वर्षांत 300 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आहेत. हरियाणामध्येही प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मित्रांनो,
देशवासीयांच्या आशीर्वादाने पूर्ण झालेल्या अशा अनेक हमींची गणती मी करू शकतो. पण, काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड काय? देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला अनेक दशकांपासून मूलभूत गरजांपासून दूर ठेवण्याचा, वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. देश आणि देशवासियांच्या हितापेक्षा केवळ एकाच कुटुंबाचे हित हा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काँग्रेसचा आहे. दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. सेना आणि सैनिक दोघांनाही कमकुवत करण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण आजही काँग्रेसची टीम तीच आहे, नेते तेच आहेत, हेतू तेच आहेत आणि त्यांची निष्ठाही एकाच घराण्याशी आहे. त्यामुळे धोरणही तेच असेल, ज्यामध्ये लूट, भ्रष्टाचार आणि नुकसान असेल.
मित्रांनो,
सत्तेत राहणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे काँग्रेसला वाटते. म्हणूनच हा गरीब मुलगा पंतप्रधान झाल्यापासून माझ्याविरुद्ध कारस्थाने रचत आहेत.

पण ईश्वर स्वरूप जनता जनार्दनाचे आशीर्वाद माझ्या सोबतीला आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक कट कारस्थानासमोर जनता जनार्दन ढाल बनून समोर उभे राहतात. काँग्रेस जीतक्या जास्त प्रमाणात कारस्थाने रचते तितक्याच जास्त ताकदीनिशी जनता मला मजबूत बनवते, आपले आशीर्वाद देते. यावेळीही काँग्रेसने माझ्या विरोधात सर्व आघाड्या खुल्या केल्या आहेत. मात्र माझ्या देशातील जनतेने प्रदान केलेले सुरक्षा कवच.. आणि, जेव्हा जनतेचे सुरक्षा कवच मिळालेले असते, जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळालेला असतो, माता भगिनी ढाल बनून समोर उभ्या असतात तेव्हा आपण संकटावर मात करून पुढे जाऊ शकतो. आणि देशालाही पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच, तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने हिंदुस्तानाच्या कानाकोपऱ्यात मला हा अनुभव येत आहे. म्हणूनच लोक म्हणत आहेत - एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार.

 

मित्रांनो,

काँग्रेस एकाच परिवाराच्या मोहात गुंतली आहे, हरियाणामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, काँग्रेस आज आपल्या इतिहासातील सर्वात दयनीय परिस्थितीतून जात आहे. त्यांचे नेते आपला एक स्टार्ट अप सांभाळू शकत नाही, आणि हे लोक देश सांभाळण्याची स्वप्ने पाहत आहेत. ज्यांनी कधी काळी त्यांना साथ देण्याचा मानस बनवला होता ते देखील यांच्यापासून दूर निघून जात आहेत. आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेस जवळ आपले असे कार्यकर्तेच शिल्लक राहिलेले नाहीत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार तिथे हे आपले सरकार देखील सांभाळू शकत नाहीत. आज हिमाचल प्रदेशात लोकांना वेतन आणि निवृत्तीवेतन मिळण्यात देखील अनंत अडचणी येत आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार विकास योजनांवर देखील काम करण्यात असमर्थ ठरत आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

एका बाजूला काँग्रेसचे कुशासन आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचे सुशासन आहे. येथे दहा वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. म्हणूनच गरिबांच्या कल्याणासाठी मोदीने ज्या कोणत्या योजना तयार केल्या आहेत, त्यांच्या शंभर टक्के अंमलबजावणीत हरियाणा अव्वल स्थानावर आहे. हरियाणा कृषी क्षेत्रात देखील अभूतपूर्व प्रगती करत आहे आणि येथे उद्योग क्षेत्राच्या कक्षा निरंतर रुंदावत आहेत. ज्या दक्षिण हरियाणाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते आज तोच प्रदेश अत्यंत जलद गतीने प्रगती करत आहे. देशात रस्ते असो, रेल्वे असो, मेट्रो असो किंवा यांच्याशी संबंधित ज्या कोणत्या मोठ्या योजना बनवल्या जात आहे त्या सर्व याच प्रदेशातून जात आहेत. दिल्ली - मुंबई द्रूतगती मार्गाच्या दिल्ली - दौसा - लालसोट विभागाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. देशातील सर्वात लांब द्रूतगती मार्ग हरियाणाच्या गुरुग्राम, पलवल आणि नूंह या जिल्ह्यांमधून जात आहे.

 

मित्रांनो,

2014 च्या पूर्वी हरियाणा मध्ये रेल्वेच्या विकासासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे 300 कोटी रुपयांचा संकल्प सादर जात असे, केवळ 300 कोटी रुपये! यावर्षी हरियाणामधील रेल्वेसाठी जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मग तुम्हीच पहा, 300 कोटी रुपये कुठे आणि 3 हजार कोटी रुपये कुठे ! आणि हा बदल गेल्या दहा वर्षात झाला आहे. रोहतक - महम - हांसी, जिंद - सोनीपत यासारखे नवीन रेल्वे मार्ग आणि अंबाला कॅंट - दप्पर सारख्या मार्गाचे दुहेरीकरण यामुळे लाखो लोकांना लाभ झाला आहे. जेव्हा अशा सुविधांची निर्मिती होते तेव्हा जीवन सुकर बनते आणि व्यवसाय उद्योग देखील सुलभ बनतात. 

बंधू आणि भगिनींनो,

या क्षेत्रात शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. राज्य सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. जगातील शेकडो मोठ्या कंपन्या आज हरियाणामध्ये कार्यरत आहे. या कंपन्यांमध्ये युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे.

मित्रांनो,

हरियाणा कपडा आणि तयार कपड्यांच्या उद्योगात आपले नाव नव्या उंचीवर घेऊन जात आहे. देशातून निर्यात होत असलेले 35 टक्क्यांहून अधिक गालिचे, जवळपास 20 टक्के तयार कपडे हरियाणामध्ये तयार होतात. हरियाणाच्या कापड उद्योगाला आपले लघुउद्योग पुढे घेऊन जात आहेत. पानिपत हातमाग उत्पादनांसाठी, फरीदाबाद कापड उत्पादनासाठी, गुरूग्राम तयार कपड्यांसाठी, सोनीपत कपडा उद्योगातील तंत्रज्ञानासाठी तर भिवानी हे शहर कापड उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी आज प्रसिद्ध झाले आहेत. मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तसेच लघु उद्योगांसाठी लाखो कोटी रुपये मदतीच्या स्वरूपात दिले आहेत. यामुळे जुने लघु उद्योग,  कुटीर उद्योग तर मजबूत झाले आहेतच, हरियाणा मध्ये हजारो नवीन उद्योग देखील सुरू झाले आहेत. 

 

मित्रांनो,

रेवाडी हे शहर तर विश्वकर्मा बंधूंच्या कारागिरीसाठी देखील ओळखले जाते. येथील पितळ धातूवर केली जाणारी कारागिरी आणि हस्तकला खूपच प्रसिद्ध आहे. 18 व्यवसायांशी संबंधित, अशा पारंपरिक कारागिरांसाठी प्रथमच आम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा नावाने एक मोठी योजना सुरू केली आहे. देशभरातील लाखो लाभार्थी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेशी जोडले जात आहेत. भाजपा सरकार या योजनेवर 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही योजना आपल्या या पारंपरिक कारागिरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात परिवर्तन करणारी आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मोदीची हमी त्यांच्याच बरोबर असते ज्यांच्याजवळ हमी देण्यासाठी काहीही नसते. देशातील छोट्या शेतकऱ्यांजवळ बँकेला हमी देण्यासाठी काहीही नव्हते. मोदीने त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना द्वारे हमी दिली आहे. देशातील गरीब, दलित, मागास आणि इतर मागास प्रवर्गाच्या कुटुंबातील मुला मुलींजवळ  बँकेला हमी देण्यासाठी काहीही नव्हते. देशात अनेक जण हातगाडा आणि रस्त्यावर छोटा - मोठा व्यवसाय करत आले आहेत. आपले हे साथी अनेक दशकांपासून शहरांमध्ये हे काम करत आले आहेत. यांच्या जवळ देखील हमी देण्यासाठी काहीही नव्हते. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे यांची हमी मोदीने घेतली आहे.

मित्रांनो,

छोट्या गावातील आपल्या भगिनींची स्थिती दहा वर्षांपूर्वीपर्यंत कशी होती. आपल्या भगिनींचा जास्तीत जास्त वेळ पाण्याची सोय करण्यात, स्वयंपाक करण्यासाठी लागणारे जळाऊ लाकूड गोळा करण्यात किंवा यासारख्या इतर सोयी करण्यातच जात होता. मोदी मोफत गॅस कनेक्शन घेऊन आला आहे, नळाद्वारे घरापर्यंत पाणी घेऊन आला आहे. आज हरियाणाच्या गावांमध्ये माझ्या भगिनींना अनेक सुविधा मिळत असल्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होत आहे. केवळ हेच नाही तर, या वाचलेल्या वेळेचा उपयोग या भगिनी आपली कमाई वाढवण्यासाठी करू शकतील, याचीही सोय करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात देशभरातील 10 कोटी भगिनींना आम्ही बचत गटांशी जोडले आहे. यामध्ये हरियाणाच्या लाखो भगिनींचा समावेश आहे. भगिनींच्या या गटांना लाखो कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त भगिनींना लखपती दीदी बनवू शकू, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत एक कोटी भगिनी लखपती दिदी बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये 3 कोटी भगिनींना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आणि नमो ड्रोन दीदी योजना देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भगिनींच्या समूहांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि सोबतच ड्रोन देखील देण्यात येणार आहेत. हे ड्रोन शेतीच्या कामासाठी वापरता येतील आणि यामुळे भगिनींना अधिक पैसे कमावता येतील.

 

मित्रांनो,

हरियाणा अद्भुत संभावनांचे राज्य आहे. मी हरियाणाच्या फर्स्ट टाइम वोटर्स ना, जे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत, जे 18 - 20 - 22 वर्ष वयाचे आहेत, त्यांना विशेष रुपाने सांगू इच्छितो की तुमचे भविष्य खुपच उज्ज्वल असणार आहे. डबल इंजिनचे सरकार तुमच्यासाठी विकसित हरियाणा तयार करण्याच्या कामात मग्न आहे. तंत्रज्ञानापासून कापड उद्योगापर्यंत, पर्यटनापासून व्यापारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. संपूर्ण जग आज भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे.  आणि गुंतवणूक करण्यासाठी हरियाणा एक उत्तम राज्य म्हणून उदयाला आले आहे. आणि, गुंतवणूक वाढली याचाच अर्थ असा आहे की रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होत आहेत. म्हणूनच डबल इंजिनच्या सरकारला आपणा सर्वांचे आशीर्वाद असेच मिळत राहोत, हे आवश्यक आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एम्स साठी, हजारो कोटी रुपये खर्चाच्या योजनांसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा. माझ्यासोबत म्हणा - 

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

खुप खुप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Cheetah population crosses 50 after new cubs born at Kuno

Media Coverage

India's Cheetah population crosses 50 after new cubs born at Kuno
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on sacred Earth as a source of strength to the nation
March 10, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam emphasising on sacred Earth as a source of strength to the nation:

“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।

यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।

सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”

The Subhashitam conveys that, the Earth, which is filled with water within the oceans, and surrounded by water outside, which thoughtful scholars have understood through their wisdom, and whose heart is covered by the eternal truth in the vast sky – may that earth, sustain our energy and strength in a noble nation.

The Prime Minister wrote on X;

“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।

यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।

सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”