पूज्य श्री श्री रविशंकर जी, येथे उपस्थित असलेले इतर सर्व संतजन, बंधू आणि भगिनींनो, एल्लारिगू नमस्कारा.
आजची ही सकाळ एक वेगळीच अनुभूती घेऊन आली आहे. मुलांच्या वैदिक मंत्रांनी झालेले स्वागत, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जींची 70 वर्षे आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची 45 वर्षे; हे असे क्षण आहेत जे माझ्या स्मरणात कायम राहतील. या अद्भुत सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

आत्ता गुरुदेवांनी बरेच काही सांगितले; तुम्हाला वाटले असेल की ते माझी प्रशंसा करत होते, पण मला वाटत होते की ते मला नवे कार्य सांगत होते. तुम्ही बरोबर म्हणालात की माझ्यासाठी कोणताही औपचारिक धन्यवाद असू शकत नाही, मी तुमच्यापासून वेगळा नाही, तुमच्यामधूनच आलो आहे आणि तुमच्यासाठीच आलो आहे; आणि आज जिथे आहे तिथेही तुमच्यामुळेच आहे. आज गुरुदेवांच्या 70 वर्षांचा हा कार्यक्रम आहे, पण मी घरचाच माणूस असल्याने स्पष्ट सांगू इच्छितो की, जेव्हा तुमचा शताब्दी सोहळा असेल, तेव्हा मी पुन्हा एकदा नक्की येईन.
आज या दिव्य आणि भव्य 'ध्यान मंदिरा'चे लोकार्पण झाले आहे. जेव्हा संकल्प स्पष्ट असतो आणि सेवाभावाने कार्य केले जाते, तेव्हा प्रत्येक प्रयत्नाचे सुखद फळ मिळते. बाकी काही असो वा नसो, आपण सर्वजण 'कमळाच्या’ छत्रछायेखाली आहोत. जसे जसे समजेल, तशा टाळ्या वाजवत राहा. आणि गुरुदेवांचे आशीर्वाद कायम राहिले, तर हीच कमळाची छत्रछाया देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' परिवाराला या ध्यान मंदिरासाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
बंगळुरूचे वातावरण येथील ऊर्जा काही वेगळीच असते. हे शहर सॉफ्टवेअर आणि सेवाक्षेत्रासाठी जगभर प्रसिद्ध आहे. पण भारताची सांस्कृतिक ओळख, अध्यात्म आणि आध्यात्मिक चेतनेलाही या शहराने नवीन उंची दिली आहे. योग, ध्यान, प्राणायाम हे भारताच्या संस्कारांचे अविभाज्य भाग राहिले आहेत. आणि गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे, आज जगभरातील लोक भारताच्या या आध्यात्मिक संस्कारांनी प्रभावित आहेत आणि याच पुरातन संस्कारांमधून भारताच्या अनेक संस्थांना प्रेरणा मिळत राहिली आहे.

मित्रांनो,
याच प्रेरणेतून श्री श्री रविशंकरजींनी 45 वर्षांपूर्वी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या रूपाने एक बीज पेरले होते. आज ते एका विशाल वटवृक्षाच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे. या वटवृक्षाच्या हजारो शाखा जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करत आहेत. मला सरकारी कामासाठी परदेशात जिथे जिथे जावे लागते, तिथे तुमचा कोणी ना कोणी माणूस भेटतोच.
मित्रांनो,
आमचा भारत विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या भाषा, इतक्या परंपरा, वेगवेगळ्या चालीरीती, उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती; जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा एक स्वाभाविक प्रश्न आपल्या मनात येतो, या सर्व सुंदर विविधतेंना जोडणारा मूळ घटक कोणता? त्याचे उत्तर आहे, स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगणे. आपल्याकडे म्हटले आहे की, 'अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्। परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्॥' म्हणजेच दुसऱ्यांची सेवा करणे पुण्य आहे आणि कोणाला त्रास देणे पाप आहे. 'सेवा परमो धर्मः' हे आपल्या समाजाचे स्वाभाविक ओळख आहे. पिढ्यानपिढ्या वाहणारी ही संस्कार सरिता आपल्या सर्वांना संस्कारित करते, प्रेरित करते आणि ऊर्जावान बनवते. भारताच्या अनेक आध्यात्मिक आंदोलनांनी अंतिमतः स्वतःला मानव सेवेच्या माध्यमातूनच व्यक्त केले आहे. मला आनंद आहे की 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या प्रत्येक प्रयत्नात याच सेवाभावाचे प्रतिबिंब दिसते. आत्ता जो व्हिडिओ दाखवला गेला, त्यात 'सेवा हीच सेवा' आहे आणि त्यात लोकांचेच कल्याण आहे. मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या प्रवासाशी जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मनापासून शुभेच्छा देतो.

मित्रांनो,
कोणतीही मोहीम तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तिच्याशी समाजाची शक्ती जोडली जाते. म्हणूनच अशा प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेसाठी समाजाची शक्ती जागृत करणे अत्यंत आवश्यक असते. समाज हा राजकारण आणि सरकारांपेक्षाही अधिक शक्तिशाली असतो, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. आणि कोणतेही सरकार तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा समाज स्वतः राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेतो. उदाहरणार्थ, आपला 'स्वच्छ भारत अभियान' आहे; हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर तो लोकांच्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनला आहे. आज तो समाजशक्तीच्या बळावर पुढे जात आहे.
मित्रांनो,
जेव्हा समाज सक्रिय होतो, तेव्हा देशाच्या सर्वात मोठ्या आव्हानांवरही सामूहिक उपाय काढता येतात. 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्था देखील नेहमीच समाजाच्या या शक्तीला सोबत घेऊन चालते, हे पाहणे सुखद आहे. तुम्ही सर्वजण विकासाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सामाजिक दृष्टिकोनाला खूप महत्त्व देता. मग ते वृक्षारोपण अभियान असो, ग्रामीण स्मार्ट व्हिलेज केंद्रे असोत, महिला आणि आदिवासी समाजाला सक्षम करणारे कार्यक्रम असोत किंवा कैद्यांच्या मानसिक आरोग्यासाठी राबवले जाणारे अभियान असो; हे सर्व प्रयत्न देश आणि समाजाच्या विकासयात्रेत मोलाचे योगदान देणारे आहेत.

मित्रांनो,
मी आणखी एका गोष्टीसाठी येथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीची प्रशंसा करेन, ती म्हणजे 'युवा शक्ती'वर असलेला तुमचा भर. आजच्या जगात खूप वेगाने मोठे बदल होत आहेत. विज्ञान दररोज नवनवीन शक्यतांची द्वारे उघडत आहे. नवनवीन नवोन्मेष संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहेत. भारत या परिवर्तनात केवळ सहभागी होत नाही आहे, तर अनेक क्षेत्रांत नेतृत्वही करत आहे. आपल्या डिजिटल क्रांतीने भारताला 'डिजिटल पेमेंट'मध्ये जागतिक नेता बनवले आहे. आज पायाभूत सुविधाही अभूतपूर्व गतीने आणि भविष्यदर्शी दृष्टीकोनासह विकसित होत आहे.'स्टार्ट-अप'मध्ये भारत वेगाने जगातील तिसरी सर्वात मोठी परिसंस्था बनत आहे. आपले तरुण आज अवकाशात स्वतःचे उपग्रह पाठवत आहेत; या सर्व यशामागील सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपल्या देशाचे युवा आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'. तरुणांना आजच्या आधुनिक युगातील आव्हानांवर उपाय शोधण्यात गुरुदेव आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग' मोठी मदत करत आहे.
मित्रांनो,
आज तंत्रज्ञानामुळे दूरवर बसलेले लोक एका क्षणात एकमेकांशी जोडले जात आहेत. पण महत्त्वाचे हे आहे की, आपण जगाशी जोडले गेलो किंवा नाही, तरी स्वतःशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही स्वतःशी जोडण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी, महान परंपरेची गरज असते. विकसित भारताची निर्मिती अशा तरुणांच्या हातून होईल जे मानसिकदृष्ट्या शांत असतील, सामाजिकदृष्ट्या जबाबदार असतील आणि समाजाप्रती संवेदनशील असतील. म्हणूनच 'आध्यात्मिक कल्याण', मानसिक आरोग्य, योग, ध्यान यावर काम करणारी तुमची ही महत्त्वाची क्रियाशीलता आणि अशाच प्रकारे काम करणाऱ्या इतर संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अशा संस्था लोकांमधील जवळीक, आपलेपणा आणि सामूहिक जबाबदारीची भावना मजबूत करतात. याचबरोबर, अशा संस्थांमुळे लोकांना आपल्या संस्कृतीची ओळख आणि माहिती मिळते. आज उद्घाटन झालेले हे ध्यान मंदिर भविष्यात अनेक पिढ्यांसाठी आणि हजारो लोकांसाठी शांतता व उपचाराचे केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे.

मित्रांनो,
तुम्ही सर्वजण देश आणि समाजाप्रती आपली कर्तव्ये चोखपणे पार पाडत आहात. पण मी जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये येतो, तेव्हा काही आग्रह करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. आता माझ्या बोलण्याआधीच गुरुजींनी सांगितले की तुमचे नऊ आग्रह आम्हाला मान्य आहेत, त्यामुळे बोलण्यासारखे काही उरले नाही, पण सवय जात नाही. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्तरांवर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यात 'आर्ट ऑफ लिव्हिंग' सारख्या संस्था अधिक ताकदीने या परिवर्तनाचे रक्षक बनू शकतात. तुमच्यापैकी बरेच जण शेतकऱ्यांशी आणि ग्रामीण समुदायाशी जोडलेले आहात. जसे येथे चित्रपटामध्येही सांगितले गेले की, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्यासाठी अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आज आजारपणातही माणूस 'नैसर्गिक उपचारा'चे मार्ग शोधत आहे, तसेच आपल्या या धरती मातेलाही नैसर्गिक उपचारांची गरज आहे. रासायनिक खतांनी आपल्या शेतीला आणि धरती मातेचे नुकसान केले आहे. आपल्या या धरती मातेला रसायनांपासून वाचवणे ही देखील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च आहे. 'एक पेड़ माँ के नाम’' या अभियानाला अधिक व्यापक बनवण्यात आपण मोठी भूमिका बजावू शकता. कारण पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च आहे. 'पर्यावरणशास्त्र' आणि 'अर्थशास्त्र' आपण वेगळे करू शकत नाही. 'पर ड्रॉप मोर क्रॉप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा उत्तम वापर सांगितला जात आहे. यात तुमच्या सहकार्याने आणखी चांगले परिणाम मिळतील. कारण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही देखील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च आहे. काही आठवड्यांत मान्सून येणार आहे; जलसंधारणाबाबत व्यापक जागरूकता पसरवण्याची ही योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे वीज वाचवणे, 'सिंगल युज प्लास्टिक'पासून दूर राहणे, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ही सर्व 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च आहे. आज देश 'मिशन लाईफ' वरही भर देत आहे. हे जीवन अधिक जबाबदारीने आणि जागरूकतेने जगण्याचे एक जिवंत अभियान आहे. यात निसर्गाशी संतुलन राखून जीवनशैली स्वीकारण्याचा आग्रह आहे. माझ्या मते 'मिशन लाईफ' हे देखील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चेच एक प्रकट रूप आहे. मला विश्वास आहे की, गुरुदेवांच्या शताब्दीपर्यंत आपण ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करू. मी पुन्हा एकदा श्री श्री रविशंकरजींना, गुरुदेवांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' परिवारातील प्रत्येक स्वयंसेवकाचे त्यांच्या सेवाभावाबद्दल मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली, या पवित्र वातावरणात काही क्षण घालवण्याची संधी दिली, 'कमळाच्या’ छत्रछायेखाली विचार करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय गुरुदेव.


