खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर एक अनौपचारिक, उत्स्फूर्त सत्र घेतले
135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांसाठी देशाचे आशीर्वाद आहेतः पंतप्रधान
खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण शिबिरे, उपकरणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी पुरवण्यात आली आहेः पंतप्रधान
आज एक नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन घेऊन देश प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी कसा उभा आहे याचा अनुभव खेळाडू घेत आहेत : पंतप्रधान
प्रथमच, इतक्या मोठ्या संख्येने आणि तेही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत : पंतप्रधान
असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत प्रथमच पात्र ठरला आहेः पंतप्रधान
‘Cheer4India ’ ची जबाबदारी देशवासियांची आहे:पंतप्रधान

आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप आनंद झाला.खरे तर आज सर्वांशीच बोलता आलं नाही. मात्र, आपली उमेद, उत्साह संपूर्ण देशाला जाणवत आहे. या कार्यक्रमात माझ्यासोबत उपस्थित असलेले देशाचे क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर जी, आता काही दिवसांपूर्वी पर्यंत ज्यांनी क्रीडामंत्री पदाची जबाबदारी सांभाळतांना आपल्या सर्वांसोबत खूप काम केले, असे आपले सध्याचे कायदा मंत्री श्री किरेन रिजीजु जी, क्रीडा राज्यमंत्री, आमच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असलेले, श्री निशीथ प्रामाणिक जी , खेळाशी संबंधित संस्थांचे सर्व प्रमुख, संस्थांचे सर्व सदस्य आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे माझे सर्व खेळाडू मित्र, सर्व खेळाडूंचे कुटुंबीय आणि आप्त.. आज आपल्यात आभासी पद्धतीने संवाद झाला. मात्र, जर मी तुम्हा सर्वांचे इथे दिल्लीत माझ्या घरी स्वागत करु शकलो असतो, आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकलो असतो, तर मला अधिक आनंद झाला असता. याआधी मी 

नेहमीच असं केलं आहे. आणि माझ्यासाठी, तुमच्याशी संवाद हा अत्यंत उत्साहाचा प्रसंग असतो. आणि यावेळी अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंचे परदेशात आधीच प्रशिक्षण सुरु आहे. मात्र, या स्पर्धेनंतर परत आल्यावर  मी आपल्या सगळ्यांच्या सोयीच्या वेळी आपल्याला नक्की भेटेन, असे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो.

सध्या कोरोनाने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अनेक बदल केले आहेत. ऑलिम्पिकचे वर्ष बदलले, आपली तयारीची, प्रशिक्षणाची पद्धत बदलली, बरेच काही बदलले. आता तर ऑलिम्पिक सुरु व्हायला केवळ दहाच दिवस शिल्लक आहेत. टोक्योमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल.

मित्रांनो,

आज आपल्याशी संवाद साधतांना, संपूर्ण देशाला कळले की इतक्या कठीण काळातही आपण सर्वांनी देशासाठी किती मेहनत घेतली आहे, किती घाम गाळला आहे. गेल्या महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी आपल्यापैकी काही खेळाडूंशी या मेहनतीबद्दल चर्चा देखील केली होती. देशबांधवांना आग्रहही केला होता की त्यांनी देशातल्या आपल्या सर्व खेळाडूंना चीअर करावे, त्यांचे मनोधैर्य वाढवावे. अलीकडेच, हॅशटॅग ‘चीअर फॉर इंडिया’ वर मी कितीतरी फोटो पहिले. सोशल मिडीयापासून ते देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात संपूर्ण देश आपल्यासाठी उभा आहे. 135 कोटी भारतीयांच्या या शुभेच्छा म्हणजे, खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वीच आपल्याला मिळालेला देशाचा आशीर्वाद आहे. मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा देतो. आपल्या सर्व देशबांधवांकडून, आपल्याला सातत्याने शुभेच्छा मिळत राहाव्यात, यासाठी नमो ॲपवरही खास व्यवस्था करण्यात आली आहे. नमो ॲपवर जाऊनही लोक तुम्हा सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवूत आहेत, शुभेच्छा देत आहेत, आपले संदेश पाठवत आहेत, आपले मनोधैर्य वाढवण्याचे काम करत आहेत. मला आज हे बघून अत्यंत आनंद होत आहे की सगळा देश आपला उत्साह वाढवत आहे. 135 कोटी भारतीयांचा हा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे.  मी माझ्याकडून तुम्हा सर्वांना भरपूर शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

संपूर्ण देशाच्या भावना आज तुमच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि मी जेव्हा तुम्हा सर्वांना बघतो, तेव्हा मला काही गोष्टी समान दिसत आहेत. आपल्या सगळ्यांची धाडसी वृत्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक भावना आगदी समान आहे. आणखी काही समान गुणवैशिष्ट्ये तुमच्यात मला आढळतात. ती म्हणजे शिस्त, समर्पण आणि  दृढनिश्चय. आपल्या सर्वांमध्ये कटिबद्धता आहे, स्पर्धात्मक भावनाही आहे. आपल्या नव्या भारताच्याही याच भावना आहेत. आणि 

म्हणूनच, आपण सगळे एकप्रकारे नव्या भारताचे प्रतिबिंब आहात. देशाच्या भविष्याचे प्रतीक आहात.

तुमच्यापैकी कुणी दक्षिणेकडील आहे, कुणी उत्तरेकडील आहे, कुणी पूर्वेकडील आहे तर कुणी ईशान्य भागातील आहेत. काहींनी आपल्या खेळाची सुरुवात गावातील शेतांपासून केली आहे तर काही जण लहानपणापासूनच एखाद्या क्रीडा अकादमीत जात होते. मात्र आता तुम्ही सगळे इथे  'टीम इंडिया' चा भाग आहात. तुम्ही सगळे देशासाठी खेळणार आहात. हीच विविधता, हीच संघ भावना  'एक भारत श्रेष्ठ भारत' ची ओळख आहे.

मित्रानो,

तुम्ही सगळे एका गोष्टीचे साक्षीदार आहात की देश कशा प्रकारे आज एक नवीन विचार, नव्या दृष्टिकोनासह आपल्या प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्याबरोबर उभा आहे. आज देशासाठी तुमची प्रेरणा खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही मोकळेपणाने खेळावे, आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी खेळावे, आपल्या खेळात, आपल्या तंत्रात  आणखी सुधारणा करावी याला  सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. तुम्हाला आठवत असेल, ऑलिम्पिकसाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना खूप आधीच करण्यात आली होती. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत सर्व खेळाडूंना शक्य ती मदत पुरवण्यात आली आहे. तुम्ही देखील याचा अनुभव घेतला आहे. पूर्वीच्या तुलनेत आज जे बदल झाले आहेत, ते देखील तुम्हाला जाणवत आहेत.

माझ्या मित्रानो,

तुम्ही देशासाठी घाम गाळता, देशाचा झेंडा घेऊन जाता, म्हणूनच तुमच्या बरोबर ठामपणे उभे राहणे ही देशाची जबाबदारी आहे . आम्ही खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण शिबिरे, उत्तम उपकरणे पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. आज खेळाडूंना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय संधी देखील दिल्या जात आहेत. खेळाशी संबंधित संस्थांनी तुम्हा सगळ्यांच्या सूचनांना प्राधान्य दिले, म्हणूनच इतक्या कमी वेळेत एवढे बदल होऊ शकले आहेत.

मित्रानो,

जसे खेळाच्या मैदानात मेहनती बरोबरच योग्य रणनीतीची साथ असेल तर विजय निश्चित होतो, हीच बाब मैदानाबाहेर देखील लागू होते. देशाने 'खेलो इंडिया' आणि  'फिट इंडिया' सारखे अभियान राबवून  मिशन मोड मध्ये योग्य रणनीतीसह काम केले, त्याचे परिणाम देखील तुम्ही पाहत आहेत. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. प्रथमच एवढ्या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. अनेक खेळ असे आहेत ज्यात भारत प्रथमच पात्र ठरला आहे. 

मित्रानो,

आपल्याकडे म्हटले जाते - अभ्यासात् जायते नृणाम् द्वितीया प्रकृतिः॥ अर्थात्, आपण जसा अभ्यास करतो, जसे प्रयत्न करतो, हळूहळू ते आपल्या स्वभावाचा भाग बनतात. इतक्या दिवसांपासून तुम्ही सगळे जिंकण्यासाठी सराव करत आहात.  तुम्हा सर्वाना पाहून , तुमची ही ऊर्जा पाहून शंकेला वावच उरत नाही. तुम्हाला आणि देशाच्या युवकांचा जोश पाहून एवढे म्हणू शकतो की तो दिवस दूर नाही जेव्हा जिंकणे हीच नव भारताची  सवय बनेल. आता तर ही सुरुवात आहे, तुम्ही टोकियोत जाऊन  जेव्हा देशाचा झेंडा फडकवाल तेव्हा संपूर्ण जग ते पाहिल. हो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे की जिंकण्याचा ताण घेऊन खेळायचे नाही . आपल्या मनाला, मेंदूला केवळ एकच गोष्ट सांगा की मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. मी देशवासियांनाही पुन्हा एकदा सांगेन  'चीयर फॉर इंडिया'. मला पूर्ण खात्री आहे ,तुम्ही सगळे देशासाठी खेळत असताना देशाचा गौरव वाढवाल नवे विक्रम नोंदवाल. याच विश्वासासह तुम्हा सर्वांचे खूप-खूप  धन्यवाद ! माझ्या खूप-खूप शुभेच्छा आणि तुमच्या कुटुंबीयांना माझा विशेष नमस्कार. खूप-खूप धन्यवाद. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features

Media Coverage

In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026
September 03, 2026

A- Rating to Third-Largest Wind Producer: How Modi’s Policies Are Rewriting India’s Global Rank