तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!
सायबराबादचे सामर्थ्य राष्ट्रीय तर आहे आणि तसेच जागतिक ही आहे. हे तेलंगणाच्या आणि देशाच्या वेगवान विकासाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. म्हणूनच, आज सायबराबादमधून तेलंगणाला देशाचे एक मोठे ‘मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस’ बनवण्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले आहे, त्यातून येथे हजारो नवीन रोजगार निर्माण होतील आणि तेलंगणाची संपर्कव्यवस्था देखील अधिक मजबूत होईल. मी या प्रकल्पांसाठी तेलंगणाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,
आज भारत 'रिफॉर्म्स एक्सप्रेस'वर वेगाने पुढे जात आहे. सोबतच, आजचा भारत आधुनिक पायाभूत सुविधाही उभारत आहे. झहीराबाद औद्योगिक क्षेत्राच्या निर्मितीमागेही हाच उद्देश आहे. हा औद्योगिक क्षेत्र, भारत सरकारच्या औद्योगिक कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याच्या राष्ट्रीय मोहिमेचा एक भाग आहे. हे क्षेत्र एक प्रकारे औद्योगिक स्मार्ट सिटी बनणार आहे. येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उत्तम वीज पुरवठा आणि प्रगत आयसीटी नेटवर्क उपलब्ध असेल; म्हणजेच जगभरातील गुंतवणूकदारांसाठी उद्योगाला आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा येथे उपलब्ध असेल. या सुविधांच्या विकासासाठी भारत सरकार हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि हे तेलंगणा व हैदराबादच्या हजारो तरुणांसाठी रोजगाराचे माध्यम बनेल. येथे बनणारी वाहने, मशिनरी आणि उभारले जाणारे अन्न प्रक्रिया उद्योग, तेलंगणाचे कामगार आणि शेतकरी यांनाही सक्षम करतील.
मित्रांनो,
भूतकाळात भारत जगातील एक मोठी अर्थव्यवस्था असताना, आपल्या वस्त्रोद्योगाची त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. आता आपण तो वारसा पुन्हा सशक्त करत आहोत. वारंगलमधील पीएम मित्रा पार्क, देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या क्रांतीला नवी गती देईल. पीएम मित्रा पार्कमध्ये लागणाऱ्या युनिट्सना केंद्र सरकारच्या योजनांचाही पूर्ण लाभ मिळेल. त्यांना केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेतूनही मदत मिळेल. म्हणजेच या वस्त्रोद्योग पार्कमुळे मोठ्या संख्येने रोजगाराची निर्मिती होईल. विशेषतः आपल्या माता-भगिनींसाठी अनेक नवी संधी निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
गेल्या 12 वर्षांत भारत सरकारची सर्वात महत्त्वाचे प्राधान्यक्रम हे आधुनिक संपर्कव्यवस्था आहेत. रस्ते असोत, रेल्वे असो वा विमानतळ; संपर्कव्यवस्थेच्या प्रत्येक माध्यमावर अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक फक्त आणि फक्त राष्ट्रीय महामार्गांसाठीच करण्यात आली आहे आणि याचा मोठा लाभ तेलंगणालाही होत आहे. गेल्या 12 वर्षांत तेलंगणातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दुप्पट झाले आहे. तेलंगणा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे प्रवास सुलभ होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक खर्चातही बचत होईल.

मित्रांनो,
2014 पूर्वी अविभाजित आंध्र प्रदेशसाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षाही कमी रेल्वे बजेट असायचे. रेवंत जी ऐकताय ना? संयुक्त आंध्रच्या वेळी रेल्वेचे बजेट एक हजार कोटींपेक्षा कमी होते. आज फक्त संयुक्त आंध्रचे नाही तर, आज फक्त तेलंगणाचे रेल्वे बजेटच सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचे आहे. सध्या सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे काम येथे सुरू आहे. तेलंगणामध्ये पाच वंदे भारत आणि 6 अमृत भारत ट्रेनही धावत आहेत.
मित्रांनो,
काही वेळापूर्वी काझीपेट-विजयवाडा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाच्या काही भागांचे लोकार्पण झाले आहे. याशिवाय काझीपेट रेल्वे अंडर बायपास लाईनही राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहे. या सुविधांमुळे प्रवास सोपा होईल आणि वाहतुकीचा वेगही वाढेल.
मित्रांनो,
21व्या शतकाच्या या जगात ऊर्जेविना सर्व कामकाज ठप्प होतात. ऊर्जा सुरक्षेचे काय महत्त्व आहे, हे आज जगातील प्रत्येक व्यक्ती अनुभवत आहे. म्हणूनच भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आमचे केंद्र सरकार अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. मलकापूर येथे इंडियन ऑईलच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन हे दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. हे टर्मिनल तेलंगणाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करेल आणि पुरवठा साखळी मजबूत करेल.

मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत जगातील अग्रगण्य देशांमध्ये पोहोचला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबतही अभूतपूर्व काम झाले आहे. आधी आपण शंभर टक्के एलपीजी कव्हरेजवर लक्ष केंद्रीत केले, आता आपण पाईपद्वारे स्वस्त गॅसवर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि सीएनजी आधारित व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहोत. अशा प्रयत्नांमुळे भारत या मोठ्या जागतिक ऊर्जा संकटाला अधिक सक्षमपणे सामोरा जात आहे. पण आता काळाची ही मागणी आहे की पेट्रोल-डिझेल-गॅस अशा गोष्टींचा वापर अत्यंत संयमाने करावा. जे ऊर्जा उत्पादने आपण परदेशातून मागवतो, त्यांचा वापर जितकी गरज आहे तितकाच करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि युद्धाच्या संकटामुळे होणारे दुष्परिणाम कमी करता येतील.
मित्रांनो,
आज तेलंगणाचा तरुण नवी स्वप्ने पाहत आहे. येथील शेतकरी नवीन आशेने पुढे जाऊ इच्छितो. येथील उद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्स, सर्वजण एका विकसित तेलंगणाच्या निर्मितीमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावू इच्छितात. कारण तेलंगणा विकसित होईल तेव्हाच भारत विकसित होईल. मी तेलंगणाच्या प्रत्येक परिवाराला हा विश्वास देतो की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार याहीपेक्षा वेगाने काम करत राहील. आता आमचे रेवंत जी म्हणाले की आपण राजकीय गोष्टींवर बोलणार नाही, तर मी देखील बोलणार नाही; आणि म्हणूनच एक राजकीय बाब नसलेली गोष्ट मी रेवंत जींना सांगेन की, 10 वर्षांच्या शासनात भारत सरकारने जेवढे गुजरातला दिले, तेवढे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की, जसे मी हे करेन, तुम्हाला आता जे मिळत आहे ते निम्मे होईल. तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे, तिथे पोहोचता येणार नाही. म्हणूनच हेच चांगले आहे की माझ्याशीच जोडून राहा.

मित्रांनो,
आमचा हा पक्का विश्वास आहे की, लोकशाहीत राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरकारे असणे ही वाईट गोष्ट नाही, पण देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्यच नाही. म्हणूनच आमच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी राज्यांचा विकास असो, तो वेगाने व्हावा, या भावनेने आपण सर्वजण मिळून चालूया आणि 2047 विकसित भारताचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर सिद्ध होताना पाहूया, याच माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत.
खूप खूप धन्यवाद!


