पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण
अनेक विकास प्रकल्पांची केली पायाभरणी, आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन केले
"आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेले शिवाजी महाराज यांचा हा पुतळा तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करेल"
पुण्याने शिक्षण, संशोधन आणि विकास, महिती तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती क्षेत्रात सातत्याने आपली ओळख मजबूत केली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक सुविधा ही पुणेकरांची गरज आहे आणि आमचे सरकार पुणेकरांची ही गरज लक्षात घेऊन काम करत आहे.
"या मेट्रोमुळे पुण्यातील प्रवास सुलभ होईल, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल, पुण्यातील लोकांचे जगणे अधिक सुसह्य होईल"
“आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या भारतात, आपल्याला वेग आणि व्याप्ती यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणूनच आमच्या सरकारने पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार केला आहे.
"आधुनिकतेबरोबरच पुण्याच्या प्राचीन परंपरा आणि महाराष्ट्राचा अभिमान यांना नगर नियोजनात

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे यंच्यासह अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिक कलाकार, समाजसेवक यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीतील माझ्या बंधू-भगिनींना नमस्कार!

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवलेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, महाराष्ट्र सरकारचे इतर मंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माझे संसदेतील सहकारी प्रकाश जावडेकरजी, इतर संसद सदस्य, आमदार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळजी, पिंपरी चिंचवडच्या महापौर श्रीमती माई ढोरेजी, याठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, बंधू-भगिनी,

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सध्या देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यात पुण्याचे ऐतिहासिक योगदान आहे.  लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण देशमुख, आर. जी. भांडारकर, महादेव गोविंद रानडेजी, या मातीतील सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी विनम्र आदरांजली अर्पण करतो.

महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगी यांची आज पुण्यतिथीही आहे. मी आज बाबासाहेब पुरंदरेजींचेही आदरपूर्वक स्मरण करत आहे. काही वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा तरुण पिढीमध्ये, येणाऱ्या पिढ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण करेल.

पुण्याच्या विकासाशी संबंधित इतर अनेक प्रकल्पांचे आज उद्घाटन आणि पायाभरणीही झाली आहे. पुणे मेट्रोच्या पायाभरणीसाठी तुम्ही मला आमंत्रित केले होते आणि आता उद्घाटन करण्याची संधी तुम्ही मला दिली हे माझे सौभाग्य आहे. यापूर्वी पायाभरणी झाली की, उद्घाटन कधी होणार हे माहीतच नसायचे.

मित्रांनो,

ही घटना महत्त्वाची आहे कारण योजना वेळेवर पूर्ण होऊ शकतात असा संदेशही यातून दिला जातो. मुळा-मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1100 कोटी रुपयांच्या प्रकल्पावरही आज काम सुरू आहे. आज पुण्याला ई-बसही मिळाल्या, बाणेर येथे ई-बसच्या आगाराचे उद्घाटन झाले. या सर्वांसह, आणि मी उषाजींचे अभिनंदन करतो, पुण्याला आर.के. लक्ष्मणजी यांना समर्पित एक अद्भुत कलादालन (आर्ट गॅलरी) देखील मिळाले आहे. पुण्याच्या विविधतेने नटलेल्या जीवनातील एक मनोहारी भेट आहे. मी उषाजी यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो कारण मी सतत त्यांच्या संपर्कात असतो. त्यांचा उत्साह, एकच ध्यास आणि काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणे यासाठी मी संपूर्ण कुटुंबाचे, उषाजीचे अभिनंदन करतो. या सर्व सेवा कार्याबद्दल मी आज पुणेकर जनतेचे अभिनंदन करतो आणि आपल्या दोन्ही महापौर महोदयांचे, त्यांच्या चमूचे अनेक विकासकामे वेगाने केल्याबद्दल अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

पुणे हे सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि देशभक्तीच्या चेतनेसाठी प्रसिद्ध आहे.  आणि त्याच बरोबर शिक्षण, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान तसेच वाहनउद्योग या क्षेत्रात पुण्याने आपली ओळख सातत्याने मजबूत केली आहे.  अशा परिस्थितीत आधुनिक सुविधा ही पुणेकरांची गरज असून, पुणेकरांची ही गरज लक्षात घेऊन आमचे सरकार अनेक आघाड्यांवर काम करत आहे. काही वेळापूर्वी मी पुणे मेट्रोने गरवारे ते आनंदनगर असा प्रवास केला. या मेट्रोमुळे पुण्यातील संपर्क व्यवस्था सुलभ होईल, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल, पुण्यातील लोकांचे राहणीमान अधिक उत्तम होईल. 5-6 वर्षांपूर्वी देवेंद्रजी इथे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पासाठी सातत्याने दिल्लीत येत असत, मोठ्या उत्साहाने आणि आशेने ते या प्रकल्पाचा पाठपुरावा करायचे. त्यांच्या प्रयत्नांना मी दाद देतो.

मित्रांनो,

कोरोना महामारीच्या काळातही हा विभाग आज सेवेसाठी सज्ज आहे.  पुणे मेट्रोच्या संचलनासाठी सौरऊर्जेचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.  यामुळे दरवर्षी सुमारे 25 हजार टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन थांबेल. या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व लोकांचे, विशेषत: सर्व कामगारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचे योगदान पुण्यातील व्यावसायिकांना, येथील विद्यार्थ्यांना, येथील सर्वसामान्यांना खूप मदत करेल.

मित्रांनो,

आपल्या देशात किती वेगाने नागरीकरण होत आहे हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. असं मानलं जातं की, 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 600 दशलक्ष पार करेल. शहरांची वाढती लोकसंख्या त्यांच्यासोबत अनेक संधी घेऊन येते पण त्याचवेळी आव्हानेही उभी ठाकतात. शहरांमध्ये ठराविक मर्यादेतच उड्डाणपूल बांधता येतात, लोकसंख्या वाढली की किती उड्डाणपूल बांधणार? कुठे उभारणार? किती रस्ते रुंद करणार? कुठे करणार? अशा परिस्थितीत आपल्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे व्यापक वाहतूक व्यवस्था (मास ट्रान्सपोर्टेशन). व्यापक वाहतूक व्यवस्थेसाठी (मास ट्रान्सपोर्टेशनसाठी) अधिकाधिक व्यवस्था निर्माण करणे. त्यामुळेच आज आमचे सरकार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या साधनांवर आणि विशेषतः मेट्रो वाहतूक व्यवस्थेवर (कनेक्टिव्हिटीवर) विशेष लक्ष देत आहे.

2014 पर्यंत, देशातील फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता. उरलेल्या मोजक्या शहरांमध्येच मेट्रो पोहोचू लागली होती. मेट्रो आज देशातील दोन डझनहून अधिक शहरांमध्ये एकतर कार्यान्वित झाली आहे किंवा लवकरच कार्यान्वित होणार आहे. यात महाराष्ट्राचाही वाटा आहे.  मुंबई असो, पुणे-पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर असो, आज महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे.

आज या निमित्ताने माझी पुणेकरांना आणि  जिथे मेट्रो धावते त्या प्रत्येक शहरातील नागरिकांना एक आवाहन आहे., मी सुखवस्तू  नागरिकांना एक विशेष आवाहन करेन, समाजात ज्या  व्यक्तींना मोठे लोक संबोधले जाते त्यांना मी विशेष आवाहन करेन की, आपण कितीही मोठे झालो तरी मेट्रोने प्रवास करण्याची सवय समाजातील प्रत्येक घटकाने अंगी बाणवली पाहिजे. तुम्ही मेट्रोचा जितका अधिकाधिक वापर करात तितके तुम्ही तुमच्या शहराला मदत कराल.

बंधू आणि भगिनींनो,

21 व्या शतकात भारतात आपल्याला आपली शहरे आधुनिकही बनवायची आहेत  आणि त्यात नवीन सुविधाही द्यायच्या आहेत. भविष्यातील भारतातील शहरे  लक्षात घेऊन, आमचे सरकार अनेक कल्पांप्रवर एकत्रितपणे काम करत आहे.प्रत्येक शहरात अधिकाधिक हरित वाहतूक, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक दुचाकी, प्रत्येक शहरात स्मार्ट वाहतूक असावी, लोकांनी वाहतूक सुविधांसाठी एकच कार्ड वापरावे, असा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे.

सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रत्येक शहरात एकात्मिक कमांड आणि  नियंत्रण केंद्र  असावे, चक्रीय  अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा असावी, प्रत्येक शहराला अतिरिक्त पाणी  मिळावे यासाठी प्रत्येक शहरात पुरेसे आधुनिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र असावीत , जलस्रोतांचे अधिक चांगले संवर्धन करणारी व्यवस्था असावी, कचऱ्यातून संपत्ती  निर्माण करण्याच्या दृष्टीने  प्रत्येक शहरात गोबरधन  प्रकल्प असावेत, बायोगॅस संयंत्र असावीत, प्रत्येक शहराने ऊर्जा कार्यक्षमतेवर भर द्यावा, प्रत्येक शहरातील पथदिवे स्मार्ट एलईडी बल्बने उजळले पाहिजेत या दृष्टीकोनासह आम्ही वाटचाल करत आहोत.

शहरांमधील पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेची  स्थिती सुधारण्यासाठी आम्ही अमृत अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेऊन कार्यवाही सुरु आहे. रेरासारखा कायदाही आम्ही केला, एकेकाळी हा कायदा नसल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबे त्रस्त होती, पैसे दिल्यानंतर, वर्षे निघून जायची, मात्र घर मिळत नव्हते. या सर्व त्रासाचे निराकारण कागदावर केले जायचे मात्र घर मिळत नव्हते, खूप  अनागोंदी  होती  एकप्रकारे, आपले मध्यमवर्गीय कुटुंब ज्याला आयुष्याची पुंजी लावून स्वतःचे घर घ्यायचे आहे, घर मिळण्यापूर्वीच त्याला स्वतःची फसवणूक झाली असे वाटायचे. हा रेरा कायदा या मध्यमवर्गीय लोकांना, ज्यांना घर घ्यायचे त्यांच्या संरक्षणाचे खूप मोठे काम करत आहे. स्वच्छतेवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पूर्ण लक्ष असावे, या अनुषंगाने आपण शहरांमध्ये विकासाची निकोप स्पर्धाही विकसित करत आहोत. शहर रचनेशी संबंधित यांसारख्या  विषयांकडेही यंदाच्या अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

हरित इंधनाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळखही दृढ होत आहे. प्रदूषणाच्या समस्येपासून  मुक्ती मिळवण्यासाठी, कच्च्या तेलासाठी परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही जैवइंधनावर, इथेनॉलवर भर देत आहोत. पुण्यात इथेनॉल मिश्रणाची संबंधित सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आसपासच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठी मदत होणार आहे. आज पुणे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेने अनेक कामे सुरू केली आहेत. वारंवार येणारे पूर आणि प्रदूषणापासून पुण्याला मुक्त करण्यासाठी हे शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.मु ळा-मुठा नदीच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठीही  केंद्र सरकार  पुणे महापालिकेला पूर्ण सहकार्य करत आहे. नद्यांना नवसंजीवनी मिळाल्यास शहरातील नागरिकांनाही दिलासा मिळेल, त्यांनाही नवी ऊर्जा मिळेल.

आणि मी शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आवाहन करेन की, वर्षातून एकदा, तारीख निश्चित करून नियमित नदी उत्सव साजरा करावा. नदीप्रती आदर, नदीचे महत्त्व, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण, नदी महोत्सवाचे वातावरण संपूर्ण शहरात निर्माण झाले पाहिजे, तरच आपल्या नद्यांचे महत्त्व समजेल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आपल्याला समजेल.

मित्रांनो,

कोणत्याही देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गतिमानता आणि व्याप्ती. मात्र अनेक दशकांपासून आपल्याकडे अशा यंत्रणा होत्या की यामुळे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत असे. या सुस्त वृत्तीचा देशाच्या विकासावरही परिणाम होत आहे. आजच्या झपाट्याने पुढे जात असलेल्या भारतात, आपल्याला गतिमानतेवरही  आणि व्याप्तीवरही  लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणूनच आमच्या सरकारने पीएम -गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा तयार केला आहे. आपण पाहिले आहे की, विविध विभाग, विविध मंत्रालये, सरकार यांच्यातील समन्वयाचा अभाव हा अनेकदा प्रकल्पांना विलंब होण्याचे कारण असतो. यामुळे असे घडते की, एखादा प्रकल्प अनेक वर्षांनंतर पूर्ण झाला तरी तो कालबाह्य होतो, त्याची प्रासंगिकता संपून जाते.

हे सर्व विरोधाभास दूर करण्याचे काम पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा  करेल. जेंव्हा एकात्मिक लक्ष केंद्रित करून काम केले जाईल, जेंव्हा प्रत्येक भागधारकाकडे पुरेशी माहिती असेल, तेंव्हा आपले प्रकल्प वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढेल. त्यामुळे लोकांच्या अडचणीही कमी होतील, देशाचा पैसाही वाचेल आणि लोकांना सुविधा लवकर मिळतील.

बंधू आणि भगिनींनो,

आधुनिकतेसोबतच पुण्यातील प्राचीनता आणि महाराष्ट्राची शान यांनाही शहर  नियोजनात समान स्थान दिले जात आहे, याचेही मला समाधान आहे. ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या प्रेरणा देणाऱ्या संतांची आहे. काही महिन्यांपूर्वीच मला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी करण्याचे भाग्य लाभले. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून, आधुनिक विकासाचा हा प्रवास असाच सुरू राहो, या सदिच्छेसह सर्व पुणेकर नागरिकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
RBI sees resilient economy despite West Asia conflict, monsoon concerns

Media Coverage

RBI sees resilient economy despite West Asia conflict, monsoon concerns
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlights the importance of fostering beneficial thoughts, words, and actions
July 24, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting how continuous practice in thought, word, and action shapes one's character and direction in life.

The Prime Minister wrote on X;

"कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।

तदेवापहरत्येनं तस्मात् कल्याणमाचरेत्॥"

Whatever a person continuously practices through their actions, thoughts, and words ultimately shapes their personality and draws them in that very direction; therefore, one should always give space only to beneficial subjects in one's thoughts and conversations.