विकास आणि वारसा या मंत्रांच्या आधारेच नव भारत पुढे वाटचाल आहे : पंतप्रधान
आपला देश ऋषीमुनींची, विद्वानांची आणि संतांची भूमी, जेव्हा जेव्हा आपला समाज कठीण काळातून जातो, तेव्हा ऋषीमुनी किंवा विद्वान व्यक्तिमत्वे या भूमीवर अवतरत समाजाला नवी दिशा दाखवतात : पंतप्रधान
गरीब आणि वंचितांच्या उन्नतीचा संकल्प, ‘सबका साथ, सबका विकास'चा मंत्र हीच सेवाभावना म्हणजे सरकारचे धोरण आणि वचनबद्धता : पंतप्रधान
भारतासारख्या देशात आपली संस्कृती केवळ आपल्या अस्मितेशी जोडलेली नाही, तर आपली संस्कृतीच आपल्या क्षमतांना बळकटी देते : पंतप्रधान

जय सच्चिदानंद जी !!!

स्वामी विचार पूर्ण आनंद जी महाराज जी, राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, खासदार व्ही. डी. शर्मा जी, खासदार जनार्दन सिंह सीग्रीवाल जी, व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर, आणि  माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येथे दिल्ली, हरियाणा, पंजाब संपूर्ण देशातून भाविक आले आहेत. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

श्री आनंदपूर धाम येथे आल्यावर मन अत्यंत भारावून गेले आहे. आत्ताच मी गुरुजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. खरोखरीच, माझे मन आनंदाने भरून गेले आहे.

 

मित्रानो,

ज्या भूमीचा कण न कण संतांच्या तपश्चर्येने शिंपला गेला आहे, जेथे परमार्थ ही एक परंपराच झाली आहे, जेथे सेवा करण्याचा संकल्प मानवतेच्या कल्याणाचा मार्ग अधिक प्रशस्त करून देतो, ती भूमी सामान्य नाही. आणि म्हणूनच, आपल्या संतांनी अशोक नगराबद्दल असे म्हटले आहे की दुःख सुद्धा येथे यायला घाबरते. आज येथे बैसाखी आणि श्री गुरु महाराजजी यांच्या अवतीर्ण दिन उत्सवात मला सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने मी अत्यंत आनंदित झालो आहे. या पावन प्रसंगी मी प्रथम पादशाही श्री श्री एकशे आठ श्री स्वामी अद्वैत आनंद जी महाराज आणि इतर पादशाही संतांना नमन करतो. मला असे समजले आहे की वर्ष 1936 मध्ये आजच्याच दिवशी, श्री द्वितीय पादशाहीजी यांनी महासमाधी घेतली होती. आणि वर्ष 1964 मध्ये आजच्याच दिवशी श्री तृतीय पादशाहीजी निजरुपात विलीन झाले. मी या दोन्ही सद्गुरूजींच्या पायी श्रद्धा पुष्प वाहतो. मी माता जागेश्वरी देवी, माता बीजासन, माता जानकी करीला माता धाम यांना देखील वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना बैसाखी आणि श्री गुरु महाराज जी यांच्या अवतीर्ण उत्सवाच्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आपला भारत ही ऋषी, ज्ञानवंत आणि संतांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा आपला भारत, आपला समाज एखाद्या कठीण काळातून जात असतो तेव्हा कोणी ना कोणी ऋषी, ज्ञानी पुरुष या धर्तीवर जन्म घेऊन समाजाला नवी दिशा दाखवतो. पूजनीय स्वामी अद्वैत आनंद जी महाराज यांच्या जीवनात देखील आपल्याला याची झलक बघायला मिळते. एके काळी आदि शंकराचार्यांसारख्या आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानासारखी सखोल संकल्पना समजावून सांगितली होती. गुलामीच्या काळात आपल्या समाजाला त्याचे विस्मरण होऊ लागले होते. मात्र, त्याच काळात असे ऋषी-मुनी देखील झाले ज्यांनी अद्वैताच्या संकल्पनेबाबत देशाच्या आत्म्याला खडबडून जाग आणली. याच धर्तीवर, पूजनीय अद्वैत आनंदजी महाराजांनी ही संकल्पना भारतातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला. महाराजजींनी अद्वैताची संकल्पना आपणा सर्वांसाठी अधिक सोपी केली, तिला सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणे सुलभ केले.

 

मित्रांनो,

आज जगात भौतिक उन्नती होत असताना युध्द, संघर्ष आणि मानवतावादी तत्वांशी संबंधित अनेक कठीण संकटे मानवतेसमोर उभी ठाकली आहेत. या संकटांच्या, या आव्हानांच्या मुळाशी काय आहे. तर, यांच्या मुळाशी आहे- आपलेपणा आणि परकेपणाची मानसिकता! अशी मानसिकता जी माणसाला माणसापासून दूर करते. संपूर्ण विश्व देखील आज विचार करत आहे, की यावर उपाय कुठे मिळेल? अद्वैताची संकल्पना हा यावरचा उपाय आहे. अद्वैत म्हणजे जेथे कोणतेही द्वैत नाही, दुजाभाव नाही. अद्वैत म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये एकच ईश्वर आहे असे मानण्याची संकल्पना! याहीपुढे जाऊन संपूर्ण सृष्टीला ईश्वराचे रूप मानण्याचा विचार म्हणजेच अद्वैत आहे. परमहंस दयाळ महाराज यांनी अद्वैताचा हाच सिद्धांत अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे- ‘जो तू है सो मैं हूं’ म्हणजेच जे तत्व तुझ्यात आहे तेच माझ्यातही आहे.जरा विचार करा, ‘जो तू है सो मैं हूं’ ही किती सुंदर संकल्पना आहे. ही संकल्पना ‘माझे आणि तुझे’ हा भेदच संपवून टाकते. आणि ही संकल्पना सगळ्यांनी स्वीकारली तर सगळे वादविवाद संपून जातील.

मित्रांनो,

आत्ता काही वेळापूर्वी सहावे पादशाही स्वामी श्री विचार पूर्ण आनंदजी महाराज यांच्याशी मी बातचीत करत होतो. पहिले पादशाही परमहंस दयाळ महाराजजी यांच्या विचारधनासोबतच ते मला आनंदधामच्या सेवाभावी कार्याची देखील माहिती देत होते. येथे साधनेचे जे 5 नियम निश्चित करण्यात आले त्यामध्ये निस्वार्थी सेवेच्या नियमाचा देखील समावेश आहे. निस्वार्थी भावनेने केलेली गरिबांची-वंचितांची सेवा, माणसाच्या सेवेलाच भगवंताची सेवा मानण्याची भावना ही आपल्या संस्कृतीचा पाया आहे. आनंदपूर विश्वस्त संस्था संपूर्ण समर्पित वृत्तीने सेवेची ही संस्कृती पुढे नेत आहे याचा मला आनंद आहे. ता संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच मोफत उपचारासाठी येथे शिबिरे देखील भरवली जातात.गो सेवेसाठी आधुनिक गोशालाही चालवली जाते.भावी पिढी घडविण्यासाठी ट्रस्टद्वारे अनेक शाळाही चालवल्या जातात.इतकेच नव्हे तर आनंदपूर धाम, पर्यावरण संरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेची मोठी सेवा करत आहे.आश्रमाच्या अनुयायांनी हजारो एकर पडीक जमीन वृक्ष लागवडीने हिरवीगार केल्याची माहिती मला देण्यात आली आहे.आज या आश्रमाने लावलेली हजारो झाडे लोकांना छाया देत आहेत.

 

बंधू-भगिनीनो,

आज हाच सेवा भाव आमच्या सरकारच्या प्रत्येक प्रयत्नाच्या केंद्र स्थानी आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे आज कोणताही गरजू पोटापाण्याच्या चिंतेपासून मुक्त आहे. आयुष्मान योजनेमुळे प्रत्येक गरीब आणि ज्येष्ठ नागरिक उपचाराच्या चिंतेपासून मुक्त  होत आहे.पीएम आवास योजनेमुळे गरिबांना आपल्या पक्क्या घराची चिंता आता भेडसावत नाही.जलजीवन अभियानामुळे गावा-गावातल्या  पाण्याच्या समस्या दूर होऊ लागल्या आहेत. देशात विक्रमी संख्येने नवी एम्स,आयआयटी,आयआयएम्स उघडली जात आहेत.अगदी गरीब वर्गातल्या मुलांचीही स्वप्ने साकारू लागली आहेत.आपल्या पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी, निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सरकारने ‘एक पेड  माँ के नाम’ हे अभियानही  सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत आज देशात कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत.देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेली ही कार्ये आपल्या सेवाभावाचीच साक्ष आहेत.गरीब आणि वंचितांच्या विकासाचा संकल्प, ‘सबका साथ,सबका विकास’ हा मंत्र, सेवेची ही भावना आज सरकारचे धोरणही आहे आणि निष्ठाही आहे.

मित्रहो,

आपण सेवेचा संकल्प घेतो तेव्हा आपण केवळ दुसऱ्याचे कल्याण करतो इतकेच नव्हे तर सेवा भाव आपल्या व्यक्तिमत्वालाही झळाळी देतो, आपल्या विचारांना व्यापक करतो.सेवा आपल्याला वैयक्तिक कक्षेच्या बाहेर जाऊन समाज,राष्ट्र आणि मानवतेच्या व्यापक उद्देशांशी जोडते. सेवेसाठी एकत्र येत, एकजुटीने काम करायला आपण शिकतो.जीवनाचे वेगवेगळे पैलू आपण जाणतो. आपण सर्वजण सेवाकार्यासाठी समर्पित लोक आहात. संकटांशी लढणे आणि त्यावर मात करणे हे आपण जीवनात अनुभवले असेल,सेवा करता करता आपण हे सर्व सहज शिकून जातो. म्हणूनच मी म्हणतो, सेवा ही एक साधना आहे, एक गंगा आहे ज्यामध्ये प्रत्येकाने नक्कीच डुबकी घेतली पाहिजे.

 

मित्रहो,

अशोक नगर आणि आनंदपूर धाम यासारख्या  क्षेत्रांनी देशासाठी बरेच कार्य केले आहे, त्यांचा विकास ही आपलीही जबाबदारी आहे.या भागाला कला, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. इथे वारसा आणि विकास यांच्या अपार संधी आहेत.म्हणूनच आम्ही मध्यप्रदेश आणि अशोकनगरमध्ये विकासाला झपाट्याने चालना देत आहोत. चंदेरी हातमागाला नवी झळाळी देण्यासाठी चंदेरी साड्यांना भौगोलिक मानांकन टॅग देण्यात आला आहे.  प्राणपूर इथे हस्तकला हातमाग पर्यटन ग्राम सुरु करण्यात आले आहे. यातून या भागाच्या अर्थव्यवस्थेला नवा वेग प्राप्त होईल. मध्य प्रदेश सरकार आतापासूनच उज्जैन सिंहस्थाच्या तयारीला लागले आहे.

बंधू-भगिनीनो,

आताच काही दिवसांपूर्वी रामनवमीचे महापर्व होते. आम्ही देशात ‘राम वनगमन पथ’ विकसित करत आहोत. या राम वनगमन पथ चा एक मोठा भाग मध्य प्रदेशातून जात आहे. आपले मध्य प्रदेश तर पूर्वीपासूनच आगळे आहे.या उपक्रमांमुळे त्याची ओळख आणखी दृढ होईल.

 

मित्रहो,

2047 पर्यंत विकसित भारत हे लक्ष्य देशाने ठेवले आहे आणि आपण ते नक्कीच साध्य करू याचा मला विश्वास आहे. मात्र या प्रवासात काही महत्वाच्या बाबी आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायच्या आहेत.जगातले अनेक देश, विकासाच्या प्रवासात आपल्या संस्कृतीपासून दुरावत गेल्याचे आपण पाहिले आहे. ते परंपराही विसरले आहेत.भारतात आपल्याला प्राचीन संस्कृतीचे जतन करायचे आहे.भारतासारख्या देशात आपली संस्कृती केवळ आपली ओळख नव्हे तर आपली संस्कृती आपल्या  सामर्थ्यालाही बळ देते.आनंदपूर धाम ट्रस्ट या दिशेनेही काम करत आहे याचा मला आनंद आहे. आनंदपूर धामची सेवा कार्ये, विकसित भारताचा  संकल्प नव्या उर्जेने पुढे नेतील असा मला विश्वास आहे. बैसाखी आणि श्री गुरु महाराज जी यांच्या जयंती उत्सवाच्या आपणा सर्वांना  पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.खूप-खूप अभिनंदन.जय श्री सच्चिदानंद .

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
French drugmaker Servier bets big on India as key global export hub

Media Coverage

French drugmaker Servier bets big on India as key global export hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles loss of lives in a shooting incident in Canada
February 11, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, extended his heartfelt condolences to the families who have lost their loved ones in a shooting incident in Canada. Shri Modi also wished a speedy recovery to the injured. "India stands in solidarity with the people of Canada in this moment of profound grief", Shri Modi stated.

Shri Modi posted on X:

"Deeply shocked by the horrendous shooting in Canada. I extend my heartfelt condolences to the families who have lost their loved ones and wish a speedy recovery to the injured. India stands in solidarity with the people of Canada in this moment of profound grief."

@MarkJCarney