तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त यांद्वारे विकसित भारताचा रोडमॅप मांडणारा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प: पंतप्रधान
आम्ही प्रक्रिया सुलभ केल्या आहेत, व्यवसाय सुलभता सुधारली आहे, तंत्रज्ञानप्रणीत प्रशासनाचा विस्तार केला आहे, संस्थांना बळकटी दिली असून देश आजही 'सुधारणा एक्सप्रेस'वर स्वार आहे: पंतप्रधान
गेल्या दशकात पायाभूत सुविधांवर आपण उत्तमप्रकारे लक्ष केंद्रित केले : पंतप्रधान
गेल्या दशकात पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे जारी राखले: पंतप्रधान
आम्ही जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला की भारताचा विकास महामार्ग, रेल्वे, बंदरे, डिजिटल नेटवर्क्स आणि वीज प्रणाली यांसारख्या मूर्त मालमत्ता तयार करूनच साध्य करता येईल : पंतप्रधान
येणारी अनेक दशके या मालमत्ता उत्पादकता निर्माण करत राहतील, यासाठी सार्वजनिक भांडवली खर्चात सातत्याने वाढ सुरू आहे: पंतप्रधान
जेव्हा सरकार, उद्योग आणि ज्ञान भागीदार एकत्रितपणे पुढे येतात तेव्हा सुधारणा परिणामांमध्ये रूपांतरित होतात आणि तेव्हाच घोषणा प्रत्यक्षात साकारतात : पंतप्रधान

 

नमस्कार !

या वर्षातील पहिल्या बजेट वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत 'बजेट वेबिनार' ही एक भक्कम परंपरा बनली आहे. बऱ्याचदा अर्थसंकल्पाचे मूल्यमापन वेगवेगळ्या निकषांवर केले जाते; कधी शेअर बाजाराच्या चढउतारांवर चर्चा होते, तर कधी प्राप्तिकराच्या प्रस्तावांवर लक्ष केंद्रित केले जाते. पण वस्तुस्थिती ही आहे की, राष्ट्रीय अर्थसंकल्प हा कोणताही अल्पकालीन दस्तऐवज नसून तो एक धोरणात्मक आराखडा असतो. म्हणूनच अर्थसंकल्पाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन देखील ठोस निकषांवर व्हायला हवे. अशी धोरणे जी पायाभूत सुविधांचा विस्तार करतील, जी पतपुरवठा सुलभ करतील, जी व्यापार सुलभता वाढवतील, जी प्रशासनात पारदर्शकता आणतील आणि सामान्य जनतेचे जीवन सुसह्य करून त्यांच्यासाठी नवनवीन संधी निर्माण करतील. अर्थसंकल्पातील या बाबींशी संबंधित निर्णयच अर्थव्यवस्थेला शाश्वत मजबुती देतात.

 

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही अर्थसंकल्पाकडे वेगवेगळे, एकाकी म्हणून पाहिले जाऊ नये. राष्ट्र निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया असते. प्रत्येक अर्थसंकल्प हा एका मोठ्या ध्येयाकडे जाण्याचे एक पाऊल असते आणि आपल्यासमोर ते मोठे ध्येय आहे - 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती. प्रत्येक सुधारणा, प्रत्येक निधीचे वाटप आणि प्रत्येक बदल या दीर्घ प्रवासाचा एक भाग म्हणून पाहिला पाहिजे.

आणि म्हणूनच, दरवर्षी अर्थसंकल्पानंतर होणारी ही वेबिनार खूप महत्त्वाची असतात. माझी अपेक्षा आहे की ही सत्रे केवळ विचारांच्या देवाणघेवाणीपर्यंत मर्यादित राहू नयेत, तर ते एक प्रभावी विचारमंथन बनावे. तुमचे अनुभव आणि व्यावहारिक आव्हानांवर आधारित सूचना, आर्थिक रणनीती अधिक उत्तम बनवण्यासाठी आणि तोडगा शोधण्यासाठी नक्कीच मदत करतील. जेव्हा उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, विश्लेषक आणि धोरणकर्ते एकत्र येऊन विचार करतात, तेव्हा योजनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे होते आणि त्याचे परिणाम अधिक अचूक मिळतात. या चर्चासत्रांच्या मालिकेमागे हीच एक भावना आहे.

मित्रांनो

21 व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला आहे. जर तुम्ही स्वतःच्या बाबतीत विचार केला, तर तुमच्या आयुष्यातील एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा कालखंड निघून गेला आहे. आता आपण देशाच्या विकास प्रवासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहोत. ही अशी वेळ आहे, जेव्हा आपली अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे आणि त्याचबरोबर भारताने गेल्या दशकात विलक्षण लवचिकता दाखवली आहे. ही लवचिकता अपघाताने आलेली नाही, तर ती आमच्या दृढनिश्चयाने केलेल्या सुधारणांचे फळ आहे. आम्ही प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, व्यापार सुलभता सुधारली आहे, तंत्रज्ञान-आधारित प्रशासनाचा विस्तार केला आहे, संस्थांना बळकट केले आहे आणि आजही हा देश सुधारणांच्या गतीवर स्वार आहे. हा वेग टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला केवळ धोरणात्मक हेतूवर लक्ष केंद्रित करायचे नाही, तर अंमलबजावणीतील उत्कृष्टतेवरही भर द्यायचा आहे. सुधारणांचे मूल्यमापन त्यांच्या घोषणेवरून नव्हे, तर तळागाळातील त्यांच्या प्रभावावरून व्हायला हवे. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि डेटा विश्लेषण यांचा व्यापक वापर करून पारदर्शकता, गती आणि जबाबदारी वाढवावीच लागेल, तसेच तक्रार निवारण प्रणालीद्वारे परिणामांवर सतत लक्ष ठेवून देखील रहावे लागेल.

मित्रांनो,

गेल्या दशकात आमचा पायाभूत सुविधांवर मोठा भर राहिला आहे. भारताचा विकास महामार्ग, रेल्वे, बंदरे, माहिती तंत्रज्ञान जाळे, ऊर्जा प्रणाली यांसारख्या अनेक ठोस मालमत्ता तयार करूनच होईल, हा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतला आहे. या मालमत्ता येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत उत्पादकता निर्माण करत राहतील.

 

यामुळेच आणि ह्याच कारणामुळे सार्वजनिक भांडवली खर्च सातत्याने वाढवला जात आहे. 11 वर्षांपूर्वी सार्वजनिक कॅपेक्ससाठी अंदाजपत्रकात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची तरतूद होती, तर सध्याच्या अंदाजपत्रकात ती वाढून सुमारे 12 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी सरकारी गुंतवणूक ही खाजगी क्षेत्रासाठीही एक स्पष्ट आणि सकारात्मक संदेश आहे.

मित्रांनो,

आता वेळ आली आहे की उद्योग क्षेत्र आणि वित्तीय संस्थानी देखील नव्या ऊर्जेसह पुढे यावे. आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये अधिक सहभाग हवा आहे, वित्तपुरवठ्याच्या मॉडेल्समध्ये अधिक नावीन्य हवे आहे आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये अधिक भक्कम सहकार्य हवे आहे. या संदर्भात माझा आणखी एक महत्त्वाचा सल्ला आहे — आपल्याला प्रकल्प मंजुरी पद्धती आणि मूल्यमापनाची गुणवत्ता अधिक सक्षम करावी लागेल. खर्च-लाभ विश्लेषण आणि संपूर्ण जीवनचक्र खर्चाचा विचार सर्वोपरी ठेवून अपव्यय आणि विलंब रोखलेच पाहिजेत.

मित्रांनो,

आपण परकीय गुंतवणूक चौकट अधिक सुलभ करत आहोत. व्यवस्था अधिक पूर्वानुमानक्षम आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दीर्घकालीन वित्तपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी बाँड बाजार अधिक सक्रिय करण्याच्या दिशेनेही आम्ही पावले उचलत आहोत. बाँड खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक सुलभ केली जात आहे.

मित्रांनो,

बाँड बाजार सुधारणांकडे दीर्घकालीन विकासाच्या सक्षमक म्हणून पाहिले गेले पाहिजेत. आपल्याला पूर्वानुमानक्षमता सुनिश्चित करावी लागेल, तरलता अधिक सखोल करावी लागेल, नवीन साधने आणावी लागतील आणि जोखमींचे प्रभावी व्यवस्थापन करावे लागेल. तेव्हाच आपण सातत्यपूर्ण परकीय भांडवल आकर्षित करू शकू. मला अपेक्षा आहे की आपण जागतिक सर्वोत्तम पद्धतींमधून शिकून, परकीय गुंतवणूक आराखडा आणि बाँड बाजार मजबूत करण्यासाठी स्पष्ट आणि ठोस सूचना द्याल.

 

मित्रांनो,

कोणतीही धोरणात्मक चौकट सरकार तयार करू शकते, पण तिचे यश आपल्यावर अवलंबून असते. उद्योग क्षेत्राने नवीन गुंतवणूक आणि नावीन्यासह पुढे यावे लागेल. वित्तीय संस्था आणि विश्लेषकांनी व्यवहार्य उपाय तयार करण्यास मदत करावी लागेल आणि बाजारातील विश्वास अधिक मजबूत करावा लागेल. जेव्हा सरकार, उद्योग आणि ज्ञान भागीदार एकत्र पुढे जातात, तेव्हा सुधारणा प्रत्यक्ष परिणामांत रूपांतरित होतात. तेव्हाच घोषणा प्रत्यक्ष उपलब्ध्यांमध्ये रूपांतरित होतात. माझा सल्ला आहे की आपण एक स्पष्ट सुधारणा भागीदारी सनद विकसित करूया. ही सरकार, उद्योग, वित्तीय संस्था आणि शिक्षणक्षेत्र यांची संयुक्त बांधिलकी असेल. ही सनद विकसित भारताच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

मित्रांनो,

मी सर्व भागधारकांना — वित्तीय संस्था, बाजारपेठा, उद्योग, व्यावसायिक आणि नवोन्मेषकांना — आवाहन करतो की या अर्थसंकल्पाने दिलेल्या नव्या संधींचा पूर्ण लाभ घ्या. अर्थसंकल्पामुळे खुल्या झालेल्या संधींशी सखोलपणे जोडले जा. आपल्या सहभागामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल तसेच आपल्या अभिप्राय आणि सहकार्यामुळे अधिक चांगले परिणाम मिळतील.

चला, आपण सर्व मिळून सुधारणा करूया, वाढ साध्य करूया आणि असा भविष्यकाळ घडवूया, ज्यामुळे विकसित भारताचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल.

मला पूर्ण विश्वास आहे की आज आपण सखोल चिंतन कराल, प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. एक गोष्ट लक्षात ठेवूया — अर्थसंकल्पापूर्वी आपण सर्वांशी सल्लामसलत करतो, त्याचा उद्देश अर्थसंकल्प अधिक उत्तम बनवणे हा असतो. परंतु आता अर्थसंकल्प तयार झाला आहे. आता चर्चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी नाही, तर अर्थसंकल्पातील तरतुदी शक्य तितक्या लवकर आणि सोप्या मार्गाने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांना लाभ होईल आणि त्यांचा सक्रिय सहभाग राहील. या दृष्टीने आपण चर्चा आणि चिंतन केले, तर हे वेबिनार खऱ्या अर्थाने एक सशक्त आणि गतिमान अर्थव्यवस्थेची दारे उघडतील.

खूप-खूप धन्यवाद !

नमस्कार !

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-New Zealand elevate ties to strategic partnership; Scripts 2030 roadmap, $20bn investment & Indo-Pacific security

Media Coverage

India-New Zealand elevate ties to strategic partnership; Scripts 2030 roadmap, $20bn investment & Indo-Pacific security
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the passing of Father Amir of State of Qatar HH Sheikh Hamad bin Khalifa Al Thani
July 12, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed deep grief over the passing of the Father Amir of the State of Qatar, HH Sheikh Hamad bin Khalifa Al Thani.

The Prime Minister described him as a visionary leader who led Qatar to great levels of development and prosperity. Shri Modi also remembered him as a true friend whom he had the honour of meeting during his visit to Qatar in February 2024.

The Prime Minister conveyed his sincere condolences to the Amir of Qatar, HH Sheikh Tamim bin Hamad Al Thani, the entire royal family and the people of Qatar.

The Prime Minister wrote on X;

“We deeply mourn the passing of Father Amir of State of Qatar, HH Sheikh Hamad bin Khalifa Al Thani. A visionary leader who led Qatar to great levels of development and prosperity, we remember him also as a true friend whom I had the honour of meeting during my last visit to Qatar in February 2024. I convey my sincere condolences to the Amir of Qatar, HH Sheikh Tamim bin Hamad Al Thani and the entire royal family and people of Qatar. May the departed soul rest in eternal peace.

@TamimBinHamad”