आदरणीय

राष्ट्रपति घनी,

तुम्ही केलेल्या प्रशंसेसाठी आभारी आहे. आपल्यासोबत उपस्थित अफगाणिस्तानातील सर्व वरिष्ठ अधिकारी,

सहकाऱ्यांनो ,

नमस्कार!
सर्वप्रथम, इथे येण्यासाठी विलंब झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आमच्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि काही कार्यक्रमामुळे मी तिथे उपस्थित असणे, अत्यंत आवश्यक होते. आज आपण भारत -अफगाणिस्तान यांच्यातील मैत्रीच्या प्रदीर्घ प्रवासात आणखी एक मैलाचा दगड रोवणार आहोत. भारत आणि अफगाणिस्तान केवळ भौगोलिकदृष्टयाच नव्हे तर इतिहास आणि सांस्कृतिकदृष्टया देखील एकमेकांशी जोडलेले आहेत, एकमेकांवर प्रभाव पाडत आलेले आहेत. शतकानुशतकांचे हे प्राचीन संबंध आपल्या भाषा, आपले खानपान, संगीत, आपल्या साहित्यात प्रतिबिंबित होतात.

मित्रांनो ,

सर्वांना ठाऊक आहे की नद्या जगातील महान संस्कृती च्या प्रसारक आहेत. नद्या आपल्या राष्ट्राच्या, समाजाच्या जीवनदात्री, रूपरेषा निश्चित करणाऱ्या राहिल्या आहेत. भारतात आम्ही आमच्या गंगा नदीला आई माता मानतो आणि तिच्या कायाकल्पासाठी आम्ही 'नमामि गंगे' कार्यक्रम सुरू केला आहे. नद्यांचा सन्मान हा भारत आणि अफगाणिस्तानचा समान सांस्कृतिक वारसा आहे. ऋग्वेदातील ‘नदी -स्तुती-सुक्त’ आपल्या प्रदेशात वाहणाऱ्या नद्यांची स्तुती करते. तर मौलाना जलालुद्दीन रूमी यांनी नद्यांमुळे निर्माण महान संस्कृतींमधल्या संबंधांविषयी म्हटले आहे, “जी नदी तुमच्यात वाहत आहे, तीच माझ्यातही वाहत आहे”.

सहकाऱ्यांनो,

जवळपास गेल्या दोन दशकांपासून भारत अफगाणिस्तानातील प्रमुख विकास भागीदारांपैकी एक आहे. अफगाणिस्तानातील आमचे विकास प्रकल्प; पायाभूत सुविधा, क्षमताबांधणी, शेती, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात आहेत. दशकभरापूर्वी, पुल-ए-खुमरीपासून पारेषण वाहिनीच्या निर्मितीमुळे काबूल शहराचा वीजपुरवठा सुधारला. 218 किलोमीटर लांबीच्या डेलाराम-झरंज महामार्गामुळे अफगाणिस्तानसाठी दळणवळणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. काही वर्षांपूर्वी बांधलेल्या ‘मैत्री’ धरणामुळे हेरात वीज व सिंचन व्यवस्था मजबूत झाली. अफगाणिस्तानच्या संसदेची निर्मिती ही भारत आणि अफगाणिस्तानातील जनतेच्या लोकशाहीवरील प्रेमाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या सर्व प्रकल्पांमधील एक महत्त्वाचा पैलू हा आहे की यामुळे भारत आणि अफगाणिस्तानची मैत्री, आमची परस्पर भागीदारी, अधिक दृढ झाली आहे. ही मैत्री, हे घनिष्ठ संबंध कोविड साथीचा सामना करतानाही दिसून आले. औषधे आणि पीपीई असोत, किंवा भारतात तयार केलेल्या लसींचा पुरवठा असो, आम्ही अफगाणिस्तानाच्या गरजांना नेहमीच महत्त्व दिले आहे. म्हणूनच मी हे म्हणू शकतो की आज आपण काबूलमध्ये ज्या शहतूत धरणाच्या निर्मितीसाठी स्वाक्षऱ्या करत आहोत, त्याचा पाया फक्त विटा आणि सिमेंटवर बांधला जाणार नाही तर भारत-अफगाणिस्तानची मैत्रीच्या बळावर बांधला जाईल. काबूल शहर भारतीय लोकांच्या मनामनात वसलेले आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गुरू रवींद्रनाथ टागोरांची ‘काबुलीवाला’ कथा वाचून कितीतरी पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. शहतूत धरणयोजनेमुळे काबूल शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. त्याचबरोबर काबूल नदी खोऱ्यात सिंचनाच्या जाळ्याचा देखील विकास होईल.

सहकाऱ्यांनो,

संसद भवनाचे उद्‌घाटन करण्यासाठी मी जेव्हा डिसेंबर 2015 मध्ये काबूलला आलो होतो तेव्हा मला प्रत्येक अफगाण स्त्रीपुरुष आणि मुलाच्या डोळ्यात भारताबद्दलचे प्रचंड प्रेम दिसले. अफगाणिस्तानात मला असे वाटलेच नाही की मी दुसऱ्याच्या घरात आहे. स्वतःच्याच घरात असल्यासारखे मला वाटत होते. ‘खन्ना-ए-खुद-अस्त’, हे आपले घर असल्याचे मला वाटले! बदख़शान पासून निमरोजपर्यंत आणि हेरातपासून कंधारपर्यंत प्रत्येक अफगाण बंधू आणि भगिनीला मी ग्वाही देतो की भारत तुमच्यासोबत उभा आहे. तुमचे धैर्य, साहस आणि दृढनिश्चयाच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर भारत तुमच्यासोबत राहील. कोणतीही बाह्य शक्ती अफगाणिस्तानचा विकास किंवा भारत-अफगाणिस्तानची मैत्री रोखू शकत नाही.

सन्माननीय महोदय,

अफगाणिस्तानातील वाढत्या हिंसाचारामुळे आम्ही चिंतित आहोत. निष्पाप नागरिक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना भ्याडपणे लक्ष्य केले जात आहे. हा हिंसाचार त्वरित संपवण्याचे आवाहन आम्ही केले आहे आणि त्वरित व्यापक युद्धबंदीचे समर्थन आम्ही करत आहोत. हिंसा ही शांतीचा प्रतिकार आहे आणि दोघे एकत्र वाटचाल करू शकत नाहीत. एक निकटवर्ती शेजारी आणि मजबूत सामरिक भागीदार म्हणून भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांना आपला प्रदेश दहशतवाद आणि कट्टरतेच्या गंभीर संकटापासून मुक्त पाहावयाचा आहे. भारत अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व जपणाऱ्या आणि अफगाणिस्तानच्या नियंत्रणाखालील अशा शांती प्रक्रियेचे समर्थन करत आला आहे.

अफगाणिस्तानच्या जनतेचे ऐक्य मजबूत करणे खूप आवश्यक आहे. अखंड अफगाणिस्तान कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असल्याची मला खात्री आहे. अफगाणिस्तानच्या यशामध्ये आम्ही भारत आणि संपूर्ण प्रदेशाचे यश पाहतो. मी पुन्हा एकदा सर्व अफगाण मित्रांना भारताच्या मैत्रीचा पूर्ण भरवसा देतो. भारतावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी अफगाणिस्तानातील सर्व प्रिय बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानतो.

तशक्कुर,

धन्यवाद।

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One App For 2,400-Plus Government Services: How UMANG Is Changing Access In India

Media Coverage

One App For 2,400-Plus Government Services: How UMANG Is Changing Access In India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister witnesses Surya Tilak at Shri Ram Janmabhoomi Mandir
March 27, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, today, witnessed Surya Tilak at the Shri Ram Janmabhoomi Mandir, Ayodhya. “May the blessings of Prabhu Shri Ram always remain upon us”, Shri Modi stated.

Shri Modi posted on X:

“Earlier today, witnessed the Surya Tilak that took place at the Shri Ram Janmabhoomi Mandir, Ayodhya. May the blessings of Prabhu Shri Ram always remain upon us.”