पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वाययुजीएम, युग्म परिषदेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
युग्म (संस्कृतमध्ये याचा अर्थ "संगम") ही अशा प्रकारची पहिलीच धोरणात्मक परिषद आहे ज्यामध्ये सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील अग्रणी उपस्थित राहणार आहेत. वाधवानी फाउंडेशन आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह सुमारे 1,400 कोटी रुपयांच्या सहयोगी प्रकल्पाद्वारे भारताच्या नवोन्मेष प्रवासाला यातून हातभार लागेल.
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेष-प्रणीत भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून, या परिषदेदरम्यान विविध प्रमुख प्रकल्प सुरू केले जातील. त्यामध्ये आयआयटी कानपूर (एआय आणि इंटेलिजेंट सिस्टीम्स) आणि आयआयटी बॉम्बे (जैव विज्ञान, जैव तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध) येथील सुपरहब; संशोधन व्यावसायीकरणाला चालना देण्यासाठी आघाडीच्या संशोधन संस्थांमध्ये वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (डब्ल्यू आयएन) केंद्रे; आणि विलंबित प्रकल्पांना संयुक्तपणे निधी देण्यासाठी आणि संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन सोबत भागीदारी यांचा समावेश आहे.
या परिषदेत सरकारी अधिकारी, आघाडीचे उद्योग आणि शैक्षणिक धुरिणांसह उच्च-स्तरीय गोलमेज परिषदा आणि पॅनेल चर्चा; संशोधनाचे परिणामात जलद गतीने रूपांतर सक्षम करण्यासाठी कृतिभिमुख संवाद; संपूर्ण भारतातील अत्याधुनिक नवोन्मेषांचा समावेश असलेला डीप टेक स्टार्टअप शोकेस; आणि सहकार्य आणि भागीदारीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये विशेष नेटवर्किंग संधी यांचा समावेश असेल.
भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक उत्प्रेरित करणे; प्रमुख तंत्रज्ञानात संशोधन-ते-व्यावसायीकरण प्रक्रियेला गती देणे; शैक्षणिक-उद्योग-सरकार भागीदारी मजबूत करणे; एएनआरएफ आणि एआयसीटीई इनोव्हेशन सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना चालना देणे; संस्थांमध्ये नवोन्मेष अनुमतीचे लोकशाहीकरण करणे; आणि विकसित भारत @2047 च्या दिशेने राष्ट्रीय नवोन्मेष संरेखनाला चालना देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.