पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यासाठी त्यांना संबोधित केले. सेवानिवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करताना, अशा प्रसंगी सभागृहाला पक्षीय अभिनिवेशांच्या पलीकडे जाऊन समान भावना अनुभवता येते, असे नमूद केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सदस्य सभागृहात परत येवोत किंवा ते नंतर ते व्यापक समाजसेवेकडे वळले तरी, त्यांचा संचित अनुभव देशासाठी संपत्तीच राहतो. राजकारणाच्या गतिमान क्षेत्रात, प्रवास कधीच खऱ्या अर्थाने संपत नाही, कारण अनुभवी नेत्यांसाठी भविष्य नेहमीच नवीन संधी घेऊन येते. "राजकारणात पूर्णविराम नसतात; तुमचा अनुभव आणि योगदान राष्ट्राच्या जीवनाचा एक भाग म्हणून कायम राहील," असे प्रतिपादन मोदींनी केले.
पंतप्रधानांनी निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव करत खासदारांच्या नवीन पिढीने देवेगौडा, खर्गे आणि शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आदर्श मानून त्यांच्याकडून धडे घ्यावेत, अशी सूचना केली. त्यांनी उपसभापती हरिवंशजी यांच्या मृदू वागण्याची आणि गुंतागुंतीची परिस्थिती हाताळताना सभागृहाचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. अशा प्रकारे समर्पित सेवा समाजाने सोपवलेल्या जबाबदाऱ्यांप्रती गाढ वचनबद्धता दर्शवते, याकडे मोदींनी लक्ष वेधले. "समाजाने दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रती पूर्णपणे वचनबद्ध कसे रहावे याबद्दल या ज्येष्ठ नेत्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे," असे पंतप्रधानांनी नमूद केले.
सभागृहाच्या बदलत्या परंपरांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, दिवसरात्र चालणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या वातावरणामुळे प्रत्येकजण अधिक जागरूक झाला असला तरी, विनोद आणि हजरजबाबीपणाची परंपरा संसदीय जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. दर दोन वर्षांनी एक गट सभागृहातून निवृत्त होत असल्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सातत्याने सुरू राहण्यासोबतच सभागृहात नवीन येणाऱ्या सदस्यांकडून समृद्ध परंपरा कायम ठेवली जाईल हे देखील सुनिश्चित होते, असे त्यांनी नमूद केले. मोदी पुढे म्हणाले की, हे संस्थात्मक सातत्य हा लोकशाही प्रक्रियेला बळकट करणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. "येथील वारसा ही एक निरंतर प्रक्रिया असून ती आपल्या संसदीय प्रणालीला समृद्ध करते," असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी राज्यसभेचे अद्वितीय संस्थात्मक मूल्य अधोरेखित करत 'दुसऱ्या मता'च्या संकल्पनेमुळे संसदीय प्रणालीला प्रचंड बळ मिळते, याकडे अंगुलीनिर्देश केला. दोन्ही सभागृहांच्या निर्णयांतील संक्रमण कायदेविषयक प्रक्रियेला महत्त्वाचा नवीन आयाम देते, असे नमूद करत त्यामुळे देशासाठी अधिक परिष्कृत परिणाम सुनिश्चित होतात. हा लोकशाही वारसा राष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत खुलेपणा आणि सखोलतेची भावना वाढण्यास चालना मिळते, असे ते म्हणाले. "हे दुसरे मत आपल्या लोकशाहीत मोठे योगदान देणारे असून आपण ही गोष्ट जपली पाहिजे," असे मोदी म्हणाले.
निवृत्त होत असलेल्या या सदस्यांना त्यांच्या कार्यकाळात जुन्या आणि नवीन अशा दोन्ही संसद भवनांमध्ये सेवा बजावण्याची दुर्मिळ संधी मिळाली आहे याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. नवीन सभागृहातील या ऐतिहासिक संक्रमणाच भाग असणे,त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या कारकिर्दीतील ताजी आणि लक्षणीय आठवण ठरेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मोदींनी हे सभागृह 'महान मुक्त विद्यापीठ' असल्याचे म्हणत ते सदस्यांना राष्ट्रीय जीवनातील जटिलेतेचे अनोखे शिक्षण देते असे सांगितले."येथे घालवलेली सहा वर्षे देशासाठी योगदान देण्याच्या आणि आत्मविकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची असतात,"असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, मोदींनी सदस्यांच्या अनेक वर्षांच्या संसदीय अनुभवामुळे त्यांची दूरदृष्टी आणि क्षमता अनेक पटींनी वाढली असल्याचा विश्वास व्यक्त केला. निवृत्त होणारे सदस्य औपचारिक व्यवस्थेत सेवा करोत किंवा स्वतंत्र सामाजिक कार्याद्वारे, राष्ट्र उभारणीतील त्यांचे अमूल्य योगदान पुढेही जाणवत राहील, असे नमूद केले. पंतप्रधान मोदींनी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रतिनिधींच्या दीर्घ आणि समर्पित सेवेची पुन्हा एकदा प्रशंसा करत त्यांनी समर्पितपणे, सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. “मी सर्व सेवानिवृत्त सदस्यांच्या योगदानाला पुनश्च प्रणाम आणि गौरव करतो,” यावर मोदींनी भर दिला.


