भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये सरकारची वाटचाल: पंतप्रधान
जलद विकास साधण्यात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचे महत्त्व पंतप्रधानांकडून अधोरेखित
कार्यसिद्धीसाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी एकत्र काम करण्याची गरज, लोकसहभागाद्वारे परिवर्तन घडेल: पंतप्रधान
आगामी 25 वर्षे समृद्ध आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित असतील: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी माध्यमांशी संवाद साधला. समृद्धीची देवता असलेल्या देवी लक्ष्मीला वंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला, प्रथेप्रमाणे ज्ञान, समृद्धी आणि कल्याण देणाऱ्या देवी लक्ष्मीचे स्मरण करुया. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर लक्ष्मीचा विशेष वरदहस्त असावा अशी त्यांनी देवी लक्ष्मीला प्रार्थना केली.

 

भारताने आपल्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण केली असून ती प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे नमूद करताना, या कामगिरीचे लोकशाही जगात विशेष स्थान आहे, जे भारताचे सामर्थ्य आणि महत्त्व दर्शवते यावर मोदी यांनी भर दिला. 

तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या देशातील जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, पंतप्रधानांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याचे निदर्शनास आणले आणि 2047 पर्यंत, जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा देश विकसित देश बनण्याचे ध्येय साध्य करेल असा विश्वास व्यक्त केला. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे 140 कोटी नागरिक एकत्रितपणे हा संकल्प पूर्ण करतील, असे त्यांनी नमूद केले. तिसऱ्या कार्यकाळात, सरकार भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये वाटचाल करत आहे हे उद्धृत करताना नवोन्मेष, समावेशन आणि गुंतवणूक हे देशाच्या आर्थिक आराखड्याचा पाया असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मोदी यांनी नमूद केले की या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयके आणि प्रस्तावांवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे राष्ट्राला बळकटी देणारे कायदे तयार होतील. महिलांना पुन्हा सन्मान मिळवून देणे, धार्मिक आणि सांप्रदायिक भेदांपासून मुक्त राहून प्रत्येक महिलेसाठी समान हक्क सुनिश्चित करणे यावर त्यांनी भर दिला. हे ध्येय साध्य करण्यासाठी या अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले. जलद विकास साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यसिद्धीसाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे आणि लोकसहभागाद्वारे परिवर्तन घडेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

भारत, एक तरुण राष्ट्र आहे ज्यामध्ये प्रचंड युवाशक्ती आहे यावर भर देऊन पंतप्रधान म्हणाले की, आज 20-25 वयोगटातील तरुण 45-50 वर्षांचे झाल्यावर विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील. ते धोरणनिर्मितीत महत्त्वाच्या पदांवर असतील आणि पुढील शतकात विकसित भारताचे अभिमानाने नेतृत्व करतील. विकसित भारताचा संकल्प साकारण्याचे प्रयत्न हे सध्याच्या किशोरवयीन आणि तरुण पिढीसाठी एक महत्वपूर्ण भेट असेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी याची तुलना 1930 आणि 1940 च्या दशकात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांशी केली, ज्यांच्या प्रयत्नांमुळे 25 वर्षांनंतर स्वातंत्र्याचा उत्सव झाला. त्याचप्रमाणे, पुढील 25 वर्षे समृद्ध आणि विकसित भारत साध्य करण्यासाठी समर्पित असतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विकसित भारताचे स्वप्न बळकट करण्यासाठी सर्व खासदारांना योगदान देण्याचे आवाहन केले. तरुण खासदारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, कारण सभागृहात त्यांचा सक्रिय सहभाग आणि जागरूकता त्यांना विकसित भारताच्या फलनिष्पत्तीची अनुभूती देईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2014 नंतर कदाचित हे पहिलेच संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय स्रोतांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. गेल्या 10 वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी सातत्याने गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून वातावरण भडकवण्यास तयार असलेल्या लोकांची कमतरता नाही अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. तथापि, गेल्या दशकातील हे पहिलेच अधिवेशन आहे जिथे कोणत्याही बाह्य कोन्यातून असा गदारोळ माजवला गेला नाही असेही त्यांनी सांगितले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India car sales to hit 4.7 million in FY26 despite bumps

Media Coverage

India car sales to hit 4.7 million in FY26 despite bumps
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 मार्च 2026
March 16, 2026

Thoughtful Strength: Balancing Security, Growth, and Autonomy Under PM Modi's Leadership