79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शेतकऱ्यांना अवलंबनाकडून स्वावलंबनाकडे सुरू असलेल्या राष्ट्राच्या वाटचालीचा कणा संबोधून भावनिक आदरांजली वाहिली. वसाहतवादी राजवटीने देशाला दारिद्र्यात ढकलले होते, परंतु शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताची धान्यकोठारे भरली आणि राष्ट्राचे अन्न सार्वभौमत्व सुरक्षित झाले, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांप्रती मनःपूर्वक कृतज्ञतेसह भारतीय कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठीचा सुस्पष्ट आराखडा यांचा समन्वय दिसून आला.
शेतकरी – भारताच्या समृद्धीचा कणा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची वाढती अर्थव्यवस्था शेतकरी, पशुपालक आणि मत्स्यव्यवसायिकांना थेट लाभ देत आहे. आज भारताचे स्थान:
- दूध, डाळी आणि ताग उत्पादनात जागतिक स्तरावर क्रमांक. 1, तर
- तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाज्या उत्पादनात क्रमांक. 2 आहे.
कृषी निर्यातीने आता ₹4 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वाधिक मागास 100 शेतीप्रधान जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जाहीर केली.
स्वतःच्या वचनबद्धतेची पुनरुक्ती करत ते म्हणाले: “शेतकरी, मत्स्यव्यवसायिक आणि पशुपालकांसाठी मोदी नेहमीच संरक्षक भिंत म्हणून उभे राहतील.”
सिंधू जल करार – भारताच्या हितांना प्राधान्य
सिंधू जल कराराला अन्यायकारक संबोधून पंतप्रधान मोदी म्हणाले की, विद्यमान स्वरूपात हा करार भारतातील शेतकऱ्यांची हानी करतो. भारत यापुढे अशा एकतर्फी व्यवस्थेचा स्वीकार करणार नाही आणि स्वतःच्या शेतजमिनी व जनतेसाठी हक्काच्या पाण्याचा हिस्सा मिळवेल.
कृषी स्वावलंबन – खते आणि इतर साहित्य
पंतप्रधान मोदी यांनी अन्नसुरक्षा आयातीवर अवलंबून ठेवता येणार नाही, हे अधोरेखित केले. खत आणि इतर महत्त्वाच्या साहित्याचे देशांतर्गत उत्पादन करण्याची तातडीची गरज व्यक्त करत ते म्हणाले की, यामुळे भारतीय शेतकरी सक्षम होतील आणि कृषी क्षेत्र स्वतंत्रपणे भरभराटीला येईल. हे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या आर्थिक सार्वभौमत्वाला बळकटी देण्यासाठीही आवश्यक आहे.
आपल्या योजनांमुळे अधिक आत्मविश्वासपूर्ण शेतकरी
पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या सामर्थ्याची प्रशंसा करताना नमूद केले की, छोटे शेतकरी, पशुपालक किंवा मत्स्यव्यवसायिक असोत, सर्वांना विविध विकास योजनांचा लाभ मिळत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी, पर्जन्यजल संधारण, सिंचन प्रकल्प, दर्जेदार बियाणे वाटप आणि वेळेवर खत पुरवठा यांसारख्या उपक्रमांनी देशभरातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
शेतकऱ्यांसाठी संरक्षक भिंत
पंतप्रधानांनी या भागाचे समापन राष्ट्रभरात प्रतिध्वनित होणाऱ्या प्रतिज्ञेने केले. ते म्हणाले:
“भारत के किसानों, मछुआरों और पशुपालकों से जुड़ी किसी भी अहितकारी नीति के आगे मोदी दीवार बनकर खड़ा है. भारत अपने किसानों के हितों से कोई समझौता नहीं करेगा.”



