कोची-लक्षद्वीप बेटादरम्यान समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिकल फायबर जोडणीचे देखील केले उद्‌घाटन
कदमत येथील लोक टेम्परेचर थर्मल डिसेलिनेशन (LTTD) प्रकल्प केला राष्ट्राला समर्पित
आगत्ती आणि मिनिकॉय बेटांवरील सर्व घरांमध्ये कार्यशील घरगुती नळ जोडणीचे (FHTC) पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
कवरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे केले लोकार्पण
प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा आणि पाच प्रारुप अंगणवाडी केंद्रांच्या नूतनीकरणाची केली पायाभरणी
"लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्र जरी लहान असले तरी येथील रहिवाशांची हृदये मात्र समुद्रासारखी गहन आहेत"
"आमच्या सरकारने दुर्गम, सीमा भाग, किनारपट्टी आणि बेट या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे"
“सर्व सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे”
"स्थानिक माशांच्या जातींमध्ये असलेल्या निर्यात गुणवत्तेच्या अपार शक्यता स्थानिक मच्छिमारांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवू शकतात"
"लक्षद्वीपच्या सौंदर्याच्या तुलनेत जगातील इतर पर्यटनस्थळे फिकी आहेत"
"विकसित भारताच्या निर्मितीमध्ये लक्षद्वीप महत्वपूर्ण भूमिका बजावेल"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी केली तर काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज पायाभरणी, उद्घाटन, राष्ट्रार्पण झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञान, ऊर्जा, जलस्रोत, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.  पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉप योजनेंतर्गत लॅपटॉप दिले तर बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकरी आणि मच्छिमार लाभार्थ्यांना पीएम किसान क्रेडिट कार्डे देखील प्रदान केली.

 

लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दांमध्ये वर्णन न करता येण्याजोगे असल्याचे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधानांनी स्थानिक नागरिकांची भेटण्यासाठी आपण अगट्टी, बंगाराम आणि कवरत्ती या शहरांना भेट दिल्याचा उल्लेख केला.  "लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्र जरी लहान असले तरी येथील रहिवाशांची हृदये मात्र समुद्रासारखी गहन आहेत", अशा शब्दात भारावून गेलेल्या पंतप्रधानांनी स्थानिकांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.

पंतप्रधानांनी दुर्गम, सीमा भाग किंवा किनारी आणि बेट क्षेत्राकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले असल्याचे सांगितले. "आमच्या सरकारने अशा क्षेत्रांना आमचे सर्वोच्च प्राधान्य दिले आहे", असे ते म्हणाले. पायाभूत सुविधा, संपर्क सुविधा, पाणी, आरोग्य आणि बाल संगोपनाशी संबंधित प्रकल्पांसाठी त्यांनी या परिसरातील जनतेचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण), प्रत्येक लाभार्थ्याला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणे, पीएम किसान क्रेडिट कार्ड आणि आयुष्मान कार्डचे वितरण तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्य आणि तंदुरुस्ती केंद्र विकासाची माहिती दिली. “केंद्र सरकार सर्व सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.  थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम वितरित करतानाच्या पारदर्शकतेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. जे कोणी जनतेचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करतील त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी लक्षद्वीपमधील जनतेला दिले.

 

2020 मध्ये 1000 दिवसांच्या आत जलद इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आपण दिलेल्या हमीची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. कोची ते लक्षद्वीप बेटादरम्यान समुद्राखालून जाणारा ऑप्टिकल फायबर जोडणी (KLI - SOFC) प्रकल्प आज लोकांना समर्पित करण्यात आला आहे. या जोडणी प्रकल्पामुळे लक्षद्वीपच्या लोकांना 100 पट वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे सरकारी सेवा, वैद्यकीय उपचार, शिक्षण तसेच डिजिटल बँकिंगसारख्या सुविधांमध्ये सुधारणा होईल.  लक्षद्वीपला लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याच्या क्षमतेलाही यातून बळ मिळेल, असेही ते म्हणाले.  कडमत येथील लो टेम्परेचर थर्मल डिसॅलिनेशन (LTTD) प्रकल्पाचा (समुद्राच्या पाण्याचा खारेपणा कमी करणारा प्रकल्प) संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की लक्षद्वीपमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

लक्षद्वीपमध्ये आल्यावर पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ अली माणिकफान यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल बोलले आणि लक्षद्वीप द्वीपसमूहाच्या संवर्धनासाठी अली माणिकफान यांनी केलेले संशोधन आणि त्यांच्या नवकल्पना ठळकपणे मांडल्या.  विद्यमान सरकारने 2021 मध्ये अली माणिकफान यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी प्रचंड समाधान व्यक्त केले. आज विद्यार्थ्यांना सायकली आणि लॅपटॉप वाटप केल्याचे सांगत लक्षद्वीपमधील तरुणांच्या नवकल्पना आणि शिक्षणासाठी केंद्र सरकार मार्ग मोकळा करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  मागच्या काळात लक्षद्वीपमध्ये कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेच्या अभावाकडे लक्ष वेधत याच कारणामुळे स्थानिक तरुणांनी या बेटांवरून स्थलांतरित होणे पसंत केले असे पंतप्रधानांनी सांगितले. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था उघडण्याच्या दिशेने उचललेल्या पावलांची माहिती देताना पंतप्रधानांनी ॲन्ड्रॉट आणि कदमत बेटांवर कला आणि विज्ञानासाठी शैक्षणिक संस्था तसेच मिनीकॉयमधील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या स्थापनेचा उल्लेख केला.  " या संस्थांचा लक्षद्वीपच्या तरुणांना मोठा फायदा होत आहे," असे ते पुढे म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हज यात्रींसाठी उचललेल्या पावलांचा उल्लेख केला. या सुधारणांमुळे लक्षद्वीपच्या लोकांनाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.  हज व्हिसासाठी सुलभता आणि व्हिसाची प्रक्रिया डिजिटल करणे तसेच महिलांना ‘मेहरम’शिवाय हजला जाण्याची परवानगी या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्नांमुळे ‘उमराह’साठी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

जपानला स्थानिक टूना माशांची निर्यात होत असल्याने लक्षद्वीपसाठी फायदेशीर ठरणाऱ्या जागतिक सीफूड बाजारामध्ये भारताचा वाटा वाढवण्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  मच्छीमारांचे जीवन बदलू शकणार्‍या दर्जेदार स्थानिक माशांच्या निर्यातीच्या शक्यता पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. तसेच त्यांनी समुद्री शैवाल शेतीच्या क्षमतेच्या शोधाची माहिती दिली.  या परिसराच्या नाजूक पर्यावरणाच्या संरक्षणावर पंतप्रधानांनी भर दिला, आणि कवरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्प, जो लक्षद्वीपचा पहिला बॅटरी-समर्थित सौर ऊर्जा प्रकल्प आहे, अशा उपक्रमांचा एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात लक्षद्वीपची भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी केंद्रशासित प्रदेशाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थापित सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. येथे नुकत्याच संपन्न झालेल्या  जी 20 बैठकीचा संदर्भ देत लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय ओळख आणि मान्यता मिळाली आहे, असे  पंतप्रधानांनी सांगितले. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत लक्षद्वीपसाठी गंतव्यस्थान-विशिष्ट प्रारुप आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. लक्षद्वीप हे दोन निळ्या-ध्वजाच्या(जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे) समुद्र किनाऱ्यांचे राज्य आहे, असे सांगत त्यांनी कदमत आणि सुहेली बेटांवरील वॉटर व्हिला प्रकल्पांच्या विकासाचा उल्लेख केला.  “लक्षद्वीप हे क्रूझ पर्यटनाचे प्रमुख ठिकाण बनत चालले आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले. कारण लक्षद्वीपमध्ये पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत पर्यटकांचा ओघ पाचपटीने वाढला आहे.  पर्यटनासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक भारतीय नागरिकांने देशातील किमान पंधरा ठिकाणांना भेट देण्याच्या आपल्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  परदेशातील बेट राष्ट्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.  “एकदा तुम्ही लक्षद्वीपच्या सौंदर्याचे साक्षीदार झालात की, जगातील इतर ठिकाणे फिकी वाटू लागतील”, असे पंतप्रधान म्हणाले.

लक्षद्वीपमधील जनतेचे राहणीमान सुधारण्यासाठी, प्रवास सुकर करण्यासाठी तसेच व्यवसाय सुलभीकरणासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व पावले उचलत राहील, असे आश्वासन पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या लोकांना दिले .  "विकसित भारताच्या निर्मितीमध्ये लक्षद्वीप एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

लक्षद्वीपचे नायब राज्यपाल प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमात उपस्थित होते.

पार्श्वभूमी

एका परिवर्तनीय वाटचालीतील महत्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी कोची ते लक्षद्वीप द्वीपसमूहादरम्यान समुद्राखालून जाणारा ऑप्टिकल फायबर जोडणी (KLI - SOFC) प्रकल्प सुरू करून लक्षद्वीपमधील मंद गतीच्या इंटरनेटच्या आव्हानावर मात करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची  घोषणा 2020 मध्ये लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या पंतप्रधानांच्या भाषणात करण्यात आली होती.  हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.  या प्रकल्पामुळे इंटरनेटचा वेग 100 पटीने वाढेल (1.7 जीबीपीएस ते 200 जीबीपीएस).  स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीप समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडले जाणार आहे. हा समर्पित ऑप्टिकल फायबर जोडणी प्रकल्प लक्षद्वीप बेटांमधील दळणवळण पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणेल. यासोबतच जलद आणि अधिक विश्वासार्ह इंटरनेट सेवा, टेलिमेडिसिन, ई-प्रशासन, शैक्षणिक उपक्रम, डिजिटल बँकिंग, डिजिटल चलन वापर, डिजिटल साक्षरता इत्यादी सेवा कार्यान्वित होतील.

 

पंतप्रधानांनी कदमत येथे लो टेम्परेचर थर्मल डिसेलिनेशन (LTTD) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.  यातून दररोज 1.5 लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती होईल.  पंतप्रधानांनी अगाट्टी आणि मिनिकॉय बेटांच्या सर्व घरांमध्ये कार्यशील घरगुती नळजोडणी  (FHTC) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.  लक्षद्वीपच्या बेटांवर पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता हे नेहमीच आव्हान होते कारण प्रवाळ बेट असल्याने येथे भूजलाची उपलब्धता नेहमीच कमी आहे.  या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांमुळे या बेटांची पर्यटन क्षमता बळकट होण्यास मदत होईल, आणि त्यातून स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील.

राष्ट्राला समर्पित केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये कवरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे.  हा लक्षद्वीपचा पहिला बॅटरी-समर्थित सौर ऊर्जा प्रकल्प आहे.  हा प्रकल्प डिझेल-आधारित उर्जा निर्मिती प्रकल्प, नवीन प्रशासकीय ब्लॉक आणि कवरत्ती येथील इंडिया रिझर्व्ह बटालियन (IRBn) कॉम्प्लेक्समधील 80 पुरुष बॅरेकवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करेल.

 

कालपेनी येथील प्राथमिक आरोग्य सेवा सुविधेचे नूतनीकरण आणि आंद्रोथ, चेतलाट, कदमत, अगत्ती आणि मिनिकॉय या पाच बेटांवर पाच प्रारुप अंगणवाडी केंद्र (नंद घर) बांधण्याच्या कामाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s PC exports double in a year, US among top buyers

Media Coverage

India’s PC exports double in a year, US among top buyers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Congratulates India’s Men’s Junior Hockey Team on Bronze Medal at FIH Hockey Men’s Junior World Cup 2025
December 11, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi, today congratulated India’s Men’s Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior World Cup 2025.

The Prime Minister lauded the young and spirited team for securing India’s first‑ever Bronze medal at this prestigious global tournament. He noted that this remarkable achievement reflects the talent, determination and resilience of India’s youth.

In a post on X, Shri Modi wrote:

“Congratulations to our Men's Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior World Cup 2025! Our young and spirited team has secured India’s first-ever Bronze medal at this prestigious tournament. This incredible achievement inspires countless youngsters across the nation.”