वक्फ सुधारणा कायदा आणून दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले
वक्फच्या दाव्यांमुळे यापूर्वी आपल्या समाजाने केलेला संघर्ष विषद करून, पंतप्रधानांनी हा कायदा केवळ अल्पसंख्याकांसाठीच नव्हे, तर अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्य समुदायासाठी आणल्याचे प्रतिनिधी मंडळाने सांगितले
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समावेशकतेची भावना जाणवत असल्याची प्रशंसा करून त्यांच्या सबका साथ सबका विकास या दृष्टीकोनावरील आपला विश्वास आणखी दृढ झाल्याचे दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाचे गौरवोद्गार
हा कायदा आणण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, महिला, विशेषत: विधवा महिलांना या प्रचलित व्यवस्थेची सर्वाधिक झळ बसत होती: पंतप्रधान
पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाबरोबरच्या आपल्या घनिष्ट संबंधांबद्दल बोलताना वक्फ सुधारणा कायदा आणण्यासाठी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दिलेल्या योगदानाची केली प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधला. 

 

या प्रतिनिधीमंडळात दाऊदी बोहरा समुदायातील उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. आपला संघर्ष विषद करताना, त्यांनी आपल्या समुदायातील सदस्यांच्या मालकीच्या मालमत्तांवर वक्फने चुकीच्या पद्धतीने कसा दावा केला, ते सांगितले. वक्फ सुधारणा कायदा आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि ही मागणी दीर्घ काळापासून प्रलंबित होती, असे सांगितले.

 

दाऊदी बोहरा समाजाबरोबर पंतप्रधानांचे असलेले जुने घनिष्ट संबंध आणि त्यांनी केलेल्या सकारात्मक कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. या कायद्याचा त्यांच्या समाजाला कसा लाभ मिळेल, याविषयी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांनी हा कायदा केवळ अल्पसंख्याकांसाठीच नव्हे, तर अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्य समुदायासाठी आणला आहे. भारताने नेहमीच आपल्या समुदायाला स्वतःची ओळख मिळवायला प्रोत्साहन दिल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना समावेशकतेची भावना जाणवते.

वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाविषयी चर्चा करताना या प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी भारताला विकसित करण्याच्या वाटचालीत कटिबद्धता आणि सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पंतप्रधानांच्या ‘खरा विकास लोक-केंद्री असला पाहिजे’ या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेतृत्वाची देखील त्यांनी प्रशंसा केली. आत्मनिर्भर भारत, एमएसएमई उद्योगांना पाठबळ इत्यादींसारख्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा करत ते म्हणाले की हे उपक्रम विशेषतः लहान व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. महिला शक्तीला सक्षम करण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि अशाच इतर उपक्रमांसारख्या सरकारने उचललेल्या पावलांचे देखील त्यांनी कौतुक केले.

 

यावेळी बोलताना वक्फ सुधारणा कायदा आणण्यासाठी गेली अनेक वर्षे केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. वक्फ मुळे लोकांपुढे उभ्या राहिलेल्या समस्यांविषयी त्यांनी सांगितले आणि ते म्हणाले की विद्यमान यंत्रणेमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागणाऱ्या महिला, विशेषतः विधवा हा कायदा करण्यातील सर्वात महत्त्वाची प्रेरणा ठरल्या.

 

पंतप्रधानांनी यावेळी दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी असलेल्या घट्ट नात्याची आठवण केली. या समुदायातर्फे केले जाणारे समाज कल्याण कार्य आपण गेली अनेक वर्षे बघत आलो आहोत असे सांगून त्यांनी हे कार्य करण्याच्या समुदायाच्या परंपरेची प्रशंसा केली. वक्फ सुधारणा कायदा आणण्यात या समुदायाच्या विशेष योगदानाचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की जेव्हा हा कायदा करण्यासाठीचे कार्य हाती घेण्यात आले तेव्हा ज्या मोजक्या लोकांशी त्यांनी याबद्दल पहिल्यांदा चर्चा केली त्यात सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचा समावेश होता आणि त्यांनी या कायद्याच्या विविध बारकाव्यांवर केलेली तपशीलवार टिप्पणी अत्यंत महत्त्वाची होती.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x

Media Coverage

India’s data centre boom: Mumbai cracks global top 15, Hyderabad pipeline set to surge 15x
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.