पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.

या शिखर परिषदेला दोन्ही देशांतील 50 हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॉर्वेजियन तसेच भारतीय व्यावसायिक आणि संशोधन समुदायातील 250 हून अधिक जण उपस्थित होते. भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) लागू झाल्यानंतर, द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला मिळालेली वाढती गती या शिखर परिषदेतून अधोरेखित झाली.
या उच्चस्तरीय व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेपूर्वी, ओस्लोमधील विविध ठिकाणी चार गोलमेज बैठकांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रातील नवोन्मेष, सागरी सहकार्य, बॅटरी आणि ऊर्जा साठवणूक प्रणाली, डिजिटलायझेशन आणि विद्युतीकरण, तसेच पवन ऊर्जा या विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.

आपल्या संबोधनात, पंतप्रधान मोदी यांनी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार 'टीईपीए' लागू झाल्यानंतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीत झालेल्या वाढीची प्रशंसा केली. दोन्ही बाजूंच्या हितधारकांनी टीईपीए अंतर्गत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि त्याच्या माध्यमातून भारतात 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. भारताचा वेगवान आर्थिक विकास, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी तरुण, भक्कम व्यावसायिक पद्धती, गुंतवणूकदार-स्नेही नियामक चौकट आणि स्पर्धात्मक संघवादाची भावना या गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या. त्यांनी नील अर्थव्यवस्था, जहाजबांधणी, हरित संक्रमण, नवीकरणीय ऊर्जा, हेल्थ-टेक, महत्त्वपूर्ण खनिजे आणि स्टार्टअप्स यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर नॉर्वेजियन गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले.

पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विविध क्षेत्रातील विस्तार, वाढती ऊर्जेची मागणी, हवामान विषयक वचनबद्धता आणि अक्षय ऊर्जा, ग्रिड पायाभूत सुविधा, ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील जलद विस्ताराचा समावेश असलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी हरित संक्रमण जाहीरनाम्यावर देखील भर दिला. स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक, सागरी कार्बनमुक्तीकरण, महासागर शाश्वतता आणि हवामान वित्तपुरवठा या क्षेत्रांतील नॉर्वेच्या जागतिक नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही देशांच्या व्यावसायिक समुदायांनी नवीन भागीदारी करावी, सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधावीत आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
या शिखर परिषदेदरम्यान भारतीय आणि नॉर्वेच्या कंपन्या आणि संस्थांमध्ये अनेक व्यावसायिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Click here to read full text speech


