भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण
"आपल्या नौदलातील जवानांच्या समर्पणाला भारत वंदन करतो"
“सशस्त्र दलांमध्ये आपल्या नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”
"भारताकडे विजय, शौर्य, ज्ञान, विज्ञान, कौशल्य आणि आपल्या नौदल सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास आहे"
कोणत्याही बलाढ्य जागतिक महासत्तेकडे भक्कम नौदलाची गरज; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार नौदलाची क्षमता वाढवून आवश्यक संसाधने पुरवत आहे: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
‘जहाज खरेदीदार’ भूमिकेतून ‘जहाज बांधणी’ करणारे आपण म्हणजे; किनारी नौदलातून महासागरी नौदलात परिवर्तन
मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.
.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.
हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल” असे ते म्हणाले.
नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक  प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले.  मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची  पाहणी केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग  हा भव्य किल्ला ,  वीर शिवाजी महाराजांचे वैभव  आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि  4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे  भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले  आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या  शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर  नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो” असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या  दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी  नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत  पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे  नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून  पुढे मार्गक्रमण करत  आहे असे पंतप्रधान म्हणाले.  नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील  कारण हे नवीन मानचिन्ह  नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते  याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली.  आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार  आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

 

140 कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत  आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती  साध्य करण्यासाठी झटत आहे असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्प, भावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे.  नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून  प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल” असे ते म्हणाले.

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले की, हा इतिहास केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून, त्यामध्ये भारताचे विजय, धैर्य, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि सृजनशीलता, कौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीच, अशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदर, आणि सुरत येथील 80 पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होता, त्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होता, त्याने  समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असताना, आपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमी, अर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी 'सागरमाला' प्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत 'मेरिटाइम व्हिजन', अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत, त्यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सध्याच्या काळाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "हा भारताच्या इतिहासाचा असा काळ आहे, जो केवळ 5-10 वर्षांचा नव्हे, तर येणाऱ्या अनेक शतकांचे भविष्य लिहिणार आहे." ते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्थानावरून झेप घेत, तो पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे, आणि तिसर्‍या स्थानाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. “जग भारताचा ‘विश्व मित्र (जगाचा मित्र)’ म्हणून उदय होताना पाहत आहे,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, इंडिया मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर सारख्या उपायांमुळे हरवलेला मसाल्याचा मार्ग पुन्हा निर्माण होईल. त्यांनी मेड इन इंडियाचे सामर्थ्य स्पष्ट करताना,  तेजस, किसान ड्रोन, यूपीआय प्रणाली आणि चांद्रयान-3 यांचा उल्लेख केला. परिवहन विमाने, विमानवाहू जहाज INS विक्रांतच्या उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता देखील दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

 

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातील गावांना, देशातील शेवटचे गाव, असे संबोधण्या ऐवजी, ‘देशातील पहिले गाव’ समजण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना  मोदी म्हणाले, "आज, किनारपट्टी भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे." 2019 मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची निर्मिती आणि या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून, 2014 नंतर मत्स्य उत्पादनात 8 टक्के आणि निर्यातीत 110 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय, शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण 2 लाखावरून वरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळीच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सागरमाला योजना किनारपट्टी भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) मजबूत करत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत असून त्यामुळे किनारपट्टी भागात नवे व्यापार आणि उद्योग सुरु होतील. मत्स्य प्रक्रियेशी संबंधित उद्योग आणि मासेमारी नौकांचे आधुनिकीकरणही हाती घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. या राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन, चिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवण, आचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

“वारसा आणि  विकास, हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

 

संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी दिल्लीबाहेर लष्कर दिन, नौदल दिन इत्यादीसारखे सशस्त्र सेना दिन आयोजित करण्याच्या नवीन परंपरेबद्दल सांगितले कारण यामुळे या सोहोळ्याची व्याप्ती भारतभर वाढते आणि नवीन ठिकाणे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरतात.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हा विशेषाधिकाराचा क्षण असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी उद्धृत केले. "छत्रपती शिवरायांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातील संधींचा अंदाज बांधणारे ते राजकारणी होते. त्यांनी नौदलाची प्रासंगिकता ओळखली आणि भारताच्या समृद्ध नौदल परंपरेत एक नवीन अध्याय जोडला. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाच्या अनुषंगाने, नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला, ज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.”

छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत, याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही बलाढ्य जागतिक महासत्तेकडे मजबूत नौदल असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला; त्यामुळे नेत्याने नौदलाची क्षमता वाढवणे आणि त्यांना स्वराज्य बळकट करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे, हे राजकीय मुत्सद्दीपणा दर्शवते.

एक दशकापूर्वीपर्यंत नौदलाला महत्त्व दिले जात नव्हते आणि असे मानले जात होते की देशाला फक्त जमिनीवरच धोका आहे. पण, पंतप्रधान मोदींनी या मर्यादित विचारसरणीच्या पलीकडे जाऊन सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांवर सारखेच लक्ष केंद्रित केले असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

'आत्मनिर्भरता' साध्य करण्यासाठी नौदलात केलेल्या प्रगतीवर संरक्षण मंत्र्यांनी प्रकाश टाकला आणि सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण झालेल्या देशातील पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतचा विशेष उल्लेख केला. पूर्वी नौदलाची बरीचशी उपकरणे आयात केली जायची पण आज आपण 'बायर नेव्ही' मधून 'बिल्डर नेव्ही' म्हणजे ‘जहाज खरेदीदार’ भूमिकेतून ‘जहाज बांधणी’ करणारे झालो आहोत. आज आपण कोस्टल नेव्ही ते ब्लू वॉटर नेव्हीमध्ये म्हणजेच किनारी नौदलातून महासागरी नौदलात परिवर्तन करत आहोत. हे परिवर्तन खरोखरच आपल्या पंतप्रधानांचे दूरदर्शी नेतृत्व दर्शवते,” ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9-10 वर्षात केलेली अभूतपूर्व प्रगती आणि यशाचा देश साक्षीदार आहे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. सीमेला लागून असलेल्या गावांना एकेकाळी भारतातील शेवटची गावे म्हटले जायचे, पण आज पुढच्या पिढीचा पायाभूत सुविधांचा विकास दूरवरच्या भागात होत असून, ही गावे देशातील पहिली गावे बनली आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ प्रयत्न केले जात नाहीत, तर आज सशस्त्र दलापासून संसदेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्या देशाच्या विकासात समान भागीदार आहेत, असेही ते म्हणाले.भारतीय नौदलाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान 'ऑपरेशन ट्रायडेंट'मधील कामगिरीचे स्मरण करण्यासाठी भारतीय नौदल दरवर्षी 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्रातील मालवण जिल्ह्यातील सिंधुदुर्ग तालुक्यातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर, यंदा प्रथमच कोणत्याही मोठ्या नौदल तळाच्या बाहेर नौदल दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याची पार्श्वभूमी होती, भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा गौरव करणारे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये बांधलेला सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 43 फूट उंचीच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. भारतीय नौदलाने या पुतळ्याची संकल्पना मांडली होती, आणि त्याला महाराष्ट्र शासनाचे अर्थसहाय्य लाभले.

त्यानंतर पंतप्रधानांनी तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या नौदलाच्या प्रात्यक्षिकांचे निरीक्षण केले. या कार्यक्रमाचे आयोजन नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी केले होते आणि व्हाईस अॅडमिरल फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड दिनेश के त्रिपाठी यांनी त्याचे संचालन केले.

या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने, हेलिकॉप्टर आणि विशेष दलांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात 15 हून अधिक मोठ्या आणि लहान युद्धनौकांचा (बहुतेक सर्व स्वदेशी) आणि त्याच बरोबर मिग (एमआयजी) 29 के, स्वदेशी एलसीए नेव्ही आणि अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेले मल्टी-मिशन हेलिकॉप्टर एमएच 60 आर यांच्या सह 40 हून अधिक विमानांनी भाग घेतला. इतर प्रमुख आकर्षणांमध्ये नौदल बँडचे सादरीकरण, नौदलाच्या तुकडीद्वारे कंटिन्युटी ड्रिल आणि सी कॅडेट कॉर्प्सच्या कॅडेट्सचे हॉर्नपाइप नृत्य यांचा समावेश होता. या भव्य कार्यक्रमाचा समारोप बंदरात नांगरलेल्या जहाजांवरील पारंपारिक रोषणाईने झाला, त्यानंतर लेझर शो आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर रोषणाई करण्यात आली.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील या भव्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तसेच सशस्त्र दलातील, परराष्ट्र सेवेशी संलग्न, केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मान्यवर तसेच स्थानिक नागरिकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे, नागरिकांमध्ये सागरी चेतना जागृत करणे आणि देशाची सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीमधील नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकणे, हे नौदल दिन साजरा करण्या मागचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha

Media Coverage

Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses delight as Sarnath is inscribed on the UNESCO World Heritage List
July 25, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today expressed that it is a proud moment for every Indian, sharing his delight that Sarnath in Uttar Pradesh has been inscribed on the UNESCO World Heritage List.

He noted that Sarnath has a close association with Lord Buddha, whose timeless message of wisdom, compassion and harmony inspires the world.

Shri Modi highlighted that this recognition celebrates India’s profound civilisational and spiritual heritage. The Prime Minister observed that it will also inspire more people across the world to come to Sarnath and connect with the ideals of Lord Buddha.

In a post on X, the Prime Minister shared:

 "A proud moment for every Indian!

Delighted that Sarnath in Uttar Pradesh has been inscribed on the UNESCO World Heritage List.

Sarnath has a close association with Lord Buddha, whose timeless message of wisdom, compassion and harmony inspires the world.

This recognition celebrates India’s profound civilisational and spiritual heritage. It will also inspire more people across the world to come to Sarnath and connect with the ideals of Lord Buddha.

@UNESCO"