एनसीसीने भारतातील युवकांना राष्ट्र उभारणीसाठी सातत्याने प्रेरित केले आहे: पंतप्रधान
भारताचे युवक हे जागतिक कल्याणासाठी एक शक्ती आहेत: पंतप्रधान
भारतात युवकांना भेडसावणारे अनेक अडथळे दूर करण्यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही काम केले आहे, यामुळे भारतातील युवकांची क्षमता वाढली आहे: पंतप्रधान
या अमृत काळात आपल्याला एकच ध्येय लक्षात ठेवायचे आहे - विकसित भारत, आपल्या प्रत्येक निर्णयाचा, आपल्या प्रत्येक कृतीचा निकष विकसित भारत असायला हवा: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वार्षिक मेळाव्याला संबोधित केले.  सांस्कृतिक कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहिले तसेच त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार प्रदान करण्यात आले.  एनसीसी दिनानिमित्त उपस्थितांना  शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, 18 मित्र देशांमधील  सुमारे 150 छात्रसैनिक इथे असून  त्यांचे मी स्वागत करतो. मेरा युवा भारत (माय भारत) पोर्टलच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी  झालेल्या भारतातील युवकांचे  त्यांनी अभिनंदन केले. 

“प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड होणे ही एक मोठी कामगिरी  आहे,” असे पंतप्रधान छात्रसैनिकांना  संबोधित करताना म्हणाले. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास होता कारण भारताने प्रजासत्ताक म्हणून 75  वर्षे पूर्ण केली असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील  आणि  या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनल्याचा छात्रसैनिकांना अभिमान वाटेल.  पुरस्कार विजेत्या छात्रसैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले. आज एनसीसीच्या अनेक मोहिमांचा प्रारंभ करण्याची संधी मिळाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, अशा मोहिमा भारताचा वारसा युवकांच्या आकांक्षांशी जोडतात. मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व छात्रसैनिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

भारताला  स्वातंत्र्य मिळाले त्या काळाच्या आसपासच एनसीसीची स्थापना झाली होती असे मोदींनी नमूद केले. देशाच्या राज्यघटनेपूर्वीच एनसीसीचा प्रवास सुरू झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोदी म्हणाले की, प्रजासत्ताकच्या 75 वर्षांच्या काळात ,राज्यघटनेने लोकशाहीला प्रेरित केले आणि नागरी कर्तव्यांचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे एनसीसीने भारतातील युवकांना  राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले आहे आणि त्यांना शिस्तीचे महत्त्व शिकवले आहे. मागील काही वर्षांमध्ये एनसीसीची व्याप्ती आणि जबाबदाऱ्यांचा विस्तार करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. एनसीसीचा विस्तार सीमावर्ती भागात आणि किनारपट्टीलगत  जिल्ह्यांमध्ये करण्यात आला असून  170 हून अधिक सीमावर्ती  तालुके आणि सुमारे  100 किनारी तालुक्यांमध्ये  आता एनसीसीचे अस्तित्व आहे असे त्यांनी नमूद केले  . या जिल्ह्यांमधील युवा एनसीसी कॅडेट्सना विशेष प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल तिन्ही सशस्त्र दलांचे  मोदी यांनी  अभिनंदन केले. या उपक्रमाचा सीमावर्ती  भागात राहणाऱ्या हजारो युवकांना  फायदा झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एनसीसीमधील सुधारणांचा परिणाम  कॅडेट्सच्या वाढलेल्या संख्येत स्पष्टपणे दिसून आल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की 2014 मध्ये अंदाजे 14 लाख एनसीसी कॅडेट्स  होते आणि आज ही संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे आणि यात 8 लाखांहून अधिक मुली आहेत. आपत्ती व्यवस्थापनात एनसीसी कॅडेट्स  महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून क्रीडा विश्वातही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवक संघटना आहे याबद्दल  त्यांनी अभिमान व्यक्त केला.

 

21 व्या शतकात भारताचे युवक हे  देशाच्या आणि जगाच्या विकासाची दिशा ठरवतील असे पंतप्रधानांनी नमूद केले.   "भारतीय युवक  केवळ भारताच्या विकासात योगदान देत नाहीत तर ते जागतिक कल्याणासाठी देखील एक शक्ती आहेत" यावर त्यांनी भर दिला.  गेल्या दशकात भारतीय युवकांनी  1.5 लाख स्टार्टअप्स आणि 100 हून अधिक युनिकॉर्न तयार केल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका अहवालाचा दाखला देत पंतप्रधानांनी नमूद केले की, 200 हून अधिक प्रमुख  जागतिक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे लोक करत असून जागतिक जीडीपीमध्ये अब्जावधींचे योगदान देत आहेत आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यात मदत करत आहेत.पंतप्रधान मोदी यांनी यावर भर दिला की भारतीय शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षक जागतिक प्रगतीला गती देत आहेत. त्यांनी सांगितले की,  कोणत्याही क्षेत्रात, भारतातील तरुणांच्या प्रतिभेशिवाय आणि सामर्थ्याशिवाय जगाच्या भविष्याची कल्पना करणे कठीण आहे आणि म्हणूनच ते त्यांना 'जागतिक कल्याणासाठी शक्ती' म्हणून संबोधतात.

अनावश्यक अडथळे दूर केले की, एखाद्या व्यक्तीची किंवा देशाची ताकद वाढते असे  अधोरेखित करून, गेल्या 10  वर्षांत  भारतातील तरुणांसमोरील अनेक अडथळे दूर झाले आहेत, ज्यामुळे तरुण आणि राष्ट्र दोघांचीही क्षमता वाढली आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.  त्यांनी  पुढे नमूद केले की, 2014  मध्ये, जे  तरुण सुमारे 10 – 12 वर्षांचे होते,  त्यांनी  आपल्या  कुटुंबियांना त्यावेळी कशी परिस्थिती होती, याबद्दल विचारले पाहिजे. यावेळी  पंतप्रधानांनी दस्तऐवजांच्या स्व-प्रमाणीकरणाचे उदाहरण दिले.   आधी कुठेही  प्रवेश घेणे,  परीक्षा आणि भरतीसाठी कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्याकडून प्रमाणित करावी लागत होती.  असे प्रमाणीकरण करून घेताना सर्वांना  खूप  त्रास होत होता. आता ही समस्या सोडवली असल्याचे अधोरेखित करून, सरकारने  कागदपत्रांचे स्व-प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आणि ती प्राप्त करताना तरुणांना येणाऱ्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.  शिष्यवृत्ती निधीच्या वितरणात अनेक अडचणी येत होत्या. एकल-खिडकी प्रणाली सुरू केल्यामुळे याआधी येत असलेल्या समस्या दूर झाल्या आहेत,  यावर त्यांनी भर दिला. विषय निवडीशी संबंधित आणखी एक प्रमुख मुद्दा मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी बोर्ड परीक्षेनंतर विषय निवडल्यानंतर तो बदलणे कठीण होते.  परंतु आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे त्यांच्या आवडीनुसार विषय बदलण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

दशकापूर्वी, तरुणांना बँक कर्ज सहज मिळणे कठीण होते.  कारण बँका कर्ज देण्यापूर्वी हमी मागत होते. मात्र 2014  मध्ये आपण  पंतप्रधान झाल्यानंतर  देशातील तरुणांची जबाबदारी घेण्याची हमी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने मुद्रा योजना सुरू केली. या योजनेमध्‍ये  बँक हमीशिवाय कर्ज दिले जात आहे. या योजनेचा अधिक तपशील  सांगताना पंतप्रधान म्हणाले केले की,  प्रारंभी  10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जात होते.  सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ही मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या 10  वर्षांत मुद्रा योजनेअंतर्गत 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आला आहे.  यामुळे लाखो तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

तरुणांच्या भविष्यासाठी निवडणूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधान  मोदी यांनी नमूद केले की,  दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मतदार यादीत  नाव नोंदणी करून  अनेक तरुण पहिल्यांदाच मतदार बनले. मतदार दिनाचा उद्देश मतदारांच्या सहभागाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हा होता. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की,   जगातील सर्वात मोठ्या निवडणुका घेणारा भारत देश आहे.  एका वर्षात  काही महिन्यांच्या अंतराने  वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे अनेक  आव्हाने निर्माण होतात. स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर  सुरुवातीला काही वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जात होत्या, परंतु ही पद्धत बदलण्‍यात आली. मात्र त्यामुळे  देशामध्‍ये अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या. पंतप्रधान  मोदी यांनी अधोरेखित केले की,  वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदार याद्या अद्ययावत करणे आवश्यक असते आणि त्यातही  अनेक कामे समाविष्ट असतात. यामुळे अनेकदा शिक्षकांच्या कर्तव्यांवर, अभ्यासावर आणि परीक्षेच्या तयारीवर परिणाम होतो.त्यांनी असेही म्हटले की, वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासनात अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच, देश सध्या "एक राष्ट्र, एक निवडणूक" या संकल्पनेवर चर्चा करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील तरुणांना या चर्चेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. याचे कारण म्हणजे,  त्याचा त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम होत असतो. त्यांनी नमूद केले की, अमेरिकेसारख्या देशांमध्ये नवीन सरकार स्थापनेची तारीख निश्चित केली जाते आणि दर चार वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे, ते म्हणाले की, महाविद्यालये किंवा शाळांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी पूर्ण केल्या जातात. त्यांनी तरुणांना दर महिन्याला निवडणुकांचा त्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होतो याचा विचार करण्यास आणि "एक राष्ट्र, एक निवडणूक" या चर्चेत सहभागी व्‍हावे यासाठी   प्रोत्साहन दिले.

 

एकविसाव्या शतकातील जग वेगाने बदलत आहे आणि या बदलाशी ताळमेळ राखणे अत्यावश्यक आहे अशी टिप्पणी करत पंतप्रधान मोदी यांनी या स्थित्यंतरातील युवकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर अधिक भर दिला.ते पुढे म्हणाले की कला, संशोधन अथवा नवोन्मेष अशा कोणत्याही क्षेत्रात युवा वर्गाने त्यांच्या अभिनव कल्पना आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून नवी उर्जा निर्माण करायला हवी. राजकारण हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे हे सांगण्यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला आणि युवकांना नव्या सूचना तसेच अभिनव कल्पनांसह राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित केले. ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले. देशातील एक लाख युवकांना राजकारणात येण्यासाठी लाल  किल्ल्यावरून केलेल्या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. “विकसित भारत: यंग लीडर्स डायलॉग” या कार्यक्रमादरम्यान दिसून आलेल्या युवा शक्तीची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली. विकसित भारताच्या उभारणीसाठी देशभरातील लाखो युवकांनी अनमोल सूचना केल्या असून आपापल्या संकल्पना व्यक्त केल्या आहेत याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

 

 

पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्य संग्रामादरम्यान प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात कार्यरत लोकांचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. तशाच प्रकारे या अमृत काळात विकसित भारत उभारणे हे आपले एकच लक्ष्य असले पाहिजे असे त्यांनी पुढे सांगितले. याच लक्ष्याच्या कसोटीवर प्रत्येक निर्णय आणि कृती मोजली पाहिजे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. विकसित भारताची उभारणी, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता, आपल्या वारशाचा अभिमान, भारताच्या एकात्मतेसाठी कार्य आणि प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडणे या पाच निर्धारांचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की हे पंच-निर्धार प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शन करतील आणि प्रेरित करतील. या कार्यक्रमात आधी सादर झालेल्या सांस्कृतिक सादरीकरणातून देशाची महत्त्वाची ताकद असलेल्या “एक भारत, श्रेष्ठ भारत” या प्रेरणेचे दर्शन घडले याची नोंद घेऊन पंतप्रधानांनी त्या कार्यक्रमांची प्रशंसा केली. प्रयागराज येथे सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याला “एकतेचा कुंभ” असे संबोधत हा मेळादेखील देशाच्या एकतेचे प्रतीक आहे असे त्यांनी नमूद केले. देशाच्या प्रगतीसाठी हे ऐक्य अत्यावश्यक आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

प्रत्येकाने स्वतःची कर्तव्ये नेहमीच लक्षात ठेवण्याच्या महत्त्वावर अधिक भर देत पंतप्रधानांनी सांगितले की कर्तव्यांच्या भक्कम पायावरच भव्य आणि दिव्य विकसित भारताची उभारणी होईल. छात्रांना आणि देशाच्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः लिहिलेल्या काही ओळी उद्धृत करत प्रत्येकाला उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदी यांनी भाषण संपवले.  

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह तसेच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

यावर्षी एकूण राष्ट्रीय छात्र सेनेच्या 2361 विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन शिबिरात भाग घेतला त्यापैकी 917 विद्यार्थिनी होत्या. विद्यार्थिनींचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक संख्येतील सहभाग होता. पंतप्रधान रॅलीमध्ये या विद्यार्थ्यांच्या सहभागासह नवी दिल्ली येथे महिनाभर सुरु असलेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबीर 2025 यशस्वीरित्या संपन्न झाले. ‘युवा शक्ती, विकसित भारत’ ही यावर्षीच्या एनसीसी पंतप्रधान रॅलीची संकल्पना होती.

 

आज 800 हून अधिक छात्र राष्ट्र उभारणीप्रती एनसीसीची कटिबद्धता दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. जगातील 18 मित्र देशांतील 144 युवा छात्रांनी या वर्षीच्या रॅलीमध्ये अधिक रंगत आणली.

देशभरातील मेरा युवा (एमवाय) भारत, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांतील 650 हून अधिक स्वयंसेवकांनी देखील विशेष अतिथी म्हणून एनसीसी पंतप्रधान रॅलीमध्ये भाग घेतला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From Suzuki to Volkswagen, global auto giants bet big on India as sales slow elsewhere

Media Coverage

From Suzuki to Volkswagen, global auto giants bet big on India as sales slow elsewhere
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi reaffirms resolve to harness Science & Tech for National Development and Global Good on National Science Day
February 28, 2026

The Prime Minister highlighted that, on National Science Day, we celebrate the spirit of research, innovation, and scientific curiosity that drives our nation forward.

PM Modi stated that, “This day commemorates the groundbreaking discovery of the Raman Effect by Sir CV Raman”. The Prime Minister noted that this discovery placed Indian research firmly on the global map.

The Prime Minister reaffirmed that our resolve to empower our youth, strengthen research ecosystems, and harness science and technology for national development and global good.

The Prime Minister wrote on X;

Today, on National Science Day, we celebrate the spirit of research, innovation and scientific curiosity that drives our nation forward.

This day commemorates the groundbreaking discovery of the Raman Effect by Sir CV Raman. This discovery placed Indian research firmly on the global map.

We reaffirm our resolve to empower our youth, strengthen research ecosystems and harness science and technology for national development and global good.