एनसीसीने भारतातील युवकांना राष्ट्र उभारणीसाठी सातत्याने प्रेरित केले आहे: पंतप्रधान
भारताचे युवक हे जागतिक कल्याणासाठी एक शक्ती आहेत: पंतप्रधान
भारतात युवकांना भेडसावणारे अनेक अडथळे दूर करण्यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही काम केले आहे, यामुळे भारतातील युवकांची क्षमता वाढली आहे: पंतप्रधान
या अमृत काळात आपल्याला एकच ध्येय लक्षात ठेवायचे आहे - विकसित भारत, आपल्या प्रत्येक निर्णयाचा, आपल्या प्रत्येक कृतीचा निकष विकसित भारत असायला हवा: पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंहजी, संजय सेठजी, सीडीएस जनरल अनिल चौहानजी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक, इतर अतिथीवर्ग आणि एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेतील माझ्या प्रिय मित्रांनो!

एनसीसी दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.आज इथे आपल्यासोबत 18 मित्र देशांतून आलेले सुमारे दीडशे छात्रसैनिक देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्व छात्रसैनिकांचे मी स्वागत करतो.देशभरातून मेरा युवा भारत, माय भारतच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या मित्रांचे देखील मी अभिनंदन करतो.

मित्रांनो,

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड होणे ही खरोखरीच एक मोठी कामगिरी आहे. यावर्षी भारतीय प्रजासत्ताकाला 75 वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे यावर्षीचे प्रजासत्ताक दिन संचलन आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. मित्रांनो, या आठवणी आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. भविष्यात तुम्ही नक्कीच ही आठवण काढाल की जेव्हा आपल्या प्रजासत्ताकाला 75 वर्षे पूर्ण झाली होती त्या वर्षीच्या संचालनात आपण सहभागी झालो होतो. ज्या छात्रसैनिकांना सर्वोत्तम छात्रसैनिक म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. एनसीसीच्या अनेक अभियानांची सुरुवात करून देण्याची संधी आत्ता येथे मला मिळाली. एनसीसीचे असे उपक्रम भारताच्या वारशाला युवा वर्गाच्या आकांक्षांशी जोडून घेतात. या अभियानांमध्ये सहभागी झालेल्या छात्र सैनिकांना मी शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

ज्या कालखंडात देश स्वतंत्र झाला, एनसीसीची सुरुवात देखील साधारण त्याच काळात झाली. एका अर्थी, देशाला राज्यघटना मिळण्याच्या आधीच तुमच्या या संघटनेचा प्रवास सुरु झाला. प्रजासत्ताकाच्या या 75 वर्षांच्या कालावधीत भारताच्या संविधानाने प्रत्येक वेळी देशाला लोकशाहीची प्रेरणा दिली, नागरिकांच्या कर्तव्याचे महत्त्व समजावून दिले. याच प्रकारे एनसीसीने देखील सदासर्वदा भारताच्या तरुणांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा दिली आणि त्यांना शिस्तीचे महत्त्व समजावून दिले. गेल्या काही वर्षांमध्ये एनसीसीचा आवाका आणि जबाबदारी दोन्ही वाढवण्यासाठी सरकारने बरेच काम केले आहे याचा मला आनंद आहे. आपले सीमावर्ती भागातील जे प्रदेश आहेत, समुद्राच्या किनारपट्टी प्रदेशालगत जे जिल्हे आहेत तेथे एनसीसीच्या कार्याचा विस्तार करण्यात आला आहे. आजघडीला देशातील 170 हून अधिक सीमावर्ती तालुके आणि सुमारे 100 तटवर्ती तालुक्यांमध्ये एनसीसी पोहोचली आहे. मी तिन्ही सेनादलांचे देखील अभिनंदन करतो कारण या दलांनी या जिल्ह्यांतील तरुण छात्रसैनिकांना विशेष पद्धतीने प्रशिक्षित करण्याची जबाबदारी घेतली आणि त्याचा लाभ आज सीमेवर, किनारपट्टी भागात राहणाऱ्या हजारो युवकांना झाला आहे. एनसीसी मधील सुधारणांचा परिणाम आपल्याला छात्रसैनिकांच्या संख्येमधून देखील समजू शकतो. वर्ष 2014 मध्ये एनसीसीत सुमारे 14 लाख छात्रसैनिक होते, आज ही संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे.आणि यामध्ये 8 लाखांहून अधिक छात्र सैनिक मुली आहेत, आपल्या कन्या आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज आपले एनसीसीचे सैनिक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. क्रीडाविश्वात देखील एनसीसीचे छात्रसैनिक यशाचा झेंडा फडकावत आहेत. एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे ही बाब माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

मित्रांनो,

तुम्ही एकविसाव्या शतकात भारताच्या विकासाचा जगाच्या विकासाचा मार्ग निश्चित करणार आहात. भारतातील तरुण केवळ देशासाठीच नवे तर जगाच्या हितासाठीची प्रेरक शक्ती आहेत. संपूर्ण जग आज ही गोष्ट मान्य करत आहे. नुकताच वर्तमानपत्रांमध्ये एक अहवाल छापून आला आहे त्यात जे म्हटले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे.भारतात गेल्या दशकभराच्या काळात युवकांनी दीड लाखांहून अधिक स्टार्ट अप उद्योग सुरु केले आहेत आणि शंभराहून अधिक युनिकॉर्न्स उभारले आहेत. आज जगभरातील 200 हून अधिक प्रमुख कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्ती करत आहेत. या कंपन्या जागतिक जीडीपीमध्ये लाखो करोड रुपयांचे योगदान देत आहेत, कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात मदत करत आहेत. भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय संशोधक, भारतातील शिक्षक देखील जगाच्या प्रगतीला चालना देत आहेत. म्हणजेच, क्षेत्र कोणतेही असो, भारताची युवा शक्ती आणि भारताच्या प्रतिभेविना जगाच्या भविष्याची कल्पना देखील करणे कठीण आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना जगाच्या हितासाठीची प्रेरक शक्ती असे संबोधतो.

 

मित्रांनो,

कोणतीही व्यक्ती असो किंवा कोणताही देश, त्यांचे सामर्थ्य तेव्हाच वाढते जेव्हा तो अनावश्यक अडथळे ओलांडून पलीकडे जातो. भारतातील युवकांसमोरच्या अनेक समस्या जेव्हा जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा गेल्या 10 वर्षांच्या काळात त्या समस्या दूर करण्याचे कार्य आम्ही केले याचे मला समाधान वाटते. त्यामुळे भारतातील युवा वर्गाची ताकद वाढली आहे, देशाची ताकद वाढली आहे. 2013 मध्ये तर तुम्ही 10-12 वर्षांचे किंवा 14 वर्षांचे असाल. तुम्ही तुमच्या घरच्यांना जरा विचारून बघा, पूर्वी देशात कशी परिस्थिती होती. यासाठी एक उदाहरण म्हणजे आपापली कागदपत्रे प्रमाणित करण्याची बाब. पूर्वी शिक्षणासाठी प्रवेश घेणे असो, परीक्षा असो, एखादी भर्ती प्रक्रिया असो, कुठलाही फॉर्म भरणे असो, काहीही असले तरी आधी आपली कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन घ्यावी लागत असत आणि त्यासाठी फार धावपळ करावी लागत असे. आमच्या सरकारने तरुणांची ही समस्या दूर केली, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता तुम्ही तुमची कागदपत्रे स्वतःच साक्ष्यांकित करून प्रमाणित करू शकता. पूर्वी युवकांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यात, शिष्यवृत्ती मिळवण्यात मोठे अडथळे येत असत. शिष्यवृत्तीच्या पैशांमध्ये अनेक घोटाळे होत असत, मुलांच्या खात्यात पैसे जमा होत नसत. आता एक खिडकी व्यवस्थेने पूर्वीच्या साऱ्या अडचणी संपवल्या आहेत. पूर्वी आणखी एक मोठी अडचण होती ती म्हणजे विषयाची निवड करण्याबाबत. दहावीनंतर एखादा विषय निवडला की मग त्यात बदल करणे कठीण होत असे. आता नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार विषयात बदल करण्याची लवचिकता बहाल करण्यात आली आहे.

मित्रांनो,

10 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की तरुणांना बँकेकडून सहजपणे कर्ज मिळत नसे. कर्ज हवे असेल तर आधी काहीतरी हमी किंवा तारण म्हणून ठेवावे लागेल असे बँकांचे म्हणणे असे. 2014 मध्ये देशाच्या जनतेने मला पंतप्रधानपदावर नेमून त्यांची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा मी म्हटले की माझ्या देशातील युवकांची हमी मी घेतो. आम्ही बँकेत विनाहमी कर्ज देणारी मुद्रा योजना सुरु केली. आधी 10 लाख रुपयांचे कर्ज विनाहमी मिळत असे. आता सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही ही रक्कम वाढवून 20 लाख केली आहे. गेल्या 10 वर्षांत मुद्रा योजनेंतर्गत आम्ही 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज वितरीत केले आहे. तुमच्यासारख्या लाखो तरुणांनी या कर्जाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.

 

मित्रांनो,

तरुणांच्या भविष्याशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे देशातील निवडणूक प्रक्रिया. दोन दिवसांपूर्वीच आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला. तुमच्यापैकी बरेच तरुण प्रथमच मतदान करणारे आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे आणि आपल्या अधिकाराचा उपयोग करावा, हाच मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश आहे. आज भारतात जगातील सर्वात मोठी निवडणूक होते, पण याची दुसरी बाजू ही आहे की भारतात दर काही महिन्यांनी निवडणुकाच निवडणुका चालत राहतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळ अशी पद्धत सुरू राहीली की जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होत होत्या. नंतर ही पद्धत मोडीत निघाली, याचे देशाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मतदारांची यादी आद्ययावत  केली जाते, इतर बरीच कामे केली जातात, यासाठी आपल्या शिक्षकांची मदत घेतली जाते हे तुम्ही पाहिले असेलच. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होते, परीक्षांच्या तयारीवर देखील याचा प्रभाव पडतो. पुन्हा पुन्हा होणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासनिक कामात देखील अडचणी येतात. म्हणूनच आजकाल देशात एका खूपच महत्त्वपूर्ण विषयावर वादविवाद सुरू आहे. या विषयावर प्रत्येक जण आपापले मत मांडत आहे आणि लोकशाहीत असे विचार मंथन होणे आवश्यकही आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले मत व्यक्त करणे गरजेचे आहे, आणि ही चर्चा कोणत्या विषयावर आहे, तर - ‘एक राष्ट्र - एक निवडणूक’. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाव्यात आणि त्याही निर्धारित वेळेनुसार दर पाच वर्षांनी व्हाव्यात. यामुळे मध्यंतरीच्या काळात जी वेगवेगळ्या नव्या कामांना खिळ बसते, ते यापुढे होणार नाही. भारतातील युवकांना देखील मी आज विशेष रूपाने आवाहन करतो, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना देखील आवाहन करतो, माय भारत उपक्रमाच्या स्वयंसेवकांना आवाहन करतो, राष्ट्रीय सेवा योजनेच्या साथीदारांना आवाहन करतो की, आपण जेथे कोठे असाल तेथे ही चर्चा करा, या विषयावरील संवाद सुरू ठेवा, या संवादाचे नेतृत्व करा, आणि आपण मोठ्या संख्येने या संवादात सहभागी व्हा. हा विषय थेट तुमच्या भविष्याशी संबंधित आहे. अमेरिकेसारख्या देशात देखील नवीन सरकार अस्तित्वात येण्याची तारीख निश्चित आहे, तेथे दर चार वर्षांनी निवडणुका होतात. तुम्ही शिकत असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका देखील एकाच टप्प्यात घेतल्या जातात. जरा विचार करा, प्रत्येक महिन्यात जर निवडणुकाच होत राहिल्या तर विद्यापीठ, महाविद्यालयात शिक्षण होणे संभव आहे का? म्हणूनच तुम्ही ‘एक राष्ट्र - एक निवडणूक’ या संवादात सहभागी होऊन त्याचे नेतृत्व करा, देशभरात या मुद्द्यावर चर्चा होऊ द्या म्हणजेच देश योग्य दिशेने जाण्याचा निर्णय घेऊ शकेल.

मित्रांनो,

आज 21 व्या शतकातील जग जलद गतीने बदलत आहे.आपण जलद गतीने पुढे चालले पाहिजे ही आज काळाची गरज आहे.यामध्ये तुम्हा सर्वांची, देशातील युवकांची मोठी भूमिका आहे. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात, मग ते क्षेत्र कलेचे असो, संशोधनाचे असो वा नवोन्मेषाचे असो, तुम्हाला आपल्या नवोन्मेषी कल्पनातून,सृजनातून नवी ऊर्जा निर्माण करायची आहे. असेच आणखी एक महत्वपूर्ण क्षेत्र आहे ते म्हणजे राजनीति. आपल्या देशातील युवक राजनीतिच्या क्षेत्रात जास्तीत जास्त संख्येने यावेत, नव्या पर्यायांसह यावेत, नव्या ऊर्जेसोबत यावेत, नवोन्मेषासोबत यावेत, ही आज देशाची गरज आहे. म्हणूनच, एक लाख युवकांनी राजनीतिमध्ये आले पाहिजे, असे मी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हणालो होतो. युवकांमध्ये काय ताकद असते हे आम्ही - विकसित भारत - युवा नेता संवादा दरम्यान पाहिले आहे. देशभरातील लाखो युवकांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपल्या अमूल्य सूचना आणि विचार व्यक्त केले आहेत.

मित्रांनो,

स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याच्या काळात, देशातील प्रत्येक व्यवसायातील लोकांनी आपले एकच लक्ष्य निर्धारित केले होते, ते म्हणजे - देशाचे स्वातंत्र्य, आणि युवकांनी यामध्ये मोठ्या उत्साहात, मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, बलिदान दिले होते, आपले तारुण्य तुरुंगवासात संपवले होते. त्याचप्रमाणे, आता स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्याला एकच उद्दिष्ट ऊराशी बाळगले पाहिजे, ते म्हणजे - विकसित भारत. आपल्या प्रत्येक निर्णयाची कसोटी, प्रत्येक कार्याची कसोटी ‘विकसित भारत’ हीच असली पाहिजे. आणि यासाठीच आपण आपले पंच प्रण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. हे पाच प्रण म्हणजे - आपल्याला विकसित भारत निर्माण करायचा आहे, आपल्याला गुलामीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती मिळवायची आहे, आपल्याला आपल्या वारशाचा गौरव वाढवायचा आहे, आपल्याला भारताच्या एकतेसाठी काम करायचे आहे आणि आपल्याला आपली कर्तव्ये इमानदारीने पूर्ण करायची आहेत. हे पाच प्रण प्रत्येक भारतीयाला योग्य दिशा दाखवणारे आहेत, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहेत. आताच तुम्ही जे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यात याचीच झलक दिसत होती. ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ ही भावना देशाची खूप मोठी शक्ती आहे. आता सध्या प्रयागराजमध्ये जो महाकुंभ मेळावा सुरू आहे तेथे देखील देशाच्या एकतेचे प्रतिबिंब दिसून येत आहे. म्हणूनच, हा महाकुंभ मेळावा एकतेचा महाकुंभ आहे. म्हणूनच हा महाकुंभ एकतेचा महाकुंभ आहे. ही एकता देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.

 

मित्रांनो,

तुम्ही तुमची कर्तव्ये कायम लक्षात ठेवली पाहिजेत. कर्तव्याच्या पायावरच भव्य दिव्य विकसित भारताची निर्मिती होऊ शकते.

आज जेव्हा मी तुमच्यासोबत आहे, तेव्हा तुमचा हा उत्साह पाहून, ही मनोवृत्ती पाहून मी पूर्वी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी मला सहज आठवल्या,  त्या अशा आहेत,

 

 

असंख्य भुजाओं की शक्ति है, हर तरफ देश की भक्ति है।

तुम उठो तिरंगा लहरा दो, भारत के भाग्य को फहरा दो।

कुछ ऐसा नहीं जो कर ना सको, कुछ ऐसा नहीं जो पा ना सको।

तुम उठ जाओ, तुम जुट जाओ।

सामर्थ्य को अपने पहचानो, कर्तव्य को अपने सब जानो।

 

 

मित्रांनो,

तुमच्या उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हा सर्वांचे अनेकानेक आभार. माझ्यासोबत म्हणा -

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम।    

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to great social reformer Shri Sant Sevalal Maharaj
February 15, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to the great social reformer Shri Sant Sevalal Maharaj on his birth anniversary, today. “By spreading the message of truth, non-violence, and high moral values, he instilled a new consciousness in society. His inspiring life will forever continue to guide the people of the country”, Shri Modi said.

The Prime Minister posted on X:

“महान समाज सुधारक श्री संत सेवालाल महाराज को उनकी जयंती पर शत-शत नमन। सत्य, अहिंसा और उच्च नैतिक मूल्यों का संदेश देकर उन्होंने समाज में नवचेतना का संचार किया। उनका प्रेरणादायी जीवन सदैव देशवासियों का मार्गदर्शन करता रहेगा।

जय सेवालाल!”