शाही महामहीम,
पंतप्रधान महोदय,
दोन्ही देशांच्या व्यावसायिक समुदायातील सन्माननीय सदस्य
आज आपल्याला नॉर्वे आणि भारताचे व्यावसायिक आणि संशोधन क्षेत्रातील आघाडीचे नेते यांच्याशी चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या शिखर परिषदेचे इतक्या भव्य प्रमाणावर आयोजन केल्याबद्दल मी नॉर्वेच्या पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो.
नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.

ही केवळ शक्यतांची भागीदारी नाही; तर ही एक सिद्ध झालेली भागीदारी आहे. आज, जेव्हा अन्न, इंधन आणि खत सुरक्षा ही जागतिक आव्हाने बनली आहेत, तेव्हा भारत आणि नॉर्वे या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. भारताच्या अन्न क्षेत्रात ओर्कलाने (Orkla) केलेली गुंतवणूक असो, भारताला इक्विनॉरचा (Equinor) एलपीजी आणि एलएनजीचा पुरवठा असो, किंवा भारताच्या खत क्षेत्रात यारा इंटरनॅशनलचे (Yara International) योगदान असो - हे सहकार्य आपली भागीदारी अधिक मजबूत करत आहे.
येथे उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी अनेकांनी भारतातील 'व्हायब्रंट गुजरात' आणि इतर गुंतवणूकदार शिखर परिषदांमध्ये सातत्याने मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे, याचा मला खूप आनंद आहे. आता, आपण या भागीदारीची गती वाढवली पाहिजे आणि तिला एका नव्या उंचीवर नेले पाहिजे.
आणि आता, केवळ एका वेळी एक पाऊल पुढे टाकणे पुरेसे ठरणार नाही. आपल्याला आपला वेग वाढवावा लागेल आणि आपण आपली उद्दिष्टे देखील खूप उच्च ठेवली पाहिजेत.
मित्रांनो,
तुमच्यापैकी जे सर्वजण भारताशी जोडलेले आहात, आणि भारताविषयी तुम्ही येथे जी चर्चा केली आहे - मला असे वाटते की यापेक्षा उत्तम वेळ दुसरी असू शकत नाही. आजची ही वेळ एका मोठ्या संधीची आहे, जिथे योग्य वेळेचा योग्य वापर एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
ऑक्टोबर 2025 मध्ये, आम्ही युरोपियन मुक्त व्यापार संघासोबत (EFTA) व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच "TEPA" लागू केला. हा अनोखा आणि विशेष करार आपल्यातील प्रतिभा, तंत्रज्ञान आणि परस्पर विश्वासाचा करार आहे.
या कराराच्या माध्यमातून, EFTA देशांनी पुढील पंधरा वर्षांत भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आणि 10 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे, परंतु ते साध्य करण्याजोगे देखील आहे. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने ग्वाही देतो की, भारतातील तुमच्या गुंतवणुकीचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर करणे ही आमची हमी आहे.

मित्रांनो,
मला अशा दोन क्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे जी तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात. भारताचा झपाट्याने वाढणारा मध्यमवर्ग पोषण आणि आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये मोठी मागणी निर्माण करत आहे. भारतातील ही मागणी पूर्ण करण्यासाठी नॉर्वेच्या अन्न, मत्स्यव्यवसाय आणि आरोग्य सेवा कंपन्या भक्कम भागीदार बनू शकतात.
त्याचप्रमाणे, स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या आकांक्षांची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही. 2030 पर्यंत, आम्ही 500 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा आणि 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वच्छ ऊर्जेतील गुंतवणूक ही 'नॉर्वेजियन वेल्थ फंड'ची देखील प्राधान्याची बाब आहे. मी नॉर्वेला भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यात एक महत्त्वाचा भागीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
मित्रांनो,
सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मंत्रानुसार पुढे वाटचाल करताना, जर आपण गेल्या बारा वर्षांचे सिंहावलोकन केले तर असे दिसून येते की आपण भारताच्या आर्थिक संरचनेत मूलभूत बदल घडवून आणला आहे.
आम्ही सातत्याने अनुपालनामध्ये घट करत आहोत आणि व्यवसाय सुलभतेत आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार अतिशय सक्रियपणे उपाययोजना करत आहे.
अगदी अलीकडेच आम्ही करप्रणाली, श्रम संहिता आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये नव्या पिढीतील सुधारणा सुरु केल्या आहेत. माझा विश्वास आहे की आता आम्ही भारतातील उत्पादकतेला पुढील पातळीवर नेण्यासाठी अतिशय उकृष्ट संधी उपलब्ध करुन देत आहोत. आम्ही कित्येक प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रोत्साहनही देत आहोत.
याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जहाजबांधणी क्षेत्र. या क्षेत्राला धोरणात्मक उत्पादक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही वेगाने कार्य करत आहोत. आम्ही जहाजबांधणी समूह विकसित करत आहोत आणि त्याच्या विकासासाठी एक संपूर्ण परिसंस्था उभारत आहोत.

जहाजबांधणी बरोबरच, भारत देखभाल, दुरुस्ती आणि परिचालन, हरित नौवहन आणि सागरी सेवांसाठीचे एक जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे.
आज नॉर्वेच्या सुमारे 10 टक्के जहाजांची बांधणी भारतात होते. येत्या पाच वर्षांमध्ये आपण हे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो का? मला खात्री आहे की हे काही तितकेसे अवघड नाही. आपण आधीच वेगाने वाटचाल करत आहोत. आता आपल्याला मोठ्या महत्त्वाकांक्षांच्या पाठबळावर अधिक मोठी पावले उचलण्याची गरज आहे.
मी आपल्या सर्वांना भारतातील धोरण स्थैर्य आणि प्रोत्साहन यांचा लाभ घेऊन या क्षेत्रांमध्ये मोठे भागीदार होण्यासाठी आमंत्रित करतो.
मित्रांनो,
आज मी आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांनी भारत-नॉर्वे संबंधांना हरित सामरिक भागीदारीच्या पातळीवर नेले आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे नॉर्वेजियन कंपन्यांना महत्त्वपूर्ण खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ आणि संरक्षण या क्षेत्रात संपूर्ण पाठिंबा मिळेल. या सर्व क्षेत्रांमध्ये मी तुम्हा सर्वांना भारताला नवोन्मेष आणि उत्पादकतेचे केंद्र बनवण्यासाठी आमंत्रित करतो.
मित्रांनो,
आज आपण भारत-नॉर्वे भागीदारीचे रूपांतर प्रयोगशाळा ते प्रयोगशाळा, विद्यापीठ ते विद्यापीठ आणि शास्त्रज्ञ ते शास्त्रज्ञ या पातळीवर करत आहोत. भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, स्टार्टअप निधी आणि नॉर्वेची संशोधन संस्था एकमेकांशी सहकार्य अधिक बळकट करत आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या संशोधन आणि स्टार्टअप परिसंस्था परस्परांशी जोडल्या जातील.

मित्रांनो,
नॉर्वेच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करता यावे या उद्देशाने आम्ही इन्व्हेस्ट इंडिया अंतर्गत नॉर्वेसाठी एक स्वतंत्र व्यापार सुलभता डेस्क सुरू केला आहे. हा डेस्क भारतातील आपला गुंतवणूक प्रवास अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी करेल.
अशाप्रकारची समर्पित यंत्रणा लक्षणीयरित्या सोयीस्कर ठरते. याशिवाय तुम्हाला राज्य सरकारांशी समन्वय साधणे देखील बऱ्याच प्रमाणात सुलभ होते. आणि ज्यावेळी काही तडजोड किंवा निर्णय प्रक्रियेदरम्यान कोणतेही सहकार्य हवे असेल तर ते देखील अत्यंत वेगाने देणे सहजशक्य होते. नेमक्या याच कारणासाठी आम्ही ही विशेष व्यवस्था केली आहे

आता माझा तुम्हा सर्वांसाठी हा एक मुख्य संदेश असेल: भारतात या आणि तुमची व्याप्ती आणि महत्त्वाकांक्षा यांचा विस्तार करा. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक भारतात आमंत्रित करतो.
तुम्हालाही हे अनुभव प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल. मी सुद्धा माझ्या बाजूने तुम्हाला आश्वासन आणि विश्वास देऊ केला आहे. एक प्रकारे, आता निर्णय तुमच्या हातात आहे.
धन्यवाद.


