It is our Constitution that binds us all together: PM Modi
What is special about Indian Constitution is that it highlights both rights and duties of citizens: PM Modi
As proud citizens of India, let us think how our actions can make our nation even stronger: PM Modi

देशाची एकता जपताना आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला राज्यघटना देते, असे सांगून राज्यघटनेतील सर्वसमावेशकतेची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली.

राज्यघटनेच्या 70व्या वर्षानिमित्त संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित संयुक्त बैठकीला ते संबोधित करत होते.

‘काही क्षण आणि काही दिवस असे असतात की जे भूतकाळाशी आपले बंध दृढ करतात. अधिक चांगल्या भविष्यासाठी काम करण्याची प्रेरणा देतात. आजचा 26 नोव्हेंबरचा दिवस ऐतिहासिक आहे. 70 वर्षांपूर्वी, आपण राज्यघटनेचा स्वीकार केला होता’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

संविधान सभेतील अनेक वाद आणि चर्चांचे फलित राज्यघटना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या राज्यघटनेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

‘या मध्यवर्ती सभागृहात 7 दशकांपूर्वी राज्यघटनेतल्या प्रत्येक कलमावर वाद झाले होते. आपली स्वप्ने, प्रगती आणि आव्हाने यावर चर्चा झाली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरु, आचार्य कृपलानी, मौलाना अबुल कलाम आझाद आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली आणि आपल्याला हा वारसा दिला. ही राज्यघटना देणाऱ्या सर्वांना मी आदरांजली वाहतो.’

‘संविधान सभेतल्या सदस्यांची स्वप्ने, राज्यघटनेतील मूल्ये आणि शब्दांच्या रुपाने आकाराला आली,’ असे ते म्हणाले.

राज्यघटनेवरुन शेवटचा हात फिरवताना 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला भूतकाळाची आठवण करुन दिली होती. ‘आपल्या स्वत:च्या चुकांमुळे आपण आपले स्वातंत्र्य आणि गणराज्याचे स्वरुप गमावले.’

‘देश आता आपले स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित राखू शकेल का? असे आंबेडकर यांनी विचारले होते’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘आज जर बाबासाहेब असते तर त्यांना अत्यंत आनंद झाला असता. भारताने आपली मूल्ये तर जपलीच आणि लोकशाही व स्वातंत्र्य अधिक मजबूत केले’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘राज्यघटनेच्या संसदीय, कार्यकारी आणि न्यायिक स्तंभासमोर मी नतमस्तक होतो. या स्तंभांनी राज्यघटनेतील मूल्ये आणि आदर्श संवर्धित करण्यात साहाय्य केले आहे.’

राज्यघटना जतन करण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान दिल्याबद्दल संपूर्ण देशापुढे आपण नतमस्तक होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

‘देशाच्या लोकशाहीवर अबाधित विश्वास ठेवणाऱ्या आणि राज्यघटनेला कायम पवित्र आणि दीपस्तंभ मानणाऱ्या 130 कोटी भारतीयांना मी वंदन करतो.

आपल्या राज्यघटनेची 70 वर्ष ही आनंदाची, अभिमानाची आणि परिपूर्तीची भावना जागवणारी आहेत.

मूल्यांविषयीचा आपलेपणा आणि राज्यघटनेचे सार याला देशातल्या नागरिकांनी कधी तडा जाऊ दिला नाही.

‘राज्यघटनेतल्या आदर्शांमुळे आपण एक भारत श्रेष्ठ भारताच्या दिशेने वाटचाल करु शकलो’, असे ते म्हणाले.

प्रचंड मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात, देशाची आकांक्षा, स्वप्ने आणि प्रगती आपण केवळ राज्यघटनेच्या माध्यमातूनच साध्य करु शकलो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना हा पवित्र ग्रंथ असल्याचे सांगितले.

‘आपली राज्यघटना हा सर्वात पवित्र ग्रंथ असून, त्यात आपले जीवन, आपला समाज, आपल्या परंपरा, आपली मूल्ये आणि आपल्यासमोरच्या आव्हानांच्या सोडवणुकीचे मार्ग संचयित रुपात आहेत.’

प्रतिष्ठा आणि एकता या दोन तत्वज्ञानावर राज्यघटना आधारलेली आहे. ‘भारतीयांसाठी प्रतिष्ठा’ आणि ‘देशाची एकता’ हे राज्यघटनेतले दोन मंत्र आहेत. देशाची एकता अबाधित ठेवत आपल्या नागरिकांची प्रतिष्ठा राज्यघटनेने सर्वोच्च मानली आहे.

जगभरातल्या लोकशाहींची सर्वोत्तम अभिव्यक्ती आपली राज्यघटना आहे. आपले हक्क आणि आपल्या कर्तव्यांबाबतही राज्यघटना आपल्याला जागृत ठेवते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘भारतीय राज्यघटनेने नागरिकांचे हक्क आणि नागरिकांची कर्तव्ये दोन्ही अधोरेखित केले आहेत. आपल्या राज्यघटनेचा हा विशेष पैलू आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हक्क आणि कर्तव्य यातले नाते आणि संतुलन योग्यप्रकारे उमजले होते.’

राज्यघटनेतल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव कायम ठेवण्याचे पंतप्रधानांनी नागरिकांना केले.

‘राज्यघटनेतील कर्तव्यांची परिपूर्ती आपण कशी करु शकतो, यावर विचार करु या.

सेवा आणि कर्तव्य यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. सेवा ही स्वयंसेवी असते. रस्त्यावरच्या गरजुला मदत करणे हे तुमच्यावर अवलंबून असते पण जेव्हा तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करता तेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्य निभावत असता.

आपण कर्तव्यावर भर दिला पाहिजे. देशाभिमान असलेले भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशाला अधिक बळकट कसे करता येईल, याबाबत आपण विचार करुया.’

‘आपल्या राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारताचे नागरिक’, अशी आहे. ‘आम्ही भारताचे नागरिक’ ही तिची शक्ती, प्रेरणा आणि तिचे उद्देश असल्याची जाणीव कायम ठेवू या’, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे स्मरण केले आणि श्रद्धांजली वाहिली.

‘आजच्याच दिवशी, 26 नोव्हेंबरला मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला करुन हजारो वर्षांचे ‘वसुधैव कुटुम्बकम’चे समृद्ध तत्वज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात बळी पडलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो, असे ते म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Nagaland gets its first natural gas supply via National Gas Grid

Media Coverage

Nagaland gets its first natural gas supply via National Gas Grid
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 ऑगस्ट 2026
August 19, 2026

Defence to Diamonds: How PM Modi’s Vision Turned India into a Global Capability Hub