भारतमाता की जय....

भारतमाता की जय....

भारतमाता की जय....

माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज जे महान लोक देशाच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या उभारणीसाठी संपूर्ण तन्मयतेने आणि संपूर्ण कटिबद्धतेसह देशाचे संरक्षण देखील करत आहेत आणि देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्याचे प्रयत्न देखील करत आहेत, मग ते आपले शेतकरी असोत, आपल्या तरुणांचा उत्साह असो, आपल्या माता-भगिनींचे योगदान असो, दलित असो, पिडीत असो, शोषित असो किंवा वंचित असोत, आव्हानात्मक परिस्थितीत देखील देशाच्या स्वातंत्र्याप्रती त्यांची निष्ठा, लोकशाहीप्रती त्यांची श्रद्धा, ही संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी घटना आहे. मी आज अशा सगळ्यांनाच आदरपूर्वक नमस्कार करतो.

 

प्रिय देशवासियांनो,

या वर्षी आणि गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे आपली चिंता वाढत चालली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांनी स्वतःच्या कुटुंबातील माणसे गमावली आहेत, संपत्ती गमावली आहे, देशाने देखील अनेकदा राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान सहन केले आहे. मी आज त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की संकटांच्या वेळी हा देश तुम्हा सर्वांसोबत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपण जरा स्वातंत्र्यापूर्वीचे ते दिवस आठवूयात. शेकडो वर्षांची गुलामी, तो कालखंड अत्यंत संघर्षाचा होता. तरुण असो, वयस्कर असो, महिला असो, आदिवासी असो, हे सर्वजण गुलामीविरोधात लढत राहिले, सतत लढत राहिले. 1857 च्या स्वातंत्र्यसमराची आपण नेहमी आठवण काढतो, त्याच्या आधी देखील आपल्या देशातील असे अनेक आदिवासी प्रदेश असे होते जेथे स्वातंत्र्यासाठी संघर्ष होत होता याचा इतिहास साक्षीदार आहे.

मित्रांनो,

गुलामगिरीचा इतका मोठा काळ, जुलमी शासक, अनंत यातना, सामान्यांतील सामान्य माणसांचा विश्वास भंग करण्यासाठी योजलेल्या युक्त्या, अशा स्थितीत देखील त्या वेळच्या लोकसंख्येचा विचार करता, सुमारे 40 कोटी देशवासीयांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात असे साहस दाखवले, असा धाडसीपणा दाखवला, सामर्थ्य दाखवले. त्या सर्वांनी एक स्वप्न उराशी बाळगले, सतत एक निर्धार करुन ते कार्य करत राहिले, झुंजत राहिले. त्यावेळी एकच स्वर होता – वंदे मातरम! एकच स्वप्न होते, भारताच्या स्वातंत्र्याचे. चाळीस कोटी देशवासीयांनी हे कार्य केले. आणि आमच्या धमन्यांमध्ये त्यांचे रक्त खेळते आहे याचा आम्हांला अभिमान आहे. ते आपले पूर्वज होते. केवळ चाळीस कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उखडून फेकून दिले होते. गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या. ज्यांचे रक्त आपल्या अंगातून वाहते आहे ते आपले पूर्वज जर हे करू शकतात तर आज आपण 140 कोटी आहोत. जर चाळीस कोटी लोक गुलामगिरीच्या बेड्या तोडू शकतात, चाळीस कोटी लोक स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात, स्वातंत्र्य प्राप्त करुनच दाखवतात, तर 140 कोटी लोकांचा हा देश, हे माझे नागरिक, माझे 140 कोटी कुटुंबीय, जर निर्धार करून वाटचाल करू लागले, एक दिशा निश्चित करून त्या दिशेने जाऊ लागले, एकमेकांसोबत पावले टाकत, खांद्याला खांदा भिडवून निघाले, तर आव्हाने कितीही असो, अभावांचे प्रमाण कितीही तीव्र असले तरीही, साधन संपत्तीसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी प्रत्येक आव्हानाचा सामना करून आपण समृध्द भारत निर्माण करू शकतो. आपण 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू शकतो. जर 40 कोटी भारतवासी आपल्या पुरुषार्थाने, आपल्या समर्पणाने, आपल्या त्यागाने, आपल्या बलिदानाने, स्वातंत्र्य मिळवू शकतात, स्वतंत्र भारत निर्माण करू शकतात, तर 140 कोटी देशवासीय त्याच भावनेसह समृद्ध भारत देखील उभारू शकतात.

मित्रांनो,

असा एक काळ होता जेव्हा, लोक देशासाठी मरण पत्करायला तयार होते. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर आज देशासाठी जगण्याची शपथ घेण्याची वेळ आली आहे. जर देशासाठी मरण स्वीकारण्याचा निश्चय आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो तर, देशासाठी जगण्याचा निर्धार समृद्ध भारत देखील उभारून दाखवू शकतो.

मित्रांनो,

विकसित भारत@2047 हे केवळ भाषणातील शब्द नव्हेत तर याच्या पाठीमागे, कठोर मेहनत आहे, देशभरातील कोट्यवधी लोकांकडून सूचना मागवल्या जात आहेत, आणि आम्ही, देशवासियांकडून सूचना मागवल्या. आणि मला अत्यंत प्रसन्नता वाटते की, माझ्या देशातील कोट्यवधी नागरिकांनी 2047 मधील विकसित भारत उभारणीसाठी असंख्य सूचना मांडल्या, प्रत्येक देशवासियाचे स्वप्न त्यांच्यातून प्रतिबिंबित होत आहे, प्रत्येक देशवासियाचा निर्धार त्यातून व्यक्त होत आहे. तरुण असो की प्रौढ, गावातील लोक असो किंवा शहरातील, शेतकरी असो, कामगार असो, दलित असो की आदिवासी, डोंगराळ प्रदेशातील रहिवासी असोत किंवा जंगलातील लोक, शहरातील नागरिक अशा प्रत्येकाने, 2047 मध्ये देश जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करत असेल तोपर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अनमोल सूचना केल्या. मी जेव्हा या सगळ्यांनी सुचवलेल्या बाबी बघत होतो तेव्हा माझे मन प्रसन्न होत होते, देशाला जगाची कौशल्यविषयक राजधानी बनवण्याची सूचना आमच्यासमोर मांडण्यात आली होती, 2047 मध्ये विकसित भारत निर्माणासाठी काही लोकांनी देशाला निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सूचना केल्या, काही लोकांनी भारतातील विद्यापीठांना जागतिक स्वरूप देण्याच्या सूचना केल्या. काही लोकांनी हेही विचारले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी आपल्या माध्यमांना जागतिक स्वरूप द्यायला नको का? काही लोक असे म्हणाले की आपल्या देशातील कुशल तरुणांना जगातून प्रथम पसंती मिळाली पाहिजे. काही जणांनी असे सुचवले की भारताने प्रत्येक क्षेत्रात लवकरात लवकर आत्मनिर्भर झाले पाहिजे. काही लोकांनी सुचवले की आपल्या देशातील शेतकरी जे भरड धान्य पिकवतात, ज्याला आपण श्रीअन्न असे म्हणतो ते सुपरफूड आपल्याला जगाच्या प्रत्येक जेवणाच्या टेबलवर पोहोचवायचे आहे. आपल्याला जगाच्या पोषणाला बळ द्यायचे आहे आणि भारतातील लहान शेतकऱ्यांना सक्षम बनवायचे आहे. अनेकांनी असेही सांगितले की, देशातील स्वराज्य संस्थांपासून ते अनेक संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे. देशात न्यायदानात जो विलंब होतो आहे, त्याप्रती चिंता व्यक्त करून काही लोकांनी लिहिले की आपल्या देशातील न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणेची अत्यंत आवश्यकता आहे. अनेकांनी असे लिहिले की देशात ग्रीनफिल्ड शहरे उभारणे ही काळाची गरज आहे. काहींनी वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा विचार मांडून शासन आणि प्रशासनात क्षमता निर्मितीसाठी एखादी मोहीम उभारण्याच्या सूचना केल्या. अंतराळात आता भारताचे अवकाश स्थानक लवकरात लवकर उभारले पाहिजे असे स्वप्न देखील अनेक लोकांनी पाहिले आहे. कोणी म्हणाले आहे की, जग आता समग्र उपचार पद्धतीकडे वळत असताना आपल्या भारताची जी पारंपरिक औषधोपचार पद्धती आहे त्यातील जी पारंपरिक औषधे आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन जागतिक स्वास्थ्य केंद्राच्या स्वरुपात भारताला विकसित करणे आवश्यक आहे. काहींनी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे की भारत आता लवकरात लवकर जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली पाहिजे, त्यात उशीर व्हायला नको. माझ्या देशवासीयांनी ह्या सूचना केल्या आहेत म्हणून त्या मी तुम्हाला वाचून दाखवत होतो. माझ्या देशातील सामान्य नागरिकाने ह्या सूचना केल्या आहेत. मला वाटते की देशवासीयांचे असे व्यापक विचार असतील, देशवासीयांची इतकी भव्य स्वप्ने असतील, देशवासीयांच्या विचारांतून त्यांचे निर्धार दिसून येत असतील, तर आमच्यामध्ये देखील एक दृढनिश्चय निर्माण होतो, आमचा आत्मविश्वास नव्या उंचीवर पोहोचतो.

मित्रांनो,

देशवासियांचा हा विश्वास म्हणजे एखादी बौद्धिक चर्चा नाही. हा विश्वास त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित आहे. प्रदीर्घ काळ केलेल्या मेहनतीतून हा विश्वास जन्माला आला आहे. आणि म्हणूनच देशातील सामान्य माणसाला जेव्हा लाल किल्ल्यावरून सांगण्यात येते की, देशातील 18 हजार गावांमध्ये निर्धारित कालखंडात वीज जोडण्या दिल्या जातील, आणि त्याप्रमाणे हे काम पूर्ण होते तेव्हा हा विश्वास अधिक मजबूत होतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांनी देखील देशातील अडीच कोटी घरांमध्ये वीज पोचलेली नाही, तेथे अंधाराचेच साम्राज्य आहे. तेव्हा त्या अडीच कोटी घरांपर्यंत वीज पोहोचवण्याचा निर्णय होतो आणि त्याप्रमाणे तेथे वीज जोडण्या दिल्या जातात तेव्हा सामान्य नागरिकाचा विश्वास वृद्धींगत होतो. जेव्हा स्वच्छ भारत अभियानाचा विषय निघतो, तेव्हा या देशाच्या पहिल्या आघाडीतील लोक असोत, गावातील लोक असोत, गरीब वस्त्यांमध्ये राहणारे लोक असोत, लहान मुले असोत, प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असेल, स्वच्छतेची चर्चा होत असेल, स्वच्छतेचे महत्त्व एकमेकांना आवर्जून सांगण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटते, हा भारतात निर्माण झालेल्या नव्या चैतन्याचे प्रतिबिंब आहे. जेव्हा लाल किल्ल्यावरून आपल्या देशातील लोकांना अशी माहिती देण्यात येते की, आज आपल्या देशात 3 कोटी कुटुंबे अशी आहेत ज्यांना नळाने पाणी उपलब्ध होत नाही, या घरांमध्ये नळाने पिण्याचे शुध्द पाणी पोहोचवण्याची गरज आहे.

इतक्या कमी वेळात  12 कोटी कुटुंबांना जल जीवन अभियानाअंतर्गत  पाणी पोहोचत आहे. आज 15 कोटी कुटुंबे याचे लाभार्थी झाले आहेत. कोण वंचित होते व्यवस्थेपासून, कोण मागे राहिले होते,  समाजातल्या वरच्या थरातल्या  लोकांना या अभावाला तोंड द्यावे लागत नव्हते. माझ्या दलित, पीडित, शोषित,माझ्या  आदिवासी बंधू- भगिनी, माझ्या  गरीब बंधू- भगिनी,झोपडीमध्ये राहून स्वतःची गुजराण करणारे माझे लोक हेच या गोष्टींविना जगत होते. अशा प्राथमिक गोष्टींसाठी आम्ही जे प्रयत्न केले त्याचा लाभ समाजातल्या या आमच्या सर्व बंधू-भगिनींना मिळाला आहे.आम्ही ‘व्होकल फॉर लोकल’ चा मंत्र दिला आज  मला आनंद आहे की व्होकल फॉर लोकल  हा अर्थशास्त्रासाठी नवा मंत्र ठरला आहे. प्रत्येक जिल्हा आपल्या उत्पादनाचा  अभिमान बाळगू लागला आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ असे वातावरण निर्माण झाले आहे. एक जिल्हा एक उत्पादन मधल्या उत्पादनांची निर्यात कशी करता येईल या दिशेने आमचे सर्व जिल्हे विचार करू लागले आहेत.नविकरणीय उर्जेचा संकल्प घेतला होता.  जी-20 समूहाच्या देशांनी यासंदर्भात जितके केले आहे त्यापेक्षा जास्त कार्य भारताने केले आहे आणि भारताने उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी, जागतिक तापमान वाढीच्या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी आम्ही काम केले आहे,

 

मित्रहो, 

देश आज अभिमान बाळगतो, फिनटेक अर्थात आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराच्या यशापासून  संपूर्ण जग भारताकडून शिकण्याची-जाणण्याची इच्छा बाळगत आहे तेव्हा आपला अभिमान अधिकच वृद्धिंगत होतो.मित्रांनो, आपण कोरोनाचा संकट काळ कसा विसरू शकतो,  जगात सर्वात  वेगाने कोट्यवधी लोकांच्या लसीकरणाचे काम आपल्या याच देशामध्ये झाले. हा तोच देश आहे जिथे कधी दहशतवादी येऊन आम्हाला मारून निघून जात असत, जेव्हा देशाचे सैन्यदल लक्ष्यभेदी हल्ला करते,  जेव्हा देशाचे सैन्यदल हवाई हल्ला करते,तेव्हा देशाच्या युवकांची मान अभिमानाने ताठ होते, देशाची छाती अभिमानाने भरून येते.आणि हीच बाब आहे ज्याने आज 140 कोटी देशवासीयांचे मन अभिमानाने दाटून आले आहे, आत्मविश्वासाने भरले आहे.मित्रांनो, या सर्व गोष्टींसाठी एक विचारपूर्वक प्रयत्न केला जात आहे. सुधारणांच्या परंपरेला बळ देण्यात आले आहे. आणि जेव्हा राजनीती नेतृत्वाची संकल्प शक्ती आहे, दृढ विश्वास आहे जेव्हा सरकारी यंत्रणा समपर्ण भावनेने ती लागू करण्यासाठी झटते,आणि जेव्हा देशाचा प्र्त्येक नागरिक ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन भागीदारी करण्यासाठी लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी  पुढे येतो तेव्हा आपल्याला निश्चितच त्याचे फलित प्राप्त होते.

माझ्या प्रिय देशबांधवानो,

आपण हे विसरता कामा नये, देशाच्या स्वातंत्र्यानंतर  दशकांनंतरही अशा मानसिकतेत घालवला आहे जेव्हा होते असे, चालून जाते, चालते, आपल्याला कष्ट करायची काय आवश्यकता आहे,अरे पुढची पिढी बघून घेईल,आपल्याला संधी मिळाली आहे तर मजा करून घेऊ या. पुढचे काय ते पुढचा बघून घेईल, आपल्याला काय त्याचे,आपण आपला काळ  घालवू, अरे काही नवे करायला घेतले तर काही  नवीन गोंधळ वाट्याला   येईल,  अरे बाबानो का ? देशात जैसे थे अशी  परिस्थिती निर्माण झाली होती. जे आहे त्यातच भागवून घ्या असे वातावरण निर्माण झाले होते. लोक म्हणत असता,अरे जाऊ दे ना, काही होणार नाही अशीच मानसिकता झाली होती. त्यांना या मानसिकतेतून आम्हाला बाहेर काढायचे होते  आहे, आम्हाला  विश्वासाने परिपूर्ण व्हायचे होते,आणि आम्ही त्या दिशेने प्रयत्न केले. काही जण तर म्हणतच होते की अरे बाबा, पुढच्या पिढीसाठी आम्ही काम का करायचे आम्ही तर आजचेच बघू मात्र देशाच्या सामान्य नागरिकाची अशी  इच्छा नव्हती.तो परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होता, त्याला परिवर्तन हवे होते. त्याची आस होती. मात्र त्याच्या स्वप्नांकडे कोणी लक्ष दिले नाही.त्याच्या आशा-आकांक्षाकडे लक्ष पुरवले गेले नाही आणि त्यामुळे समस्यांना तोंड देत तो आपली गुजराण करत राहिला. तो सुधारणांची प्रतीक्षा करत राहिला. आमच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आणि आम्ही मोठ्या सुधारणा वास्तवात साकारल्या. गरीब असो, मध्यमवर्ग असो,  आमचे वंचित लोक असोत,आमची वाढती शहरी लोकसंख्या असो,आमच्या युवकांची स्वप्ने असोत, संकल्प असोत, आशा-आकांक्षा असोत, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सुधारणांचा  मार्ग निवडला आणि मी देशवासियांना भरवसा देऊ इच्छितो की सुधारणांप्रती  आमची जी कटिबद्धता आहे,ती अर्थविषयक वर्तमानपत्रांच्या संपादकीयापुरती मर्यादित नाही.  सुधारणांप्रती आमची जी कटिबद्धता आहे, ती चार दिवस वाहवा मिळवण्यासाठी नाही, सुधारणांची आमची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या नाईलाजातून आलेली नाही, देशाला सामर्थ्यवान करण्याच्या उद्देशाने या सुधारणा आहेत.आणि म्हणूनच आज सांगू शकतो की सुधारणांचा आमचा मार्ग एक प्रकारे पथदर्शी आराखडा ठरला आहे. या आमच्या सुधारणा, विकास, हे परिवर्तन हे केवळ चर्चेसाठी, बुद्धीजीवी वर्गासाठी, तज्ञांसाठी चर्चेकरिता विषय नाही.

मित्रांनो,

आम्ही राजकारण नाईलाज म्हणून केले नाही.आम्ही जे काम करतो ते राजकीय गुणाकार- भागाकार या दृष्टीकोनातून करत नाही, आमचा एकच संकल्प असतो, ‘राष्ट्र सर्वप्रथम’. राष्ट्र सर्वप्रथम, राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी,माझा भारत महान व्हावा हा संकल्प  घेऊन आम्ही पाऊले उचलतो.

मित्रांनो,

जेव्हा सुधारणांची बाब येते, त्याचा एक प्रदीर्घ पट आहे.त्याची चर्चा करत बसलो तर कदाचित अनेक तास लागतील मात्र मी छोटेसे उदाहरण देऊ इच्छितो.बँकिंग क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या, आपण विचार करा, बँकिंग क्षेत्राची काय परिस्थिती होती, ना विकास होत  होता, ना विस्तार होत होता, ना विश्वास वाढत होता इतकेच नव्हे तर ज्या प्रकारचे कारनामे झाले त्यामुळे आपल्या बँका संकटातून जात होत्या.आम्ही बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे आज आपल्या बँका, जगातल्या ज्या मोजक्या मजबूत बँका आहेत त्यामध्ये भारताच्या बँकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आणि जेव्हा बँकांचा विषय येतो,तेव्हा औपचारिक अर्थव्यवस्थेचे सामर्थ्यही वाढते.जेव्हा बँक व्यवस्था नीट असते तेव्हा सामान्य विशेष करून गरीब कुटुंबाच्या ज्या गरजा असतात,  त्या पूर्ण करण्याची सर्वात मोठी ताकद बँकिंग क्षेत्रात असते. जर त्याला गृह कर्ज हवे असेल त्याला वाहन कर्ज हवे असेल, माझ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर साठी कर्ज हवे असेल, माझ्या युवावर्गाला स्टार्ट अपसाठी कर्ज हवे , माझ्या युवकांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल, परदेशात जाण्यासाठी कर्ज हवे असेल तेव्हा  या सर्व बाबी शक्य होतात. मला तर आनंद आहे की माझे पशुपालकही, मत्स्यपालन करणाऱ्या बंधू- भगिनीही आज बॅंकांचा लाभ घेत आहेत.मला आनंद आहे की माझ्या लाखो फेरीवाल्या बंधू- भगिनी आज बँकांशी जोडले जाऊन आपली नवी परिमाणे साध्य करत आहेत आणि विकासाच्या वाटचालीत भागीदार होत आहेत. आपले सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग, आपल्या  लघु उद्योगांसाठी तर बँका सर्वात मोठ्या सहाय्यक असतात. त्यांना दररोज पैशांची आवश्यकता असते, आपल्या नित्य प्रगतीसाठी आणि आपल्या मजबूत बँकांमुळे हे काम शक्य झाले आहे.  

 

मित्रांनो,

आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आपल्याला स्वातंत्र्य तर प्राप्त झाले पण  लोकांना  दुर्दैवाने मायबाप संस्कृतीला सामोरे जावे लागले.सरकारकडे मागत राहा,सरकार पुढे हात पसरत राहा, कोणाची शिफारस मिळेल याचे मार्ग शोधत राहा,हीच संस्कृती फोफावली होती.आज प्र्शासनाचे हे मॉडेल आम्ही बदलले आहे. आज सरकार स्वतः लाभार्थी, हितार्थ्याकडे जात आहे. आज सरकार स्वतः त्याच्या घरी गॅस शेगडी पोहोचवत आहे. आज सरकार स्वतः त्याच्या घरी पाणी पोहोचवत आहे. आज सरकार स्वतः त्याच्या घरी वीज जोडणी देत आहे. आज सरकार स्वतः त्याला आर्थिक साहाय्य देत विकासाच्या नव्या आयामासाठी त्याला प्रेरित करत आहे, प्रोत्साहित करत आहे. आज सरकार स्वतः युवकांच्या कौशल्य विकासासाठी अनेक पाऊले उचलत आहे.

मित्रांनो,

मोठ्या सुधारणांसाठी आमचे सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि याद्वारे आम्ही प्रगतीच्या वाटा चोखाळू  इच्छितो. मित्रहो, देशात नव्या व्यवस्था निर्माण होत आहेत, देशाला पुढे नेण्यासाठी, अनेक धोरणे निरंतर करण्यासाठी आणि नव्या व्यवस्थेवर देशाचा विश्वासही वाढत राहतो, अखंड वाढत राहतो. आज जो युवक 20- 25 वर्षांचा आहे, जो 10 वर्षांपूर्वी जेव्हा  12 – 15 वर्षांचा युवक होता  त्याने आपल्या डोळ्यासमोर हे परिवर्तन घडताना पाहिले आहे. 10 वर्षांमधेच त्याच्या स्वप्नांना आकार मिळाला आहे,भरारी मिळाली आहे आणि त्याच्या आत्मविश्वासाला  एक नवी उर्जा प्राप्त झाली आहे आणि तोच देशाचे नवे सामर्थ्य म्हणून पुढे येत आहे.
 

आज जगभरात भारताचा डंका वाजत आहे, भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज जगभरात युवकांसाठी संधींची दारे खुली झाली आहेत. रोजगाराच्या अगणित संधी, ज्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही प्राप्त झाल्या नव्हत्या  अशा संधी आज त्यांच्यासमोर उभ्या आहेत.शक्यता वाढल्या आहेत, नव्या संधी निर्माण होत आहेत.माझ्या देशाच्या युवकांचा आता संथगतीने  वाटचाल करण्याचे उद्दिष्ट नाही,माझ्या देशाचा युवक,इंक्रीमेंटल प्रगतीवर विश्वास ठेवत नाही. माझ्या देशाचा युवक झेप घेण्यासाठी सिद्ध झाला आहे.भरारी घेत नवी शिखरे साध्य करण्याच्या मनस्थितीत आहे. मी सांगू  इच्छितो भारतासाठी सुवर्ण काळ आहे. जागतिक परिस्थितीच्या तुलनेतही पाहिले तर  हा सुवर्ण काळ आहे. हा आपला स्वर्णिम कालखंड आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

ही संधी आपण गमावता कामा नये. ही संधी आपण सोडता कामा नये. आणि हीच संधी घेऊन आपली स्वप्ने आणि संकल्प घेऊन आगेकूच केली तर आपण देशाची स्वर्णिम भारताची जी अपेक्षा आहे आणि आपण विकसित भारत 2047 हे लक्ष्य आपण नक्कीच साध्य करू.आपण शतकांपासूनच्या बेड्या तोडून निघालो आहोत. आज सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग क्षेत्र असो,शिक्षण असो,आरोग्य क्षेत्र असो, वाहतूक क्षेत्र असो,शेती, कृषी  क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नवी आधुनिक व्यवस्था तयार होत आहे. आपण जगातल्या सर्वोत्तम प्रथा डोळ्यासमोर ठेवत,आपल्या देशाच्या परिस्थितीनुसार आगेकूच करू इच्छितो.प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची आवश्यकता आहे. नाविन्याची गरज आहे. तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आमच्या नव्या धोरणांमुळे, या सर्व क्षेत्रात नवे पाठबळ मिळत आहे, नवे सामर्थ्य लाभत आहे. आपले सारे अडथळे दूर व्हावेत आपण सर्व सामर्थ्यानिशी जोमाने झेप घ्यावी ,फुलून येत स्वप्ने साध्य करावीत, त्यांची सिद्धता  आपल्या समीप आल्याचे पाहावे, आत्मसात करावी  या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे.   

आता तुम्ही पहा, किती मोठे परिवर्तन घडले आहे. मी अगदी तळागाळातील स्तराबद्दल बोलत आहे. महिला स्वयंसहायता गट. आज गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील दहा कोटी भगिनी महिला स्वयंसहायता गटाशी जोडल्या गेल्या आहेत. नवीन दहा कोटी भगिनी. आम्हाला याचा अभिमान वाटत आहे. आमच्या सामान्य कुटुंबातील गावातील महिला आर्थिक रूपाने आत्मनिर्भर बनत आहेत आणि जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते, तेव्हा कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत देखील तिचा समावेश होतो आणि एका अतिशय मोठ्या सामाजिक परिवर्तनाची हमी मिळते. मला या गोष्टीचा अभिमान तर वाटतोच,  मात्र या बरोबरच मला अजून एका गोष्टीचा देखील अभिमान वाटतो आहे. आणि ती म्हणजे भारताचे सीईओ आज संपूर्ण जगावर आपला ठसा उमटवत आहेत. भारताचे आपले सीईओ संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकत आहेत. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे की भारताचे सीईओ संपूर्ण जगात नाव कमवत असून संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत तर दुसरीकडे आमच्या महिला स्वयंसहायता गटातील सामान्य कुटुंबातील आमच्या एक कोटी माता भगिनी लखपती दीदी बनत आहेत. माझ्यासाठी ही देखील तितकीच अभिमानाची गोष्ट आहे. आता आम्ही महिला स्वयंसहायता गटांना दहा लाखांवरून वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत बँकांच्या माध्यमातून 9 लाख कोटी रुपये महिला स्वयंसहायता गटांना मिळाले आहेत. या अर्थसहाय्याच्या मदतीनं त्या आपल्या अनेक कामांना गती देत आहेत. 

माझ्या मित्रांनो,माझ्या युवकांनो,

जरा इकडे लक्ष द्या. अंतराळ क्षेत्र हे आपल्याशी निगडित असलेले भविष्य आहे. एक महत्वपूर्ण पैलू आहे. आम्ही या क्षेत्रातही प्रगती करत आहोत. आम्ही अंतराळ क्षेत्रात खूप परिवर्तन घडवून आणले आहे. अंतराळ क्षेत्राला ज्या बंधनांमध्ये आपण जखडून ठेवले होते, ती बंधने आम्ही खुली केली आहेत. आज अंतराळ क्षेत्रात शेकडो स्टार्ट-अप्स आगमन करत आहेत. अतिशय चैतन्यदायी बनणारे आपले अंतराळ क्षेत्र भारताला एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनवण्याचा एक अविभाज्य घटक आहे. आणि आम्ही दूरदृष्टीने या क्षेत्राला अधिक मजबूत करत आहोत. आज खाजगी उपग्रह आणि खाजगी रॉकेट्सचे प्रक्षेपण होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आज मी हे म्हणू शकतो की जेव्हा धोरण योग्य असते, हेतू स्पष्ट असतो आणि संपूर्ण समर्पणाच्या भावनेने राष्ट्र कल्याण हा मंत्र असतो, तेव्हा आपण निर्धारित ध्येय नक्कीच गाठतो. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आज आपल्या देशात नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आज मी हे म्हणू शकतो की अशा आणखी दोन गोष्टी झाल्या आहेत, ज्यांनी विकासाला नवीन गती दिली आहे, विकासाला एक नवीन उंची दिली आहे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आधुनिक पायाभूत सेवा सुविधांची निर्मिती. आम्ही पायाभूत सेवा सुविधांना आधुनिक बनवण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनातील समस्या आहेत, सुलभ राहणीमानाचे आमचे जे स्वप्न आहे, त्यावर देखील आम्ही भर दिला आहे. गेल्या दशकभरात देशात पायाभूत सेवा सुविधांचा अभूतपूर्व विकास झाला आहे. मग रेल्वे असो, रस्तेमार्ग असो, विमानतळ असो, बंदरे असोत की ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी असो,  गावागावात शाळा उभारणे असो, जंगलभागात शाळा उभारणे असो, दुर्गम भागात रुग्णालयांची किंवा आरोग्यमंदिरांची उभारणी असो, वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना असो, आयुष्मान आरोग्य मंदिरांची निर्मिती असो, साठ हजारांहून अधिक अमृत सरोवराची निर्मिती असो, दोन लाख पंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची योजना असो, कालव्यांचे एक खूप मोठे जाळे तयार करण्याचे काम असो, चार कोटी पक्क्या घरांची निर्मिती होऊन गरिबांना नव्याने आश्रय मिळण्याची गोष्ट असो, नवीन तीन कोटी घरांच्या निर्मितीचा संकल्प घेऊन पुढे मार्गक्रमण करण्याचा आमचा प्रयत्न असो, आमचा पूर्व भारत असो, आज हा भाग तेथील पायाभूत सेवा सुविधांनी ओळखला जात आहे, आणि आम्ही आज हा जो कायापालट केला आहे, त्याचा सर्वाधिक लाभ समाजाच्या त्या वर्गासाठी होत आहे, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत त्या ग्रामीण भागात आज पक्के रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यांच्याकडे कधी कोणी पाहत देखील नव्हते, त्या भागाकडे कोणी पाहत नव्हते, त्या गावांकडे कोणी पाहत नव्हते, दलित असोत, वंचित असोत, पीडित असोत, शोषित असोत, मागासलेले असोत, आदिवासी असोत, जंगलात राहणारे असोत, उंच डोंगरांवर राहणारे असोत की सीमावर्ती भागातले नागरिक असोत, आम्ही त्यांच्या गरजांची पूर्तता केली. आमच्या मच्छिमार बांधवांच्या गरजा पूर्ण करणे, आमच्या पशुपालकांच्या जीवनात परिवर्तन आणणे.. एक प्रकारे देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमच्या धोरणांमध्ये राहिला, आमच्या हेतूंमध्ये राहिला, आमच्या सुधारणांमध्ये आणि उपक्रमांमध्ये कायम राहिला आहे, आमच्या कार्यशैलीत राहिला आहे आणि या सर्वाचा, सर्वाधिक लाभ माझ्या युवकांना होतो. या नवनवीन संधी उपलब्ध होतात, नवनवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या संधी मिळतात आणि त्यामुळेच त्यांना सर्वाधिक रोजगार मिळत आहे. आणि सर्वाधिक रोजगार मिळण्याची संधी त्यांना याच काळात मिळाली आहे. 

आपले जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे, मध्यमवर्गीय कुटुंबाना जीवनाची गुणवत्ता जी त्यांची स्वाभाविक अपेक्षा आहे, मध्यमवर्गीय आपल्या देशाला खूप काही देतात, त्यामुळे उत्तम जीवनशैलीची त्यांची अपेक्षा पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, सरकारी क्लिष्टतेपासून मुक्ततेची त्यांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करतो आहोत. आणि मी तर हे स्वप्न पहिले आहे की 2047 मध्ये विकसित भारत साकार करण्याचे जे भारताचे स्वप्न असेल त्याचा एक भाग असाही असेल की सामान्य माणसाच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमी असेल जिथे सरकारची गरज असेल तिथे अभाव नसेल आणि सरकारचा विनाकारण प्रभाव ही नसेल, अशा प्रकारची यंत्रणा तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आम्ही लहानातील लहान गरजांवर देखील लक्ष केंद्रित करत आहोत. आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहोत.  आमच्या देशातील गरिबांच्या घरातील चूल पेटणे महत्वाचे आहे, आपल्या मातांना कधी उपाशीपोटी झोपावे लागू नये, आमची मोफत उपचारांची योजना सुरु आहे. ऊर्जा, पाणी, इंधन हे सर्व आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. आणि आम्ही जेव्हा पूर्णत्वाबद्दल बोलतो तेव्हा ते शंभर टक्के असते. जेव्हा पूर्णत्वाची स्थिती असते तेव्हा तिथे जातीयवादाचा रंग नसतो, जेव्हा पूर्णत्वाची स्थिती असते तेव्हा त्याला पंथीयवादाचा रंग नसतो, जेव्हा पूर्णत्व हा मंत्र असतो तेव्हा खऱ्या अर्थाने सबका साथ, सबका विकास हा मंत्र असतो. लोकांच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमीतकमी असावा या दिशेनं आम्ही प्रयत्न केले आहेत. अनेक अटींच्या पूर्ततेचा ताण सामान्य माणसांवर असायचा, आम्ही ते दूर केले आहे, आम्ही त्या अटी दूर केल्या आहेत. 

आम्ही देशवासियांसाठी दीड हजारांहून अधिक कायदे रद्द केले आहेत. कायद्यांच्या जंजाळात देशवासी गुंतू नयेत यासाठी प्रयत्न केले आहेत. अगदी लहानसहान चुकीची शिक्षा म्हणून कारागृहात धाडण्याची शिक्षा असलेले कायदे रद्द केले. छोट्या छोट्या कारणांमुळे कारागृहात जाण्याची परंपरा असलेले कायदे आम्ही रद्द केले आहेत. आम्ही त्या कायद्यांना आमच्या यंत्रणेतून रद्दबातल केले आहे. आज आपण स्वातंत्र्याच्या वारशाच्या अभिमानाबद्दल जे बोलतो, कित्येक शतकांपासून आपल्याकडे जे फौजदारी कायदे प्रचलित होते, आज आम्ही त्या कायद्यांचे रूपांतर नवीन फौजदारी कायद्यात करून न्याय संहितेचे रूप देऊन ज्याचा मूलाधार दंड नव्हे तर नागरिकांना न्याय मिळावा या प्रबळ भावनेने आम्ही त्यांची निर्मिती केली आहे.

 

राहणीमान अनुकूलतेसाठी देशव्यापी मोहिमेवर काम सुरु आहे. प्रत्येक स्तरावरील सरकारी प्रतिनिधींना मी आवाहन करतो. मी प्रत्येक लोकप्रतिनिधी मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो किंवा कोणत्याही सरकारचा असो, मी अशा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी राहणीमान सुलभतेसाठी अंमलबजावणी स्तरावर पावले उचलली पाहिजेत. मी युवकांना आणि व्यावसायिकांना आवाहन करतो की तुम्ही जिथे कुठे आहात,  त्या ठिकाणच्या सर्व लहानसहान समस्या तुम्ही सरकारला पत्रांच्या माध्यमातून कळवा. सरकारला सांगा की या समस्या अगदी विनाकारण भेडसावत असून त्या दूर करण्यात काही नुकसान नाही. माझा विश्वास आहे की आज सर्व सरकारे संवेदनशील आहेत. मग ते कोणतेही सरकार असो, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असो, त्या समस्येचे निराकरण नक्कीच करतील. प्रशासनात सुधारण.. यासाठी आपल्याला 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांत अधिक जोमाने कार्य केले पाहिजे. 

सामान्य माणसाच्या जीवनात अनेक संधी निर्माण व्हाव्यात आणि सर्व अडथळे दूर व्हावेत. नागरिकांची प्रतिष्ठा म्हणजेच एक नागरिक म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळायला हवी, एखाद्या सेवेच्या वितरणात कधी कोणाला असे बोलावे लागू नये की हा तर माझा हक्क होता, मात्र मी त्यापासून वंचित राहिलो. त्यांना शोधाशोध करायला लागू नये. सरकारच्या प्रशासनात वितरण व्यवस्था अधिक मजबूत असणे आवश्यक आहे. तुम्ही पहा, जेव्हा आपण देशात सुधारणांची गोष्ट करतो, तेव्हा आज देशात सुमारे तीन लाख संस्था कार्यरत आहेत. मग ती ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, केंद्रशासित प्रदेश असो, राज्य असो, जिल्हास्तरीय असो, लहान मोठ्या अशा जवळ जवळ तीन लाख संस्था आहेत. आज मी या तीन लाख संस्थांना आवाहन करतो की जर तुम्ही तुमच्या स्तरावर सामान्य माणसांकरता दोन सुधारणा हाती घ्याल, माझ्या मित्रांनो मी जास्त सांगत नाही, केवळ दोन सुधारणा करा. मग ती पंचायत असो, राज्य सरकार असो, कोणताही भाग असो केवळ एका वर्षात दोन सुधारणा, आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबाजवणी करा, तुम्ही बघाल आपण पाहता पाहता एका वर्षात कमीतकमी 25 ते 30 लाख सुधारणा करू शकतो. जेव्हा 25 ते 30 लाख सुधारणा होतील तेव्हा सामान्य माणसाचा विश्वास किती वाढेल, त्यांचे सामर्थ्य राष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी किती उपयोगी पडेल. आणि म्हणूनच आपण आपल्या स्तरावर, होते आहे, चालते तसे चालू दे या मनोधारणेतून बाहेर येऊन परिवर्तनासाठी पुढे यावे, हिंमतीने पुढे यावे, सामान्य माणसाच्या गरजा अगदी लहान लहान आहेत, पंचायत स्तरावर सुद्धा त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्या समस्यांमधून त्यांची सुटका केल्यास मला पूर्ण विश्वास आहे की आपण या स्वप्नांना साकार करू शकतो. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आज देश आकांक्षांनी पूर्ण आहे. आपल्या देशाचे युवक नवीन पराक्रम करू इच्छित आहे,  नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत करून इच्छित आहे. आणि यासाठीच प्रत्येक क्षेत्रात कार्याला गती देण्याचा, कार्याला वेग देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिले म्हणजे आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण करत आहोत. दुसरे म्हणजे या परिवर्तनकारी व्यवस्थेला आवश्यक असलेले आधारभूत पायाभूत सेवा सुविधांचे नेटवर्क आहे, त्या बदलत्या व्यवस्थेला अनुरूप बदल आणून त्या सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या विषयाला आम्ही प्राधान्य दिले आहे, अधिक बळ दिले आहे. या तीनही घटकांनी भारतात एका महत्वाकांक्षी समाजाची निर्मिती केली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून समाज स्वतःच एका विश्वासाने परिपूर्ण आहे. आमच्या देशवासीयांच्या इच्छाआकांक्षा, त्यांच्या भाव भावना, आमच्या नवयुवकांची ऊर्जा यांची सांगड आपल्या देशाच्या सामर्थ्याशी घालून आम्ही देशाला पुढे घेऊन जात आहोत. मला विश्वास आहे की रोजगार आणि स्वयंरोजगार या क्षेत्रात विक्रमी संधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम केले आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न दुप्पट करण्यात आज आपण यशस्वी झालो आहोत.

जागतिक विकासात भारताचं योगदान मोठं आहे. भारताची निर्यात सातत्याने वाढते आहे, परकीय चलनसाठा सातत्याने वाढतो आहे, पुर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. जागतिक संस्थांचा भारताबद्दलचा विश्वास वाढला आहे.

मला विश्वास आहे. भारताची दिशा योग्य आहे, भारताच्या गतीनं वेग पकडला आहे. आणि भारताच्या स्वप्नांमध्ये सामर्थ्य आहे, मात्र या सगळ्या सोबत संवदनशीलतेचा आपला मार्ग, आपल्यासाठी उर्जेला एक नवी चेतना देत आहे. 

ममभाव ही आपली कार्यशैली आहे. समभावही हवा, ममभावही हवा, याच तत्वांच्या सोबतीनं आपण वाटचाल करत आहोत. 

सहकाऱ्यांनो,

जेव्हा मी कोरोना महामारीच्या काळ आठवतो.

कोरनासारख्या जागतिक महामारीच्या काळात सर्वात वेगानं अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणणारा जर कोणता देश असेल, तर तो भारत देश आहे. तेव्हा वाटतं की, आपली दिशा योग्य आहे. 

जेव्हा जात, पात, मत, पंथाच्या पलिकडे जात प्रत्येक घरी तिरंगा फडकवला जातो, तेव्हा वाटतं देशाची दिशा योग्य आहे.

आज संपूर्ण देश तिरंगा आहे, प्रत्येक घर तिरंगा आहे. कोणतीही जात नाही, कोणतीही पात नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. सर्वच भारतीय आहेत. हीच तर आपल्या दिशेची ताकद आहे.

जेव्हा आपण 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढतो, तेव्हा आपला विश्वास ठाम होतो की आपण गती योग्य तऱ्हेनं कायम राखली आहे, आणि स्वप्ने साकार होणं आता दूर नाही.  

जेव्हा 100 पेक्षा जास्त आकांक्षित जिल्हे, आपल्या आपल्या राज्यातील चांगल्या जिल्ह्यांसोबत स्पर्धा करू लागले आहेत, बरोबरी करू लागले आहेत, तेव्हा आपल्याला पटतं आपली दिशा आणि गती दोन्ही सामर्थशील आहे.

जेव्हा आपल्या त्या आदिवासी सहकाऱ्यांना ती मदत मिळते, पीएम जनधनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ज्या योजना पोहोचल्या होत्या. लोकसंख्या खूपच कमी आहे, मात्र अत्यंत दूरदूरच्या परिसरात छोटी छोटी कुटुंब वसली आहेत. आम्ही त्यांचा शोध घेतला आहे, त्यांची काळजी वाहिली आहे. तेव्हा कळतं की संवेदनशीलतेनं जेव्हा काम केलं जातं, तेव्हा किती आनंद मिळतो.

काम करणाऱ्या महिलांसाठी वेतनासह बाळंतपणाची रजा 12 आठवड्यांवरून वाढवून 26 आठवडे केली जाते, तेव्हा केवळ महिलांचा सन्मानच केला जातो असे नाही, महिलांप्रति संवेदनशील भावनेनं निर्णय घेतले जात आहेत केवळ इतकेच नाही, मात्र त्यांच्या गर्भात जे बाळ वाढतं आहे, त्याला एक उत्तम नागरिक बनवण्यासाठी आईची जी गरज असते, त्यात सरकार अडथळा ठरू नये या संवेदनशील भावनेनं असे निर्णय आम्ही घेत असतो.

जेव्हा माझे दिव्यांग बंधु भगिनी, जेव्हा भारतीय चिन्ह भाषेची गोष्ट असो, किंवा सुगम्य भारत अभियान असो, त्यांना वाटतं त्यांचीही प्रतिष्ठा आहे, माझ्या प्रति सन्मान आहे, देशाचे नागरिक सन्मानाच्या भावनेने पाहात आहेत. पॅरा ऑलिम्पिक मध्ये तर आपले खेळाडू नवी नवी ताकद दाखवू लागले आहेत, तेव्हा वाटतं की हा जो माझा मम भाव आहे, आपल्या सगळ्यांचा ममभाव आहे, त्याची ताकद दिसून येत आहे.

आपल्या तृतीयपंथी समाजासाठी आम्ही ज्या संवेदनशीलतेने निर्णय घेत आहोत. आम्ही नवे नवे कायदे बनवत आहोत, त्यांना सन्मानाचं जगणं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तेव्हा परिवर्तनाची आपली दिशा योग्य असल्याचे दिसते. 

सेवाभावनेनं केलेल्या या कामांचं, ज्या विविध मार्गांनी आपण वाटचाल करत आहोत, या कामांचे अगदी थेट लाभ त्याच्या परिणामांतून आपल्याला दिसून येत आहेत.

60 वर्षांनंतर सलग तिसऱ्या वेळी आपण आम्हाला देशसेवेची संधी दिली आहे. माझ्या 140 कोटी देशवासीयांनो, आपण जे आशिर्वाद दिले आहेत, त्या आशिर्वादात माझ्यासाठी एकच संदेश आहे, जनजनाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा आणि सेवाभावनेने समाजाची ताकद सोबत घेऊन विकासाच्या नव्या उंचीवर पोहचणं … ट्वेंटी फोर्टी सेवन, विकसीत भारताच्या स्वप्नांना घेऊन वाटचाल करणं, त्याच संदेशाच्या बाबतीत, आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून, आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी, मी कोटी कोटी देशवासीयांचे नतमस्तक होऊन आभार मानतो, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आहे. मी त्यांना विश्वासानं सांगू इच्छितो की आपल्याला नवी उंची, नव्या जोशानं पुढे वाटचाल करायची आहे. आपल्याला, केवळ जे झालंय त्यावरच समाधान मानून शातं बसणारे आपण नाही, ते आपले संस्कारच नाहीत. आम्ही आणखी काही करण्यासाठी, आणखी पुढे वाटचाल करण्यासाठी, आणि आखणी नवी उंची गाठण्यासाठी आम्ही पुढे वाटचाल करू इच्छितो. विकासासाठी, समृद्धीसाठी, स्वप्ने साकार करण्यासाठी, संकल्पांसाठी आपले आयुष्य देण्याला आम्ही आपला स्वभाव बनवू इच्छितो, देशवासीयांचा स्वभाव बनवू इच्छितो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज नवे शिक्षण धोरण, बहुतांश प्रमाणात अनेक राज्यांनी त्याबाबत चांगला पुढाकार घेतला आहे. आणि त्यामुळे आज एक 21 व्या शतकाला अनुरुप आपल्या शिक्षण व्यवस्थेला आम्ही जी बळकटी देऊ इच्छितो आणि विकसित भारताच्या स्वप्नासाठी ज्या प्रकारचा मानव समुह तयार करू इच्छितो. नव्या शैक्षणिक धोरणाची मोठी भूमिका असणार आहे.

माझी अशी इच्छा नाही की, माझ्या देशातल्या युवा वर्गाला आता परदेशात शिकण्यासाठी मजबूर व्हावं लागेल. मध्यमवर्गातील कुटुंबांचे लाखो करोडो रुपये मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याकरता खर्च व्हावेत. आम्ही इथे अशी शिक्षण व्यवस्था विकसित करू इच्छितो की, माझ्या देशातल्या युवा वर्गाला परदेशात जाण्याची गरजच पडणार नाही. माझ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना लाखो करोडो रुपये खर्च करायला लागू नयेत. इतकेच नाही अशा संस्था निर्माण होओत की विदेशातून लोक भारतात, त्यांची पावले इकडे वळतील.

आत्ता अलिकडेच आम्ही, बिहारचा, आपला इतिहास गौरवास्पद राहिला आहे. नालंदा विद्यापीठाचे पुनर्निर्माण केले आहे. पुन्हा एकदा नालंदा विद्यापीठ कार्यरत झाली आहे. मात्र आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा, अनंत काळ आधीच्या नालंदा स्पिरीटला जागृत करायला हवं. त्या नालंदा स्पिरीटला जगलं पाहीजे, त्या नालंदा स्पिरीटला सोबतीनं घेऊन मोठ्या विश्वासानं जगाच्या ज्ञानाच्या परंपरांना नवी चेतना देण्याचं काम करायला हवं.

मला पूर्ण विश्वास आहे की नव्या शैक्षणिक धोरणाने मातृभाषेवर भर दिला आहे. मी राज्य सरकारांना सांगू इच्छितो, मी देशातील सर्व संस्थांना सांगू इच्छितो, की भाषेच्या कारणाने आपल्या देशातल्या प्रतिभेसमोर कोणतेही अडथळे निर्माण व्हायला नकोत, भाषा अडथळा झाली नाही पाहिजे, मातृभाषेचे सामर्थ्य, आपल्या देशातील गरीबातल्या गरीब आईच्या बाळालाही स्वप्न पूर्ण करण्याचे बळ देते. आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या मातृभाषेत शिक्षण, जगण्यात मातृभाषेचे स्थान, कुटुंबात मातृभाषेचे स्थान, त्या दिशेवरच आपल्याला भर द्यावा लागेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

ज्या प्रकारे आज जगात बदल घडून येत आहेत. आणि तेव्हा कुठे कौशल्याचे महत्व खूप वाढू लागले आहे. आणि आम्ही कौशल्याला आखणी नवं बळ देऊ इच्छितो. आम्ही इंडस्ट्री 4.0 ला गृहीत धरून, आम्ही कौशल्य विकास घडवून आणू इच्छितो. आम्ही जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात, आम्ही कृषी क्षेत्रातही क्षमतावृद्धीसाठी कौशल्य विकास करू इच्छितो. आम्ही तर आपलं सफाई क्षेत्र आहे, त्यातही एका नव्या कौशल्य विकासाच्या दिशेवर भर देऊ इच्छितो. आणि आम्ही कौशल्य विकास कार्यक्रमाला यावेळी मोठ्या व्यापक स्वरुपात घेऊन आलो आहोत. अर्थसंकल्पातही याबाबत खूप मोठे....या अर्थसंकल्पात इंटर्नशीपवरही आम्ही भर दिला आहे, जेणेकरून आपल्या युवा वर्गाला काहीएक अनुभव मिळावा, त्यांची क्षमतावृद्धी व्हावी. आणि बाजारपेठेत त्यांची ताकद दिसावी या तऱ्हेनं मी त्यांच्यासाठी कौशल्य विकास घडवून आणू इच्छितो. आणि जे असंख्य युवा आहेत, आणि मित्रांनो आज जगाची परस्थिती पाहून मी अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतोय की भारताचे जे कुशल मनुष्यबळ आहे, आपले जे कौशल्यधारीत युवा आहेत, ते जागतिक रोजगाराच्या बाजारपेठेत आपली चमक दाखवतील, आम्ही त्या स्वप्नाला सोबतीला घेऊन पुढे वाटचाल करत आहोत.

सहकाऱ्यांनो जग ज्या वेगाने बदलत आहे, जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्व वाढत जाणार आहे. आपल्याला विज्ञानावर मोठा भर देण्याची गरज आहे. आणि मी पाहीलंय चंद्रयानाच्या यशानंतर आपल्या शाळा आणि महाविद्यालंयांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रती एक नवीन आवडीचं वातावरण वाढू लागलं आहे, नवे स्वारस्य निर्माण झाले आहे. हा जो, हा जो मनोदय झाला आहे, त्याला आकार देण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. भारत सरकारनेही संशोधनासाठीचे पाठबळ वाढवले आहे. आम्ही जास्तीत जास्त संस्थाने स्थापन केली आहेत. आम्ही राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करून आम्ही त्याला कायदेशीर स्वरुप देऊन स्थायी स्वरुपातील व्यवस्था स्थापन केली आहे, जेणेकरून संशोधनाला सातत्यपूर्ण पाठबळ मिळत राहील, आणि संशोधन संस्थांनी त्यांचे काम करावे. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, अर्थसंकल्पात आम्ही 1 लाख कोटी रुपये संशोधन आणि नवोन्मेषासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, जेणे करून आपल्या देशातल्या युवा वर्गात मनात ज्या कल्पना आहेत, त्यांना आपण प्रत्यक्षात मूर्त रुप देऊ शकू.

सहकाऱ्यांनो,

आजही आपल्या देशात, वैद्यकीय शिक्षणासाठी आपली मुलं बाहेर जात आहेत. त्याबाबत बोलायचं तर त्यातली जास्त जास्त मुलं ही मध्यवर्गीय कुटुंबातली आहेत. त्यांचे लाखो करोडो रुपये खर्च होऊन जातात. आणि तेव्हा कुठे आम्ही मागच्या दहा वर्षात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा जवळपास एक लाखाच्या वर केल्या आहेत. आज मी, जवळपास 25 हजारापेक्षा जास्त युवा दरवर्षी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. आणि अशा अशा देशात जावं लागतं, कधी कधी ते ऐकून मी अचंबित होऊन जातो. आणि त्यासाठीच आम्ही ठरवलंय की, पुढच्या पाच वर्षात वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नव्या प्रवेशाच्या जागा निर्माण केल्या जातात.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

विकसित भारत 2047 हा आरोग्यदायी भारतही असायला हवा. आणि जेव्हा आरोग्यदायी भारताबद्दल बोलायचे तर आज जी मुलं लहान आहेत, त्यांच्या पोषणावर आजपासूनच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आम्ही विकसित भारताची जी पहिली पिढी आहे, त्यांच्यावर विशेषत्वाने लक्ष केंद्रीत करून आम्ही पोषणाचं एक अभियान चालवलं आहे. आम्ही राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केलं आहे. पोषणाला आम्ही प्राधान्य दिलं आहे. 

माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो,

आपल्या कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे. आपण अनंत काळापासून ज्या परंपरांच्या दबावाखाली आहोत, जखडून गेलो आहोत, त्यापासून मुक्ती मिळवावी लागेल. आणि आपल्या शेतकऱ्यांना आम्ही त्यासाठी मदतही पुरवत आहोत. आम्ही त्यांच्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने काम करत आलो आहोत. आज सुलभ कर्ज देत आहोत शेतकऱ्यांना, तंत्रज्ञानाची मदत देत आहोत, शेतकरी जे उत्पन्न घेतात त्याच्या मूल्य वर्धनासाठी आम्ही काम करत आहोत, त्यांच्या विवणनासाठीची सर्व व्यवस्थाही पाहतो आहोत, जेणे करून त्यांना सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार म्हणून काहीएक व्यवस्था उपलब्ध असावी, त्या दिशेनेच आम्ही काम करत आहोत. 

आज जेव्हा धरणी मातेसाठी सर्व जग चिंतेत आहे. ज्या प्रकारे खतांच्या मात्रेमुळे आपल्या धरणी मातेचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. आपल्या धरणी मातेची उत्पादन क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे, कमी होऊ लागली आहे. आणि अशावेळी मी माझ्या देशाच्या लाखो शेतकऱ्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला आहे, आणि आपल्या धरणी मातेची सेवा करण्याचाही त्यांनी विडा उचलला आहे. आणि यावेळी अर्थसंकल्पातही आम्ही सेंद्रीय शेतीला पाठबळ देण्यासाठी खूप मोठ्या योजनांसह, अर्थसंकल्पात खूप मोठ्या तरतुदी केल्या आहेत. 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज मी जगाची परिस्थिती पाहतो आहे. संपूर्ण जग सर्वंकष आरोग्याच्या दिशेने वळू लागले आहे. आणि तेव्हा त्यांना, सेंद्रीय खाद्यान्न हे त्यांचे पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य झाले आहे. आज जगासाठी सेंद्रीय खाद्यान्नाचा, जर कोणी खाद्यान्नाचा पेटारा होऊ शकतो, तर तो माझ्या देशाचा शेतकरी बनू शकतो, माझा देश बनू शकतो. आणि त्यामुळेच आम्ही येत्या काळात ते स्वप्न घेऊन पुढे वाटचाल करू इच्छितो, जेणेकरून सेद्रिय खाद्यान्नाची जी जगाची मागणी आहे, त्या सेंद्रीय खाद्यान्नाचा पेटारा आपला देश कसा होऊ शकेल. शेतकऱ्याचं जगणं सुलभ व्हावं, गावात सर्वोच्च दर्जाची इंटरनेटची जोडणी उपलब्ध व्हावी, शेतकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्यासाठी स्मार्ट शाळा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, छोट्या छोट्या शेतीच्या तुकड्यांवर आता संपूर्ण कुटुंबाचे जगणे आज कठीण होऊ लागले आहे, अशा वेळी त्यांच्या युवा मुलांना अशी कौशल्ये उपलब्ध व्हावीत की, जेणेकरून त्यांना नवे रोजगार मिळावेत, नवी उत्पन्नाची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वंकष प्रयत्न आम्ही करत आहोत.

गेल्या काही वर्षांत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रारुपावर आम्ही काम केले आहे. नवोन्मेष असो, रोजगार असो, उद्यमशीलता असो प्रत्येक क्षेत्रात महिलांची पावलं पुढे पडत आहे. महिलांचा केवळ सहभाग वाढतो आहे असे नाही, महिला नेतृत्व उभे करू लागल्या आहेत. आज अनेक क्षेत्रात, आज आपल्या संरक्षण क्षेत्राकडे पाहा, आपलं हवाई दल, आपलं लष्कर असो, आपलं नौदल असो, आपलं अंतराळ क्षेत्र असो, आपल्या आपल्या महिलांची ताकद आपण पाहात

जगासाठी आज फूड बास्केट कोणी बनू शकत असेल, तर तो आपला देश आहे. आपल्या  देशातील शेतकरी आहे. जगाची सेंद्रिय अन्नाची गरज आपण भागवू शकतो. शेतकऱ्यांच्या मुलांना असे कौशल्य मिळेल, की ते त्यांच्या रोजगाराचे साधन बनेल. याची सर्वसमावेशक योजना आम्ही तयार करत आहोत.

प्रत्येक क्षेत्रात महिलांचे पाऊल पुढे पडत आहे. पण दुसरीकडे चिंतेची गोष्ट लक्षात येत आहे. आज लाल किल्ल्यावरून एक समस्या आपल्या समोर ठेवायची आहे. आज आपल्या माता, भगिनी कान्या, यांच्यावर अत्याचार होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. आपल्या राज्य सरकारांना ते गांभीर्याने घ्यावे लागेल. अशा राक्षसी कृत्यांना कडक शासन व्हायला हवे. मिडिया मध्ये या बातम्या पसरतात, मात्र राक्षसी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झाल्याच्या बातम्या प्रसारित होत नाहीत. त्यांना कडक शिक्षा मिळणे गरजेचे आहे. जेणे करून असे दुष्कृत्य करणार्‍यांच्या मनात दहशत निर्माण होईल.

मित्रांनो,

एके काही आपल्या देशात खेळण्यांची आयात होत असे. आपल्याकडे खेळणी बाहेरून येत होती. पण आज मी अभिमानाने सांगू शकतो, की आज माझ्या देशात खेळण्यांचे उत्पादन होत आहे, आणि खेळणी निर्यातही होत आहेत. आज माझ्या देशातील खेळणी जगभर पोहोचत आहेत. आज माझ्या देशातून खेळणी निर्यात होऊ लागली. आपण आज मोबाईल फोनही जगभर निर्यात करू लागलो आहोत. ही भारताची ताकद आहे. आम्ही सेमी कंडक्टर उपकरणांच्या क्षेत्रात काम सुरु केले. आपल्याकडे अफाट प्रतिभा आहे. जगाला अत्याधुनिक उपाय देण्याची क्षमता आमच्यात आहे. आज प्रत्येक उपकरणामध्ये आपण वेगाने पुढे चाललो आहोत. जगात वेगाने 5 जी पोहोचवण्यात आपण आघाडीवर आहोत. आपण 6 जी वर काम करत आहोत, आणि मला खात्री आहे, यातही आपण जगात नाव मिळवू.

संरक्षण बजेट जाते कुठे, तर ते परदेशातून होणार्‍या आयातीवर खर्च होते. पण आम्ही ठरवले आहे, की संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर बनू. आज संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत पुढे जात आहे. हळूहळू या क्षेत्रातही आपण प्रगती करत आहोत.

एफ डी आय, एमएसएमई ना मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे आपण जगाचे उत्पादन केद्र बनलो आहोत. आम्ही जनभागीदारी सुरु केली आहे. जेणे करून आपण कौशल्य विकासचे उद्दिष्ट साध्य करू.

आज जगातील मोठ मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्यांना आपल्याकडे यायचे आहे. आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मी राज्य सरकारांना आवाहन करतो, प्रत्येक राज्यसरकारने गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना बनवावी. प्रत्येक राज्य निरोगी स्पर्धेत उतरेल. धोरणे बनवेल. जागतिक मागणीच्या अनुषंगाने ते आपली धोरणे निश्चित करतील. जे गुंतवणूकदार येत आहेत, ते कधीच मागे फिरणार नाहीत. आपल्या जुन्या सवयी सोडून आपण स्पष्ट धोरणे घेऊन पुढे जाऊ.

मित्रांनो,

भारत आपल्या सर्वोत्तम दर्जासाठी ओळखला जावा, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्याला प्रयत्न करायचा आहे, भारतीय दर्जा, आंतरराष्ट्रीय दर्जा बनावा. म्हणूनच आपल्याला उत्तम दर्जाच्या मुद्द्यावर काम करायचे आहे.  

डिझाईन इन इंडिया हे आवाहन  घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर वर्ल्ड हे स्वप्न बाळगून पुढे जायचे आहे. मी पाहत आहे, गेमिंग विश्वाची खूप मोठी बाजारपेठ उभी आहे. मात्र आजही गेमिंगच्या क्षेत्रातला प्रभाव , विशेषतः ते बनवणारे लोक , मेहनत करणारे लोक, विदेशी कमाई आहे. भारताकडे खूप मोठा वारसा आहे. आपण गेमिंगच्या क्षेत्रात मोठी प्रतिभा घेऊन जाऊ शकतो. जगातील प्रत्येक मुलाला भारतात बनलेल्या खेळांप्रती आकर्षित करू शकतो. मला वाटते भारतातील मुले, भारतातील युवक भारतातील आयटी व्यावसायिक, कृत्रिम बुद्धिमत्तेतील व्यावसायिक , यांनी गेमिंगच्या विश्वाचे नेतृत्व करावे. गेमिंगच्या विश्वात आपली उत्पादने पोहचायला हवीत. आणि सम्पूर्ण जगात आपले ऍनिमेटर्स काम करू शकतात. अनिमेशन विश्वात आपण आपला दबदबा निर्माण करू शकतो. त्या दिशेने आपण काम करायला हवे.

आज जगभरात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल प्रत्येक क्षेत्रात चिंता आणि चर्चेचा विषय बनला आहे. भारताने त्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. आपण जगाला आश्वस्त करत आलो आहोत, आपण शब्दांमधून नाही तर आपल्या कामांमधून, प्राप्त निष्कर्षांमधून आपण जगाला आश्वस्त देखील केले आहे आणि अचंबित देखील केले आहे. आपण एकदा वापरायच्या प्लास्टिकवर बंदी घातली. आपण नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार केला आहे.आपण नवीकरणीय ऊर्जेला नवी ताकद दिली आहे. आगामी वर्षांमध्ये आपण नेट झिरो भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. मला आठवतंय पॅरिस करारात ज्या देशांनी आपले लक्ष्य निर्धारित केले होते, 

मी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन आपल्या देशवासीयांची ताकद संपूर्ण जगाला सांगू इच्छितो , जी २० देशाचा गट जे करू शकला नाही ते माझ्या देशाच्या नागरिकांनी करून दाखवले आहे. माझ्या देशवासीयांनी करून दाखवले आहे, भारताने करून दाखवले आहे. पॅरिस करारामध्ये आपण जे लक्ष्य निर्धारित केले होते , ते मुदतीपूर्वी पूर्ण करणारा जी २० देशांच्या गटात जो कोणी असेल तर तो एकमेव माझा हिंदुस्थान आहे  एकमेव माझा  भारत आहे. याचा अभिमान वाटतो, नवीकरणीय ऊर्जेचे लक्ष्य आपण पूर्ण केले आहे. २०३० पर्यंत  नवीकरणीय ऊर्जेला ५०० गिगावॅट पर्यंत न्यायचे आहे, कल्पना करू शकता किती मोठे लक्ष्य आहे , जगभरातील लोक ५०० गिगावॅट शब्द ऐकतात ना तेव्हा माझ्याकडे अचंबित होऊन पाहत असतात , मात्र आज मी विश्वासाने सांगतो

देशवासियांनो,

हे  लक्ष्य पूर्ण करून दाखवू, हे आपल्या मानवजातीची सेवा करेल. आपल्या भविष्याची सेवा करेल, आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याची हमी बनेल. आम्ही २०३० पर्यंत आपल्या  रेल्वेसाठी नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य घेऊन चाललो आहोत.

मित्रानो, 

पीएम सूर्यघर मोफत वीज योजना याला नवी ताकद देणार आहे. आणि हे बदलाचे फळ माझ्या देशातील सामान्य कुटुंबांना, विशेषतः मुलांना मिळेल, विजेच्या बिलापासून मुक्त होतील. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. पीएम सूर्यघर योजनेद्वारे जो वीज उत्पादन करतो, त्याचा वाहनाचा प्रवास खर्च तो कमी करू शकतो. हरित हायड्रोजन मिशनच्या मदतीने जागतिक केंद्र बनायचे आहे. अतिशय वेगाने धोरणे आखली गेली, वेगाने त्याची अंमलबजावणी होत आहे आणि भारताला  हरित हायड्रोजन , एका नव्या ऊर्जेच्या दिशेने पुढे जायचे आहे. आणि हे सर्व प्रयत्न सुरु आहेत , हवामानाची चिंता तर आहेच, जागतिक तापमानवाढीची चिंता आहेच, मात्र यातून हरित रोजगार निर्माण होण्याच्या अमाप संधी आहेत. म्हणूनच आगामी काळात हरित रोजगाराचे महत्व वाढणार असून त्याचा सर्वप्रथम लाभ घेण्यासाठी , माझ्या युवकांना संधी देण्यासाठी , हरित रोजगारासाठी खूप  मोठ्या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहोत.

आज आपल्याबरोबर तिरंगी झेंड्याखाली जे युवा बसले आहेत.त्यांनी ऑलींपिकच्या जगात भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. मी देशातील  सर्व खेळाडूंचे १४० कोटी देशवासियांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आपण नवीन स्वप्ने, नवे संकल्प , नव्या पुरुषार्थासह नवे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढे मार्गक्रमण करतील  या विश्वासासह मी त्यांना शुभेच्छा देतो.  आगामी काळात भारताचे मोठे पथक पॅरालिम्पिक साठी पॅरिसला रवाना  होणार आहे. मी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या  खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 

मित्रांनो,

भारताने जी २० चे भव्य आयोजन केले. देशात अनेक शहरांमध्ये  आयोजन केले. २०० हून अधिक कार्यक्रम केले. जगभरात जी २० चे एवढे कार्यक्रम , एवढा व्याप यापूर्वी  कधीच झाले नव्हते. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की भारताकडे अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सामर्थ्य आहे. आदरातिथ्यचे सामर्थ्य अन्य देशांपेक्षा भारताकडे अधिक आहे. हे सिद्ध झाले आहे आणि भारताचे स्वप्न आहे २०३६ मधील  ऑलिम्पिक स्पर्धा भारतभूमीवर  व्हाव्यात यासाठी तयारी करत आहोत, प्रयत्न करत आहोत.

मित्रहो, 

समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचायचे आहे.हे आपले सामाजिक दायित्व आहे , जर कुणी मागे राहिले तर त्यामुळे आपली पुढे जाण्याची गती कमी होते. म्हणूनच आपल्याला पुढे जायचे असले तरीही यश तेव्हाच मिळते, जेव्हा मागच्या व्यक्तीला  बरोबर घेऊन जातो. म्हणूनच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या समाजात आजही जे क्षेत्र मागे राहिले आहेत, जो समाज मागे राहिला आहे, जे लोक मागे राहिले आहेत , आपले छोटेछोटे शेतकरी असतील,   जंगलात राहणारे आदिवासी बंधु भगिनी असतील, आपल्या माता भगिनी असतील ,  मजूर, कामगार असतील   या सर्वांना बरोबर आणण्यासाठी भरपूर  प्रयत्न करायचे आहेत. आता गती पकडली आहे, जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, लवकरच ते आपल्यापर्यंत पोहचतील, आपल्या बरोबर येतील. आपली ताकद खूप वाढेल. अतिशय संवेदनशीलतेने आपल्याला हे काम करायचे आहे. आणि यासाठी  एक मोठी संधी येत आहे. 

मला वाटते कि संवेदनशीलतेच्या दृष्टीने याहून मोठी संधी काय असू शकते. आपल्याला माहित  आहे, आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या आधीही इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारा  आपल्या देशातला एक आदिवासी युवक होता. २०-२२व्या वर्षी त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. आज भगवान  बिरसा मुंडा म्हणून त्यांची लोक पूजा करतात. भगवान  बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती येत आहे.  ती आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी बनावी.  समाजाप्रती छोटयातील छोटी व्यक्ती देखील देशासाठी काही करून दाखवायची इच्छा बाळगतो,  त्याहून अधिक मोठी प्रेरणा भगवान  बिरसा मुंडा यांच्याशिवाय कोण असू शकते. चला भगवान  बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करू तेव्हा संवेदनशीलता, वाढवावी, समाजाप्रती ममत्वाची भावना वाढीस लागावी , आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला , गरीब, मागास आदिवासी यांना बरोबर घेऊन जाऊ या संकल्पासह पुढे जायचे आहे.

'माझ्या प्रिय देशवासियांनो',

संकल्पांसह पुढे जात आहोत.  खूप पुढे जात आहोत , मात्र हे देखील खरे आहे की काही लोकांना प्रगती बघवत नाही.  भारताचे चांगले झालेले पाहू शकत नाहीत.स्वतःचे भले होत नाही तोवर त्यांना दुसऱ्याचे भले झालेले पाहवत नाही. अशी विकृत मानसिकता असलेल्यांची कमतरता नाही. देशाचे अशा लोकांपासून संरक्षण करावे लागेल. हे निराशेच्या गर्तेत बुडालेले लोक आहेत. असे निराशेच्या गर्तेत बुडालेले लोक, जेव्हा त्यांच्या मनात विकृती वाढीस लागते  तेव्हा ती विनाशाचे , सर्वनाशाचे कारण बनते.  तेव्हा देशाचे एवढे मोठे नुकसान होते, ज्याची भरपाई करण्यासाठी आहे, हि विकृती विनाशाची स्वप्न पाहत आहे.  देशाला हे समजून घ्यावे लागेल.. मात्र मी देशवासियांना सांगू इच्छितो की आपण चांगल्या हेतूने, प्रामाणिकपणे, राष्ट्राप्रती समर्पणाच्या भावनेने या परिस्थितीतही विपरीत मार्गावर जाणाऱ्यांचे मन जिंकू .देशाला पुढे नेण्याच्या आपल्या संकल्पात  कधी मागे हटणार नाही हा विश्वास देतो.
 

मित्रहो, 

अनेक आव्हाने आहेत,अगणित आव्हाने आहेत,  अंतर्गत आहेत, बाह्य आव्हाने देखील  आहेत. जसजसे आपण ताकदवान बनू , आपला दबदबा वाढेल, आव्हाने वाढणार आहेत.  मला याचा अंदाज  आहे. मी अशा शक्तींना सांगू इच्छितो कि भारताचा विकास कोणासाठीही संकट घेऊन येत नाही; आपण समृद्ध होतो तेव्हाही आपण जगाला  युद्धाची झळ सोसू दिली नाही. भारत हा बुद्धाचा देश आहे, 'युद्ध' हा आमचा मार्ग नाही, म्हणूनच भारत विकसित होण्याची जगाने काळजी करू नये. मी जागतिक समुदायाला आश्वस्त करतो की तुम्ही भारताचे संस्कार समजून घ्या, भारताचा हजारो वर्षांचा इतिहास समजून घ्या. आमच्यावर संकटे लादू नका. संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य ज्या भूमीत आहे तिला अधिक मेहनत करावी लागेल अशी स्थिती निर्माण करू नका. मात्र तरीही मी देशवासियांना सांगू इच्छितो कि कितीही आव्हाने असोत , आव्हानांना आव्हान देणं हा भारताचा स्वभाव आहे, आम्ही थकणार न्हाई, आम्ही थांबणार नाही .  राष्ट्राची स्वप्न साकारण्यात , देशवासियांचे भाग्य बदलण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. वाईट हेतू असणाऱ्यांना आम्ही उदात्त हेतूने जिंकू हा मी विश्वास देतो.

समाजाची मनोरचना, बदल कधी कधी आव्हानांचे कारण बनते. आपल्या प्रत्येक देशवासियाला भ्रष्टाचाराची झळ सोसावी लागली आहे. प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचाराने सामान्य माणसाचा व्यवस्थेवरील विश्वास तोडला आहे. योग्यता, क्षमताप्रति अन्यायाची त्याला जी चीड आहे त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होतो. म्हणूनच मी भ्रष्टाचाराविरोधात युद्ध पुकारले आहे. मला माहित आहे. याची किंमत मला चुकवावी लागेल, माझ्या प्रतिष्ठेला झळ बसेल, मात्र राष्ट्रापेक्षा मोठी माझी प्रतिष्ठा असू शकत नाही. राष्ट्रापेक्षा मोठे माझे स्वप्न नाही. म्हणूनच प्रामाणिकपणे  भ्रष्टाचाराविरोधात माझा लढा सुरूच राहील. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई नक्कीच होईल. मला  भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी भीतीचे वातावरण तयार करायचे आहे कारण नागरिकांना लुटण्याची जी परंपरा बनली आहे ती मला तोडायची आहे.मात्र सर्वात मोठे नवीन आव्हान आले आहे , भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहेच मात्र समाज जीवनात उच्च स्तरावर एक परिवर्तन आले आहे ते सर्वात मोठे एक आव्हान आहे आणि समाजासाठी चिंतेची बाब देखील आहे. कुणी कल्पना करू शकते का माझ्याच देशात महान संविधान असूनही असे लोक पुढे येत आहेत जे भ्रष्टाचाराचे गुणगान गट आहेत, त्याचा  जयजयकार उघडपणे  करत आहेत. समाजात अशा प्रकारची बीजे पेरण्याचा प्रयत्न होत आहे, भ्रष्टाचाराचा उदोउदो होत आहे , भ्रष्टाचार फोफावण्याचा निरंतर प्रयत्न केला जात आहे तो निकोप समाजासाठी आव्हान बनले आहे, मोठी चिंतेची बाब बनत आहे. भ्रष्टाचाऱ्यांपासून समाजात अंतर राखले तरच त्याच्या मनात भीती निर्माण होईल. जर त्याचा जयजयकार झाला तर आज जो भ्रष्टाचार करत नाही त्याला हे प्रतिष्ठेचे कारण वाटेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

बांगला देशात जे काही झाले आहे, त्या संदर्भात शेजारी देश या नात्याने चिंता वाटणे... मी हे समजू शकतो, मी अशी आशा करतो,  तिथली परिस्थिती लवकरच सामान्य होईल, विशेषतः 140 कोटी देशवासियांची चिंता, की तेथील हिंदू, तेथील अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित व्हावी. भारताची नेहमीच अशी इच्छा असते की आपले शेजारी देश सुख आणि शांततेच्या मार्गावर चालावेत. शांततेविषयी आपली वचनबद्धता आहे, आपले संस्कार आहेत. आगामी काळात बांगलादेशच्या विकासयात्रेत नेहमीच आपले शुभचिंतनच असेल, कारण आपण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे लोक आहोत. 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, भारताच्या संविधानाच्या 75 वर्षांचा प्रवासात, देशाला एकसंध राखण्यात, देशाला श्रेष्ठ बनवण्यात खूप मोठी भूमिका राहिली आहे. भारताच्या लोकशाहीला बळकटी देण्यात आपल्या देशाच्या संविधानाची खूप मोठी भूमिका राहिली आहे. आपल्या देशातील दलित, पीडित, शोषित, वंचितांना सुरक्षा देण्याचे खूप मोठे काम, आपल्या संविधानाने केले आहे. आता ज्यावेळी आपण संविधानाची 75 वर्षे साजरी करणार आहोत, त्यावेळी आपण सर्व देशवासियांनी संविधानात निर्दिष्ट कर्तव्याच्या भावनेवर जोर देण्याची नितांत गरज आहे. आणि जेव्हा मी कर्तव्याविषयी बोलतो तेव्हा मला केवळ नागरिकांवर ओझे टाकायचे नाही, कर्तव्ये केंद्र सरकारची देखील आहेत. कर्तव्ये केंद्र सरकारच्या आपल्यासारख्या सेवकांची देखील आहेत. कर्तव्ये राज्य सरकारांची देखील आहेत, राज्य सरकारच्या सेवकांची आहेत. कर्तव्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहेत. मग त्या पंचायती असोत, नगरपालिका असोत, महानगरपालिका असोत, तालुका असो, जिल्हा असो, प्रत्येकाची आहेत. पण त्याबरोबरच 140 कोटी देशवासियांची कर्तव्ये आहेत. आपण सर्वांनी एकत्रितपणे, आपल्या कर्तव्यांचे पालन केले, तर आपण आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे कारण बनू. आणि ज्यावेळी कर्तव्याचे पालन होते त्यावेळी अधिकारांचे रक्षण निहीत होते. त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. माझी अशी इच्छा आहे की आपली ही भावना ठेवून आपण वाटचाल केली तर आपली लोकशाही देखील बळकट होईल, आपले सामर्थ्य आणखी वाढेल आणि आपण एका नव्या शक्तीने पुढे जाऊ. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने वारंवार समान नागरी कायद्याबाबत जी चर्चा केली आहे, अनेक वेळा आदेश दिले आहेत, कारण देशातील एका खूप मोठ्या वर्गाला असे वाटते आणि ते खरे देखील आहे. की जी नागरी संहिता घेऊन आपण जीवन जगत आहोत, ती संहिता तर एका प्रकारे जातीयवादी संहिता आहे, भेदभाव करणारी नागरी संहिता आहे, अशा नागरी संहितेने ज्यावेळी संविधानाची 75 वर्षे साजरी करत आहोत आणि संविधानाची भावना देखील आपल्याला हे करायला सांगत आहे, देशाचे सर्वोच्च न्यायालय देखील आपल्याला हे करायला सांगत आहे आणि त्यावेळी संविधानाच्या निर्मात्यांचे जे स्वप्न होते, ते स्वप्न पूर्ण करण्याचे आपल्या सर्वांचे दायित्व आहे आणि मला असे वाटते की या गंभीर विषयावर देशात चर्चा व्हावी. व्यापक चर्चा व्हावी, प्रत्येक जण आपले विचार घेऊन यावा, आणि त्या कायद्यांना, जे कायदे धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करतात, जे उच्च-नीचतेचे कारण बनतात, अशा कायद्यांचे आधुनिक समाजात कोणतेही स्थान असू शकत नाही, आणि म्हणूनच तर मी असे सांगेन की आता काळाची ही गरज आहे की देशात एक धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असावी. आपण जातीयवादी नागरी संहितेसोबत 75 वर्षे व्यतित केली आहेत. आता आपल्याला धर्मनिरपेक्षा नागरी संहितेकडे वळावे लागेल. आणि तेव्हा कुठे देशात जे धर्माच्या आधारावर भेदभाव होत आहेत, सामान्य नागरिकाला जे अंतर जाणवत आहे, त्यापासून मुक्ती मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

जेव्हा मी देशात नेहमीच एक चिंता व्यक्त करताना सांगतो, घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीची अपरिमित हानी करत आहेत. देशाला, देशातील राजकारणाला घराणेशाहीपासून आपल्याला मुक्त करावे लागेल, आज आपण... मी पाहात आहे, माझ्यासमोर जे युवा बसले आहेत, त्यावर लिहिले आहे, माय भारत. ज्या संघटनेचे नाव आहे त्याचे वर्णन लिहिले आहे. खूपच उत्तम रितीने लिहिलेले आहे. माय भारतची अनेक मिशन आहेत. एक मिशन हे देखील आहे की आपण लवकरात लवकर देशात, राजकीय जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून एक लाख अशा तरुणांना पुढे आणायचे आहे, सुरुवातीला... एक लाख तरुणांना पुढे आणायचे आहे, ज्यांच्या कुटुंबात कोणाचीही कोणत्याही प्रकारे राजकीय पार्श्वभूमी नसेल. ज्याचे आई-वडील, भाऊ-बहीण, काका, मामा-मामी हे कधीही राजकारणात नव्हते. कोणत्याही पिढीत नव्हते, अशा होतकरू युवांना, तरुण रक्त, एक लाख, मग ते पंचायतीमध्ये येवोत, नगरपालिकेत येवोत, जिल्हा परिषदांमध्ये येवोत, विधानसभेत येऊ देत किंवा लोकसभेत येऊ देत. एक लाख तरुण, ज्यांचा कोणत्याही प्रकारे राजकीय इतिहास नसेल. असे ताज्या दमाचे लोक राजकारणात यावेत जेणेकरून जातीयवादापासून मुक्ती मिळावी, घराणेशाहीपासून मुक्ती मिळावी, लोकशाहीला समृद्धी मिळावी आणि त्यांनी कोणत्याही एकाच पक्षात जावे असे काही गरजेचे नाही, त्यांना जो आवडेल त्या पक्षात जावे, त्या पक्षात जाऊन त्यांनी लोकप्रतिनिधी बनून पुढे यावे. देशाने हे ठरवून चालावे की आगामी दिवसात असे एक लाख तरुण ज्यांचा घराणेशाहीच्या राजकारणाशी दुरान्वयाने संबंध नाही, असे ताज्या दमाचे रक्त असलेले लोक आले तर विचारसरणी देखील नवी असेल. सामर्थ्य देखील नवे येईल, लोकशाही समृद्ध होईल, आणि म्हणूनच आपल्याला या दिशेने पुढे जावे लागेल. मला असे वाटते, की देशात वारंवार होत राहणाऱ्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनतात, गतिरोध निर्माण करतात, आज कोणत्याही योजनेला निवडणुकांशी जोडणे सोपे झाले आहे कारण दर तीन महिने, सहा महिन्यांनी कुठे ना कुठे निवडणुका होतच असतात, कोणतीही योजना जाहीर केली तर प्रसारमाध्यमांमध्ये सांगितले जाते की निवडणूक आली तर अमुक झाले, निवडणूक आली तर तमुक झाले. प्रत्येक कामाला निवडणुकीचा रंग लावला जातो, आणि म्हणूनच देशात व्यापक चर्चा झाली आहे, सर्व राजकीय पक्षांनी आपले विचार मांडले आहेत. एका समितीने खूपच चांगल्या पद्धतीने आपला अहवाल तयार केला आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ साठी देशाला पुढे यावे लागेल. मी लाल किल्ल्यावरून तिरंग्याच्या साक्षीने देशाच्या राजकीय पक्षांना हा आग्रह करत आहे, देशाच्या संविधानाचे ज्ञान असलेल्या लोकांना आग्रह करतो, की भारताच्या प्रगतीसाठी भारताच्या संसाधनांचा सर्वाधिक वापर सर्वसामान्यांसाठी व्हावा यासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ चे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पुढे आले पाहिजे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

भारताचा स्वर्णिम कालखंड आहे 2047, विकसित भारत आपली प्रतीक्षा करत आहे. अडचणी, अडथळे, आव्हाने या सर्वांना पराभूत करून एका संकल्पाने वाटचाल करण्यासाठी हा देश वचनबद्ध आहे. आणि समोर मी हे स्पष्टपणे पाहात आहे, माझ्या विचारात कोणतीही साशंकता नाही, माझ्या स्वप्नांसमोर कोणताही आडपडदा नाही, मी स्पष्टपणे हे पाहू शकतो, 140 कोटी देशवासियांच्या परिश्रमाने, आपल्या पूर्वजांचे रक्त आपल्या नसानसात आहे, जर ते 40 कोटी लोक देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात, तर 140 कोटी देशवासी समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू शकतात. 140 कोटी देशवासी विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतात. मी यापूर्वीच सांगितले होते की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात देश तिसरी अर्थव्यवस्था तर बनेलच पण मी तीन पट काम करेन, तीन पट वेगाने काम करेन, तिप्पट व्यापकतेने काम करेन. बाकी, देशासाठीची जी स्वप्ने आहेत ती लवकरच पूर्ण व्हावीत. माझा प्रत्येक क्षण देशासाठी, माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे, माझा प्रत्येक कणकण केवळ आणि केवळ भारत मातेसाठी आहे. आणि म्हणूनच ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन फॉर ट्वेंटी फॉर्टी सेव्हन’ या वचनबद्धतेने चला मी सर्व देशवासियांना आवाहन करतो, आपल्या पूर्वजांनी जी स्वप्ने पाहिली होती, त्या स्वप्नांना आपण संकल्प बनवूया, आपल्या स्वप्नांना त्यात जोडूया, आपला पुरुषार्थ जोडूया. 21वे शतक हे भारताचे शतक आहे, या शतकात स्वर्णिम भारत बनवू, याच शतकात आपण विकसित भारत बनवू आणि त्या स्वप्नांना पूर्ण करून पुढे जाऊ आणि स्वतंत्र भारतात, 75 वर्षांच्या प्रवासानंतर एका नव्या टप्प्याच्या दिशेने जात असताना आपण कोणतीही कसर कोणतीही उणीव बाकी ठेवायची नाही आणि मी तुम्हाला ही हमी देतो तुम्ही मला जे दायित्व दिले आहे, त्यामध्ये मी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. मी कष्ट करताना कधी मागे हटणार नाही. मी साहस करताना कचरत नाही, मी आव्हानांना तोंड देताना कधी घाबरत नाही, का? कारण मी तुमच्यासाठी जगत आहे, मी तुमच्या भविष्यासाठी जगत आहे, भारतमातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगत आहे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आज राष्ट्रध्वजाच्या छायेत, तिरंग्याच्या छायेत दृढसंकल्पासह आपण आगेकूच करुया. याबरोबरच माझ्या सोबत बोला…

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

वंदे मातरम् !!

वंदे मातरम् !!

वंदे मातरम् !!

वंदे मातरम् !!

जय हिंद !!

जय हिंद !!

जय हिंद !!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros

Media Coverage

Tier-2 cities drive growth in India's tech hiring as GCC expansion spreads beyond metros
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
List of Outcomes: Prime Minister of Japan’s visit to India for the 16th India-Japan Annual Summit
July 02, 2026
Sl. No.OutcomeDescription
1. India-Japan Joint Declaration on Economic Security Promotes project-based collaboration for enhancing joint resilience in key sectors including semiconductors, critical minerals, information and communication technology including AI, clean energy and pharmaceuticals. India-Japan Fact Sheet 2.0 captures growing India-Japan G2G and B2B engagement in this crucial area.
2. India-Japan Joint Statement on Cooperation in the Field of Artificial Intelligence Elevates the India-Japan relationship to a strategic research and development partnership in the AI domain. Building on the India-Japan AI Initiative, the Joint Statement provides a roadmap for greater cooperation across the entire AI technology stack in pursuit of the shared vision of safe, secure, trusted, inclusive, and human-centric AI.
3 Joint Statement on Energy Resilience (between MoPNG and METI, Japan) Strengthens cooperation in strategic stockpiling and reserve mechanisms for crude oil and petroleum products. Promotes collaboration in joint investments across the maritime energy transport value chain.
4. Celebrating the 75th Anniversary of India-Japan Diplomatic Relations Outlines a series of commemorative events to celebrate 2027, the 75th anniversary of establishment of diplomatic relations, as the India-Japan Year of Shared Horizons
5. Memorandum of Cooperation for India-Japan Cooperative Biogas for Growth (CBG) Initiative Promotes cooperation towards the goal of establishing 1,000 biogas and organic fertilizer plants all across India, leveraging the extensive network of dairy cooperatives.
6. Memorandum of Cooperation in the Field of Batteries Promotes cooperation in battery-related projects and expands business opportunities with an aim of building a trusted, resilient and sustainable battery supply chain.
7. Memorandum of Cooperation in the Field of Pharmaceuticals and Medical Devices Sector Strengthens pharma supply chains, including in Active Pharmaceutical Ingredients (APIs) and Key Starting Materials (KSMs), through promotion of bilateral investment and business linkages, technical collaboration and industry-academia collaboration.
8. Memorandum of Cooperation in the Field of Geology and Mineral Exploration Strengthens cooperation in upstream critical minerals exploration through exchange of technical expertise.
9. Memorandum of Cooperation between IndiaAI Mission and Ministry of Economy, Trade and Industry (METI), Japan Promotes institutional cooperation between IndiaAI Mission and Japan’s GENIAC initiative – through B2B matchmaking, webinars on AI policies and challenges and support for joint projects through access to computing resources
10. Memorandum of Cooperation on Next Generation Mobility Partnership (NGMP) Establishes a framework for operationalizing the Next Generation Mobility Partnership (NGMP) which was announced at the 15th Annual Summit in August 2025. The NGMP would accelerate private sector-led cooperation and investment in mobility sectors including rail, automotive and road infrastructure, aviation, shipbuilding and ports, logistics, and urban development, positioning India as a hub for “Make in India for the World” exports to third countries.
11. Memorandum of Understanding between India’s Centre for Cellular and Molecular Platforms (C-CAMP) and RIKEN, Japan Establishes a framework for academic, translational research and start-up oriented innovation in deep-tech and life sciences, covering healthcare, agriculture and environment.
12. Memorandum of Understanding between National Center for Biological Sciences-Tata Institute of Fundamental Research and RIKEN, Japan Creates a framework for cooperation in basic biological and neuroscience research between the two leading research institutions
13. Memorandum of Understanding between IIT Bombay, BharatGen Technology Foundation and National Institute of Informatics, Japan Furthers collaboration on large language models (LLMs), with a focus on developing LLMs for enhanced scientific reasoning, through joint research exchanges
14. Memorandum of Understanding between SarvamAI and Preferred Network on LLM Development Creates a framework for cooperation across the full AI technology stack, including foundation models.
15. Memorandum of Understanding Between National Internet Exchange of India (NIXI) and Japan Network Information Center (JPNIC) Promotes cooperation in National Internet Registry operations, IPv6 adoption, internet security improvements, capacity building, student/professional exchanges and exchange of views on internet governance at regional and global forums.
16. Exchange of Letters Between International Financial Services Centres Authority (IFSCA) and Financial Services Agency, Japan (JFSA) Establishes a framework for cooperation in development, regulation and supervision of financial services as well as information exchange on financial-market trends and best practices, particularly in FinTech and RegTech.