राष्ट्रपतींनी विकसित भारताच्या दिशेने भारताच्या प्रवासात गेल्या वर्षभरात झालेली जलद प्रगती स्पष्टपणे अधोरेखित केली : पंतप्रधान
या शतकातील दुसरा पंचवीस वर्षांचा टप्पा विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाचा असेल: पंतप्रधान
प्रत्येक नागरिकाला वाटत आहे की देश एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे आणि मागे वळून न पाहता पुढे जात राहिले पाहिजे: पंतप्रधान
ग्लोबल साऊथचा एक बुलंद आवाज म्हणून भारत उदयास आला आहे: पंतप्रधान
देशाच्या युवकांसाठी हा अनंत संधींचा काळ आहे: पंतप्रधान
कितीही आव्हाने असली तरी त्यावर आपल्याकडे 140 कोटी उपाय आहेत: पंतप्रधान
भारत आता ही संधी दवडणार नाही, तो आता आघाडीवर राहून नेतृत्व करेल: पंतप्रधान

आदरणीय सभापती जी,

राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित राहिलो आहे.

आदरणीय सभापती जी,

या आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे मी माझे सौभाग्य मानतो.

आदरणीय सभापती जी,

विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .

आदरणीय सभापती जी,

माझी एक विनंती आहे, आदरणीय खर्गेजींचे वय लक्षात घेता, जर ते बसून घोषणा देऊ शकले तर बरे  होईल, जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही, मागे बरीच तरुण मंडळी आहेत, त्यामुळे कृपया खर्गेजींना बसूनच घोषणा देण्याची परवानगी द्या.

आदरणीय सभापती जी,

राष्ट्रपतींनी या देशातील मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग, गरीब, गावे, शेतकरी, महिला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेती या सर्व विषयांबद्दल अतिशय विस्ताराने सांगितले आणि संसदेत भारताच्या प्रगतीचा एक स्वर घुमला. देशाचे युवक भारताच्या सामर्थ्याला कसे पुढे नेत आहेत याबाबतही सविस्तर चर्चा केली आहे. प्रत्येक वर्गाच्या क्षमता त्यांनी शब्दांकित केल्या, एवढेच नाही, आदरणीय राष्ट्रपतींनी भारताच्या उज्ज्वल भविष्याप्रति विश्वास व्यक्त केला जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .

आदरणीय सभापती जी,

21व्या शतकातील पंचवीस वर्षांचा पहिला टप्पा संपला आहे आणि ज्याप्रमाणे गेल्या शतकातला  पंचवीस वर्षांचा दुसरा टप्पा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक होता, त्याचप्रमाणे हा दुसरा टप्पा  विकसित भारताच्या उभारणीतही तितकाच सामर्थ्यवान आणि वेगवान असेल. आणि म्हणूनच आदरणीय सभापती जी,

देशातील प्रत्येक नागरिकाला वाटत आहे की देश एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे, आता ना थांबायचे आहे, ना मागे वळून पाहायचे आहे, आता आपण पुढे पाहायचे आहे आणि वेगाने पुढे जायचे आहे, ध्येय साध्य केल्यानंतरच आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि या दिशेने आपण पुढे वाटचाल करत आहोत.

आदरणीय सभापती जी,

जर आपण वर्तमानाकडे पाहिले तर भारताच्या भाग्यात आपल्याला अनेक शुभ संधी प्राप्त झाल्या  आहेत. मला वाटते की हा एक खूप चांगला योगायोग आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत देश आता वृद्ध होत आहेत, तिथली लोकसंख्या वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचली आहे, ज्याला आपण वृद्ध म्हणून ओळखतो. आपला देश असा आहे जो विकासाची नवी उंची गाठत आहे आणि वाढत्या युवा लोकसंख्येसह देशही तरुण बनत आहे. हा एक खूप सुखद योगायोग आहे.

आदरणीय सभापती जी,

दुसरीकडे, मी पाहत आहे की जगाचे भारताकडे असलेले आकर्षण वाढले आहे आणि त्यातही जगाने भारताच्या प्रतिभेचे महत्व समजून घेतले आहे. भारतात प्रतिभावंतांची खाण आहे ज्यांच्याकडे स्वप्ने आहेत, संकल्प देखील आहे, सामर्थ्य देखील आहे आणि म्हणूनच हा दुसरा सुयोग आहे, शक्तीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे .

आदरणीय सभापती जी,

आज जगात जी आव्हाने निर्माण होत आहेत, त्या जागतिक आव्हानांवर उपाय देणारा आशेचा किरण म्हणून भारत उदयास आला आहे. आणखी एक महत्त्वाचा योगायोग आहे की आज प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास दर खूप जास्त आहे आणि उच्च विकास दर आणि कमी महागाई हा अतिशय अद्वितीय योगायोग आहे आणि तो आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवतो.

आदरणीय सभापती जी,

आपण वेगाने पुढे वाटचाल करत आहोत, जेव्हा जनतेने आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा भारताची गणना 'नाजूक पाच' अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये केली जात होती आणि देश स्वतंत्र झाला तेव्हा आपला देश सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र नंतर या लोकांनी अशी वाईट स्थिती निर्माण केली की ती अकराव्या क्रमांकावर घसरली, परंतु आज आपण  तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहोत.

आदरणीय सभापती जी,

आज कोणतेही क्षेत्र घ्या, विज्ञान असो, अंतराळ असो, क्रीडा असो, या प्रत्येक क्षेत्रात भारत आत्मविश्वासाने वावरत आहे. कोविडनंतर जगात अशी परिस्थिती निर्माण झाली, आणि अशा नवीन गोष्टी जोडल्या गेल्या, अजूनही जग सावरू शकत नाही, अशा परिस्थितीत स्पष्टपणे दिसून येते की जग एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, एक जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली होती. आता जग एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. आणि सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे जर आपण सर्व घटनांचे अराजकीयदृष्ट्या आणि निःपक्षपातीपणे विश्लेषण केले तर कळते की तो कल भारताच्या दिशेने आहे. विश्व मित्र म्हणून, विश्व बंधू म्हणून, आज भारत अनेक देशांचा विश्वासू भागीदार बनला आहे आणि खांद्याला खांदा लावून, आपण जागतिक कल्याणासाठी आपली योग्य भूमिका बजावत आहोत आणि आपल्या क्षमतांद्वारे मदत देखील करत आहोत.

आदरणीय सभापती जी,

आज, संपूर्ण जग ग्लोबल साऊथची चर्चा करत आहे , परंतु त्या चर्चेचा सूत्रधार म्हणून, भारत जागतिक व्यासपीठांवर ग्लोबल साऊथसाठी एक बुलंद आवाज बनला आहे. आज भारत अनेक देशांसोबत "भविष्यासाठी सज्ज  व्यापार करार"  करत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच जगातील महत्वपूर्ण, मोठ्या 9 देशांबरोबर 9 मोठे व्यापारी आपले करार झाले आहेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, यामध्येच ‘मदर ऑफ डील‘ म्हणजेच एकाचवेळी 27 देशांबरोबर म्हणजेच युरोपियन संघाबरोबर असा व्यापार करार झाला आहे. जे लोक आता थकून गेले, अगदी ‘बिचारे होवून’ निघून गेले, त्यांनाही कधी ना कधीतरी उत्तर द्यावेच लागेल. देशाची इतकी खराब स्थिती करून ठेवली होती की, जगातील कोणताही देश आपल्याबरोबर व्यापारी व्यवहार, करार करण्यासाठी  स्वतःहून हात पुढे करीत नव्हते. तुम्ही मंडळींनी व्यवहार करण्यासाठी प्रयत्न केले असतील. इतकेच नाही तर त्यांच्या मागे-मागे लागण्यासाठी तुम्हाला खूप वेळा चकराही माराव्या लागल्या असतील. परंतु त्यांच्यापैकी एकानेही तुमच्याकडे साधे वळूनही पाहिले नसेल. जरा विचार करा, कशी स्थिती पूर्वी होती? आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता काही उगाचीच जगभरातील सगळे देश उगाचच भारताबरोबर व्यवहार, व्यापार, करायला पुढे येत नाहीत.

आदरणीय सभापती जी, 

यामागची सर्वात महत्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे. कारण आता सर्व मोठे विकसित देश, ज्यावेळी एका विकसनशील देशाबरोबर ज्यावेळी व्यापार करार करतात, त्यावेळी आर्थिक जगतामध्ये, एक खूप मोठा संदेश दिला जातो. आणि माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. कारण ज्यावेळी मला गुजरातमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी मी एक ‘व्हायब्रंट गुजरात‘ या शीर्षकाअंतर्गत एक खूप मोठी शिखर परिषद भरविण्‍याचा  कार्यक्रम मी  करीत होतो. आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी होती की, एक राज्य, हिंदुस्तानमधील एका राज्याच्या, माझ्या या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेसाठी भागीदार  होता तो म्हणजे, सर्वात विकसित देश - जपान! एका राज्याने असे सामर्थ्य त्यावेळी दाखवले होते. आज माझा देश असेच सामर्थ्य दाखवत आहे. अशा गोष्टी कधी घडून येतात, तर ज्यावेळी तुमच्याकडे आर्थिक सामर्थ्य असते; तुमच्या नागरिकांमध्ये, देशवासीयांमध्ये उत्पादन करण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याची एक चैतन्य, शक्ती, ऊर्जा असते! अशाच वेळी संपूर्ण जग तुमच्याबरोबर व्यवहार, व्यापार करण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करीत असते. मतपेढीच्या राजकारणामध्ये जे लोक बुडाले आहेत, त्यांनी कधीही देशाच्या अशा अनेक पैलूंकडे पाहिले नाही की, असे पैलू मजबूत करण्याची इच्छा दर्शवली नाही. त्यांचे देशाला मजबूत करण्याला प्राधान्यच नव्हते त्याचाच परिणाम हा आहे. आणि ज्याठिकाणी कॉंग्रेस पक्षचा प्रश्न आहे, त्याबाबत मी हे अगदी स्पष्ट सांगू इच्छितो. आणि माझ्या शब्दांवर विश्वास नसेल तर, मी देशातील लोकांना फक्त एक गोष्ट तपासून पहायला सांगतो. त्यांना बाकी काहीही करू नये, फक्त लाल किल्ल्यावरून कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषणांचे विश्लेषण करावे. तुमच्या अगदी स्पष्टपण लक्षात येईल की, त्या भाषणांतून स्पष्‍ट जाणवते की, तुमच्याकडे कोणताही विचार नव्हता की, तुमच्याकडे कोणतेही ‘व्हिजन‘ नव्हते. आणि त्याचबरोबर काही वेगळे, नवे करण्याची कोणत्याही प्रकारची इच्छाशक्तीच नव्हती. आणि त्याचेच परिणाम या  देशाला  प्रदीर्घ काळ भोगावे लागले. 

आदरणीय सभापती जी,

देशवासीयांचा मी कोटी-कोटी आभारी आहे. त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली. आमच्या सरकारची खूप मोठी शक्ती पूर्वीच्या सरकारने केलेल्या चुका दुरूस्त करण्यामध्ये खर्च होत आहे. जगाच्या मनात त्यांच्या काळातील सरकारची छबी पक्की उतरली आहे. ही छबी बदलण्यासाठी मला शक्ती खर्च करावी लागते. अशा प्रकारे संपूर्ण देशाला खराब करून ठेवले होते आणि आता या कामासाठी आणि आम्ही भविष्यातील सज्जतेसाठी धोरण निर्माण करण्यासाठी भर दिले आहे. आज तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, देश नीती धोरणांच्या आधारावर वाटचाल करीत आहे. नियोजित धोरणांनुसार पुढे जात आहे. अधिराज्य गाजविण्याच्या वृत्तीचा आम्ही त्याग केला आहे आणि याच कारणामुळे संपूर्ण विश्वाचा विश्वास आम्ही कमावला आहे. आम्ही ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म‘ हा मंत्र जपत पुढची वाटचाल सुरू ठेवली आहे. आणि स्थिती अशी आहे की, देशाची ‘सुधारणा एक्सप्रेस‘ वेगाने पुढे जात आहे. संपूर्ण देश या सुधारणा एक्सप्रेसचा प्रवासी बनला आहे, आरूढ झाला आहे. आम्ही संरचनात्मक सुधारणा घडवून आणल्या आहेत. प्रक्रियेशी संबंधित सुधारणा घडवून आणल्या. धोरणांमध्ये सुधारणा केल्या. आमचे उत्पादन क्षेत्र, आमचे उद्योजक सशक्त कसे होतील, भारताची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू यामध्ये मूल्यवर्धन कसे होईल, या दिशेने आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. आणि मी आज पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की, आज भारत संपूर्ण विश्वाबरोबर स्पर्धा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ज्यावेळी आपण विश्वाच्या सीईओ मंचची शिखर परिषद पाहतो, त्यावेळी  संपूर्ण जग आमच्या उद्योजकांना समान स्वरूपामध्ये पाहते; आणि गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांचे प्रतिनिधीमंडळ जगातील अनेक देशांमध्ये गेले, त्यावेळी त्या सर्व प्रतिनिधींनीही, हाच अनुभव घेतला आहे. आणि त्या सर्वांनी बाहेरच्या देशात आलेले अनुभव मला सांगितले आहेत. त्यांनाही बाहेरच्या देशात भारताच्या प्रतिनिधीला दिलेल्या सन्मानपूर्वक अनुभवाविषयी अभिमान वाटत होता. होय, बाहेरच्या विश्वाशी आपल्याला बरोबरीने चर्चा करता येते. ही गोष्टच मुळात महत्वाची आहे.

आदरणीय सभापती जी, 

एमएसएमई चे जाळे जितके मोठे, तितके आपल्याला सामर्थ्यवान होता येते. हे क्षेत्र खूप दीर्घकाळ अर्थव्यवस्थेला ताकद देते. आम्ही या दिशेने भर दिला आहे. आणि त्यासाठी आम्ही बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या आहेत. आज आमच्याकडील एमएसएमईच्या जाळ्यावर संपूर्ण जगाचा विश्वास वाढत आहे. कदाचित आम्ही खूप मोठमोठी विमाने बनवू शकत नाही. परंतु असंख्य प्रकारच्या विमानांना लागणारे लहान-लहान सुटे भाग आम्ही आता बनवू शकतो. विशेष म्हणजे अनेक देशांमध्ये बनविल्या जाणाऱ्या मोठ्या विमानांना लागणारे अनेक लहान सुटे भाग आज माझ्या देशांतील लहान एमएसएमई बनवतात.

आदरणीय सभापती जी, 

देशामध्ये होत असलेल्या अनेक प्रयत्नांचे परिणाम सर्वांनाच दिसून येत आहेत. प्रमुख देश भारताबरोबर  व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहेत. युरोपियन संघाबरोबर केलेला व्यापार करार असो किंवा अमेरिकेबरोबर नुकताच झालेला करार असो, या संदर्भातील सविस्तर माहिती आपले मंत्री पीयुष गोयल यांनी काल सभागृहामध्‍ये दिली आहेच. संपूर्ण जग या व्यापार कराराचे मुक्तपणे कौतुक करत आहे. ज्यावेळी युरोपियन संघाबरोबर भारताचा व्यापार करार झाला त्यावेळी संपूर्ण जगाला जागतिक स्थैर्यामध्‍ये  वाढ झाल्याची भावना जाणवली. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारानंतर जगाला आणखी विश्वास मिळाला की, ते अनुभवत असलेली स्थिरता आता वेगाने साकार होत आहे आणि या गोष्‍टी म्हणजे जगासाठी एकप्रकारे चांगले संकेत मिळत आहेत.

आदरणीय सभापती जी,

या करारांचा सर्वात मोठा फायदा आपल्या देशातील तरुणांना होईल. ज्यावेळी मी तरुण असे म्हणतो त्यावेळी त्यामध्‍ये मध्यमवर्गीय तरुण, शहरी तरुण आणि ग्रामीण तरुणांचाही समावेश असतो. मुले आणि मुली यांचाही समावेश असतो आणि म्हणूनच, त्यांच्याकडे हे वेगवेगळे  घटक आहेत, अशा पद्धतीने पाहिले जाऊ नये. आपल्या देशातील तरुणांच्या क्षमतेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि संपूर्ण जागतिक बाजारपेठ आता त्यांच्यासाठी मुक्त झाली आहे. आता, त्यांच्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच मी त्यांना म्हणतो, "चला मित्रांनो! मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. धाडस दाखवा ! पुढे वाटचाल करा! देश तुमच्याबरोबरीने उभा आहे आणि जग तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहे, वाट पाहत आहे."

आदरणीय सभापती जी,

ज्याप्रमाणे आपल्या तरुण व्यावसायिकांची जागतिक मागणी वाढत आहे, त्याचप्रमाणे काळजीवाहकांची, काळजी घेवू शकणाऱ्या मंडळीना असलेली  मागणीही वाढत आहे. सर्वजण सहमत आहेत की,  आपल्याला अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. काहीजण जर पात्र व्यक्तींची भरती करण्यासाठी आणि त्यांना आवश्‍यक अशा प्रतिभावंतांचा शोध घेण्यासाठी येथे विशेष कार्यालये देखील स्थापन करीत आहेत. याचा अर्थ असा की, भारतीय व्यावसायिकांसाठी देखील जागतिक स्तरावर मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

आदरणीय सभापती जी,

संसदेचे हे वरिष्ठ सदन एक प्रकारे राज्यांचे प्रतिनिधित्व करते आणि आज जी चर्चा मी बारकाईने पाहिली, मला वाटते याचा स्तर थोडा उंचावायला  हवा होता आणि तिथून तर आणखी व्हायला हवा होता, ते तर किती वर्षे सरकारमध्ये राहिले आहेत, तिथून तर चर्चेचा स्तर उच्च हवा होता, मात्र त्यांनी ही संधीही वाया घालविली. देश त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो?

आदरणीय सभापती जी,

मी काल एका माननीय सदस्याचे वक्तव्य ऐकत होतो, ते तर आपल्याला राजा म्हणवून घेतल्याचा अभिमान बाळगतात. मात्र ते आर्थिक असमानतेची चर्चा करत होते, आता सांगा! जी व्यक्ती स्वतःला राजा मानते आणि ती आर्थिक असमानतेबाबत बोलते, तेव्हा वाटले हाच दिवस पहायचा बाकी राहिला होता की काय?   

आदरणीय सभापती जी,

आमच्या टीएमसीच्या सहकाऱ्यांनी बरेच काही सांगितले. त्यांनी जरा स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. निष्ठुर सरकार, पतनाचे जे काही मापदंड आहेत त्या सर्वांचे नव-नवे विक्रम करत आहेत आणि इथे उपदेश देत आहेत. काय परिस्थिती करून ठेवली आहे? अशा निर्दय सरकारमुळे तिथल्या लोकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे मात्र त्याची काही पर्वा नाही. सत्तेच्या लालसेशिवाय दुसरी आकांक्षा नाही आणि इथे उपदेश करत आहेत. घुसखोरी, जगातले समृद्ध देशही आपल्या इथल्या अवैध रितीने  राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढत आहेत. आमच्या देशात घुसखोरांना वाचविण्यासाठी न्यायालयापर्यंत दबाव निर्माण केला जात आहे. अशा लोकांना माझ्या देशाचा युवक कसा माफ करेल, जे घुसखोरांची बाजू लावून धरण्यासाठी जोर लावत आहेत आणि घुसखोर माझ्या देशाच्या युवकांचे हक्क हिरावून घेत आहेत, त्यांची रोजी-रोटी हिरावत आहेत, आदिवासींची जमीन बळकावत आहेत, मुला-मुलींच्या आयुष्याला धोका निर्माण होत आहे, मात्र त्यांच्यासाठी महिलांवर अत्याचार होत राहिले तर राहू दे, सत्ताकारणाशिवाय काही करायचे नाही  आणि इथे येऊन आम्हाला उपदेश करत आहेत आणि अशा चिंताजनक विषयांकडे डोळेझाक करत बसलेले हे लोक आहेत. एक माननीय सदस्य खूप काही बोलत होते, ज्यांचे संपूर्ण सरकार मद्य घोटाळ्यात बुडले आहे, ज्यांचे आलिशान महाल घरा-घरामध्ये तिरस्काराचे कारण ठरले होते, आता कदाचित त्यांना .ब्लॅक शब्द जास्त आवडतो, प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, या शब्दाबरोबर त्यांचे काय जुने नाते आहे माहित नाही.  

आदरणीय सभापती जी,

अशा सर्व सहकाऱ्यांना मी आज नक्कीच सांगेन,

तुम्ही जगाला किती फसवाल, तुम्ही जगाला किती फसवाल, आरसा पाहिला तर आपले सत्य रूप कोठे लपवाल? काँग्रेस असो, टीएमसी असो, डीएमके असो अनेक काळ केंद्रात सत्तेत राहिले आहेत, सत्तेचे भागीदार राहिले आहेत. राज्यांमध्येही सरकार चालविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. मात्र त्यांची काय ओळख निर्माण झाली? आज कराराची चर्चा झाली तर अभिमानाने सांगितले जाते, तेव्हा कराराची चर्चा होत असे तेव्हा बोफोर्स कराराची आठवण येत असे, असे करार होत असत. त्यांनी केवळ आपले खिसे भरण्याचे काम केले. नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याला त्यांचे प्राधान्य नव्हते.  

आदरणीय सभापती जी,

मी काही बाबी उदाहरणासह सांगू इच्छितो कारण इथे चर्चेदरम्यान सगळे विषय आले आहेत आणि म्हणूनच मला हे सांगणे आवश्यक आहे. आता एक उदाहरण देतो, बँकिंग क्षेत्राचे. बँकिंग क्षेत्र एक प्रकारे अर्थव्यवस्थेचा कणा असते. 2014 च्या पूर्वी फोन बँकिंगचा कालखंड होता. नेता फोन करत असे आणि त्याआधारे कोट्यवधी रुपये दिले जात असत आणि गरिबांना बँकांमध्ये थारा दिला जात नसे, त्यांना तिरस्कार मिळत असे. देशाची 50% पेक्षा जास्त जनता बँकांचा दरवाजाही पाहू शकली नव्हती. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या फोनवर  अब्जावधी रुपये लोकांना दिले जात असत आणि जे घेऊन जात असत ते आपली खाजगी मालमत्ता मानून ते पैसे हडप करत असत, हाच खेळ सुरु असे. काँग्रेस आणि युपीएच्या काळात आणि आज इंडी आघाडी करून जे बसले आहेत त्यांच्या काळात बँकिंग व्यवस्था उध्वस्त व्हायच्या मार्गावर होती. माझ्याकडे नुकतीच पंतप्रधान पदाची जबाबदारी आली होती तेव्हा मी एका देशाच्या प्रमुखाची भेट घेतली तेव्हा बोलत होतो. बँकिंगच्या दृष्टीकोनातून आम्हाला पुढे जायला हवे असे मी म्हटले. त्यांनी सांगितले, साहेब आपण नवे आहात, आपल्या बँकिंग व्यवस्थेचा जरा अभ्यास करा. आम्ही कशी हिंमत करू? एका देशाच्या नेत्याला ही माहिती होती, त्याने मला सांगितले. इथे त्यांना पर्वाच नाही, म्हणजे एका प्रकारे त्यांनी ज्या प्रकारे बँकिंग व्यवस्था केली आहे, एनपीएचे डोंगर उभे झाले होते. कोठेही पाहिले तरी चर्चा होत असे की एनपीएचे काय होणार?  एनपीएचे काय होणार? कसे वाचणार ? 

आदरणीय सभापती जी,

आव्हान मोठे होते, मात्र आम्ही सूज्ञपणे परिस्थिती हाताळली. बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य लोकांना विश्वासात घेतले. सुधारणांची आवश्यकता होती. धाडसाने सुधारणा केल्या. पारदर्शी व्यवस्था केली, अनेक बँकिंग सुधारणा केल्या, आणि ज्या सरकारी बँका दुर्बल झाल्या होत्या, नीट चालत नव्हत्या त्यांचे आम्ही मोठ्या बँकांसमवेत विलीनीकरण केले  आणि मला आठवत आहे की एका महाशयांनी, जे स्वतःला विद्वान मानत असत त्यांनी लिहिले होते, मोदी सरकारने बँकांमध्ये हे घडवले तर हिंदुस्तानमध्ये अतिशय मोठ्या सुधारणा होतील. हे काम मी आल्याआल्याच केले.   

आदरणीय सभापती जी,

आणि या साऱ्याचा परिणाम असा झाला की बँकामध्ये ज्या समस्या उग्र झाल्या होत्या त्यापासून बँका मुक्त झाल्या. बँकांचे आरोग्य सुधारले. सातत्याने सुधारले आणि अजूनही आगेकूच सुरु आहे आणि बँकांची परिस्थिती सुधारल्यानंतर व्यवहारही वाढले, लोकांना पैसे मिळू लागले, सामान्य जनतेला पैसे मिळू लागले. ज्या गरिबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते अशा लोकांनाही कर्ज मिळू लागले, पूर्वी त्याला बिचाऱ्याला लांबूनच पाहून जावे लागत असे. आज मुद्रा योजना,जी देशाच्या युवकाला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देते. मुद्रा योजना,जी  स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देते, मात्र स्वयंरोजगाराच्या भाषणाने काम होत नाही, त्याला मदतीचा हात द्यावा लागतो, सहाय्य करावे लागते आणि आम्ही मुद्रा योजनेद्वारे 30 लाख कोटी रुपये, 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज मुद्रा योजनेच्या माध्यमातून आणि हमीविना देशाच्या युवकांच्या हाती दिले आणि त्यांनी आपला कारभार वाढविला आणि अभिमानाची बाब ही आहे की यात मोठ्या प्रमाणात आमच्या माता-भगिनी याच्या लाभार्थी आहेत. 

सेल्फ हेल्प ग्रुप, आजकाल ग्रामीण भागातील महिला मोठी स्वप्ने पाहत आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. आम्ही महिला बचत गटांचा विस्तार तर केलाच केला, पण 10 कोटी भगिनींना थेट आर्थिक मदतीची व्यवस्था केली. आम्ही आमच्या एमएसएमई क्षेत्राला भरपूर कर्ज दिले आणि आज मी या पवित्र सभागृहात मोठ्या समाधानाने आणि जबाबदारीने सांगत आहे की, 2014 च्या आधी ज्या एनपीएचे डोंगर उभे होते, ते आज आम्ही निम्न स्तरावर आणून ठेवले आहेत.

आज एनपीए 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे, हे बँकांच्या आरोग्यासाठी आम्ही केलेले एक अतिशय उत्तम काम आहे. इतकेच नाही, तर आमच्या बँकांचा नफा आज विक्रमी पातळीवर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बँकिंग व्यवस्था मजबूत असणे आवश्यक असते आणि जेव्हा बँकिंग व्यवस्था मजबूत होते, तेव्हा उर्वरित अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते; ते काम आम्ही केले आहे.

आदरणीय सभापती महोदय,

मी आणखी एक उदाहरण देतो. आमचे पीएसयूज, सामान्यतः पीएसयूजच्या बाबतीत ही धारणा बनली होती की, ते निर्माणच होतात आजारी पडण्यासाठी, ते निर्माणच होतात उद्ध्वस्त होण्यासाठी, ते निर्माणच होतात बंद होण्यासाठी. आम्ही ही संपूर्ण मानसिकता वस्तुस्थितीच्या आधारावर बदलण्यात यश मिळवले आहे आणि हे लोक पीएसयूजबाबत किती चुकीच्या गोष्टी पसरवत होते. अर्बन नक्षलप्रमाणे, अशा पीएसयूजच्या प्रवेशद्वाराबाहेर कामगारांच्या सभा घेऊन त्यांना भडकवण्याचे पाप करत होते, त्यांची दिशाभूल करण्याचे काम करत होते. यांनी एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचएएल अशा प्रत्येकाबाबत खूप वाईट गोष्टी पसरवल्या आणि इतक्या वाईट पद्धतीने टीका केली की, जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा तर ते या गोष्टी सांभाळू शकत नव्हते आणि त्यासाठी काही करूही शकत नव्हते.

आदरणीय सभापती महोदय,

आम्ही यामध्येही धाडस दाखवले. आम्ही पीएसयूजच्या संदर्भात देखील सुधारणा केल्या. सुधारणांची एक सातत्यपूर्ण परंपरा चालवली. आज एलआयसी सर्वोत्तम पद्धतीने काम करत आहे, एलआयसीची स्थापना झाल्यापासूनचा हा त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचा कालखंड आहे. ज्या पीएसयूजना काँग्रेसच्या नेत्यांनी टाळे लावण्याच्या उंबरठ्यावर आणून सोडले होते आणि ज्यावर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला गेला होता, आज आमचे तेच पीएसयूज विक्रमी नफ्यात आहेत. इतकेच नाही, तर ते आपल्या कामगिरीने मेक इन इंडियाला देखील गती देत आहेत. मेक इन इंडियाचे जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आज ते एका मोठ्या उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहेत. ते विक्रमी संख्येने रोजगार निर्माण करत आहेत. इतकेच नाही, तर आमचे काही पीएसयूज आज जागतिक स्तरावर जात आहेत. जगातही ते आपली ताकद दाखवत आहेत. जगाशी जोडले जात आहेत आणि जगातील अनेक देशांच्या विकास प्रवासात ते भागीदार बनत आहेत. आज आमच्या पीएसयूजना देशातून आणि देशाबाहेरूनही खूप मोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. मी जे म्हणतो ना, की हा देश एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, त्या आगामी 25 वर्षांचे संकेत येथे दिसून येत आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

काँग्रेसने विश्वासघात करण्याच्या बाबतीत आपल्या देशाच्या अन्नदात्यालाही सोडले नाही. या देशात 10 कोटी शेतकरी असे आहेत, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे, ते छोटे शेतकरी आहेत. त्यांची कधीच पर्वा केली गेली नाही, त्यांच्याकडे कधी पाहिले गेले नाही, ना त्यांच्या मनात या छोट्या शेतकऱ्यांचे काही महत्त्व होते. त्यांना असे वाटायचे की काही बड्या लोकांना सांभाळून घेतले, तर हे चक्र सुरू राहील आणि हेच राजकारण ते करत राहिले आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

आमच्या मनात छोट्या शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव होती. आम्ही जमिनीवरील वास्तवाशी परिचित होतो आणि त्याच कारणामुळे आम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना घेऊन आलो आहोत आणि अतिशय कमी वेळात आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही 4 लाख कोटी रुपये दिले आहेत. 4 लाख कोटी रुपये हा आकडा लहान नसतो आदरणीय सभापती महोदय आणि त्याने आमच्या छोट्या शेतकऱ्यांना एक नवी ताकद दिली आहे. नवी स्वप्ने पाहण्याचे सामर्थ्य दिले आहे आणि मला हा ठाम विश्वास आहे की आमचा शेतकरी त्या दिशेने भारताच्या आशा-अपेक्षेनुसार नक्कीच फलप्राप्ती देईल.

आदरणीय सभापती महोदय,

येथे काही सहकाऱ्यांनी अंमलबजावणीच्या संदर्भात तक्रारींची भाषणे भरपूर केली आहेत. कदाचित ते ठरवूनच आले होते की असे असे बोलायचे आहे, यामध्ये तर त्यांची युती दिसते, बाकी कशात तर दिसत नाही.

आदरणीय सभापती महोदय,

जेव्हा हे अंमलबजावणीबाबत किती मोठ्या-मोठ्या गप्पा मारतात. मी एक किस्सा सांगतो. मी कोणावर टीका करण्यासाठी हे सांगत नाहीये, मी फक्त सत्य समोर ठेवत आहे. ज्यांना त्रास व्हायचा असेल त्यांना होईल, परंतु तथ्य हे तथ्यच असते. आपल्या देशाचे एक नेते हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते आणि तिथून आल्यानंतर त्यांनी स्वतः ही घटना कोठेतरी सांगितली, जी रेकॉर्डवर उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, त्या नेत्याने काय म्हटले, मी त्यांचेच शब्द वाचत आहे. “बऱ्याच काळापर्यंत मला योजना आयोगाशी संघर्ष करावा लागला कारण ते डोंगराळ भागांसाठी वेगळ्या योजना बनवायला तयारच नव्हते, मी हिमाचल प्रदेशला गेले होते. जेव्हा मी परत आले, तेव्हा मी योजना आयोगाला सांगितले की आमच्या कामगारांना, वर्कर्सना जीपची गरज नाही तर खेचरांची आवश्यकता आहे, जेणेकरून कमीत कमी त्यावर सामान वगैरे लादले जाऊ शकेल.” पुढे त्यांनी माहिती दिली, परंतु मला सांगण्यात आले, “आम्ही पैसे तर जीपसाठीच देऊ कारण खेचरांसाठी पैसे देण्याचे धोरण नाही.” याच भाषणामध्ये पुढे त्या म्हणतात, “आता तिथे रस्तेच नव्हते”, त्यांचे सांगण्याचे कारण हे होते की हिमाचलमध्ये जिथे त्या गेल्या, तिथे रस्तेच नव्हते. आता तिथे रस्तेच नव्हते, तर मग त्यावर जीपचा काय उपयोग होऊ शकतो? जिथे रोड नाही, तिथे जीप घेऊन कोण जाणार. परंतु त्याकाळी योजना आयोगाचा आग्रह होता की एकतर जीप घ्या किंवा काहीच नाही.

आदरणीय सभापती जी

हे भाषण दुसऱ्या कोणाचे नाही, हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे भाषण आहे. काँग्रेसच्या प्रदीर्घ शासन काळात हीच कार्यशैली राहिली आणि इंदिराजींना स्वतःलाही हे माहित होते की हे पाप चालले आहे, परंतु ही कार्यसंस्कृती सुधारण्यासाठी त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही आणि इंदिरा गांधी ज्या नियोजन आयोगाच्या चिंधड्या उडवत होत्या, त्याचे जन्मदाते त्यांचे स्वतःचे वडील होते आणि हा नियोजन आयोग बनला, आणि इंदिराजींनी जेव्हा हे म्हटले, त्या दरम्यान दोन दशके उलटून गेली होती, परंतु परिस्थिती हीच होती आणि 2014 पर्यंत सगळे दुखी होते, सगळे त्रस्त होते, सगळे चूक पाहत होते, पण सुधारणा करण्यासाठी कुणीही तयार नव्हते. 2014 नंतर जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली आणि काँग्रेसने ज्या प्रकारे नियोजन आयोगाला अडकवणे, लटकवणे, भटकटवणे अशी कार्यशैली बनवून ठेवली होती, 2014 मध्ये जेव्हा आम्हाला संधी मिळाली, तेव्हा आम्ही येऊन काम केले. नियोजन आयोग संपुष्टात आणला आणि निती आयोग बनलवला. आज निती आयोग अत्यंत वेगाने काम करत आहे. तुम्ही पहा आकांक्षित जिल्हे, हे देखील एक मोठे प्रेरक उदाहरण आहे आणि मी तर पाहत आहे की विकसनशील देशांसाठी विकासाचे एक मॉडेल म्हणून जागतिक संस्था याला अनुमोदन देत आहेत. हे आकांक्षित जिल्ह्याचे यश झाले आहे. देशातील अनेक जिल्हे असे आहेत, ज्यांना मागास मानून सोडून देण्यात आले होते आणि तिथल्या करोडो लोकांच्या ज्या मूलभूत गरजा होत्या, त्या देखील नाकारल्या गेल्या होत्या. त्यांना तर असेच जगण्यासाठी मजबूर करण्यात आले होते आणि जे मागास भाग होते, ते अधिकच मागास होत गेले आणि तिथे दुर्दशा होत गेली. आणि सरकारमधली परिस्थिती तर अशी होती की, जेव्हा कुणाची पनिशमेंट ट्रान्सफर करायची असायची, पनिशमेंट पोस्टिंग द्यायची असायची, तेव्हा अशाच जिल्ह्यांमध्ये पाठवले जायचे, म्हणजे ते अजून खराब काम करतील, अशी परिस्थिती बनली होती, अशी कार्यसंस्कृती बनली होती. आम्ही ही परिस्थिती बदलली, सर्वात आधी येऊन युवा हुशार अधिकाऱ्यांना तिथे नियुक्त केले आणि त्यांना कामासाठी पूर्ण तीन वर्षांची संधी दिली, एकापाठोपाठ एक निर्णय घेतले आणि आज पहा की सीमा भागातील आपल्या छत्तीसगडमधील बस्तर आकांक्षित जिल्ह्यात होता. आज तो बस्तर संपूर्ण देशात बस्तर ऑलिम्पिकच्या नावाने चर्चेत आहे. आज विकासाचा प्रवाह बस्तरच्या गावागावात पोहोचू लागला आहे. नुकतीच काही गावांनी पहिल्यांदा बस पाहिली आहे. संपूर्ण गावाने बस्तरमध्ये सोहळा साजरा केला, अशा परिस्थितीत हे लोक सोडून गेले होते आणि इथे माहीत नाही कशा प्रकारे हे लोक देशाला कुठे नेऊ इच्छित आहेत!

आदरणीय सभापती जी,

इंप्लीमेंटेशन काय असते, हे आकांक्षित जिल्हे एक खूप मोठे दमदार उदाहरण आहे. अशी तर शेकडो उदाहरणे आहेत, परंतु मी सांगावं म्हणून याचा उल्लेख करत आहे. काँग्रेसच्या आमच्या सहकाऱ्यांना हा जो बदल घडत आहे, त्यात इंप्लीमेंटेशन दिसत नाही आणि त्यांचे तर तेच एक नियोजन आयोगाचे मॉडेल आहे. जीप आणि खेचर यांचे मॉडेल, हेच ते लोक जाणतात. त्या पलीकडे त्यांना काहीच माहित नाही आणि हे इंप्लीमेंटेशन कसे करतात, माझा जन्म झाला नव्हता, त्याच्या आधी सरदार वल्लभभाई पटेल यांनी नर्मदा नदीवर धरण बांधण्याची कल्पना मांडली, विषय तर पक्का झाला, सरदार साहेब राहिले नाहीत. ठीक आहे, नेहरूजींनी पायाभरणी केली. आता यांचे इंप्लीमेंटेशन पहा, माझा जन्म झाला नव्हता, त्यावेळी याची कल्पना मांडली गेली होती आणि पंतप्रधान बनल्यानंतर मी याचे उद्घाटन केले, ही परिस्थिती आहे आणि त्यांचे इंप्लीमेंटेशन पहा, मला मुख्यमंत्री असताना तीन दिवस उपोषणाला बसावे लागले होते, नर्मदा सरदार सरोवर धरणासाठी, माझ्या देशाच्या, माझ्या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी, मी स्वतःला पणाला लावले होते, तेव्हा कुठे भारत सरकारला झुकावे लागले आणि तेव्हा कुठे सरदार सरोवर धरणाच्या बांधकामाला वेग मिळाला आणि इथवर मी पोहोचलो, तेव्हा मला याचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले आणि आज कच्छमधील खावडा, सीमा सुरक्षा दलाचे लोक जिथे बसतात, तिथपर्यंत नर्मदेचे शुद्ध पाणी पिण्यासाठी पोहोचत आहे. इंप्लीमेंटेशन काय असते आणि इथे इंप्लीमेंटेशन, इंप्लीमेंटेशन हा शब्द कुणी हाती दिला, प्रत्येकाच्या तोंडातून तेच निघत होते. आम्ही काँग्रेसची कार्यशैली बदलण्यासाठी, जेव्हा मी पाहिले, अनेक अशी कामे होती, जी अडकून पडली होती, विचारायला कुणीच नव्हते, फाईल्समध्ये, आणि राजकीय फायद्यासाठी घोषणा केल्या गेल्या, दिवे लावले गेले, दगड लावला गेला, पण करायचे काहीच नव्हते.

शेवटी, मी इथे आल्यानंतर एक प्रगती नावाचे तंत्रज्ञान व्यासपीठ तयार केले, त्या प्रगती व्यासपीठाचे उदाहरण देतो, मला नेमके आठवत नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कदाचित हिमाचल प्रदेशात, त्यांनी संसदेत रेल्वेची घोषणा केली होती, बहुधा उना, उना किंवा इतर कुठेतरी मी येईपर्यंत त्याचा आराखडा कागदावरही आलेला नव्हता. आणि मग निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तिची घोषणा केली. प्रगतीमध्ये माझ्यासमोर हा विषय आला. असे अनेक विषय माझ्यासमोर आले आणि प्रगतीमध्ये आम्ही प्रत्येक प्रकल्प का अडकला, कोणत्या विभागाच्या कामात कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागले, कोणी कोणत्या चुकीच्या पद्धतीने तो पुढे नेला आणि खर्चही वाढत गेला त्यावर चर्चा केली. 900 हजार कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या योजनेचा खर्च 90 हजार कोटींपर्यंत गेला अशी परिस्थिती यांनी करून ठेवली होती. आम्ही एक स्वतंत्र तंत्रज्ञान व्यासपीठ तयार केले आणि दर महिन्याला बैठक घेतली. आताच 50वी बैठक घेतली. आम्ही अथक परिश्रम घेतले आणि संबंधित राज्यांशीही संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. कोणत्या मंत्रालयाला अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत, कोणत्या राज्यात काही अडचणी येत आहेत, कोणत्या कायद्यामुळे अडचणी येत आहेत यावर आम्ही चर्चा केली.

मी प्रत्येक प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण केले आणि पंतप्रधानांच्या पातळीवर बारकाईने निरीक्षण केलेल्या या प्रगतीच्या 85 लाख कोटीं रुपयांचे काम वेगाने पूर्ण झाले असे आज मी अभिमानाने सांगू शकतो. आम्ही या देशाची अफाट क्षमता प्रकाशात आणली, आम्ही अंमलबजावणी कशी केली जाते, हे करून दाखवले. रेल्वे असो, रस्ते, सिंचन असो की ग्रामीण सोयीसुविधा असो, आम्ही या सर्व गोष्टी त्यात समाविष्ट केल्या. आता जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्ग पहा, आज हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि बर्फवृष्टी, याची एक चित्रफीत तुम्ही पाहिली असेल ती खूप लोकप्रिय झाली आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे आणि वंदे भारत रेल्वे बर्फातून जात आहे, आणि लोक म्हणतात, गल्लत करू नका हे परदेशातले नाही तर भारत आहे. हे रील्स सध्या प्रसिद्धीला आले आहे. मात्र तीन दशकांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. आपणाला कल्पना आहेच की तीन दशके, 30 वर्षे, दोन पिढ्या होऊन गेल्या, ते येथेच अडकून पडले होते. आमच्या सरकारने ते पूर्ण केले.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आता मी आसामविषयी बोलतो आहे आणि तिथे निवडणुका आहेत म्हणून बोलत आहे असा विचार कोणी करू नये. ही यांची पापे आहेत म्हणून मला बोलावे लागते. काँग्रेस फक्त कल्पना करते आणि अंमलबजावणीविषयी त्यांना काही देणे घेणे नाही. आसामच्या बोगी पूल, बोगीवाल पूल, अरुणाचल प्रदेश आणि आसामला जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता, परंतु प्रगती व्यासपीठांच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतला आणि आसामसह संपूर्ण ईशान्य भारताची सोय आम्ही याद्वारे पूर्ण केली.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

अंमलबजावणीविषयी आपण बोलतो तेव्हा हे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि हे प्रकल्प वेळेआधी पूर्ण होत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आपण 2030 पर्यंत या पातळीवर पोहोचू असे आम्ही जगाला सांगितले, मात्र सौरऊर्जेमध्ये आम्ही 2025मध्येच काम पूर्ण केले. आम्ही इथेनॉलसाठी कालनिश्चिती केली होती, तेही काम आम्ही दोन तीन वर्ष आधीच पूर्ण केले. वेळेआधीच काम पूर्ण करण्याची क्षमता, अंमलबजावणीची आमची क्षमता त्याहूनही अधिक आहे.

आदरणीय महोदय,

भाजप असो किंवा एनडीए असो, गोष्टींकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन, अडचणींची उकल करण्यासाठी आमची विचारक्षमता आणि काँग्रेस यांच्या जमीन आस्मानाचा फरक आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या देशातले 140 कोटी नागरिक इतके सक्षम आहेत की ते अडचणींवर उपाय शोधण्यास सक्षम आहेत, हा आमचा विश्वास आहे. आमचा देशावासीयांवर, त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे आणि लोकशाहीची हीच तर खरी ताकद असते. परंतु, काँग्रेसला मात्र नागरिकच अडचण वाटतात. आता मी एवढेच बोलून विषय सोडून दिला तर यांना रात्री झोप येणार नाही आणि उद्या शिव्या कश्या द्यायच्या याचे नियोजन करतील. परंतु, मी उदाहरणासह सांगतो. देशवासियांविषयी या लोकांचे काय विचार होते, नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे देशातील नागरिकांविषयी काय विचार होते? याबद्दल मी सांगू इच्छितो. इंदिराजी एकदा इराणला गेल्या होत्या आणि इराणमध्ये भाषण करताना आणि त्या भाषणामध्ये नेहरूंसमवेत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला. त्यांनी स्वतःच सांगितलं, त्या म्हणाल्या आणि इंदिराजीं जे म्हणाल्या ते मी इथे सांगतो, 'जेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे नेहरूंना विचारले की त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागले?' तेव्हा त्यांनी उत्तर दिले, '35 कोटी.' नेहरूजींना विचारले होते की त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते, तेव्हा त्यांनी सांगितले 35 कोटी. तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या होती 35 कोटी. 35 कोटी देशाचे नागरिक नेहरूजींना अडचण वाटत होते. असा राष्ट्रप्रमुख असतो? या गोष्टीचे उदाहरण देत इंदिरा गांधी पुढे म्हणाल्या की, देशाची लोकसंख्या आता 57 कोटी आहे. त्यामुळे मलाही तेवढ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. म्हणजे वडिलांना 35 कोटी नागरिक अडचण वाटत होते आणि यांना 57 कोटी नागरिकांची अडचण वाटत होती. असा नेता कसा असू शकतो, ज्याला आपल्याच देशाचे नागरिक अडचण वाटतात? हाच त्यांच्या आणि आपल्या दृष्टीकोनातील फरक आहे. मग ते नेहरूजी असोत, इंदिराजी असोत किंवा संपूर्ण काँग्रेसजन असो, भारतीतील नागरिकांनाच हे लोक अडचण समजतात.

माननीय अध्यक्ष महोदय,

माझी अनेक निवेदने आहेत. मी जगासमोर सांगितले आहे, देशासमोर सांगितले आहे आणि केवळ सांगितले आहे म्हणून नव्हे तर मला याबाबत खात्री आहे. कितीही आव्हाने असली तरी, आपल्याकडे 140 कोटी उपाय आहेत. आपल्या राष्ट्राचा समर्थक हे आपले भांडवल आहे. आपल्यासाठी, प्रत्येक देशवासीय भारताच्या उज्ज्वल भविष्याचे नियंत्रक आहेत, निर्माता आहेत, कर्ता-करविता आहेत. आपण याला समस्या कसे म्हणू शकतो? अशी विचारसरणी असलेले लोक त्यांच्या कुटुंबाचेच भले करतील की आणखी कोणाचे करतील?

माननीय अध्यक्ष महोदय,

देशातील जनतेचा अपमान करत राहणे, हा काँग्रेसच्या स्थायीभाव आहे. त्यांच्या संस्कारांमध्येच हे मुरलेले आहे. काँग्रेसने गेल्या काही दिवसांत राष्ट्रपतींचा अवमान केला. निवडणुकीनंतर आपल्या राष्ट्रपतींबाबत जे शब्द वापरले गेले आहेत. शरम वाटते की हे कसे लोक आहेत? हे लोक भारताच्या राष्ट्रपतींबाबत काय बोलत आहेत?

माननीय अध्यक्ष महोदय,

लोकसभेत सुद्धा काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर कोणतीही चर्चा झाली नाही. याने राष्ट्रपती पदाचा घोर अनादर झाला आहे, त्यांना संविधान हा शब्द उच्चारण्याचा अधिकारच उरला नाही. गरिबीतून बाहेर पडलेल्या, आदिवासी कुटुंबातील एका महिलेला तुम्ही लोकसभेत ही वागणूक दिली आहे. तुम्ही आदिवासी समाजाचा अपमान केला आहे, तुम्ही महिलांचा अपमान केला आहे, भारताच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या संविधानाने ज्यांना सर्वोच्च पद दिले त्यांचा तुम्ही अपमान केला आहे, तुम्ही संविधानाचा अवमान केला आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

त्यांना काहीही वाटू दे. हा काँग्रेसने केलेला गुन्हा आहे..

माननीय अध्यक्ष महोदय,

आपण आणि सभागृहाने वेळ दिल्याबद्दल मी आपले आणि सभागृहाचे आभार मानतो.

माननीय अध्यक्ष महोदय,

ही लोकसभेतील एक अत्यंत क्लेशदायक घटना आहे आणि कदाचित ही हतबलता, निराशा आपण समजू शकलो असतो, परंतु यासाठी देशाच्या पवित्र लोकशाहीच्या मंदिराची अशी अवस्था करणे आणि त्यावेळी आसनावर आमचे आसामचेच एक सन्माननीय खासदार विराजमान होते आणि अशावेळी कागदपत्रे फेकली गेली, ते टेबलावरही चढले. हा ईशान्येचा अपमान नाही का? आसामच्या नागरिकांचा हा अपमान नाही का? काल त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा तेच केले आणि त्यावेळी आंध्रच्या दलित कुटुंबाचा मुलगा आसनावर विराजमान होता. यामुळे त्यांनाही अपमानित केले गेले. म्हणजे तुम्ही ईशान्येकडील लोकांना अपमानित केले. आंध्रमधील एका दलित कुटुंबाचा मुलगा आसनावर बसला, त्याचा अपमान केला. सदनात त्यांना कार्यभार सोपवला आहे. सर्वांनी एकत्रितपणे कार्यभार सोपवला आहे, पण ते दलित समाजातून आले आहेत, म्हणूनच तुम्ही त्यांना अपमानित करता आणि असे दिसून येते की, काँग्रेसच्या लोकांना आसामच्या जनतेबद्दल प्रचंड द्वेष आहे. त्यांना असे वाटते की इथल्या लोकांनी त्यांची साथ सोडली म्हणजे ते त्यांचे शत्रू बनले. लोकशाहीत तुम्ही कधी असा विचार करता का? भारतरत्न भूपेन हजारिका जे या देशातील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबाबत जे घडले त्याने मला खूप वेदना झाल्या. आजही लोक घराघरात त्यांचे स्मरण करतात. त्यांच्याबद्दल जो भक्तीभाव आहे त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण त्यांना याचीही काही पर्वा नाही. आणि आपण भाग्यवान आहोत की भूपेन हजारिका जी यांनी देशासाठी जे योगदान दिले आहे. त्यांनी ईशान्येसारख्या प्रदेशाशी संपूर्ण देशाला स्वतःच्या वाणीने, विचारांनी आणि अभिव्यक्तीने एकत्र बांधून ठेवले होते. आम्ही त्यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. याबद्दलही त्यांना आक्षेप आहे, याचे मला नवल वाटते. खडगे तिथे असते तर मी त्यांच्या उपस्थितीत मी हे म्हणालो असतो. त्यांनी भारतरत्नबाबत जे वक्तव्य केले त्यांनी व्हिडिओमध्ये त्यांचा चेहरा पहिला तर तुम्हाला वाटेल की अरे ही कशी मंडळी आहेत, कसे वागत आहेत आणि हे कोण तर ते एक गायक होते. माझ्या लक्षात आले की हे कधीही कोणाचाही अवमान करायला मागेपुढे पाहणार नाहीत. भूपेन हजारिका जी यांना भारतरत्न दिले त्यालाही त्यांनी विरोध केला. हे संपूर्ण आसामच्या विरोधात आहे, संपूर्ण देशातील कलाप्रेमींच्या विरोधात आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की, आसाम हा अपमान कधीही विसरणार नाही.

माननीय अध्यक्ष महोदय,

काल जी घटना घडली, या सभागृहाच्या दुष्ट प्रवृत्ती असलेल्या काँग्रेसच्या एका सन्माननीय खासदाराने, युवराजाने त्यांचा गद्दार असा उल्लेख केला. त्यांचा अहंकार कोणत्या पातळीवर पोहोचला आहे ते पहा. काँग्रेसमधून किती लोक बाहेर पडले आहेत. काँग्रेसचे किती तुकडे झाले आहेत. अनेक जणांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केले आहेत. पण त्यांनी इतरांचा गद्दार असा उल्लेख नाही केला. पण काल खासदाराला गद्दार म्हटले कारण ते शीख आहेत. हा शीखांचा अपमान होता. हा गुरुंचा अपमान होता आणि काँग्रेसमध्ये जो शीखांबद्दल द्वेष ठासून भरला आहे ना, त्याचीच अभिव्यक्ती यातून प्रतीत होते आणि ते या सभागृहाचे सन्माननीय खासदार आहेत आणि त्यांना याबाबत काहीच गैर वाटले नाही अन्यथा आज त्यांनी उभे राहून म्हटले असते की काल जे घडले ते संसदेला, संसदेच्या प्रतिष्ठेला अनुसरून नव्हते, आम्ही दिलगीर आहोत. एक शब्द तरी बोलता आला असता, पण त्यांच्या मनात शिखांबद्दल द्वेष आहे आणि म्हणूनच त्यांनी काल जे शहीद कुटुंबातील सदस्य आहेत हे विचारात न घेता त्यांनी त्यांचे राजकीय विचार परिवर्तित केले, म्हणून ते गद्दार ठरले आणि गद्दार हा काही लहान शब्द नाही. कोणीतरी माझ्या देशवासीयांना गद्दार म्हणावे, हे देश कसे सहन करेल आणि ते देखील एक शीख आहेत, म्हणून गद्दार म्हणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि असे लोक काँग्रेसला बुडवणार नाहीत तर आणखी काय करणार ?

आदरणीय सभापती महोदय,

एका बाजूला हे दृश्य आहे तर दुसऱ्या बाजूला आपले सदानंदजी मास्टर यांचे दृश्य आहे. राजकीय द्वेषातून त्यांचे दोन्ही पाय कापण्यात आले. भरल्या तरुण वयात त्यांचे दोन्ही पाय छाटण्यात आले. कापलेल्या पायांसह ते आयुष्य जगत आहेत. पण त्यांचे संस्कार इतके उच्च आहेत की त्यांच्या वाणीमधून एकही अपशब्द निघत नाही. त्यांच्या वर्तनातही कटुता दिसत नाही. याचा अभिमान वाटतो. काल जेव्हा देशाने संसदेत त्यांचे पहिले भाषण ऐकले, तेव्हा त्यांनी आपल्या बाकावर बसताना आपली परवानगी घेऊन जे कृत्रिम पाय (आर्टिफिशियल लिंब) ते वापरतात, ते दाखवले - तो क्षण संपूर्ण देशासाठी वेदनादायक होता. कारण देशात अशी विचारधारा बाळगणारे ‘इंडी आघाडी’चे लोक, आणि ही संपूर्ण इंडिया आघाडी यासाठी जबाबदार आहे. केवळ वैचारिक मतभेदांमुळे एका तरुणाचे, आणि तोही शिक्षक - ज्याच्याकडे अभिमानाने आणि आदराने पाहिले जाते - त्याचे पाय कापले जातात. तरीही त्यांना ना खेद आहे, ना वेदना. पण मी मास्टर सदानंदजींचे मनापासून अभिनंदन करतो की इतक्या भीषण हल्ल्यानंतरही त्यांनी देशसेवेचे आपला व्रत अखंड सुरू ठेवला आहे आणि आज ते देशाच्या धोरणनिर्मितीत आपले योगदान देत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. अशाच लोकांच्या आधारावर आम्ही राजकारणात जगतो, काम करतो. देशासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा मिळते. हे संस्कार आम्हाला अशाच लक्ष्यवेधी कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येतून मिळाले आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

आजकाल काँग्रेसमधील आमच्या सहकाऱ्यांचे माझ्यावर थोडे विशेष प्रेम आहे - ते ‘स्पेशल प्रेम’ आहे. मला जी जबाबदारी मिळाली आहे, तिच्या अनुषंगाने, आणि जबाबदारी मिळाली नसती तरीही देशासाठी जगणे आम्ही शिकलो आहोत. आम्ही विकसित भारताची पायाभरणी मजबूत करत आहोत, तिला बळ देत आहोत. एका बाजूला मी देशातील तरुणांसाठी मजबूत जमीन तयार करत आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस ‘मोदीची कबर खोदण्याचे’ कार्यक्रम आयोजित करत आहे. ‘प्रेमाचे दुकान’ उघडणारे लोक ‘मोदी, तेरी कबर खुदेगी’ अशा घोषणा देत आहेत. ही कसली प्रेमाची दुकाने आहे, जी देशाधल्याच एका नागरिकाची कबर खोदण्याची स्वप्ने पाहतात? हे ते कोणत्या संविधानातून शिकले आहेत, की देशामधल्याच नागरिकाची कबर खोदण्याची भाषा बोलत आहेत? हा संविधानाचा अपमान नाही का? हा मानवतेचा अपमान नाही का? हा सार्वजनिक जीवनाच्या मर्यादांचा अपमान नाही का? आणि तरीही त्यांना याचा कुठलाही खेद नाही. यानंतर ते काय वक्तव्य करतात ते पाहा - “राज्यसभेत देखील पंतप्रधान रडत होते” असे म्हणतात. हे कोणत्या प्रकारच्या संस्कारांत आणि वृत्तींत वाढलेले लोक आहेत?

आदरणीय सभापती महोदय,

माझा अनुभव खूप जुना आहे. 2002 पासून, जेव्हा ते विरोधी पक्ष झाले; 2004 पासून, जेव्हा ते सत्तेत आले; आणि 2014 पासून, जेव्हा मी येथे आलो - गेल्या 25 वर्षांत संसदेचे असे एकही अधिवेशन गेले नाही, ज्यात मोदी संसद सदस्य नव्हते. आणि असे एकही अधिवेशन गेले नाही, ज्यात या सभागृहात मोदींना शिव्या दिल्या गेल्या नाहीत. एकदा कुणीतरी मला विचारले होते - “मोदीजी, तुमच्या आरोग्याचे रहस्य काय आहे?” मी म्हणालो - “मी रोज दोन किलो शिव्या खातो.”

आदरणीय सभापती महोदय,

हे मोदींची कबर का खोदू इच्छितात? ही केवळ घोषणा नाही. हे त्यांच्या मनात साचलेल्या द्वेषाचे प्रतिबिंब आहे. ही त्याची अभिव्यक्ती आहे. आम्ही कलम 370 ची भिंत पाडली, म्हणून त्यांना मोदींची कबर खोदायची आहे. ईशान्य भारतात बॉम्ब, बंदुका आणि दहशतीचे सावट होते - आम्ही तेथे शांतता आणि विकासाचा मार्ग निवडला, म्हणून त्यांना मोदींची कबर खोदायची आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून उत्तर दिले, म्हणून त्यांना मोदींची कबर खोदायची आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ केले, म्हणून त्यांना त्रास होतो. माओवादी दहशतीतून देशाला मुक्त करण्यासाठी धाडसी पावले उचलली, म्हणून त्यांना मोदींची कबर खोदायची आहे. नेहरूजींनी सिंधू जल करार करून देशावर मोठा अन्याय केला होता; तो करार आम्ही स्थगित केला - म्हणूनच का तुम्ही मोदींची कबर खोदण्याच्या घोषणा देत आहात?

आदरणीय सभापती महोदय,

काँग्रेसची खरी अडचण काही वेगळीच आहे. मोदी इथपर्यंत पोहोचलेच कसे, हे त्यांना पचत नाही. आणि त्यांची अडचण वाढत चालली आहे - “पोहोचले तर पोहोचले, पण इतका काळ टिकले कसे?” म्हणूनच त्यांना एकच मार्ग उरलेला दिसतो - “मोदी, तेरी कबर खुदेगी.”

आदरणीय सभापती महोदय,

ते आधीच गृहीत धरून बसले होते. त्यांना लोकशाही किंवा संविधानाशी काही देणेघेणे नाही. त्यांना वाटते की पंतप्रधानपद त्यांच्या कुटुंबाची जहागीर आहे; त्यावर दुसरा कोणी बसूच शकत नाही. त्यांच्या मनात जो द्वेष भरलेला आहे, ‘प्रेमाच्या दुकानात’ जी आग पेटलेली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. “हा आमचे पैतृक हक्क होता” या भावनेतूनच ते मोदींची कबर खोदण्याच्या घोषणा देत फिरत आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

काँग्रेसच्या शाही कुटुंबाला देशाने अनेक दशके संधी दिली. देशाने तुमच्यासाठीही आपले भविष्य पणाला लावले होते. पण तुम्ही ‘गरिबी हटाव’चे नारे दिले आणि लोकांची दिशाभूल केली. लाल किल्ल्यावरून काँग्रेसच्या कोणत्याही पंतप्रधानाचे भाषण असे नाही, ज्यात गरिबी हटवण्याची घोषणा नसेल. पण गरिबी हटवण्यासाठी प्रत्यक्षात काय केले, हे कधीच सांगितले गेले नाही. त्यांच्या घोषणा शब्दांपुरत्याच मर्यादित राहिल्या. मोदींनी मार्ग निवडला - गरिबांना सशक्त करण्याचा. मी माझ्या देशातील गरिबांना सलाम करतो. 

त्यांनी देशाच्या योजनांना समजून घेतले, स्वीकारले आणि आपली क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मी माझ्या देशातील गरिबांचे गौरवगान करतो - आमच्या धोरणांवर आणि नियतीवर विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला झोकून दिले. 25 कोटी गरीब बांधवांनी गरिबीला पराभूत केले आणि स्वतः गरिबीतून बाहेर आले. मी त्या माझ्या 25 कोटी देशवासीयांना सलाम करतो - जे निराशेत होते, ज्यांना आशेचा किरण दिसला, ते उभे राहिले आणि आज आमच्यासोबत पुढे चालत आहेत.

आदरणीय सभापती महोदय

2014च्या आधी, हे अंमलबजावणीच्या फक्त गप्पा मारायचे. आपल्याकडे रेल्वे फाटकांवर शेकडो लोकांचा मृत्यू व्हायचा. शाळेची बस रेल्वे फाटकावरून जात असताना 20-20, 25-25 शाळकरी मुले मरण पावल्याच्या बातम्या यायच्या. 'अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग' (रक्षक नसलेली रेल्वे फाटके) बंद करणे हे काही इतके मोठे काम नव्हते की जे होऊ शकले नसते. पण हे कामही मलाच करावे लागले आणि आम्ही अशी सर्व रेल्वे फाटके बंद केली. लाखो लोकांचे प्राण वाचवले. म्हणूनच… आणि म्हणूनच त्यांना मोदींची कबर खोदायची आहे.

आदरणीय सभापती महोदय,

2014 च्या आधी या देशात 18,000 गावे अशी होती, ज्यांना वीज काय असते हेच माहित नव्हते. विजेची एखादी तार असते, एखादा बल्ब असतो, एखादा दिवा लागतो आणि त्यातून उजेड बाहेर पडतो, हे त्यांना माहितच नव्हते. 2014 मध्ये जेव्हा देशवासीयांनी जबाबदारी आमच्यावर सोपवली, त्यानंतर ज्या 18,000 गावांनी कधी विजेचे तोंडही पाहिले नव्हते, विजेचा एक शब्दही कधी कानावर पडला नव्हता, त्या गावांमध्ये आम्ही उजेड पोहोचवला. म्हणूनच… आणि म्हणूनच… मोदींची कबर खोदण्याशिवाय आता त्यांना दुसरा कोणताही मार्ग दिसत नाहीये.

आदरणीय सभापती महोदय,

असाही एक काळ होता, जेव्हा देशात वारंवार बातम्या यायच्या, माध्यमांमध्ये ठळक बातम्या (हेडलाईन्स) असायच्या. सीमेवरील परिस्थितीबाबत निवेदने यायची. दारूगोळा नाही, बुलेटप्रूफ जॅकेट नाही, जवान बर्फात उभा आहे पण बर्फात उभे राहण्यासाठी लागणारे साधे शूज सुद्धा त्याच्याकडे नाहीत, अशा बातम्या यायच्या. आम्ही देशाच्या जवानांसाठी तिजोरी खुली केली. देशाच्या जवानांना जे हवे आहे ते देण्याचा संकल्प केला, आणि म्हणूनच… म्हणूनच यांना (विरोधकांना) वाटते की आता कोणताही मार्ग उरलेला नाही, आता फक्त मोदींची कबर खोदली जाईल. त्यांच्यासाठी आता हाच एक मार्ग उरला आहे.

आदरणीय सभापती महोदय,

एकदा उत्तर प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्रीजींना सभागृहात भाषण करताना रडू कोसळले होते.  मेंदूज्वरामुळे, मुले… अगणित मुले मरत होती. यांना (विरोधकांना) कधीच सुचले नाही की या मेंदूज्वरापासून मुक्ती मिळवून देता येऊ शकते.

आदरणीय सभापती महोदय,

डोळ्यांचा आजार 'ट्रॅकोमा'मुळे लोक त्रस्त असायचे. लोकांची दृष्टी जायची आणि विज्ञान प्रगती करूनही, जे शक्य होते ते हे करू शकले नाहीत. आम्ही देशाला मेंदूज्वरापासून मुक्ती मिळवून दिली आणि ट्रॅकोमापासून देशवासीयांचे डोळेही वाचवले. हेच यश आहे, हीच ती संवेदनशीलता आहे, समाजासाठी जगण्या-मरण्याचा हाच तो संकल्प आहे. समाजासाठी अहोरात्र कष्ट करणे, झिजणे, सोसणे, हेच त्यांना अस्वस्थ करत आहे. म्हणूनच 'मोदी तुझी कबर खोदली जाईल' हा मंत्र घेऊन ते चालले आहेत, अशी स्वप्ने पाहत आहेत आणि गप्पा मात्र लोकशाहीच्या मारताहेत. 'मोहब्बत की दुकान' साईनबोर्ड लावतात. काय सार्वजनिक जीवनात इतका द्वेष असतो?

आदरणीय सभापती महोदय,

यांचे सरकार रिमोटवर चालायचे. माझे सरकारही रिमोटवर चालते. 140 कोटी देशवासीय हेच माझा रिमोट आहेत. 140 कोटी देशवासीयांची स्वप्ने, 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षा, देशातील तरुणांचे संकल्प - यांच्यासाठीच आम्ही जगतो, यांच्यासाठीच सरकार चालवतो. सत्ता आमच्यासाठी सुखाचा मार्ग नाही, सत्ता आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे. मुद्रा योजनेतून लाखो-कोट्यवधी लोकांना मदत मिळाली, स्वयंरोजगाराला बळ मिळाले. काँग्रेसने कधी 'स्टार्टअप कल्चर'ला (नवउद्योग व्यवस्थेला) प्रोत्साहनच दिले नाही. काही मोजके स्टार्टअप्स बिचारे कसेबसे चालत होते, त्यांनाही माहीत नव्हते आणि यांची परिस्थिती तर अशी आहे की… आदरणीय सभापती महोदय, हे आपल्या स्वतःच्या घरातील 'स्टार्टअप'ला सुद्धा वर आणू शकत नाहीत. आणि आमच्या सरकारमध्ये आज 2 लाख पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आणि जेव्हा एका पाठोपाठ एक मिळत चाललेले यश जनसामान्यांची मने जिंकते ना, तेव्हा त्यांच्याकडे (विरोधक) एकच मार्ग उरतो—'मोदी तुझी कबर खोदली जाईल'. पण तो काळ आठवा, बीएसएनएल बद्दल विनोद चालायचे, व्यंगचित्रे बनायची; आज आम्ही स्वदेशी '4G स्टॅक' उभा केला. '5G' जगात सर्वात वेगाने सुरु करुन (रोल-आउट) देण्याचे काम आम्ही करून दाखवले. संपर्काची नवीन व्यवस्था, नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार आम्ही पुढे नेला आणि म्हणूनच हे दुःख त्यांच्याकडून (विरोधक) व्यक्त होत आहे की 'मोदी तुझी कबर खोदली आहे'.

आदरणीय सभापती महोदय,

गरिबांची सेवा करणे हे माझे भाग्य आहे. 4 कोटी गरिबांना पक्की घरे देणे, यात मला जीवनाचे समाधान वाटते. वीज, पाणी, गॅस सिलेंडर, शौचालय यांची सुविधा—मला वाटते की हो, ईश्वराने मला योग्य दिशेने काम करण्याची प्रेरणा दिली आहे. पहिल्यांदाच गावातील महिला अभिमानाने सांगत आहे की, 'हो, मी लखपती दीदी बनले आहे', तर दुसरी म्हणत आहे की 'या वर्षापर्यंत मी लखपती दीदी बनून जाईन'. ज्या बनल्या आहेत त्यांना जेव्हा मी विचारतो, तेव्हा त्या म्हणतात—'नाही साहेब, आता आम्ही कोट्यधीश  होण्याचा विचार करत आहोत'. हा जो स्वभावधर्म बदलला आहे, जो आत्मविश्वास वाढला आहे आणि अशा देशातील कोटी-कोटी जनतेचे आशीर्वाद ज्या माणसावर आहेत, कोटी-कोटी माता-भगिनींचे जे संरक्षक कवच ज्याच्या भोवती आहे—तुम्ही कितीही घोषणा द्या, कबर तुम्ही खोदू शकणार नाही. ही देशाची शक्ती, आशीर्वादाचे हे कवच, माता-भगिनींच्या माझ्याबद्दलच्या ज्या भावना आहेत, ज्या श्रद्धेने मी माता-भगिनींची सेवा करण्याचे काम केले आहे….ज्यांना कुणी विचारत नव्हते त्यांना मोदी विचारतो. हेच कारण आहे आणि हेच आशीर्वाद आहेत….जे यांना बोचतात, म्हणून यांना कबर खोदायची आहे.

आदरणीय सभापती महोदय,

चोरी करणे हा ज्यांचा पिढीजात धंदा आहे, ज्यांनी एका गुजराती माणसाचे आडनाव सुद्धा चोरले, महात्मा गांधींचे आडनाव चोरले—असे हे लोक आहेत. आणि देशाची जनता इतकी समजूतदार आहे की तुम्हाला अशी काही आपटते, अशी काही धूळ चारते...

आदरणीय सभापती महोदय,

आम्ही एक 'विकसित भारत'चे स्वप्न घेऊन निघालो आहोत आणि आज ते स्वप्न देशातील लोकांच्या ऊर्जेमुळे संकल्पात बदलले आहे. आज कुठेही जा, प्रत्येक जण हेच सांगतो की 2047 पर्यंत विकसित भारत बनवायचा आहे. आणि मला आश्चर्य वाटते की, आमचे काही सहकारी या सभागृहात इतके निराशावादी आहेत, जमिनीशी नाळ तुटलेले लोक आहेत, बदलत्या जगाशी अनभिज्ञ आहेत—काय बोलत आहेत काही कळत नाही? ते म्हणतात—'मोदी आताच 2047 विषयी काय बोलतोय? 2047 कुणी पाहिलंय?'

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढत असत, जे फाशीच्या तख्तावर चढत असत, जे लाठीमार झेलत, गोळीबार झेलत, काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून जे अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये आयुष्य घालवत - असे लक्षावधी तरुण स्वतःच्या शिक्षणाचा, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता, कसलीही तमा न बाळगता केवळ देशाचा विचार करून, सुरक्षित घरट्यातून बाहेर पडले होते. त्यांनी जर असा विचार केला असता, की 'अरे आपल्या कालखंडात तर स्वातंत्र्य मिळणारच नाही, मग मी का हे करू?', तर देशाला कधी स्वातंत्र्य मिळालं असतं का? हे लोक इतके निराशावादी आहेत की- मी जेव्हा डिजिटल इंडियाबद्दल बोलत असे, फिनटेकची चर्चा करत असे, यूपीआयबद्दल बोलत असे, तेव्हा हे म्हणायचे या देशात गरीब माणूस मोबाईल फोनवर पैशाचा व्यवहार कसा करेल? पण तीन वर्षांच्या आतच देशाने दाखवून दिलं की हे होऊ शकतं. आणि मी अवाक् झालो होतो, ज्या दिवशी, ज्या दिवशी असं भाषण संसदेत झालं तेव्हा देशातल्या प्रसारमाध्यमांमधले असे लोक आणि त्यांची सारी व्यवस्था- ते सगळे नाचत होते की बघा मोदींना कसं तडफदार उत्तर दिलं. यावर मोदीने मात्र उत्तर दिलं नाही, तर तुमच्या हातातल्या मोबाईल फोनवर जेव्हा यूपीआय चालते, काम करते ना तेव्हा उत्तर आपोआप मिळते.

आदरणीय सभापतीजी,

काँग्रेसच्या काळात एक थट्टेचा विषय बोलला जाई, अगदी सर्वसामान्यपणे आणि खूप गंभीर चर्चेतही हा विषय येई आणि मजा-मस्करीतही येई की - इंडिया मिस्ड द बस- भारताची वेळ हुकली- हे शब्द सर्रास वापरले जात. अरे संधी गमावलीच.. बाजी हातातून निसटली… इंडिया मिस्ड द बस. हे नेहमी होत असे. 

आदरणीय सभापतीजी,

आज भारताची कोणतीही बस हुकत नाही. आज भारत देशांच्या समूहाचे नेतृत्व करत आहे. 

आदरणीय सभापतीजी,

देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. वर्तमानही उज्ज्वल करण्यासाठी अविरत कार्य करणे आवश्यक आहे. आम्ही विकसित भारताच्या स्वप्नाची भरारी घेताना 5 वर्षांची योजना आखतो आणि दरवर्षाला अंदाजपत्रक तयार करतो. आणि आम्ही दिशा ठरवून चालतो, कारण आमच्यासाठी, पुढच्या निवडणुकांपुरते मर्यादित लक्ष्य नसते. आमचे लक्ष्य आहे 2047, विकसित भारत. अरे निवडणुका तर येतील- जातील, माझा देश अजर अमर राहणार आहे आणि आपण, आम्ही देशाच्या युवा पिढीच्या हातात समृद्ध हिंदुस्तान सोपवण्याचे स्वप्न घेऊन चाललो आहोत. घरोघरी मोठी होणारी, आज जी छोटी मुले आहेत ना, त्यांनाही पाहून मी विचार करतो की त्यांच्या हातात एक असा हिंदुस्थान देऊन जावे की जेणेकरून आपल्याला आपल्या कामाचे समाधान मिळेल. आणि हे म्हणतात 2047 काय.. 2047 चे काय...

आदरणीय सभापतीजी,

आज ज्या प्रकारचे उपक्रम आम्ही चालू केले आहेत- मग ते अवकाश असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, समुद्राची खोली असो, भूमी-पाणी-आकाश, अंतराळ, प्रत्येक क्षेत्रात नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवी पावले आणि नव्या सिद्धी घेऊन देश आज पुढे जात आहे. आपण हरित हाइड्रोजनवर काम करत आहोत. येऊ घातलेल्या युगाचे आपल्याला आकलन होत आहे. आपण क्वांटम कंप्यूटिंग/पुंज गणनाबद्दल बोलतो आहोत. आपण एआय मिशन घेऊन वाटचाल करत आहोत आणि आज जगालाही वाटू लागलंय की एआय मिशनमधून भारत जगाला खूप काही देऊ शकतो. हा विश्वास आज जगभरात निर्माण झाला आहे. आज जगात महत्त्वाची खनिजे, रेअर अर्थ ही राजकीय शस्त्रं बनली आहेत, आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जेणेकरून भारताला कधी कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये.

आदरणीय सभापतीजी,

परदेशी गुंतवणूक निश्चितपणे आकर्षून घेणारे असे अगणित प्रकल्प आहेत. कारण आता प्रत्येकालाच आपले भविष्य भारतभूमीमध्ये दिसू लागले आहे, प्रत्येकाला आपले भविष्य भारताच्या प्रतिभेच्या भरवशावर दिसत आहे, प्रत्येकाला भावी भारताच्या उज्ज्वल भविष्याशी जोडलेले आपले उज्ज्वल भविष्य दिसत आहे. आणि म्हणूनच जग, म्हणूनच जग - आज विकसित भारताबद्दल आपण का बोलतो आहोत, हे काहींच्या डोक्यात शिरत नाही - परंतु जगाला समजत आहे की भारताने योग्य दिशा धरली आहे, आणि चला आता प्रगतीची चर्चा तिथे चालू आहे, न जाणो आपलीच बस चुकू नये. कालपर्यंत म्हटलं जाई- भारताची संधी हुकते. आता मात्र जगालाच असे वाटते की 'आता आपल्याला उशीर न होवो', म्हणून इथे येण्याची स्पर्धा सुरू आहे. 

आदरणीय सभापतीजी,

येणारा काळ भारतासाठी संधींनी भरलेला आहे. भारताच्या नवतरुणांसाठी संधींनी भरलेला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व शक्याशक्यता मी रेखांकित करू शकतो. मला दिसतेय आणि त्या दिशेने धोरण आखून आम्ही पुढे जात आहोत. आणि माझी इच्छा आहे, मी माझ्या देशवासीयांना निमंत्रण देतो, आणि मी देशवासीयांना आज सदनातूनही सांगू इच्छितो. मन की बात मध्येही मी याचा उल्लेख केला होता, मी इथेही सर्व माननीय खासदारांनाही सांगेन की आपणही आपापल्या क्षेत्रात लोकांना असे सांगा... जेव्हा जगभरात इतक्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्या सगळ्यांना स्थायित्व एक टिकाऊपणा तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा आपण उत्तम प्रकारच्या वस्तू घेऊन जाऊ, आपण गुणवत्तेशी तडजोड करणार नाही, तेव्हाच. नफा कमी झाला तरी चालेल परंतु गुणवत्ता आपण सदैव उंचावतच जाऊ, नवोन्मेष करावा लागला तर करू, संशोधन करावे लागले तर करू, उत्पादनात कच्चा माल बदलावा लागला तर बदलू. परंतु आपण जगात गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तमाहून उत्तम होऊ. तेव्हा कुठे आज राजकीय दृष्ट्या जे निर्णय घेतले जात आहेत त्यांचा फायदा उठवण्यात आपण मागे पडणार नाही. माझ्या देशबांधवांना मी आज हाच आग्रह धरेन, की आपण क्वालिटीच्या - गुणवत्तेच्या बाबतीत मला साथ द्या. गुणवत्तेशी तडजोड करू नका. आणि मग बघाच, जग केवळ मेड इन इंडिया, मेड इन भारत, मेड इन इंडिया, मेड इन भारत, अशा वस्तूंसाठी धोषा लावत राहील.

आदरणीय सभापतीजी,

काँग्रेसमधल्या माझ्या मित्रांचेही मी आज आभार मानतो की निदान मला- म्हणजे त्यांना तसे माहीत होते- पूर्वीही हा प्रयोग त्यांनी केला होता- गेल्या 10 वर्षांत मला पाच-सहा वेळा बोलण्यापासून असे अडवले गेले, कारण त्यांना माहित होते मी एकदा का बोलायला सुरुवात केली की थांबत नाही. आणि मी सांगितले होते, एकावेळी एक एकटा- तर मग आता अनुभवातून शिकले की इथे काही डाळ शिजणार नाही, आणि मग समजूतदारपणे स्वीकारले. आणि अशी समज त्यांना सदैव मिळत राहो अशीही मी प्रार्थना करत राहीन.

आदरणीय सभापतीजी,

आदरणीय राष्ट्रपतीजींच्या भाषणविषयक उद्बोधनात योगदान देणाऱ्या सर्व खासदारांचे मी आभार मानतो. जे काही उत्तम विचार इथे प्राप्त झाले ते उत्तम विचार देशाच्या प्रगतीत निश्चितपणे उपयोगी पडतील, अशी मी ग्वाही देतो आणि या अभिभाषणाबद्दल आदरणीय राष्ट्रपतीजींना मी मनापासून धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. 

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Leads International Yoga Day Event In Kolkata, Says It Has Become 'World's Biggest Festival'

Media Coverage

PM Modi Leads International Yoga Day Event In Kolkata, Says It Has Become 'World's Biggest Festival'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi commissions three indigenously designed and built naval ships – INS Dunagiri, INS Sanshodhak and INS Agray
June 21, 2026
INS Agray, INS Dunagiri, and INS Sanshodhak have been inducted into the Indian Navy: PM
Today, 21 June is also celebrated as World Hydrography Day, And it is a truly remarkable coincidence that on this very day we have commissioned India's most advanced hydrography ship, INS Sandhayak: PM
The country whose maritime strength is robust,its economic and strategic influence will be equally robust; And India understands this reality well, India is preparing itself for this: PM
The journey from INS Vikrant to today is not merely the journey of new warships; It is the journey of India's growing self-reliance, today, INS Agray, INS Dunagiri, and INS Sanshodhak are giving new momentum to that very journey: PM
India has begun to move forward with a new vision for the shipbuilding sector; Special steps have been taken to enhance domestic construction capacity: PM
Shipbuilding, ship repair, and MRO are being viewed as part of a major national mission: PM
India has always regarded the ocean as a medium of cooperation, but India also knows that strength is essential to safeguard peace; Security is necessary to protect prosperity and self-reliance is imperative for building the future: PM
Today, INS Agray, INS Dunagiri, and INS Sanshodhak have joined the Indian Navy as symbols of this very spirit: PM

Prime Minister, Shri Narendra Modi, today commissioned three indigenously designed and built naval ships - INS Dunagiri, an advanced stealth frigate, INS Sanshodhak, a survey vessel (large) and INS Agray, an anti-submarine warfare shallow water craft, at Syama Prasad Mookerjee Port, Kolkata, West Bengal. These inductions will significantly bolster the nation’s operational capabilities, enhance maritime domain awareness, and strengthen the security of our coastal waters against geopolitical threats. All three ships were designed by the Indian Navy’s Warship Design Bureau and constructed in Kolkata by Garden Reach Shipbuilders & Engineers (GRSE), with extensive participation by Indian industry, including more than 200 MSMEs. With an indigenous content of over 75 percent, these ships are also a testament to India’s commitment to Aatmanirbharta.

Addressing the gathering, the Prime Minister noted that the occasion coincides with the International Day of Yoga being celebrated across the world and expressed happiness at having the opportunity to visit the historic land of Bengal, which has played a pivotal role in shaping India's intellectual, cultural and national renaissance and has connected India with the world through maritime routes for centuries. “The event represented an important milestone in the journey towards an Aatmanirbhar Bharat, a secure India and a developed India”, Shri Modi noted. He pointed out that June 21 is also observed globally as World Hydrography Day and described it as a remarkable coincidence that India's most advanced hydrographic survey vessel, INS Sanshodhak, is commissioned on the same day. Congratulating the Indian Navy, scientists, engineers, workers and all citizens of the country, Shri Modi said the achievement reflected India's growing technological and maritime capabilities. “No nation can emerge as a major power without strong maritime capabilities. Development, security and prosperity are closely linked to the oceans. Most of the world's trade moves through sea routes, while vast global data networks operate beneath the oceans”, Shi Modi stated while emphasizing the importance of maritime strength in the modern world. He further noted that critical minerals, deep-sea resources and future sources of energy will increasingly be connected to the maritime domain. Therefore, he said, a nation's economic and strategic influence is directly linked to the strength of its maritime sector.

Shri Modi stated that India fully understands this reality and is preparing itself accordingly. “The commissioning of the three naval platforms stands as testimony to the country's growing capabilities and skills”, he remarked. Recalling the commissioning of INS Vikrant, he said that it had marked the beginning of a new chapter in India's maritime journey and announced India's growing naval strength to the world. He noted that the journey from INS Vikrant to the commissioning of INS Agray, INS Dunagiri and INS Sanshodhak is not merely a story of new warships but also a reflection of India's increasing self-reliance. “All three vessels symbolize India's commitment to indigenous design, manufacturing and innovation. Designed and built in India, the vessels showcase the talent of Indian industries, the expertise of Indian engineers and the hard work of Indian workers”, Shri Modi underscored.

Shri Modi asserted that India does not wish to remain merely a buyer in the defence sector. “The strength of the nation's military cannot be measured by its dependence on global markets but by its ability to become self-reliant. India seeks to become a producer and a manufacturer, because nations that manufacture become decisive players on the global stage”, he added. Highlighting recent achievements, the Prime Minister noted that more than 40 indigenously built warships and submarines have been inducted into the Indian Navy over the past few years. He remarked that nearly every few weeks the Navy has received a new capability, while 45 major naval platforms are currently under construction. These figures, he said, are not merely statistics but indicators of India's industrial capacity and future potential.

Underlining the immense employment-generating potential of the maritime sector, Shri Modi said, “The Government views the maritime sector not as an isolated industry but as a major engine of employment and economic growth for a developed India. A modern ship requires large quantities of steel, electronics, machinery and thousands of components, creating opportunities across extensive industrial supply chains”. Referring to the three commissioned vessels, he noted that more than 200 MSMEs contributed to their construction, generating substantial employment and economic activity across the country.

Shri Modi stated that the time has come for India to enter the next phase of maritime development, and the Government has adopted a new vision for the shipbuilding sector and has introduced several policy reforms in recent years to enhance domestic manufacturing capabilities. “The ₹70,000 crore incentive package announced for the shipping sector is not merely an economic measure but an investment in India's maritime future and industrial expansion. Initiatives such as Sagarmala reflect this comprehensive vision and are helping reduce logistics costs, accelerate industrial growth and create new opportunities in coastal regions” he stated.

Reflecting on India's transformation in the defence sector, Shri Modi observed that there was a time when India was counted among the world's largest defence importers, creating both strategic and security challenges. Following the formation of the Government in 2014, he said, a determined effort was made to change this situation through major policy reforms and a strong emphasis on self-reliance in defence manufacturing. “These efforts have opened new opportunities in defence design, manufacturing and exports. While India's total defence production stood at around ₹40,000 crore in 2014, it has now risen to nearly ₹1.8 lakh crore, demonstrating the significant progress made towards building a strong, self-reliant and globally competitive defence industry”, he remarked. Shri Modi emphasized that the progress made over the past twelve years demonstrates how transformative change becomes possible when policies are clear, direction is correct, and all stakeholders work together with a shared commitment towards national development.

Referring to India's rich maritime heritage, the Prime Minister said that the name of West Bengal naturally comes to mind whenever the country's maritime legacy is discussed. He observed that Bengal has historically played a crucial role in India's maritime connections with the world. The waters of the Hooghly River, he said, have witnessed changing chapters of history, the growth of trade, and new journeys of development. He also noted that the port bears the name of Dr. Syama Prasad Mookerjee, the son of Bengal and India's first Minister for Industry, making the occasion even more significant. “West Bengal is poised to become a major hub for India's Blue Economy, maritime manufacturing, logistics and coastal development in the years ahead”, Shri Modi stated.

Shri Modi reiterated that India has always viewed the oceans as a medium for cooperation and connectivity. “Security is indispensable for protecting prosperity, while self-reliance is necessary for building the future. INS Agray, INS Dunagiri and INS Sanshodhak embody these very ideals and symbolize a nation that is increasingly aware of its capabilities, confident in its strengths and determined to move forward with renewed energy and purpose in the twenty-first century” he emphasised.

Concluding his address, the Prime Minister extended his best wishes to all personnel of the Indian Navy, scientists, engineers, workers and all citizens for their contribution to these achievements and expressed confidence that India's maritime and defence sectors would continue to strengthen the nation's security, prosperity and global standing.