"डबल इंजिन सरकार आदिवासी समाज आणि महिलांच्या कल्याणासाठी सेवा भावनेने काम करत आहे"
"प्रगतीच्या प्रवासात आपल्या माता आणि मुली मागे राहणार नाहीत याकडे आपण लक्ष दिले पाहिजे”
"लोकोमोटिव्हच्या निर्मितीद्वारे दाहोद मेक इन इंडिया मोहिमेत योगदान देईल "

 

भारत माता की – जय, भारत माता की-जय

सर्वप्रथम मी  दाहोदवासियांची माफी मागतो. सुरुवातीला मी थोडा वेळ हिंदीत बोलेन आणि त्यानंतर आपल्या मातृभाषेत बोलेन.

गुजरातचे  लोकप्रिय मुख्‍यमंत्री  भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी , या देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्‍णव जी, मंत्रिमंडळातील सहकारी दर्शना बेन जरदोश, संसदेतील माझे  वरिष्‍ठ सहकारी , गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे  अध्‍यक्ष सी. आर. पाटील, गुजरात सरकारचे  मंत्रीगण, खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय आदिवासी बंधू आणि भगिनींनो,

आज इथे आदिवासी भागातून लाखो बांधव आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. आपल्याकडे पूर्वापार असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्याचा मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. माझ्या  सार्वजनिक जीवनातील  प्रारंभिक कालखंडात जेव्हा आयुष्याच्या एकेक टप्प्याची सुरुवात होती , तेव्हा उमर गाव ते अम्‍बाजी, भारताची ही  पूर्व किनारपट्टी, गुजरातची पूर्व किनारपट्टी, उमर गांव ते  अम्‍बाजी, माझ्या आदिवासी बांधवांचे हे क्षेत्र, माझे  कार्यक्षेत्र होते. आदिवासींबरोबर राहणे, त्यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत करणे , त्यांना समजून घेणे, त्यांच्याबरोबर जगणे , माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळात माझ्या या  आदिवासी माता, भगिनी, बंधूंनी मला जे मार्गदर्शन केले, मला खूप काही शिकवले, त्यातूनच मला आज तुमच्यासाठी काही ना काही करण्याची  प्रेरणा मिळाली आहे.

आदिवासींचे जीवन मी अतिशय जवळून पाहिले आहे, आणि मी नतमस्तक होऊन सांगू शकतो की गुजरात असो, मध्‍य प्रदेश असो, छत्‍तीसगढ़ असो, झारखंड असो, भारतातील कुठलेही  आदिवासी क्षेत्र असेल, मी सांगू शकतो की माझ्या आदिवासी बंधू-भगिनींचे जीवन पाण्याप्रमाणे पवित्र आणि नवीन पानांप्रमाणे  सौम्‍य असते. इथे दाहोद मध्ये अनेक कुटुंबांबरोबर आणि या संपूर्ण भागात मी दीर्घकाळ वास्तव्य केले आहे.  आज मला तुम्हा सर्वांना एकत्र भेटण्याचे, तुमचे दर्शन करण्याचे  सौभाग्‍य लाभले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

हेच कारण आहे की यापूर्वी गुजरातमध्ये आता संपूर्ण देशात आदिवासी समाजाच्या विशेषतः आपल्या भगिनी -मुलींच्या छोट्या छोट्या समस्या दूर करण्याचे कार्य आज भारत सरकार, गुजरात  सरकार, हे डबल इंजिन सरकार सेवाभावनेने करत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

याच अनुषंगाने आज दाहोद आणि पंचमार्गच्या सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले, त्यापैकी एक योजना पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे आणि दुसरी योजना दाहोदला स्मार्ट सिटी बनविण्याशी संबंधित आहे. पाण्याच्या या योजनेमुळे दाहोदच्या शेकडो गावातील माता आणि मुलींचे जीवन सुसह्य होईल.

या संपूर्ण क्षेत्राच्या आकांक्षेशी निगडित आणखी एक मोठे काम आज सुरु झाले आहे.  दाहोद आता  मेक इन इंडियाचे खूप मोठे  केंद्र बनणार आहे. गुलामगिरीच्या कालखंडात इथे स्‍टीम लोकोमोटिवसाठी जो कारखाना बांधला होता तो आता  मेक इन इंडियाला गती देईल. आता दाहोदच्या  परेल इथे  20 हजार कोटी रुपये खर्चून कारखाना उभारण्यात येणार आहे .

मी जेव्हा केव्हा दाहोदला  जायचो तेव्हा मला संध्याकाळी परेलच्या त्या सर्व्हन्ट  क्वार्टरमध्ये जाण्याची संधी मिळायची आणि मला छोट्या छोट्या डोंगरांवरील तो परेल परिसर खूप आवडायचा. मला निसर्गाबरोबर राहण्याची संधी मिळाली , मात्र मनात एक दुःख होतं,  मी माझ्या डोळ्यासमोर  पाहत होतो की हळूहळू आपले रेल्वेचे क्षेत्र, आपले हे परेल पूर्णपणे निष्पर्ण होत आहे, मात्र पंतप्रधान बनल्यानंतर माझे स्वप्न होतं ते पुन्हा एकदा सजीव बनवायचे, ते पुन्हा एकदा शानदार बनवायचे , आणि आज माझे ते स्वप्न पूर्ण होत आहे, 20 हजार कोटी रुपये खर्चून आज माझ्या दाहोदमध्ये , या आदिवासी भागात एवढी मोठी गुंतवणूक, हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे.

आज भारतीय रेल्वे आधुनिक होत आहे, विद्युतीकरण वेगाने होत आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग म्हणजेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बांधले जात आहेत. यावरून वेगाने मालगाड्या धावू शकतील, जेणेकरून मालवाहतूक गतिमान होईल, स्वस्त होईल, यासाठी देशात निर्मित  लोकोमोटिव तयार करणे आवश्‍यक आहे. या  इलेक्ट्रिक लोकोमोटिवची परदेशात  मागणी वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यात  दाहोद मोठी भूमिका बजावेल. आणि माझे दाहोदचे युवक  , तुम्हाला जेव्हा जगभरात फिरण्याची संधी मिळेल , तेव्हा कधी ना कधी तुम्हाला पहायला मिळेल की तुमच्या  दाहोदमध्ये निर्मित लोकोमोटिव जगातील कुठल्या तरी देशात धावत आहेत. ज्या दिवशी तुम्ही पाहाल, तुम्हा मनापासून आनंद होईल.

भारत आता जगातील त्या निवडक देशांपैकी एक आहे , जो  9 हजार अश्वशक्तीच्या  शक्तिशाली लोकोमोटिव्हची निर्मिती करतो. या नव्या कारखान्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळेल, आजूबाजूच्या परिसरात नवे उद्योगधंदे उभे राहू शकतील. तुम्ही कल्‍पना करू शकता,  एक नवा  दाहोद दिसेल. कधी-कधी तर वाटते आता आपला  दाहोद बडोद्याविरुद्धच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी अपार मेहनत करणार आहे.

हा तुमचा उत्साह आणि जोश पाहून  मला वाटतं....... मित्रांनो  मी दाहोद मध्ये आयुष्यातली  अनेक दशकं व्यतीत केली आहेत . एक काळ होता जेव्हा मी स्कूटरवरून यायचो, बसमधून यायचो, तेव्हापासून आतापर्यंत अनेक कार्यक्रम केले आहेत. मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील खूप कार्यक्रम केले. परंतु आज मला अभिमान वाटतोय की मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एवढे कार्यक्रम करू शकलो नव्हतो आणि आज गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांनी कमाल करून दाखवली आहे, भूतकाळात पाहिला नसेल  एवढा मोठा जनसागर आज माझ्यासमोर लोटला आहे.  मी भूपेंद्रभाई, सी. आर. पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन करतो.

बंधू-भगिनींनो,

प्रगतीच्या मार्गात एक गोष्ट नक्की आहे की आपण जेवढी प्रगती करायची आहे करू शकतो,  परंतु आपल्या प्रगतीच्या मार्गात आपल्या माता भगिनी मागे राहू नयेत. माता-भगिनीनी  देखील आपल्या प्रगतीत आपल्या बरोबरीने  खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढे जावं, यासाठी माझ्या योजनांच्या केंद्रस्थानी माझ्या माता भगिनी , त्यांचे सुख असून त्यांच्या शक्तीचा विकासात उपयोग केंद्रस्थानी असतो . आपल्या इथे पाण्याचे संकट येते तेव्हा सर्वप्रथम त्याचा त्रास माता-भगिनींना होतो आणि म्हणूनच मी संकल्प केला आहे की मला नळाद्वारे पाणी पोहोचवायचे आहे आणि थोड्याच काळात हे काम देखील माता-भगिनींच्या आशीर्वादाने मी पूर्ण करणार आहे . तुमच्या घरी पाणी पोहचावे आणि पाणीदार लोकांची  पाण्याद्वारे  सेवा करण्याची मला संधी मिळणार आहे अडीच वर्षात सहा कोटींहून अधिक कुटुंबांना पाईप लाईन मधून पाणी पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.  गुजरात मध्ये देखील आम्ही आदिवासी कुटुंबांपैकी पाच लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणी पोहोचवले  आहे आणि आगामी काळात हे काम अधिक वेगाने होणार आहे. बंधू-भगिनींनो , कोरोनाचे  संकट आलं, अजून कोरोना  गेला नाही, तर जगातील युद्धाच्या बातम्या, युद्धाच्या घटना. कोरोनाचे  संकट कमी होते  की आता नवीन संकट आणि इतके सगळं असूनही आज जगासमोर देश धैर्याने आणि अनिश्चिततेत देखील पुढे जात आहे आणि कठीण दिवसात देखील सरकारने गरीबांकडे दुर्लक्ष होऊ दिले  नाही आणि माझ्यासाठी गरीब, माझे आदिवासी, माझे दलित, माझा ओबीसी समाजातील शेवटच्या रांगेतील मानवाचे सुख आणि त्याची काळजी आहे आणि म्हणूनच जेव्हा शहरे  बंद झाली,  शहरांमध्ये काम करणारे आपले दाहोदचे लोक रस्त्याची कामे खूप करत होते . आधी जेव्हा सगळं बंद झालं तेव्हा ते  परत आले , तेव्हा गरीबाच्या घरात चूल पेटावी यासाठी मी जागा  राहिलो आणि आज जवळपास दोन वर्ष व्हायला आली, गरिबांच्या घरात मोफत अन्नधान्य पोहोचवलं, 80 कोटी लोकांना दोन वर्षे मोफत अन्नधान्य पोहाचवून जगातील सर्वात मोठा विक्रम आपण केला आहे

आपण स्वप्न पाहिले की माझ्या गरीब आदिवासींना स्वतःचे पक्के घर मिळावे, त्यांना शौचालय मिळावे, त्यांना वीज  मिळावी,  त्यांना पाणी मिळावे त्यांना गॅस  जोडणी मिळावी, त्यांच्या गावांजवळ उत्तम आरोग्य केंद्र असावीत , रुग्णालय असावे,  त्यांना 108 ही सेवा उपलब्ध व्हावी , त्यांना शिकण्यासाठी  चांगल्या शाळा मिळाव्यात, गावांमध्ये जाण्यासाठी उत्तम रस्ते उपलब्ध व्हावेत या सर्व सुविधा एकाच वेळी आज गुजराच्या गावापर्यंत पोहोचाव्यात यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहे आणि म्हणूनच आपण एक पाऊल पुढे गेलो आहोत

ऑप्टिकल फायबर नेटवर्क, आत्ता तुमच्या बरोबर सहभागी होण्यापूर्वी  भारत सरकारच्या आणि गुजरात सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी बंधू भगिनी आहेत, त्यांच्या बरोबर बसलो होतो, त्यांचे अनुभव ऐकणे  माझ्यासाठी इतके आनंददायी होते, इतके  आनंददायी होतं की मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मला आनंद होत आहे की सातवी शिकलेल्या माझ्या भगिनी, शाळेतही पाय न ठेवलेल्या  माझ्या माता-भगिनी जेव्हा म्हणतात की आम्ही आपल्या धरतीमातेला रसायनांपासून मुक्त करत आहोत, आम्ही संकल्प केला आहे, आम्ही सेंद्रिय शेती करत आहोत. आम्ही आमच्या भाज्या, अहमदाबादच्या बाजारांमध्ये त्यांची विक्री होत आहे आणि दुप्पट भावाने विक्री होत आहे. मला माझ्या आदिवासी गावांच्या माता-भगिनी जेव्हा हे सांगत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये मला चमक दिसत होती.  एक काळ होता , मला आठवतय ,  आपल्या दाहोद मध्ये फुलांची  शेती जोरात होती . मला आठवतंय त्यावेळी मुंबईपर्यंत , माता,  देवतांना देवांना आपली फुले  अर्पण केली जात होती . एवढ्या साऱ्या फुलबागा , आता सेंद्रिय शेतीकडे आपला शेतकरी वळला आहे आणि जेव्हा आदिवासी बांधव एवढे मोठे परिवर्तन घडवून आणतात तेव्हा तुम्ही हे समजून घ्यावं आणि सगळ्यांना हे करायचं आहे . आदिवासी सुरुवात करतात तर सर्वांनीच करायचे आहे आणि दाहोदने हे करून दाखवलं आहे.

आज मला एका दिव्यांग  जोडप्याला भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांना भेटून मला आश्चर्य वाटले. सरकारने त्यांना  मदत केली. त्यातून  त्यांनी एक सामायिक सेवा केंद्र सुरू केले, पण त्यावरच समाधान मानून ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी मला सांगितले की साहेब मी दिव्यांग आहे आणि तुम्ही मला इतकी मदत केली! मी पण ठरवले आहे  की माझ्या गावातल्या एखाद्या दिव्यांगाला सेवा दिली  तर त्याच्याकडून एक पैसाही घेणार नाही. या परिवाराला माझा सलाम. बंधूंनो, माझ्या आदिवासी कुटुंबाचे संस्कार पाहा, आपल्याला शिकायला मिळेल असे त्यांचे संस्कार आहेत. आपली  वनबंधू कल्याण योजना, आदिवासी कुटुंबांच्या काळजीसाठी आहे , विशेषत: आपल्या  दक्षिण गुजरातमध्ये सिकलसेल आजारासाठी, याआधी, अनेक सरकारे आली, मात्र, सिकलसेलवर आवश्यक ते मूलभूत प्रयत्न आम्ही केले आणि आज सिकलसेलवर काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.  मी माझ्या आदिवासी कुटुंबांना आश्वस्त करू इच्छितो की विज्ञान आपल्याला नक्कीच मदत करेल.  शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.  अशा प्रकारच्या सिकलसेल रोगामुळे विशेषतः माझ्या आदिवासी मुलामुलींना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा  लागत आहे, त्यांना या  संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत.

बंधू आणि भगिनींनो,

हा स्वातंत्र्याचा अमृतोत्सव आहे.  देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे, पण हे या देशाचे दुर्दैव आहे की सात-सात  दशके उलटून गेली, पण जे स्वातंत्र्याचे मूळ लढवय्ये होते, त्यांच्याकडे इतिहासाने डोळेझाक केली आहे. त्यांच्या  हक्काचे  जे त्यांना मिळायला हवे होते  ते मिळालेच  नाही.  गुजरातमध्ये असताना मी त्यासाठी खूप कष्ट घेतले होते.  वयाच्या 20-22 व्या वर्षी भगवान बिरसा मुंडा, माझा आदिवासी युवक भगवान बिरसा मुंडा यांनी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले  होते. पण लोक त्यांना विसरले, आज आम्ही झारखंडमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य संग्रहालय बनवले आहे.

बंधू-भगिनींनो, मला दाहोदच्या बंधू-भगिनींना, विशेषत: शिक्षण क्षेत्रातील लोकांना एक विनंती करायची आहे. आपल्याला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे विविध जिल्ह्यात साजरे करायचे माहीतच असेल. पण त्याशिवाय, दाहोदमधल्या  आदिवासींचे नेतृत्व, त्यांनी  किती आघाडी घेतली होती , किती फळ्यांवर लढा दिला होता,  आमच्या देवगड बारियामध्ये  आदिवासींनी  22 दिवस चालवलेले  युद्ध, आमच्या मानगड पर्वतरांगांमध्ये  आमचे   आदिवासी इंग्रजांशी लढले होते. त्यांनी त्यांच्या नाकी नऊ आणले होते.  आणि आम्ही गोविंदगुरूंना विसरूच  शकत नाही.  मानगडमध्ये गोविंदगुरूंचे स्मारक उभारून आजही त्यांच्या त्यागाचे स्मरण आमच्या सरकारने केले. आज मला देशाला सांगायचे आहे, आणि म्हणून मी दाहोदच्या शाळांना, दाहोदच्या शिक्षकांना विनंती करतो की, 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात देवगड, बारिया, लिमखेडा, लिमडी, दाहोद, संतरामपूर, झालोद  असो, या परिसरातला असा कोणताच भाग नाही जिथला आदिवासी धनुष्यबाण घेऊन इंग्रजांसमोर रणांगणात उभा ठाकला नाही !  इतिहासात हे  लिहिलेले आहे, कुणाकुणाला फाशीही झाली  आणि जालियनवाला बागेत इंग्रजांनी जसे हत्याकांड घडवले तसेच हत्याकांड आपल्याच या आदिवासी परिसरातही झाले. पण दुर्दैवाने ते सर्व विस्मरणात गेले.  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने या सर्व गोष्टींमधून  आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना प्रेरणा मिळावी, शहरात राहणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शाळेत नाटके लिहिली जावीत, गाणी रचली जावीत.  ही नाटके शाळेत सादर व्हावीत आणि त्यावेळच्या घटनांची आठवण  लोकांमध्ये ताजी व्हावी.  गोविंदगुरूंचे बलिदान, गोविंदगुरूंचे सामर्थ्य,  त्यांची आदिवासी समाज पूजा करतोच ,पण भावी पिढ्यांनाही त्यांच्याबद्दल कळायला हवे, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

बंधू-भगिनींनो, आपल्या आदिवासी समाजासाठी माझ्या  मनात एक स्वप्न होते की, माझ्या आदिवासी मुला-मुलींनी डॉक्टर व्हावे, नर्सिंगमध्ये जावे.  मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा उमरगाव ते  अंबाजी या सर्व आदिवासी भागात शाळा होत्या, पण विज्ञान संस्था नव्हत्या. विज्ञान संस्था नसतील तर  माझा आदिवासी मुलगा किंवा मुलगी अभियंता कसे  होणार,  डॉक्टर कसे होणार,  म्हणून मी विज्ञान अध्ययनाची सुरुवात  केली. प्रत्येक आदिवासी तालुक्यात मी एक विज्ञान संस्था उभारण्याचे ठरवले  आणि आज मला आनंद होत आहे की आदिवासी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये, डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालये, नर्सिंग महाविद्यालये सुरू झाली आहेत आणि माझी आदिवासी मुले-मुली डॉक्टर होण्यास तत्पर  आहेत. इथली मुले अभ्यासासाठी  परदेशात गेली  आहेत, भारत सरकारच्या योजनेद्वारे  परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेली  आहेत, बंधू-भगिनींनो, आम्ही प्रगतीची दिशा सांगितली आहे, आणि आम्ही त्या मार्गावर वाटचाल करत आहोत. आज देशभरात साडेसातशे एकलव्य आदर्श शाळा आहेत, म्हणजे जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एकलव्य आदर्श शाळा आहेत आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. आपल्या आदिवासी समाजातील मुलांना एकलव्य शाळेमध्ये आधुनिक, अद्ययावत  शिक्षण मिळावे याची काळजी आम्ही घेत आहोत.

स्वातंत्र्यानंतर केवळ 18 आदिवासी संशोधन संस्था सुरू झाल्या.  सात दशकात फक्त 18, माझ्या आदिवासी बंधुभगिनींनो , मला आशीर्वाद द्या, मी सात वर्षांत आणखी 9 संस्था सुरू केल्या.  प्रगती कशी होते, प्रगतीचे प्रमाण किती आहे याचे हे उदाहरण आहे. आपली प्रगती कशी असावी, याचाही विचार आम्ही केला आहे आणि म्हणूनच मी आणखी एक काम केले  आहे.  त्यावेळी मला आठवते की मी लोकांमध्ये वावरायचो , त्यामुळे मला बारीकसारीक गोष्टी समजायच्या .आम्ही108  सेवा सुरू केली होती. मी इथे तेव्हा दाहोदला आलो असताना  मला काही भगिनी भेटल्या. ओळख होती.  मी इथे आल्यावर त्यांच्या घरीही जेवायला जायचो. तेव्हा त्या बहिणींनी मला सांगितले की साहेब तुम्ही या 108 मध्ये एक काम करा.  मी विचारले  काय करू? तेव्हा त्यांनी सांगितले की साप चावल्यावर विष शरीरात वेगाने पसरते. 108 मधून दवाखान्यात नेईस्तोवर आमच्या कुटुंबातल्या लोकांचा मृत्यू झालेला असतो. . . दक्षिण गुजरातमध्येही हीच समस्या, मध्य गुजरात, उत्तर गुजरातमध्येही हीच समस्या, मग मी निर्णय घेतला की लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्पदंशावर तातडीने दिले जाणारे इंजेक्शन 108 मध्ये उपलब्ध करायचे. आज 108 मध्ये ही सेवा सुरू आहे.

पशुपालन, आज आपल्या पंचमहालच्या डेअरीचे सर्वत्र नाव झाले  आहे, नाहीतर आधी कोणी विचारतही नव्हते.  विकासाच्या सर्व क्षेत्रात गुजरातची आगेकूच व्हावी. आज जवळपास प्रत्येक गावात सखी मंडळ सुरू आहे याचा मला आनंद आहे.  महिला स्वतः सखी मंडळाचे नेतृत्व करत आहेत आणि माझ्या शेकडो, हजारो आदिवासी कुटुंबांना त्याचा लाभ मिळत आहे, एकीकडे आर्थिक प्रगती, दुसरीकडे आधुनिक शेती, तिसर्‍या बाजूला जीवनाच्या सुखसुविधांसाठी गरजेच्या  घर, पाणी, वीज, स्वच्छतागृह, एसी , अशा  गोष्टी, आणि मुलांना भरपूर आणि जे हवे ते शिकता यावे  अशी व्यवस्था. अशी चौफेर  प्रगती आपण करत आहोत.  आज  मी दाहोद जिल्ह्यात भाषण  करत असताना  उमरगाव ते अंबाजीपर्यंतचे  माझे सर्व आदिवासी नेते मंचावर बसले आहेत.  सर्व वडीलधारी मंडळीही इथे उपस्थित आहेत. अशावेळी  माझी एक इच्छा आहे, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा. करणार का ? जरा हात उंचावून मला ती पूर्ण करण्याचे आश्वासन  द्या, करणार का? खरच, हा कॅमेरा सर्व काही रेकॉर्ड करत आहे, मी पुन्हा विचारतो, करणार ना सर्व? तुम्ही मला कधीही निराश केलेले नाही, मला माहीत आहे आणि माझा आदिवासी बांधव एकटा जरी मी करेन म्हणाला की तो ते कृतीतून करून दाखवतो.  स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आपल्या प्रत्त्येक जिल्ह्यात, आदिवासी भागात आपण  75मोठे तलाव बांधू शकू का ? आतापासून कामाला सुरुवात करा आणि प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव घ्या, त्यात पावसाचे पाणी साचेल, त्यासाठी संकल्प करा, अंबाजी ते  उमरगामचा संपूर्ण पट्टा जलमय होईल आणि त्यामुळे इथले जीवनही समृद्ध  होईल. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 'जीवन' आणण्यासाठी,  पाण्याचा उत्सव करून, पाण्यासाठी तलाव खोदून, महोत्सवाला नव्या उंचीवर नेऊया.  आणि  स्वातंत्र्याची 75 वर्षे, आणि स्वातंत्र्याच्या 100 वर्षांमधील 25 वर्षे या कालावधीसाठी काम झाले पाहिजे. आज, जी पिढी 18-20 वर्षांची आहे ती  त्या वेळी समाजात नेतृत्व करत असतील, ते जिथे असतील तिथे नेतृत्व करत असतील. तेव्हा  देश अशा  उंचीवर असण्यासाठी  जोरदार काम करण्याची वेळ आली आहे  आणि त्या कामात माझे आदिवासी बंधू-भगिनी मागे राहणार नाहीत, माझा गुजरात कधीच मागे राहणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात,  आशीर्वाद दिलात , मन-सन्मान दिलात , मी तर तुमच्या घरचा माणूस आहे. मी तुमच्यामध्ये मोठा झालो आहे. तुझ्याकडून खूप काही शिकून मी पुढे गेलो आहे. मी तुमचा  खूप ऋणी  आहे  आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला तुमचे ऋण  फेडण्याची संधी मिळते तेव्हा मी ती साधतो  आणि माझ्या परिसराचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करतो. मी पुन्हा एकदा आदिवासी समाजातील सर्व स्वातंत्र्य योद्ध्यांना आदरांजली वाहतो. मी त्यांना नमन करतो आणि येणार्‍या पिढ्या आता खांद्याला खांदा लावून भारताला पुढे नेण्यासाठी पुढे याव्यात, यासाठी  शुभेच्छा देतो.

माझ्यासोबत म्हणा

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches UPI at department store in France

Media Coverage

India launches UPI at department store in France
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi highlights India's defence transformation over the last decade
June 17, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has highlighted the significant transformation witnessed in India’s defence capabilities over the last decade.

Shri Modi said that India’s defence capabilities have undergone a major transformation, guided by the vision of self-reliance and powered by innovation, technology and indigenous manufacturing.

The Prime Minister noted that the progress made in the defence sector over the last 12 years reflects India’s growing focus on strengthening national security through self-reliance.

The Prime Minister further stated that India has strengthened its defence capabilities across air, land and sea, advanced indigenous technologies and built a stronger foundation for self-reliance and national security.

The Prime Minister wrote on X;

“India’s defence capabilities have witnessed significant transformation over the last decade, guided by the vision of self-reliance and powered by innovation, technology and indigenous manufacturing.

This thread gives a glimpse of the strides India has made in the defence sector over the last 12 years.

#12YearsOfSurakshitBharat”

“This thread explains how India has strengthened its defence capabilities across air, land and sea, advanced indigenous technologies and built a stronger foundation for self-reliance and national security.

#12YearsOfSurakshitBharat”