गीता आपल्याला विचार करायला लावते, प्रश्न विचारायला उद्युक्त करते, वाद-विवाद-चर्चा करण्यास प्रोत्साहित करते आणि आपल्या मनाची कवाडे खुली करते: पंतप्रधान

सन्माननीय अतिथी,

मित्रहो !

वनक्कम!

हा एक अनोखा कार्यक्रम आहे. स्वामी चिद्भावनंदजी यांच्या निवेदनासह गीतेचे एक ई-बुक प्रकाशित केले जात आहे. ज्यांनी याचे काम केले आहे, त्या सर्वांचे मी कौतुक करू इच्छितो. या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. यात परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातली आहे. विशेषत: तरुणांमध्ये ई-पुस्तके विशेष लोकप्रिय होत आहेत. म्हणूनच, हा प्रयत्न अधिकाधिक तरुणांना गीतेच्या उदात्त विचारांशी जोडेल.

मित्रहो,

या ई-बुकमुळे शाश्वत गीता आणि तेजोमय तमिळ संस्कृती यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील. जगभरात पसरलेला तामिळ समुदाय हे सहज वाचू शकेल. तामिळ समुदायाने अनेक क्षेत्रांमध्ये यशाची नवीन शिखरे गाठली आहेत. तरीही, त्यांना त्यांच्या सांस्कृतिक मुळांचा अभिमान आहे. ते जेथे जेथे गेले तेथे तामिळ संस्कृतीचे मोठेपण आपल्याबरोबर घेऊन गेले.

मित्रहो,

मला स्वामी चिदभावनंद जी यांना आदरांजली वहायची आहे. त्यांनी आपले मन, शरीर, हृदय आणि आत्मा , आयुष्य भारताच्या पुनर्निमीतीसाठी समर्पित केले होते. त्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे होते,मात्र नियतीने त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आखल्या होत्या. "स्वामी विवेकानंदांचे मद्रास व्याख्यान" हे पुस्तक त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या पुस्तक विक्रेत्याकडे दिसले आणि सर्व गोष्टींपेक्षा देश महत्त्वाचा ठरवून लोकांची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात:

यद्य यद्य आचरति श्रेष्ठः तत्त तत्त एवं इतरे जन:।

स्यत् प्रमाणम कुरुते लोकः तद अनु वर्तते।

याचा अर्थ असा की महापुरुष जे काही करतात त्याचे अनुसरण करण्याची अनेकांना प्रेरणा मिळते. एकीकडे स्वामी चिद्भावनंद जी यांना स्वामी विवेकानंदांनी प्रेरित केले. तर दुसरीकडे, त्यांनी आपल्या उदात्त कर्मांनी जगाला प्रेरित केले. श्री रामकृष्ण तपोवनम आश्रम हा स्वामी चिदभावनंद जी यांचे उदात्त कार्य पुढे नेत आहे. ते समाज सेवा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करत आहेत. मी श्री रामकृष्ण तपोवनम् आश्रमाचे कौतुक करू इच्छितो आणि त्यांच्या भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

गीतेचे सौंदर्य तिच्या सखोल , वैविध्यपूर्ण आणि लवचिक विचारांमध्ये आहे. आचार्य विनोबा भावे यांनी गीतेचे वर्णन करताना म्हटले आहे की गीता ही एखाद्या आईप्रमाणे आहे जी आपल्या बाळाला ठेच लागली तर त्याला मांडीवर घेते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महाकवी सुब्रमण्य भारती यांच्यासारख्या महान नेत्यांनाही गीतेने प्रेरित केले. गीता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते. ती आपल्याला प्रश्न विचारण्यास प्रेरित करते. ती वाद-विवादाला प्रोत्साहन देते. गीता आपल्या मनाची कवाडे खुली करते.गीतेपासून प्रेरित कोणीही व्यक्ती स्वभावाने नेहमी दयाळू आणि लोकशाही वृत्तीची असते.

मित्रहो ,

शांत आणि निसर्गरम्य परिसरात गीतेसारख्या ग्रंथाची निर्मिती झाली असेल असे कुणालाही वाटू शकते परंतु, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की या संघर्ष किंवा युद्धकाळात भगवद्गीतेच्या रूपाने जगाला जीवनाचा उत्कृष्ट धडा मिळाला

आपण ज्याची आशा करू शकतो त्यासाठी गीता हा सर्वात मोठा ज्ञानाचा स्रोत आहे. परंतु याचा तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णाच्या तोंडी हे ज्ञान कसे आले ? भगवद्गीता हा विचारांचा खजिना आहे , जो विषाद पासून विजय पर्यंतचा प्रवास प्रतिबिंबित करतो. जेव्हा भगवद्गीतेचा जन्म झाला, तेव्हा संघर्ष झाला, विषाद झाला.

बऱ्याच जणांना वाटते की आज माणुसकी अशाच संघर्षांमधून व आव्हानांमधून जात आहे. संपूर्ण जग एका मोठ्या महामारीच्या विरोधात कठीण युद्ध लढत आहे. याचे दूरगामी आर्थिक आणि सामाजिक परिणामही दिसत आहेत. अशा काळात श्रीमद्भगवद्गीतेत दाखवलेला मार्ग आजही सुसंगत आहे. मानवतेसमोर असलेल्या आव्हानांवर मात करून पुन्हा एकदा विजय मिळविण्यासाठी ते सामर्थ्य आणि दिशा प्रदान करू शकेल. भारतात याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. कोविड -19 विरुद्ध आपल्या जनतेच्या सामर्थ्याचा लढा, लोकांमधील भावना , आपल्या नागरिकांचे धैर्य, या सर्वांमागे गीतेची प्रेरणा आहे असे म्हणता येईल . यात नि: स्वार्थपणाची भावना देखील आहे. आपली माणसे एकमेकांना हरतऱ्हेने मदत करत असल्याचा प्रत्यय आपण वारंवार घेतला आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी एक अतिशय रंजक, नवलपूर्ण माहिती देणारा लेख ‘युरोपियन हार्ट जर्नल’मध्ये प्रकाशित झाला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्यावतीने प्रसिद्ध होत असलेल्या हृदयाच्या आरोग्य विषयक या नियतकालिकाचे अवलोकन त्या क्षेत्रातल्या विव्दानांकडून केले जाते. नियतकालिकामधील लेखात, कोरोना कालावधीतून बाहेर पडताना इतर गोष्टींबरोबरच गीतेचाही संबंध खूप जवळचा आहे, याविषयी चर्चा करण्यात आली आहे. परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अचूक मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये केले आहे. या लेखामध्ये अर्जुनाची तुलना आरोग्यसेवकाशी केली आहे आणि विषाणूविरुद्ध लढणारी रूग्णालये म्हणजे युद्धाची रणभूमी आहे, असे म्हटले आहे. भीती आणि आव्हानांच्या संकटावर मात करीत आरोग्य सेवकांनी त्यांचे कर्तव्य बजावल्याबद्दल सर्वांचे कौतुक लेखामध्ये केले आहे.

मित्रांनो,

भगवद्गीतेमध्ये दिलेल्या संदेशाचे सार म्हणजे कर्म करणे, काम-क्रिया करणे. भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे:-

नियतं कुरू कर्म त्वं

कर्म ज्यायो ह्यकर्मण:।

शरीर यात्रापि च ते

न प्रसिद्ध्ये दकर्मण: ।।

निष्क्रियतेपेक्षा कोणती तरी कृती करणे खूपच चांगले आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपल्याला काहीतरी कृती करण्यात मग्न रहावे, असे सांगितले आहे. आपण कृती केल्याशिवाय आपल्या शरीराचीही काळजी घेऊ शकत नाही. आज भारतातल्या 130 कोटी लोकांनी काही कृती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व लोक-नागरिक भारताला आत्मनिर्भर किंवा स्वावलंबी बनवणार आहेत. दीर्घकाळाचा विचार केला तर भारत स्वावलंबी बनणे, सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे काही फक्त स्वतःसाठी मालमत्ता, संपत्ती जमा करणे आणि स्वतःचे मूल्य निर्माण करणे असे अजिबात नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी संपत्ती आणि मूल्य निर्मिती करणे आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना संपूर्ण जगासाठी चांगली ठरणार आहे, असा आमचा विश्वास आहे. गेल्या काही महिन्यात ज्यावेळी जगाला औषधांची आवश्यकता होती, त्यावेळी सर्वांना औषधांचा पुरवठा होऊ शकेल, यासाठी भारताने सर्वतोपरी कार्य केले. आमच्या शास्त्रज्ञांनीही लवकरात लवकर लस कशी निर्माण होऊ शकेल, यासाठी अथक परिश्रम केले. आणि आता भारतामध्ये बनलेली - ‘मेड इन इंडिया’ लस जगातल्या अनेक देशांमध्ये दिली जात आहे, हे भारत नम्रतेने नमूद करू शकतो. आम्हाला मानवतेच्या नात्याने सर्वांना मदत करायची आहे, सर्वांना या आजारातून मुक्त करायचे, बरे करायचे आहे. अगदी हीच शिकवणूक गीतेमधून आपल्याला दिली गेली आहे.

मित्रांनो,

आजच्या युवावर्गातल्या माझ्या मित्रांना, मी विशेष आग्रह करतो की, त्यांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या शिकवणुकीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. गीतेतला उपदेश, रोजच्या जीवनातले व्यवहार पाळताना अतिशय उपयुक्त ठरतो. आजच्या काळात आपले जीवन अतिशय वेगवान झाले आहे. अशा घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये गीता म्हणजे मनाला शांत करणारी वाळवंटातली हिरवळ आहे. गीता म्हणजे आयुष्याच्या अनेक आयाम, परिमाणांचा एक व्यावहारिक मार्गदर्शक ग्रंथ आहे. म्हणूनच गीतेतल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या श्लोकाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका: -

कर्मण्ये-वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

हा श्लोक जाणून घेतल्यानंतर लक्षात येईल की, अपयशाच्या भीतीपासून आपले मन मुक्त झाले आहे आणि आपण जी काही कृती करणार आहोत, त्यावर आपण लक्ष केंद्रीत करू शकत आहोत. गीतेतला भक्ती योग याविषयावर असलेला अध्याय आपल्याला भक्तीचे महत्व शिकवतो. गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये मनामध्ये सकारात्मक चौकट जोपासण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, आपण काय द्यायचे आहे, याची शिकवण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये सर्वशक्तीमान अशा परमात्म्याची महान शक्ती आहे, आपल्यामध्ये परम दैवी शक्तीची एक ठिणगी आहे- एक अल्पसा अंश आहे, ही भावना जागृत करण्याचे काम गीता करते.

स्वामी विवेकानंद यांनीही अशाच प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. माझ्या युवामित्रांना अनेकवेळा अवघड निर्णय घेण्याच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की, मी जर अर्जुनाच्या जागी असतो तर काय केले असते? अशा मनाच्या व्दंव्दामध्ये फसल्यानंतर श्रीकृष्ण मला नेमके काय करायला सांगतील? असा स्वतःला प्रश्न विचारण्याने, खरोखरीच खूप चांगला मार्ग सापडतो. इतकेच नाही तर, तुम्ही मनानेच स्वत:च्या आवडीनिवडी आणि निर्माण झालेली परिस्थिती यातून स्वतःला जणू वेगळे करता, स्वतःविषयीच्या गोष्टींचे तुम्हाला तितके महत्व वाटेनासे होते. मात्र त्या परिस्थितीकडे तुम्ही गीतेतल्या शाश्वत तत्वांच्या नजरेने पाहण्यास प्रारंभ करता. या शाश्वत तत्वांमुळेच तुम्ही योग्य, आवश्यक कृती करता. अत्यंत अवघड निर्णय घेण्यासाठी अशी योग्य कृतीच मदत करते. गीतेच्या निरूपणासह ई-ग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल त्याचे लेखक संपादक स्वामी चिद्भवानंद जी यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.

धन्यवाद!

वणक्कम !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 फेब्रुवारी 2025
February 19, 2025

Appreciation for PM Modi's Efforts in Strengthening Economic Ties with Qatar and Beyond