बंधू आणि भगिनींनो,
माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या योजनेचे कर्मयोगी, उद्यमशील युवा, परंपरांच्या चौकटीतून बाहेर पडलेल्या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली आहे, हे माझे भाग्य आहे. तुम्ही ते लोक आहात जे नेहमीच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या मार्गांवर चालण्याऐवजी आपले साहस आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून स्वतःचे मार्ग तयार करता. देशाची समृद्धी आणि समाजाची भरभराट यामध्ये तुम्हा लोकांचे मोठे योगदान आहे.
आज माझ्या बरोबरच संपूर्ण देश तुम्हा सर्वांच्या या धाडसाची, या निर्णयाची, या पुढाकाराची, तुमच्या या प्रवासाची संस्मरणीय गाथा या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तुम्हा सर्वांसोबत जोडला गेलेला आहे. अगदी गेल्या महिन्यातच पंतप्रधान निवासस्थानी मला मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांच्या प्रगतीच्या कहाण्या मनाला समाधान देखील देतात आणि मनाला अभिमानाने प्रफुल्लित करतात. त्याच दिवशी मी ठरवले होते की जर कधी संधी मिळाली तर देशभरातील मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलण्याची संधी मी शोधत राहिलो, देशभरातील मुद्राच्या लाभार्थ्यांशी बोलेन, गप्पागोष्टी करेन. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचा, माझा वेळ देखील वाचला आहे, तरी देखील आपल्या दरम्यान एक बंधन निर्माण झाले आहे, तेच प्रेमळ नाते निर्माण झाले आहे. तुमचे अनुभव, तुमच्या भावना अगदी थेट मला ऐकता येत आहे, त्यात इतर कोणत्याही व्यवस्थेची गरज नाही.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीमध्ये तुमच्या सारख्या उद्योगींचे महत्त्वाचे योगदान आहे, पण त्यावर यापूर्वी कोणीही लक्ष पुरवले नव्हते, त्यांच्या विषयी कोणीही विचार केला नव्हता. तुम्हाला माहित आहेच की, 25-30 वर्षांपूर्वी राजकीय फायद्यासाठी कर्ज मेळावे आयोजित केले जायचे आणि राजकीय संबंध असलेले लोक, त्यांचे चेले-चमचे, कंत्राटदार, मतपेढीचे राजकारण, हे सर्व बँकांतून पैसे घेऊन जायचे, अनेक बातम्या छापून यायच्या किती बँक कर्ज दिले. नंतर काय व्हायचे ते कोणी विचारलेच नाही. आम्ही कोणतेही कर्ज मेळावे आयोजित केले नाहीत किंवा मध्यस्थांना स्थान दिले नाही. आपल्या देशाचे युवक, देशाच्या माता-भगिनींना स्वतःच्या प्रयत्नांनी काही करण्याची इच्छा असते, स्वतः बँकेच्या कार्यालयात जाऊन बोलण्याची इच्छा असते, आपले म्हणणे मांडायचे असते, काही करण्याचा निर्धार असतो, मुद्रा योजना हे एक असे उत्पादन बनवण्यात आले जे अशी इच्छा बाळगणा-यांसाठी, काही करण्याची आकांक्षा असलेल्या देशवासीयांसाठी खूप मोठी संधी ठरली. आम्ही आमच्या लहान उद्योजकांवर विश्वास ठेवला, त्यांच्या व्यवसाय कौशल्यावर विश्वास ठेवला. मुद्रा योजनेंतर्गत त्यांना कर्ज देण्यात आले जेणेकरून ते आपला व्यवसाय सुरू करू शकतील, त्याचा विस्तार करू शकतील. मुद्रा योजनेमुळे केवळ स्वयंरोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या जॉब मल्टिप्लायरचे देखील काम करत आहेत.
स्वातंत्र्यानंतरच आपल्या देशात लायसेंस राज म्हणजे परवाना राजची एखाद्या आजारासारखी मोठी समस्या निर्माण झाली. कर्ज त्यालाच मिळायचे ज्याची ओळख असेल, काम त्याचेच व्हायचे ज्याचे काही तरी नाव झालेले असेल, या ना त्या प्रकारे या प्रथेमुळे गरीबांना या प्रणालीच्या बाहेर उभे केले कारण ना त्यांचे नाव मोठे होते ना कोणाशी ओळख होती. हेच एक मोठे कारण होते की हजारो लाखो लहान उद्योजक इतक्या वर्षांपासून आपल्या योग्यतेनुसार आपला व्यापार सुरूच करू शकत नव्हते किंवा त्याचा विस्तार करू शकत नव्हते. आर्थिक मदतीसाठी ते सावकारांच्या जाळ्यातच अडकून पडत होते. या देशात एक काळ असा होता जेव्हा स्वतः अर्थमंत्री फोन करून बड्या उद्योगपतींना कर्ज मिळवून द्यायचे आणि दुसरीकडे एका छोटा उद्योजक सावकारांना 30-40 टक्क्यांना व्याज देण्याच्या चक्रात अशा प्रकारे अडकत जायचा की आयुष्यभर त्यातून बाहेर पडू शकत नव्हता. हे दुष्टचक्र कधी तरी तोडणे गरजेचे होते, कोणाला तरी ते तोडायलाच हवे होते, आम्ही या दिशेने प्रयत्न केला आणि आम्ही त्यात यशस्वी ठरलो. या दुष्टचक्राला आम्ही तोडत आहोत…. भरोसा, विश्वास यांच्या सामर्थ्याच्या मदतीने. सरकारचा गरीबांवर विश्वास, गरीबांच्या स्वप्नांवर विश्वास, गरीबांच्या कष्टांवर विश्वास.
जर युवकांना दशकांपूर्वी मुद्रा सारखी योजना मिळाली असती तर मला अगदी ठाम विश्वास आहे की शहरांकडे पलायन करण्याची समस्या इतकी अक्राळ विक्राळ बनली नसती. बँक तारणाविना कर्ज मिळाल्यावर, कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यावर युवक आपल्या गावातच किंवा शहरात राहूनच आपल्या बळावर रोजगार करू लागले असते. आज गरीबातील गरीब व्यक्तीला कोणत्याही तारणाविना मुद्रा कर्ज मिळत आहे. आज एक सामान्य व्यक्ती देखील, कोणतेही विशेष नाव किंवा ओळखीशिवाय देखील मुद्रा कर्जाच्या माध्यमातून उद्योजक बनू शकत आहे आणि आज याची देखील गरज नाही की तुमचा कोणी मित्र किंवा नातेवाईक सरकारमध्येच असला पाहिजे. आज देशात गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही, प्रत्येकाजवळ, मग तो कोणताही क्षेत्रातील असो, कोणत्याही वर्गातील असो, त्याच्याकडे कोणते ना कोणते कौशल्य आहे, गरज आहे ती त्या कौशल्याला ओळख मिळवून देण्याची, त्याला प्रोत्साहन देण्याची. मुद्रा योजनेमुळे लोकांना, विशेषतः आमच्या युवकांच्या याच कौशल्याला बळ मिळत आहे.
जेव्हा गुणवत्तेला प्रोत्साहन मिळते तेव्हा त्या गुणवत्तेत आणखी वाढ होते, जीवनात बदल घडून येतो. अशी कल्पना करू या की, कोणाच्या अंगी कपड्यावर वीणकाम करण्याचे कौशल्य होते आणि त्या व्यक्तीने मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेऊन कपड्यांवर वीणकाम करण्याचा व्यवसाय सुरू केला. हळू हळू ती व्यक्ती डिझायनर कपड्यांचे काम करू लागेल. कोणाला आपल्या हातमागाचा व्यवसाय करण्यासाठी मदत मिळेल. मुद्रा योजनेने एका प्रकारे देशातील सामान्य व्यक्तीमधील गुणवत्तेला- कौशल्याला विकसित करण्याचे काम केले आहे, त्या गुणवत्तेला ओळख देण्याचे आणि लोकांना सशक्त बनवण्याचे काम केले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, मुद्रा योजने अंतर्गत आतापर्यंत एकूण 12 कोटी लोकांना कर्जाच्या माध्यमातून 6 लाख कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.
अनेकदा असे होते की सरकारकडे योजनांसाठी निधी असतो पण त्याचा संपूर्ण वापर होऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मुद्रा एक अशी योजना आहे ज्यामध्ये लक्ष्यापेक्षा जास्त कर्ज देण्यात आले आहे. यात देखील 28 टक्के म्हणजेच सव्वा तीन कोटींपेक्षा जास्त कर्ज अशा लोकांना देण्यात आली आहेत ज्यांनी पहिल्यांदाच आपला एखादा व्यवसाय सुरू केला आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी बेकारीच्या चक्रातून बाहेर पडून रोजगार निर्माण करण्याची स्थिती प्राप्त केली आहे. सर्वाधिक आनंदाची बाब म्हणजे यात 74 टक्के लाभार्थी महिला आहेत म्हणजेच निव्वळ 9 कोटींपेक्षा जास्त महिलांना कर्ज देण्यात आले आहे.
जेव्हा महिला पुढे जातात, आर्थिक घडामोडींचे केंद्र बनतात तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा आत्मविश्वास वाढतो, विचारांमध्ये बदल होतात, समाज सशक्त होतो. याच प्रकारे मुद्रा योजने अंतर्गत 55 टक्के कर्ज मागासलेल्या व्यक्तींना देण्यात आले आहे, म्हणजेच एकूण 12 कोटी कर्जदारांमध्ये 55 टक्के कर्ज अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागास वर्गाच्या उद्योजकांना देण्यात आले आहे. दशकांपासून आपण गरिबीच्या नावाने घोषणा ऐकत आलो आहोत, गरिबांच्या उत्थानाच्या गोष्टी ऐकत आलो आहोत पण ‘मुद्रा’ योजना एक अशी योजना आहे जी कोणत्याही भेदभावाविना मागास समाजाला आर्थिक आणि सामाजिक बळ देण्याचे, त्यांना सशक्त करण्याचे काम करत आहे.
जो प्रवासाचा तांडा बँकांकडून सुरू झाला होता, त्यात हळू हळू इतर संस्था समाविष्ट होत चालल्या आहेत. आज केवळ 110 बँकाच नाहीत, त्याव्यतिरिक्त 72 मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स(MFI) आणि 9 बिगर बँकिंग वित्तपुरवठा कंपन्या (NBFCs) देखील मुद्रा कर्ज देत आहेत. बँकांनी देखील मुद्रा कर्ज देण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचे काम केले आहे. कागदपत्र जमा करणे किचकट बनू नये यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे. स्वयंरोजगार प्राप्त बनणे आज एक अभिमानाची बाब बनली आहे आणि याचे प्रेरणास्रोत तुम्ही सर्व जण आहात.


