

मित्रांनो
रस्त्यावरील फेरीवाले, पदपथावरील विक्रेते आणि हातगाड्यांवर काम करणारे तुमच्यासारख्या लाखो कुटुंबातील लोक शहरांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत. तुमच्यापैकी बहुतेकजण, आपल्या खेड्यातून येऊन शहरांमध्ये हे काम करतात. ही जी पीएम स्वानिधी योजना आहे ती केवळ बँकांना जोडण्याचा कार्यक्रम नाही. तर यामुळे लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचाही थेट लाभ मिळत आहे. तुमच्या सारख्या सर्व मित्रांना मोफत राशन, मोफत उपचार आणि मोफत गॅस जोडणीची सुविधा मिळत आहे. शहरांमध्ये नवीन शिधापत्रिका बनवणे हे काम करणाऱ्या सहकाऱ्यांसमोर किती मोठे आव्हान होते हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तुमची समस्या सोडवण्यासाठी मोदींनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजना आणण्यात आली आहे. आता एकाच शिधापत्रिकेवर देशात कुठेही रेशन मिळते.

मित्रांनो
फेरीवाले, पदपथावरील विक्रेते, हातगाड्यांवर काम करणारे बहुतेकजण झोपडपट्टीत राहतात. मोदींनीही याचीही काळजी वाहिली आहे. देशात बांधण्यात आलेल्या 4 कोटींहून अधिक घरांपैकी सुमारे एक कोटी घरे शहरी गरिबांना देण्यात आली आहेत. देशातील विविध शहरांमध्ये गरिबांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे. राजधानी दिल्लीत झोपडपट्ट्यांच्या जागी कायमस्वरूपी घरे देण्यासाठी भारत सरकारही मोठी मोहीम राबवत आहे. दिल्लीत 3 हजारांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, साडेतीन हजारांहून अधिक घरे लवकरच पूर्ण होणार आहेत. दिल्लीतील अनधिकृत वसाहतीं नियमित करण्याचे कामही वेगाने पूर्ण केले जात आहे. अलीकडेच भारत सरकारने पीएम सूर्यघर- मोफत वीज योजना देखील सुरू केली आहे. या योजनेंतर्गत छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण मदत करेल. यामुळे 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. उरलेली वीज सरकारला विकून कमाई होईल. या योजनेवर सरकार 75 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
मित्रांनो
केंद्रातील भाजप सरकार दिल्लीतील गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी अहोरात्र झटत आहे. एकीकडे आम्ही शहरी गरिबांसाठी कायमस्वरूपी घरे बांधली, तर मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत केली. देशभरातील सुमारे 20 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशातील शहरांमधील वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. त्यासाठी देशातील डझनभर शहरांमध्ये मेट्रो सुविधेवर काम सुरू असून इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात आहेत. दिल्ली मेट्रोची व्याप्ती 10 वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे. जगात काही मोजक्याच देशांमध्ये दिल्लीइतके मोठे मेट्रो जाळे आहे. खरं तर, आता दिल्ली-एनसीआर देखील नमो भारत सारख्या वेगवान रेल्वे जाळ्याने जोडले जात आहे. दिल्लीतील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. केंद्र सरकार दिल्लीत एक हजाराहून अधिक इलेक्ट्रिक बसेस चालवत आहे. दिल्लीच्या आजूबाजूला आम्ही बनवलेले द्रुतगती मार्ग वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्याही कमी करत आहेत. काही दिवसांपूर्वी द्वारका द्रुतगती मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे दिल्लीतील मोठ्या लोकसंख्येचे जीवन सुसह्य होईल.

मित्रांनो
गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, हा भाजप सरकारचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. त्यासाठी गेल्या 10 वर्षांत प्रत्येक स्तरावर वातावरण तयार केले आहे. खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून देशभरातील सामान्य कुटुंबातील ते मुले आणि मुलीही पुढे येत आहेत, ज्यांना पूर्वी संधी मिळणे अशक्य वाटत होते. आज त्यांच्या घराजवळ चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्यांच्या प्रशिक्षणासाठी सरकार मदत करत आहे. त्यामुळे माझ्या गरीब कुटुंबातून येणारे खेळाडूही तिरंग्याचा मान उंचावत आहेत.
मित्रांनो
मोदी गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यात व्यग्र आहेत. तर दुसरीकडे, इंडी आघाडी आहे, जी मोदींना रात्रंदिवस शिव्याशाप देण्याच्या घोषणापत्रासह दिल्लीत एकवटली आहे. या इंडी आघाडीची विचारधारा काय आहे? त्यांची विचारधारा आहे कुशासन, भ्रष्टाचार आणि देशविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देणे. आणि मोदींची विचारधारा आहे लोककल्याणातून राष्ट्रीय कल्याण घडवून आणणे, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण मुळापासून उखडून टाकणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवणे. मोदींना कुटुंब नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मोदींसाठी देशातील प्रत्येक कुटुंब हेच त्यांचे कुटुंब आहे. आणि म्हणूनच आज सारा देश म्हणतोय – मी आहे मोदींचा परिवार!
मित्रांनो
देशातील सामान्य माणसाची स्वप्ने आणि मोदींचा संकल्प, हीच भागीदारी उज्ज्वल भविष्याची हमी आहे. पुन्हा एकदा दिल्लीतील जनतेचे आणि देशभरातील स्वनिधीच्या लाभार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शुभेच्छा, धन्यवाद.


