कोरोना संकटाच्या काळात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारतीय स्टार्टअप्सच्या योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला’ संबोधित करत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की 45 टक्के स्टार्टअप्स दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये आहेत आणि ते स्थानिक उत्पादनांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करतात. प्रत्येक राज्य स्थानिक शक्यतांनुसार स्टार्टअपला समर्थन व सहाय्य करत आहे आणि देशातील 80 टक्के जिल्हे आता स्टार्टअप इंडिया अभियानाचा एक भाग आहेत. पंतप्रधानांनी अन्न व कृषी क्षेत्रातल्या नवीन संभाव्यतेकडे लक्ष वेधले, कारण लोक आता आपल्या आहाराविषयी अधिक जागरूक होत आहेत. या क्षेत्रांच्या वाढीकडे भारताने विशेष लक्ष दिले असून एक लाख कोटींच्या भांडवलाच्या आधारे कृषी पायाभूत निधी उभारण्यात आला आहे. या नवीन संधींसह, स्टार्टअप शेतकर्यांशी सहकार्य करत आहेत आणि सुलभतेने आणि गुणवत्तेसह शेतातून बाजारात उत्पादने नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
पंतप्रधानांनी कोरोना संकटाच्या काळात आत्मनिर्भरतेमध्ये स्टार्टअप्सच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले. सॅनिटायझर्स, पीपीई किट उपलब्धता आणि संबंधित पुरवठा साखळ्या सुनिश्चित करण्यात स्टार्टअपने मोठी भूमिका बजावली. किराणा माल, घरपोच औषधे, आघाडीच्या कामगारांची वाहतूक आणि ऑनलाइन अभ्यास साहित्य यासारख्या स्थानिक गरजा भागवण्यात त्यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली. संकटात संधी शोधण्याच्या स्टार्टअप्सच्या भावना आणि आपत्तीच्या वेळी त्यांनी ज्या प्रकारे आत्मविश्वास वाढवला त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.


