"तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे"
"अधिनम आणि राजा जी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक पवित्र मार्ग सापडला - सेंगोलच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा मार्ग"
“1947 मध्ये थिरुवदुथुराईच्या अधिनम यांनी खास सेंगोल तयार केले. आज त्या काळातील चित्रे तामिळ संस्कृती आणि आधुनिक लोकशाही म्हणून भारताची नियती यातील घट्ट भावनिक बंधाची आठवण करून देत आहेत”
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रत्येक प्रतीकातून भारताला मुक्त करण्यासाठी अधिनमने तयार केलेला सेंगोल ही सुरुवात होती.
"सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले"
" लोकशाहीच्या मंदिरात सेंगोलला त्याचे योग्य स्थान मिळत आहे"

नवीन संसद भवनात उद्या सेंगोल (राजदंड)ची स्थापना करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अधिनमकडून (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) आशीर्वाद घेतले.

अधिनमच्या उपस्थितीने आपल्या निवासस्थानाची शोभा वाढली असून ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान शिवाच्या आशीर्वादानेच त्याच्या सर्व भक्तांशी एकाच वेळी संवाद साधता आला, असे पंतप्रधानांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी अधिनम उद्या उपस्थित राहतील आणि आशीर्वाद देतील याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

तामिळनाडूच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे, असे ते म्हणाले. तामिळ लोकांमध्ये नेहमीच माँ भारतीची सेवा आणि कल्याणाची भावना होती मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांत तामिळ योगदानाला योग्य ती मान्यता दिली गेली नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आता या मुद्द्याला योग्य तो न्याय दिला जात आहे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या वेळी सत्ता हस्तांतराच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यासंदर्भात वेगवेगळ्या परंपरा होत्या, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “त्या वेळी अधिनम आणि राजा जी यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक पवित्र मार्ग सापडला - सेंगोलच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा मार्ग”, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्या व्यक्तींकडे सेंगोल होता त्यांच्याकडे देशाच्या कल्याणाची जबाबदारी आहे आणि त्यांनी कर्तव्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये याची जाणीव सेंगोलने करून दिली. त्यावेळी 1947 मध्ये थिरुवदुथुराई अधिनम यांनी खास सेंगोल तयार केला, असे त्यांनी पुढे नमूद केले. “आज त्या काळातील चित्रे तामिळ संस्कृती आणि आधुनिक लोकशाही म्हणून भारताची नियती यांच्यातील खोल भावनिक बंधनाची आठवण करून देत आहेत. ही गाथा इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा जिवंत झाली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. यावरून त्या काळातील घडामोडींना योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी मिळते. या पवित्र प्रतीकालाही कशी वागणूक दिली गेली हे देखील आपल्याला कळले आहे, असेही ते म्हणाले.

राजाजी आणि इतर विविध अधिनमांच्या दूरदृष्टीला पंतप्रधानांनी वंदन केले आणि शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रत्येक प्रतीकातून मुक्त करून देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात करणाऱ्या सेंगोलचे महत्त्व विषद केले. सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले आणि देश स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये सत्तेचे हस्तांतरण सूचित केले. भारताची भूतकाळातील गौरवशाली वर्षे आणि परंपरा याला सेंगोलने स्वतंत्र भारताच्या भविष्याशी जोडले आहे, हे सेंगोलचे आणखी एक महत्त्व आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

सेंगोलला जो सन्मान मिळायला हवा होता, तो दिला गेला नाही, त्याला प्रयागराजच्या आनंद भवन इथे ठेवण्यात आलं, आणि त्याचं प्रदर्शन “चालण्याची काठी’ असं केलं गेलं, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी व्यक्त केली. मात्र आमच्या सरकारला हे सेंगोल आनंद भवनात आणण्याची संधी मिळाली. यानिमित्त, आपल्याला ह्या सेंगोलची संसदेत स्थापना करतांना, भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास नव्याने पुनरुज्जीवित करण्याची संधी मिळते आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “आता सेंगोलला त्याच्या हक्काची जागा, म्हणजे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत स्थान मिळत आहे” असे मोदी म्हणाले. भारताच्या एका महान परंपरेचे प्रतीक असलेल्या या सेंगोलची स्थापना नव्या संसद भवनात केली जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे सेंगोल आपल्याला सातत्याने याचे स्मरण करून देईल की आपल्याला कर्तव्यपथावर चालायचे आहे आणि कायम जनतेला उत्तरदायी राहायचे आहे.

अधिनामांची अत्यंत महान आणि प्रेरणादायी परंपरा म्हणजे जिवंत पवित्र ऊर्जेचे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शैव परंपरेचा उल्लेख करत हे अधिनाम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या तत्वज्ञानाचे आचरण करत असल्याचे, पंतप्रधान म्हणाले. अनेक अधिनामांची नावे, हीच भावना व्यक्त करणारी आहेत की ही नावे, आपल्या पवित्र कैलास पर्वताशी संबंधित आहेत, जो खरे तर दूर हिमालयात आहे, मात्र तरीही, त्यांच्या हृदयात त्याला स्थान मिळाले आहे. महान शैव संत, तिरूमुलार कैलास पर्वतावरुनच, त्यांच्या शिवभक्तीचा संदेश द्यायला आले होते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी अनेक महान तामिळ संतांचा उल्लेख केला, ज्यांचा अलीकडेही उज्जैन, केदारनाथ आणि गौरीकुंड मध्ये उल्लेख केला जातो.

वाराणसीचे खासदार या नात्याने, पंतप्रधानांनी, धर्मपुरम अधिनामचे स्वामी कुमारगुरुपारा यांच्याविषयी माहिती देतांना सांगितले की ते तामिळनाडू इथून काशीला गेले होते, आणि बनारसच्या केदार घाटावर त्यांनी, केदारेश्वर मंदिराची स्थापना केली. तामिळनाडूतील थिरुप्पनंदल येथील काशी मठाचे नावही काशीच्या नावावर आहे. या मठासंबंधीच्या एका मनोरंजक गोष्टीवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी सांगितले की थिरुप्पनंदलचा काशी मठ यात्रेकरूंना बँकिंग सेवा प्रदान करत असे. कोणीही जाऊन  तामिळनाडूच्या काशी मठात पैसे जमा करू शकत असे आणि काशीमध्ये प्रमाणपत्र दाखवून पैसे काढू शकतो. “या प्रकारे, शैव सिद्धांताच्या अनुयायांनी, शिवाप्रती आपल्या भक्तीचा प्रसार तर केलाच, त्याच सोबत, एकमेकांना जवळ आणण्याचे कामही केले.” असे पंतप्रधान म्हणाले.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर देखील, अनेक वर्षांच्या तामिळ संस्कृती जिवंत ठेवण्यात अधिनाम सारख्या महान परंपरांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याचे श्रेय त्यांनी शोषित आणि वंचित घटकांना देखील दिले, ज्यांनी या संस्कृतीची जोपासना केली. "देशाला योगदान देण्यात आपल्या सर्व संस्थांचा गौरवास्पद इतिहास आहे. आता ही परंपरा पुढे नेण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांना यातून प्रेरणा देण्याची वेळ आली आहे," पंतप्रधान म्हणाले.

पुढच्या 25 वर्षांची ध्येये अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करत असताना, एक सशक्त, आत्मनिर्भर, सर्वसमावेशक आणि विकसित भारत तयार करण्याचे ध्येय आहे. देश 2047 चे ध्येय ठेवून देश मार्गक्रमण करत असताना अधीनामांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, कोट्यवधी देशवासियांना 1947 मध्ये अधिनामांनी बजावलेल्या भूमिकेचा पुन्हा परिचय झाला आहे. "तुमच्या संस्था कायम सेवेचे प्रतीक राहिल्या आहेत. लोकांना एकमेकांशी जोडण्यात, त्यांच्यात समानतेची भावना निर्माण करण्यात आपल्या संस्था कायमच पुढे राहिल्या आहेत," पंतप्रधान म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारताची शक्ती, देशाच्या एकतेवर अवलंबून आहे. देशाच्या प्रगतीत जे लोक अडथळे आणतात आणि विविध आव्हाने उभी करतात, त्या लोकांबद्दल पंतप्रधानांनी देशाला सतर्क केले. "जे लोक देशाच्या प्रगतीत अडथळे आणतात, ते आपली एकता तोडण्याचा देखील प्रयत्न करतील. मात्र, मला खात्री आहे की आपल्या संस्थांच्या माध्यमातून देशाला मिळत असलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना करू," पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI 2.0: India bets big on making more of the smartphone at home

Media Coverage

PLI 2.0: India bets big on making more of the smartphone at home
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2026
May 29, 2026

Every Sector, Every Citizen: How PM Modi’s Vision is Transforming India Across All Fronts