पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.

मागील वर्षात तमिळ संस्कृतीशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली, ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी तामिळनाडूतील हजारो वर्षे जुन्या गंगैकोंडा चोळपुरम मंदिरात पूजा-अर्चा केली. वाराणसीमधील काशी तमिळ संगमम् दरम्यान, त्यांना सांस्कृतिक एकतेच्या ऊर्जेची सतत जाणीव होत होती आणि ते त्या ऊर्जेशी जोडलेले राहिले, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंबन पुलाच्या उद्घाटनासाठी रामेश्वरमला भेट दिली तेव्हा आपण पुन्हा एकदा तमिळ इतिहासाची महानता अनुभवली, असे त्यांनी सांगितले. तमिळ संस्कृती हा संपूर्ण राष्ट्राचा आणि खरं तर, संपूर्ण मानवतेचा सामायिक वारसा आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की, ज्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेबद्दल ते अनेकदा बोलतात, ती पोंगलसारख्या सणांमुळे अधिक दृढ होते. जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये पिकांशी संबंधित एखादा सण साजरा केला जातो, असे पंतप्रधान म्हणाले. तमिळ संस्कृतीत शेतकऱ्याला जीवनाचा आधार मानले जाते, यावर त्यांनी भर दिला. 'थिरुक्कुरल' या ग्रंथात शेती आणि शेतकऱ्यांविषयी विस्तृत लेखन आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकरी राष्ट्रनिर्माणात महत्त्वाचे भागीदार आहेत आणि त्यांचे प्रयत्न 'आत्मनिर्भर भारत अभियाना'ला मोठी ताकद देत आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्यास वचनबद्ध आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पोंगलचा सण आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता बाळगण्याची केवळ भाषा शिकवत नाही;तर तो आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे,हे सुनिश्चित करतो, असे त्यांनी नमूद केले.भूमाता आपल्याला इतके भरभरून देत आहे,तर त्याचे संवर्धन करणे,ही आपली जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला.तसेच जमिनीचे आरोग्य जपणे,जल संवर्धन करणे आणि या संसाधनांचा संतुलित वापर करणे पुढील पिढ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मिशन लाईफ (Mission LiFE),एक पेड माॅं के नाम,अमृत सरोवर अशा मोहिमांचे महत्त्व सांगत,ते म्हणाले की या मोहिमा याच भावना अधोरेखित करत आहेत.सरकार कृषी व्यवसाय अधिक शाश्वत आणि अधिक पर्यावरण अनुकूल करण्यास प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात शाश्वत शेती पद्धती जल व्यवस्थापन यांचे महत्त्व वाढून ’प्रत्येक थेंबातून अधिक पीक (‘पर ड्राॅप मोर क्राॅप,) या त्यांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत नैसर्गिक शेती, कृषी तंत्रज्ञान यासह मूल्यवर्धित होईल असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.या सर्व क्षेत्रात नवकल्पनांसह युवावर्ग पुढे येत आहे,असे त्यांनी नमूद केले.काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमधे झालेल्या नैसर्गिक शेतीवरील एका परिषदेला उपस्थित असताना त्यांना, ‘व्यावसायिक जीवनातील महत्वाच्या पैलूंचा त्याग करून शेतीत काम करणाऱ्या तामिळ युवकाचे उत्तम कार्य’ दृष्टीस पडल्याचे स्मरण त्यांनी यावेळी केले. शाश्वत शेतीत क्रांती घडवून आणण्याच्या मोहीमेचा विस्तार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी शेती करणाऱ्या तामिळ युवक मित्रांना केले. आपली थाळी भरलेली असावी, आपले खिसे भरलेले असावेत आणि आपल्या भूमीचे रक्षण करणे हे आपले ध्येय असावे,यावर त्यांनी जोर दिला.

“तामिळ संस्कृती ही विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. इतिहासातून शिकवण घेत, तामिळ संस्कृती अनेक शतकांना एकत्र जोडत सध्याच्या काळात भविष्यातील वाटचालीला मार्गदर्शन करत आहे, असे त्यांनी सांगितले. यातून प्रेरणा घेत, सद्य भारत आपल्या मूलाधारांकडून शक्ती मिळवत पुढील शक्यतांचा दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी नमूद केले. जे राष्ट्र आपल्या संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले आहे, आपल्या भूमीचा सन्मान करते आणि ज्याला आपल्या भविष्याविषयी आत्मविश्वास आहे असा हा देश अधिकाधिक प्रगती करत आहे हा विश्वास भारताला पुढे नेत आहे याचा अनुभव आम्ही या पोंगल सणानिमित्त घेत आहोत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. तामिळ भाषेतून सर्वांना शुभेच्छा देत आणि पुनश्च सर्वांना पोंगल सणानिमित्त शुभेच्छा देत,आपली कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल सणानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसह केंद्रीय मंत्री श्री जी. किशन रेड्डी, श्री के. राममोहन नायडू, श्री अर्जुन राम मेघवाल आणि श्री व्ही. सोमण्णा उपस्थित होते.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Today, Pongal has become a global festival. pic.twitter.com/JSyTwUTi6b
— PMO India (@PMOIndia) January 14, 2026
Tamil culture is a shared heritage of the entire nation. pic.twitter.com/1aLcpAWore
— PMO India (@PMOIndia) January 14, 2026
In Tamil culture, the farmer is regarded as the foundation of life.
— PMO India (@PMOIndia) January 14, 2026
The Thirukkural speaks in detail about agriculture and the importance of farmers. pic.twitter.com/O2tsvUF4LO
Pongal inspires us to make respect for nature a way of life. pic.twitter.com/XLm6V3lALn
— PMO India (@PMOIndia) January 14, 2026
India takes great pride in the vibrant Tamil culture. pic.twitter.com/7IoDIfovDL
— PMO India (@PMOIndia) January 14, 2026





