पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सुरत आणि नवसारी येथील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करत, पंतप्रधानांनी सर्व संबंधितांना स्मरण करून दिले की गुजरातच्या जनतेने सेवाभावाच्या भावनेला आपला पाठिंबा आणि मान्यता दिली आहे. हा अभूतपूर्व विजय मिळवून देणारी जनतेची साथ म्हणजे सेवा कार्याच्या ध्येयाला अधिक व्यापक करण्याचा जनादेश आहे असे सांगून त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अधिक जोमाने आणि अथक कार्य करण्याचे आवाहन केले. हा संकल्प साकारण्यासाठी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले. आपला संकल्प विकसित गुजरात आणि विकसित भारत घडविण्याचा आहे. देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहराचा विकास झाल्याशिवाय हा संकल्प पूर्ण होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, आज देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या सुरतमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. एकेकाळी प्लेगच्या साथीचा फटका बसलेल्या सुरत शहराचे रूपांतर आज स्वच्छतेसाठी ओळखले जाणाऱ्या शहरात झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींसह सर्व संबंधित घटकांनी गेल्या अडीच दशकांत केलेल्या निरंतर प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. प्लेगच्या साथीने ग्रासलेले हेच सुरत शहर आज स्वच्छतेसाठी ओळखले जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मोदी म्हणाले.

हरित भविष्याच्या दिशेने होणाऱ्या जागतिक वाटचालीत गुजरातने बजावलेल्या अग्रणी भूमिकेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, की 2009 मध्ये देशातील पहिला हवामान बदल विभाग आणि ऐतिहासिक चारंका सोलर पार्क स्थापन करण्यामागे राज्याची दूरदृष्टी होती. चक्राकार जल अर्थव्यवस्था, औद्योगिक वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया आणि गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेली 'वेस्ट टू वेल्थ' अर्थात कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती यांसारख्या उपक्रमांतून सुरत शहर 'प्रगती आणि निसर्ग यांचा समतोल' साधण्याच्या राष्ट्रीय मंत्राचे उत्तम उदाहरण ठरले आहे. भविष्यातील पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तापी बॅरेज प्रकल्पाला मिळालेल्या मंजुरीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला, तसेच इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील सुरतचा जलद विस्तार, वाढते मेट्रो जाळे आणि पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर चालणाऱ्या हजीरा औद्योगिक क्षेत्रातील आगामी ग्रीन स्टील उत्पादनाबाबतही त्यांनी आशा व्यक्त केली. "बसगाड्या इलेक्ट्रिक करण्यापासून ते हरित ऊर्जेचा वापर करून स्टीलचे उत्पादन करण्यापर्यंतची ही सर्व पावले सुरतची हरित शहर म्हणून असलेली विशिष्ट ओळख खऱ्या अर्थाने अधिक मजबूत करतील," असे मोदी म्हणाले.
महामारी, जागतिक संघर्ष आणि अस्थिर ऊर्जा पुरवठा साखळ्या अशा आपत्तींच्या दशकातील अभूतपूर्व आव्हानांचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. या प्रचंड जागतिक धक्क्यांचा खंबीरपणे सामना करणाऱ्या 140 कोटी भारतीयांचे त्यांनी कौतुक केले. भारताच्या ऊर्जा स्वावलंबनातील भरीव योगदानासाठी त्यांनी गुजरातला विशेष श्रेय दिले. देशाच्या 250 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेपैकी एक-पंचमांश (50 गिगावॅट) क्षमता हे राज्य निर्माण करते आणि ग्रीन हायड्रोजन व ग्रीन अमोनिया यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यास गुजरात सज्ज आहे, असे त्यांनी नमूद केले. सौर ऊर्जा, इथेनॉल मिश्रित इंधन, रेल्वेचे विद्युतीकरण, अणुऊर्जा, अत्याधुनिक वीज पारेषण जाळे आणि गॅस पाइपलाइन व बंदरांवरील साठवणूक क्षमतेचा प्रचंड विस्तार यांमधील ऐतिहासिक गुंतवणुकीचा आढावा मोदी यांनी घेतला. गेल्या बारा वर्षांत उभारलेल्या ऊर्जा क्षमतांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सध्याचे जागतिक संकट ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता किती आवश्यक आहे हे दर्शवते आणि गेल्या बारा वर्षांत देशाने निर्माण केलेली प्रचंड क्षमता आज मोलाची ठरत आहे," असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.

कार्यक्रमापूर्वी हाजिरा येथे केलेल्या दौऱ्याचा आढावा घेताना पंतप्रधानांनी या प्रदेशाचे वर्णन केवळ एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नव्हे, तर ऊर्जा, पोलाद, संरक्षण उत्पादन आणि जागतिक सागरी व्यापार यांचा समावेश असलेली एक व्यापक, समृद्ध व्यवस्था म्हणून केले. त्यांनी या सागरी-औद्योगिक केंद्राला 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाचा एक जिवंत पुरावा म्हणून संबोधले आणि आत्मनिर्भरता अभियानाची खिल्ली उडवणाऱ्या व ऐतिहासिकदृष्ट्या देशाला परकीय घटकांवर अवलंबून ठेवणाऱ्या देशातील निराशावादी गटांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

“जे लोक राष्ट्राच्या निर्धाराला सातत्याने हीन लेखतात, ते हे विसरतात की इतरांवर अवलंबून असलेला देश विकासाची ती महान उंची कधीच गाठू शकत नाही, ज्याचा तो हक्कदार आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.
आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी आधुनिक संचारसंपर्कावर सरकारचा असलेला तीव्र भर अधोरेखित करताना पंतप्रधानांनी समर्पित मालवाहू मार्गिका, बुलेट ट्रेन तसेच वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाचा नव्याने उद्घाटन झालेला टप्पा या महाप्रकल्पांचा औद्योगिक आणि व्यापारी विकासासाठी महत्त्वपूर्ण चालना देणारे असल्याचा उल्लेख केला.

ही पायाभूत सुविधा मोहीम मुळातच सर्वसमावेशक असून, दाहोद-बोदेली-वापी कॉरिडॉरसारख्या उपक्रमांद्वारे पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचत आहे, यावर त्यांनी भर दिला. छोटा उदेपूर, नर्मदा, भरूच आणि तापी या आदिवासी पट्ट्यांमध्ये चार पदरी महामार्ग आणून सरकार प्रवासाचा वेळ आणि मालवाहतुकीचा खर्च कमी करत आहे, त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सापुतारा यांसारख्या ठिकाणी शिक्षण, आरोग्यसेवा तसेच पर्यटनासाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देत आहे. ‘“आपल्या आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये आधुनिक संचारसंपर्क आणून आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की त्यांना शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि वाढीव कमाईच्या संधींसाठी उत्कृष्ट सुविधा मिळतील,”’ असे मोदी यांनी सांगितले.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Economy भी, Ecology भी। pic.twitter.com/XapW1PkrUV
— PMO India (@PMOIndia) June 5, 2026
बीते 12 वर्षों से देश में waste to wealth का एक बहुत बड़ा जन-आंदोलन चला है। pic.twitter.com/ME2KMiPcDu
— PMO India (@PMOIndia) June 5, 2026
Today, the world is facing an unprecedented set of challenges. But with the collective efforts of 140 crore Indians, the country continues to move ahead with confidence and optimism. pic.twitter.com/GUc3cj4UXA
— PMO India (@PMOIndia) June 5, 2026


