पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक त्रिची शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवर्तनकारी विकास प्रकल्पांच्या मालिकेचा शुभारंभ केला. एकूण पाच हजार सहाशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या या उपक्रमांमध्ये स्वच्छ ऊर्जा, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन आणि महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विस्तारीत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, याचा समावेश आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी "या प्रकल्पांमुळे ऊर्जा आणि संपर्क सुविधांमध्ये वाढ होईल त्याचबरोबर तामिळनाडूतील तरुणांसाठी हजारो रोजगार निर्माण होतील," या मुद्द्यांवर भर दिला.
शाश्वत ऊर्जा केंद्रस्थानी ठेवून, भारत पेट्रोलियमच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) नेटवर्कची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. जवळपास नऊ लाख घरांना आणि अगणित व्यावसायिक संस्थांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) पुरवून निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा कायापालट करणे हे या 3,700 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम होणार असल्याचे अधोरेखित करत, "अवघ्या आठ वर्षांत या प्रकल्पाचा पर्यावरणावर चार कोटी झाडे लावण्याएवढा सकारात्मक परिणाम होईल," असे मोदींनी नमूद केले
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेन्नईतील लुब्रिकंट ब्लेंडिंग प्रकल्पाचे राष्ट्रार्पण हे 'मेक इन इंडिया' उपक्रमाला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अशा प्रकारच्या जगातील सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक असलेला हा प्रकल्प राज्यातील आणि बाहेरील विविध उद्योगांकडून असलेली मोठ्या प्रमाणातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. "लुब्रिकंटच्या स्थानिक उत्पादनात वाढ झाल्यामुळे आयात कमी होऊन देशासाठी पैशांची बचत होईल," असे मोदींनी नमूद केले.

पंतप्रधानांनी ग्रामीण संपर्कतेचे महत्त्व अधोरेखित करत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या 370 किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन केले. या रस्त्यांमुळे गावकऱ्यांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि बाजारपेठांपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था मुख्य प्रवाहाशी जोडली जाईल.
या संदर्भात पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक रस्ता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देतो आणि जीवनमान सुलभ करतो.”
प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी गंगईकोंडा चोलापूरम येथे नवीन महामार्ग बायपास प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचा उद्देश सम्राट राजेंद्र चोल यांनी बांधलेल्या आणि युनेस्कोने मान्यता दिलेल्या भव्य मंदिराचे संरक्षण करणे हा आहे. जड वाहतूक या पवित्र स्थळापासून वळवून स्मारक आणि पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.

नवीन पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधान म्हणाले, “यामुळे सर्वांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित होईल.”
भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी राज्यातील वाहतूक क्षेत्राच्या वेगवान आधुनिकीकरणाचा उल्लेख केला. अमृत भारत कार्यक्रमांतर्गत अलीकडेच आठ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्यात आला आहे.
आज नागरकोइल, कोयंबतूर, रामेश्वरम, तिरुनेलवेली, मायिलादुथुराई आणि कारैकुडी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना इतर प्रदेशांशी जोडणाऱ्या नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे पर्यटन आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळेल.
राज्याच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान म्हणाले, “राज्याच्या प्रगतीसाठी आम्ही दिवस-रात्र काम करत आहोत आणि पुढेही तसेच करत राहू.”


