नव्या प्रकल्पांमुळे या भागातील संपर्क व्यवस्था सुधारून, परिसरातील सामाजिक-आर्थिक विकासाला मिळेल चालना : पंतप्रधान
पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळून, ते गावांना बाजारपेठांशी, शेतकऱ्यांना नवीन संधींशी आणि तरुणांना रोजगाराशी जोडतात : पंतप्रधान
सौर ऊर्जा प्रकल्पांच्या वेगवान विकासामुळे गुजरात जगामध्ये नवीकरणीय ऊर्जेचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्‍याचा सुदिन लवकरच : पंतप्रधान
जगभरामध्‍ये भारताच्या विकास आणि प्रगतीच्या गाथेबद्दल चर्चा करताना, 'गुजरात मॉडेल'ची प्रशंसा होते; विकासासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प जितके महत्त्वाचे आहेत, तितक्याच कल्याणकारी योजनाही महत्त्वाच्या असल्याचे गुजरातने केले सिध्‍द : पंतप्रधान
जोपर्यंत पंचायत ते संसद या स्तरांवर परस्पर विश्वास कायम राहील, तोपर्यंत विकासाची ही 'सुपरफास्ट एक्सप्रेस' याच वेगाने धावत राहील: पंतप्रधान
आज जगातील अनेक देश युद्ध, अशांतता आणि अस्थिरतेचा सामना करत असताना, भारताने आपली स्थिरताच टिकवून ठेवली नाही, तर दररोज विकासाच्या मार्गावरून देशाची पुढची वाटचाल सुरू : पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000  कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले; तसेच काही प्रकल्पांचे  भूमिपूजन केले. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच साजरा  झाला असून, आज 'भगवान महावीर जयंती' देखील आहे, याची नोंद घेत पंतप्रधानांनी 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी प्रथमच थेट 'दीसा हवाई तळा'वर उतरण्याचा योग आल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच, पंतप्रधानांनी दीसा तळाचे मोक्याचे असलेले स्थान या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 130 किलोमीटर अंतरावर हा तळ आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की शेतकऱ्यांनी जरी या प्रकल्पासाठी आपली जमीन स्वेच्छेने दिली होती, तरीही दीसा विमानतळाच्या विस्ताराचे काम अनेक दशकांपासून रखडले होते.  "हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे श्रेय आमच्या सरकारला जाते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, हा विमानतळ विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असून, राष्ट्रासाठी एक प्रमुख सामरिक संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 

वाव-थराद आणि बनासकांठा क्षेत्राशी  आपले गाढ व्यक्तिगत  ऋणानुबंध असल्याची  आठवण करून देताना, पंतप्रधानांनी आपण ज्या काळामध्‍ये  'संघटन कार्यकर्ता' म्हणून काम केले, त्या दिवसांमधल्या आठवणी  सांगितल्या. त्या काळामध्‍ये  नरेंद्र मोदी या भागातल्या  गावांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करीत असत. त्या प्रदेशातील माता आणि भगिनींनी अत्यंत प्रेमाने तयार केलेले बाजरीच्या  रोटली, तूप, गूळ आणि शिरा या खाद्यपदार्थांची  त्यांनी  मोठ्या आपुलकीने आठवण काढली.
या प्रदेशाच्या विकासाशी असलेल्या आपल्या 25 वर्षांच्या संबंधांचे सिंहावलोकन करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की मुख्यमंत्री म्हणून ज्या विकासाच्या साखळीची सुरुवात करण्याचे भाग्य आपल्याला लाभले होते, ती साखळी आजही अखंड सुरू राहिली आहे; आणि 2014  पासूनच्या इथे आलेल्या  सरकारांनी  तिला आणखी बळकटी दिली आहे. आज सुरू करण्यात आलेले प्रकल्प ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा विस्तार करणारे आहेत, हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी ठामपणे म्हणाले, "20,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प या संपूर्ण परिसराचे चित्रच पालटून टाकतील आणि येथील जनजीवनाला नवी गती देतील."
रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांची सविस्तर माहिती देताना, पंतप्रधानांनी इडर ते वडाली बायपासपर्यंतच्या चौपदरी महामार्गाचा, धोलावीरा ते संतालपूर महामार्गाच्या आधुनिकीकरणाचा आणि संपूर्ण अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती महामार्ग  कॉरिडॉरच्या लोकार्पण सोहळ्याचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या दळणवळण सुविधांमुळे उद्योग, गुंतवणूक आणि संधी आपोआपच चालत येतात, यावर त्यांनी विशेष भर दिला. रेल्वे दळणवळणाबाबत बोलताना, त्यांनी हिम्मतनगर ते खेडब्रह्मा दरम्यानच्या 'गेज रूपांतरण' प्रकल्पाकडे लक्ष वेधले. या प्रकल्पामुळे  उत्तर गुजरातचा आदिवासी भाग देशाच्या 'ब्रॉड गेज' रेल मार्ग जाळ्याशी जोडला गेला आहे. खेडब्रह्मा, हिम्मतनगर आणि असरवा यांना जोडणाऱ्या नवीन रेल  सेवेच्या शुभारंभाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. "ज्यावेळी गावे बाजारपेठांशी जोडली जातात, त्यावेळी शेतकरी संधींशी जोडले जातात आणि तरुण रोजगाराशी जोडले जातात. आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने विकास साधला जातो," असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी यावेळी  नमूद केले.
 

औद्योगिक विकास तसेच नव्या गुंतवणुकीला चालना देण्यात उर्जेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत पंतप्रधान खावडा नवीकरणीय उर्जा पार्कशी जोडलेल्या पारेषण प्रकल्पाबद्दल बोलले. हा प्रकल्प 4.5 गिगावॉट वीज निर्माण करणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांनी वर्ष 2010 मध्ये चारंका येथे देशातील पहिल्यावहिल्या सौर पार्कची सुरुवात केली होती, अशी आठवण सांगत पंतप्रधान म्हणाले की त्या प्रारंभिक उपक्रमाने नवीकरणीय उर्जा क्षेत्रात गुजरातच्या विद्यमान नेतृत्वाची पायाभरणी केली. “ज्या दिवशी गुजरात नवीकरणीय उर्जेचे प्रमुख जागतिक केंद्र बनेल, तो दिवस आता दूर नाही,” अशी ग्वाही  पंतप्रधानांनी दिली.
मोदी त्यांचे निरीक्षण नोंदवत म्हणाले की जेव्हा जग भारताच्या विकासगाथेची चर्चा करते तेव्हा ‘गुजरात मॉडेल’चे मोठ्या प्रमाणात कौतुक होते कारण या मॉडेलने दाखवून दिले आहे की पायाभूत सुविधा विकास आणि लोक कल्याण यांनी हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. आजच्या कार्यक्रमात सुमारे 40,000 कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्की घरे मिळाली आहेत याची नोंद घेत ते म्हणाले, “एक पक्के घर त्या कुटुंबाच्या जीवनात जो बदल घडवते तो लाभार्थ्यांच्या चेहेऱ्यांवर स्पष्ट दिसून येतो, रस्ते आणि महामार्ग तर बांधायलाच हवेत, पण सर्वसामान्य व्यक्तीचे राहणीमान देखील सुधारले पाहिजे.”
 

एकेकाळी उत्तर गुजरातने सोसलेल्या दशकांच्या दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईसारख्या संकटांचे स्मरण करत,  जेव्हा महिलांना पाणी आणण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत जावे लागत असे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमांचा योग्य मोबदला मिळत नसे अशा काळाबद्दल पंतप्रधानांनी चर्चा केली. नशिबावर मात करण्याचा निर्धार केलेल्या गुजरातच्या जनतेच्या जिद्दीचे त्यांनी कौतुक केले आणि सुजलाम सुफलाम योजना तसेच नर्मदेच्या पाण्याचा विस्तार यांना परिवर्तनकारी उपक्रम म्हणून अधोरेखित केले. “आज इथला शेतकरी एकाच पिकावर अवलंबून नाही, आघाडीचा बटाटा उत्पादक प्रदेश म्हणून बनासकांठाचा उदय, हे स्वतःच एक असे उदाहरण आहे,”पंतप्रधान मोदींनी दुजोरा दिला.
गुजरातची सलग 25 वर्षांच्या विकासात्मक वाटचाल साजरी करत, या राज्याने सातत्याने विक्रम केले आणि स्वतःचेच विक्रम मोडले, याची पंतप्रधानांनी नोंद घेतली. सुमारे 650 कोटी रुपयांच्या तरतुदीसह 2005 हे वर्ष ‘शहरी विकास वर्ष’ म्हणून साजरे केल्याची आठवण सांगत पंतप्रधान म्हणाले की आता ही तरतूद 33,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. राज्यातील 9 नव्या महानगरपालिकांसाठी सुमारे 300 प्रस्तावांना मान्यता, 72 महानगरपालिकांचे अद्ययावतीकरण आणि राज्याचा 4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचा  अर्थसंकल्प यांकडे निर्देश करत, हा विकास राज्यातील प्रत्येक गाव, नगर आणि शहरापर्यंत पोहोचेल अशी ग्वाही त्यांनी दिली. “जोपर्यंत पंचायतीपासून संसदेपर्यंत प्रत्येक संस्थेवर तुमचा विश्वास आहे, तोपर्यंत विकासाची ही सुपरफास्ट एक्स्प्रेस याच वेगाने धावत राहील,” असे मोदींनी सर्वांना आश्वस्त करत सांगितले.
 

जागतिक परिस्थितीकडे बोलण्याचा रोख वळवत, पंतप्रधान म्हणाले की जगात अनेक देश युध्द, अस्थिरता आणि इंधनांच्या चढत्या दरांमुळे त्रासलेले आहेत, अगदी महासत्ता म्हणवणाऱ्या देशांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत, पण भारताने मात्र यशस्वी परराष्ट्र धोरण आणि नागरिकांच्या ऐक्याच्या बळावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
कोविड साथरोगाच्या काळात देशाने दिलेल्या एकजुटीच्या प्रतिसादाची अथवा करून देत, सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील नागरिकांनी एकमेकांसोबत उभे राहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जग संघर्ष करत असताना भारताने स्थैर्य तर राखलेच, पण दर दिवशी आपला देश विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे, आणि आजचे प्रकल्प हे या निर्धाराचे आणखी एक उदाहरण आहे, असे, भाषण संपवताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub

Media Coverage

Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance